Tuesday, August 10, 2010

म्हणूनच...

केबीनमधून खाडकन आवाज आल्याने बाहेरचे सगळे काम टाकून केबीनच्या दिशेने धावले. तेवढ्यात केबीनचे दार धाडकन ढकलून "तो' रुबाबदार तरूण बाहेर आला. त्याने बाहेर जमलेल्यांवर तुच्छतेने एक नजर टाकली आणि तो तडक तेथून बाहेर पडला. त्याला पाहत पाहत केबीनबाहेर जमलेही आपापल्या जागेवर जाऊन बसले.
--
"तो' घरी आला. कोपऱ्यात शुज काढत त्याने हातातली फाईल टेबलवर ठेवली. कानावर आई म्हणत असलेला श्‍लोक पडल्याने त्याला जरा बरे वाटले आणि मघाच्या प्रसंगाने तापलेलं डोकं काहीसं शांत झालं. त्यानं कपडे काढले आणि तो फ्रेश झाला. त्याच्या येण्याची चाहूल लागल्याने आईने त्याचा अंदाज घेतला आणि अटोपते घेत चहा टाकला.

कशी काय झाली मुलाखत?
ठीक. (आईच्या प्रश्‍नावर त्याने रुक्षपणे उत्तर दिलं)
आज पण काही....म्हणत आईनं त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि तिचं वाक्‍य अर्धवटच राहिलं...
आई! तुला माहित आहे...तरी तू मला तोच प्रश्‍न का विचारतेस?
राहिलं बाबा ! तुला जे योग्य वाटेल ते कर!
---
लक्ष्मीकांत येथेच राहतात का? बाहेरून कोणीतरी विचारले.
आईने बाहेर जाऊन पाहिले. दारात पोलिस.
हो..येथेच राहतो? काय झालं? काय काम आहे?
साहेबांनी त्यांना पोलिस ठाण्यात घेऊन यायला सांगितलंय!
आई कोण आहे गं?
अरे हे पोलिस तुला न्यायला आलेत बघ!
आई अगं घाबरू नकोस, मी पाहतो काय झालं ते!
तो बाहेर गेला, पुन्हा आत आला, "" आई तू जेवून घे, तो पर्यंत मी आलोच! चला!
"तो' पोलिसांबरोबर निघाला. त्याला आपण पोलिस ठाण्यात का निघालो आहोत याचा अंदाज आला; पण आईला त्याने काहीच सांगितले नाही. काही उपयोग होणार नव्हता त्याचा!
-----
या साहेब...बसा ! त्या कॉन्स्टेबलच्या कुत्सीत बोलण्याने त्याची विचारांची मालिका खंडित झाली. "तो' काहीसा दुखावला.
"मला येथे का बोलावलंय?'
आम्हाला वेळ जात नाही, वाईच गप्पा मारायच्या म्हणून ...(ही ही ही.)
त्याच्या हसण्याने खरंतर तो संतापला; पण त्याने संताप आवरला. कारणही तसंच होतं. त्याला पलीकडच्या मुख्य टेबलासमोर खुर्चीत बसलेला पाठमोरा माणूस दिसला.

"बसा! साहेब येऊ देत मग बघू तुमच्याकडे!'
"तो' काही बोलला नाही. शांत बसून राहिलां.
---
तेवढ्यात तेथील वरिष्ठ अधिकारी आले आणि खुर्चीत बसले! समोरच्या व्यक्तीबरोबर त्याचं काहीतरी बोलणं झालं.
तुकाराम..त्यांना घेऊन ये इकडं.
साहेबांनी बोलावलंय.
तो उठला आणि साहेबांपुढे जाऊन उभा राहिला?
""अरे लक्ष्मीकांत तू आणि इथं !''
"सर...मला घरातून बोलावून आणलं म्हणून आलो'
अरे तू आहेस... यांची तुझ्याबद्दल तक्रार आहे...तू म्हणे यांना मारहाण केलीस?
होय सर..मी यांच्या थोबाडीत दिली. त्याने थंडपणे सांगितले.
काय ऽऽऽ तुझ्याकडून अशा अपेक्षा नाहीत आणि तुला याचे परिणाम काय होतील याची कल्पना आहे नं! आणि तरीसुद्धा तू असं टोकांच पाऊल का उचललंस?
"सर तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे; पण आधी त्यांना कारण तरी विचारा'
"काय झालं म्हणून याने तुम्हाला थोबाडीत मारली' त्यांनी त्या व्यक्तीला विचारलं.
...मी यांची मुलाखत घेत होतो? काही प्रश्‍न विचारले बस्स! आणि याने मला थेट मारहाण केली.'
"सर एक मिनिट मी यांना मारहाण केलेली नाही. फक्त एक थोबाडीत लगावली आहे आणि ते ही मला नको तो प्रश्‍न विचारला म्हणून!'
असा काय प्रश्‍न विचारला म्हणून तू त्यांना मारलेस?
"सर विचारा त्यांनाच, त्यांच्या सडक्‍या मेंदूत काय शिजत होतं त्यांनाच माहित!'
"सर काय विचारलंत तुम्ही'
.............(काही वेळ शांततेत गेला)
सर ते काय बोलणार? साऱ्या जगाला ते तत्वज्ञान सांगतात आणि स्वतः वागताना मात्र खालची पातळी गाठतात.' माझी सर्व सट्रीफिकीट यांनी पाहिली. माझे मार्क्‍स पाहिले. ते पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की यांचा "कॅंडीडेट' माझ्यापुढे टिकाव धरू शकणार नाही. मग यांनी माझ्या सर्टीफिकीटवर वाचून पुन्हा-पुन्हा माझी "जात' विचारली. मी एकदा सांगितले तर मला ऐकू कमी येतं जरा मोठ्यानं सांगा म्हणत पुन्हा पुन्हा विचारलं ! मग मी मोठ्यानं सांगितलं. त्यानंतर त्यांनी माझ्यावर जातीवाचक शेरेबाजी केली. मग माझं डोकं फिरलं आणि दिली ठेऊन कानाखाली आता ते नक्कीच पुन्हा कधीच कोणाची "जात' विचारणार नाहीत. विचारा त्यांना.
-----
काय हे खरंय हे?
ती व्यक्ती काहीच बोलली नाही.

लक्ष्मीकांत जा तू... पुन्हा असे करू नकोस. रागावर कंट्रोल कर.
(थॅंक्‍यू सर म्हणून तो बाहेर पडला)
सर तुम्ही असं का केलंत? तुम्ही उच्चविद्याविभूषीत...तुम्ही या पदापर्यंत पोचलात ते कष्टाने, तुमच्या कर्माने. कधी तुमची "हलकी' जात तुमच्या आडवी आली नाही. तुम्हाला सुविधा मिळाल्या, तुम्हाला फायदा झाला म्हणून कोणीही तुमच्या विरोधात बोलल्याचं ऐकिवातही नाही. आम्ही सर्वच तुमचा आदर करतो. तुम्हीही "त्याच' चुका करू लागलात तर कशी सांधणार दुरावलेली मनं?
या तुम्ही. मला वाटतंय आता तुमची काही तक्रार उरली नसले. त्यांच्या उत्तराची अपेक्षा न करता त्यांनी दुसरी फाईल उघडली.

Monday, August 2, 2010

मनातला विठ्ठल!

पहाटे आजी नेहमीप्रमाणे मंदिरात गेल्या, पूजा झाली, काकड आरती झाली. मनोभावे त्यांनी विठ्ठलमूर्तीला नमस्कार केला; मात्र आज पुन्हा त्यांना विठ्ठलाच्या चेहऱ्यावर नेहमीचे तेज दिसलेच नाही. त्या पुन्हा अस्वस्थ झाल्या. गेल्या काही दिवसांत त्यांना विठ्ठलाच्या चेहऱ्यावर तेजच दिसत नव्हतं आणि असं का व्हावं हा विचार त्यांचा पिच्छा सोडत नव्हता. या विचारांच्या तंद्रीतच त्या मंदिरातून बाहेर पडल्या. रेंगाळतच पायऱ्या उतरून चालू लागल्या. पावसाची रिपरिप सुरू झाल्याने चालण्याचा वेग त्यांनी जमेल तसा वाढविला. दोन-चार मिनिटे चालल्यानंतर त्या राहत असलेल्या इमारतीजवळ आल्या. पायऱ्या चढून घरात गेल्या. काहीसा दम लागल्याने दाराजवळच खुर्चीत बसल्या. वेग घेतलेला श्‍वास लयीत येत असताना पुन्हा विठ्ठलमूर्ती आठवू लागल्या.
...पहाट असूनही आज एकादशीमुळे मंदिरात गर्दी होतीच; भक्तांची ये जा सुरू होती; बाहेर भिकारीही नेहमीपेक्षा जास्त दिसत होते. एखादा दुसरा भक्त त्यांच्या हातात चिल्लर भिरकावून निघून जात होता एवढंच. आज आपण पूजेला नेहमीपेक्षा जास्त वेळ दिला. प्रार्थना, अभंगही व्यवस्थीत म्हटले. निदान आज तरी गेले काही दिवस मनात सुरू असलेली अस्वस्थता कमी होईल असं वाटलं होतं, पण छे! असं का व्हावं? याचा विचार करताना त्यांच्या सुरकुतल्या चेहऱ्यावरील चिंतेचं जाळं आणखी दाट होत गेलं. मग मनाशी काय वाटलं! आणि त्या खुर्चीतून उठल्या. स्वयंपाकघरात गेल्या. पातेलं ठेवून त्यात आदण ठेवलं, चहा-साखर घातली, गॅस बारीक केला आणि पिशवी घेऊन होता होईल तेवढ्या वेगाने जिना उतरून खाली आल्या. जवळच्या डेअरीमध्ये जाऊन दुधाच्या पिशव्या घेतल्या आणि पुन्हा घर गाठले. एव्हाना चहा चांगलाच उकळला होता. आणलेलं दूध त्यांनी त्यामध्ये ओतलं. पुन्हा एकदा चहा चांगला उकळून घेतला. हातावर थेंब टाकून चव पाहिली. "ठिक जमलाय' असं दर्शवणारी मान आपसूक हलली. चहा किटलीत ओतला आणि किटली पिशवीत ठेवून त्या पायऱ्या उतरल्या आणि झपझप पुन्हा मंदिर गाठलं!
आता पाऊस थांबला होता; पण गारठा जाणवत होताच. मंदिरातली लगबग सुरूच होती. त्या भिकाऱ्यांजवळ गेल्या आणि एकेकाला चहा देऊ लागल्या. वीस-पंचवीस भिकाऱ्यांना त्यांनी गरम-गरम चहा दिला. चहा वाटून झाल्यानंतर भिकाऱ्यांचे चेहरे पाहून त्यांच्या मनातला मघाचा विचारांचा कल्लोळ काहीसा कमी झाला. चेहऱ्यावरील चिंतेचं जाळं काहीसं सैलावलं. घरी जाण्यापूर्वी पुन्हा मंदिरात गेल्या. विठ्ठलाला हात जोडले आणि जायला निघाल्या. आता त्यांना विठ्ठलाच्या चेहऱ्यावर काहीसं स्मित दिसलं. त्यांना भास झाल्यासारखं वाटलं म्हणून त्यांनी निट निरखून पाहिलं, तर आज त्यांना खरंच विठ्ठलाचा चेहरा प्रसन्न दिसला. विठ्ठलाच्या चेहऱ्यावर त्यांना त्यांच्याच मनातले समाधान उमटून आलेलं दिसलं.