Tuesday, December 21, 2010

स्टॅंड लागलंय!

शीर्षक वाचून हा काय प्रकार? असा प्रश्‍न तुम्हाला नक्कीच पडला असेल. जरा थांबा खुलासा करतोच. त्याचं काय झालं परवा असाच बाईकवरून फेरफटका सुरू होता. ट्रॅफिकमधून वाट काढत निघालो होतो. एवढ्यात एक मोटरसायकलस्वार बाजूने पुढे निघून गेला, जरा घाईतच दिसला. त्याच्या पाठोपाठ एक सॅंट्रोवालाही पुढे गेला. दोन्हीही माझ्या अगदी नजरेसमोर. एवढ्यात सॅंट्रोवाल्याने गाडीचा वेग वाढविला आणि तो त्या मोटरसायकलस्वाराजवळ गेला आणि ओरडला,
भाईसाब स्टॅंड लागलंय!फ
मोटरसायकलस्वारानं खाली पाहिलं, मोटरसायकलचा वेग कमी केला. सराईतपणे स्टॅंड पायानं मागं ढकललं आणि सॅंट्रोवाल्याकडे पाहत अगदी मनापासून मान हलवून आभार मानून निघूनही गेला. त्याच्या आभार मानण्याने सॅंट्रोवाल्याच्या चेहऱ्यावर छानशी स्उिमटली आणि तोही त्याच्या मार्गे रवाना झाला.
बाब अगदी साधी पण मला खात्री आहे, आपणही अनेकदा असा प्रसंग पाहिलेला असेल. आपल्यापैकी काहींनी अनुभवलाही असेल. आपण कित्येकदा विसरतो तसंच हा मोटरसायकलस्वार कोठे तरी उभा राहिला असणार आणि त्यानंतर गाडीला कीक मारून सुसाट निघाला असणार. गडबडीत स्टॅंड काढायचं राहिलं असणार. नेमकं हेच त्या सॅंट्रोवाल्याच्या लक्षात आलं आणि तो पटकन मोटरसायकलस्वाराला धोसुचना देऊन मोकळा झाला.
मला प्रश्‍न पडला त्या सॅंट्रोवाल्यानं हे का सांगितलं? त्याचा काय संबंध? त्या मोटरसायकलस्वाराचं आणि त्याचं नातं काय? समजा त्या तशा स्टॅंडमुळे तो मोटरसायकलस्वार पडला असता, त्याला काही दुखापत झाली असती तरी त्या सॅंट्रोवाल्याचं काहीही बिघडलं नसतं किंवा त्याचं काही नुकसानही झालं नसतं. जे काही नुकसान झालं असतं ते मोटरसायकलस्वाराचं; पण...
दोस्तांनो हा पणफच इथं खूप महत्त्वाचा आहे. त्या सॅंट्रोवाल्याच्या साध्या कृतीनं माणुसकीचा झरा वाहता आहे, तो अद्याप आटलेला नाही हे अधोरेखीत झालं. लागलेल्या स्टॅंडमुळे तो मोटरसायकलस्वार पडेल आणि त्याला काही तरी इजा होईल, ही काळजी वाटल्याने सॅंट्रोवाल्याने त्याला तातडीनं सांगितलं. त्याच्यातल्या माणुसकीनं त्याला साद घालून तातडीनं व्यक्त होण्यास भाग पाडलं आणि कदाचित होऊ घातलेला एक अपघात, एखाद्या कुटुंबावर होणारा आघात टळला.
तर दुसरीकडे च्या बीजाची एका ह्रदयातून दुसऱ्या ह्रदयात आपसूक पेरणी झाली. धोका असताना दुसऱ्याला सावधान करण्याची साधी माणुसकी जपली पाहिजे हा संदेश एकाकडून दुसऱ्याकडे अगदी अलवारपणे पोचला. मला खात्री आहे आता पुन्हा तो मोटरसायकलस्वार दुसऱ्या कुणाच्या गाडीचे स्टॅंड लागलेलं दिसेल तेव्हा तातडीनं त्याला त्याबाबत सांगेल कारण आता तो मोटरसायकलस्वार या वाहत्या झऱ्यातील एक धार बनला आहे. त्याच्या परीने तो जेव्हा जेव्हा वेळ येईल तेव्हा हा झरा अखंड वाहता राहण्यासाठी प्रयत्नशील राहील.
या आणि अशा छोट्या-छोट्या बाबींमुळेच जगाचे रहाटगाडगे काहीसे व्यवस्थीत सुरू आहे. नाहीतर आजूबाजूला पाहिलं तर फारसं सुखावह चित्र दिसतच नाही; मग अशावेळी असे काहीसे निर्मळ झरे नजरेला पडतात आणि आपल्या पावित्र्याने आपल्यालाही त्याचा एक भाग बनण्यासाठी साद घालतात. मी ठरवलं आहे या सादेला प्रतिसाद देण्याचं!... तुम्ही?

Tuesday, December 14, 2010

सैर माडबनची


ही वाट दूर जाते... स्वप्नामधील गावा...
जैतापूरला अणुऊर्जा प्रकल्प होण्याचे नक्की काय झालं आणि "माडबन' साऱ्या जगभर प्रकाशझोतात आलं. कारण हा प्रकल्प होणार आहे माडबनच्या हद्दीमध्ये. कोकणातील टिपीकल छोटंसं खेडं असलेल्या माडबन आणि परिसरावर निसर्गानं सौंदर्याची अगदी मुक्त हस्ते उधळण केलेली आहे. माडबनच्या किनाऱ्यावरून पश्‍चिमेकडे समुद्राच्या लाटांशी झुंजणारा विजयदुर्ग पहावयास मिळतो. तर येथील समुद्र किनाऱ्याला असलेल्या सुरूच्या बनातूनच किनाऱ्यावर छोट्याशा पायवाटेच्या साथीने येता येते. पायवाट संपून जेव्हा आपण किनाऱ्यावर पोचतो तेव्हा आपले स्वागत स्वच्छ, शांत, सुरक्षीत मऊशार वाळूंचा किनारा करतो. या वाळूच्या अंगणात ठिकठिकाणी खेकड्यांनी रेखाटलेली नक्षी पहावयास मिळते. छोट्या छिद्रांभोवती रेखलेली ही नक्षी पाहण्याची मौज काही औरच. शांतपणे काठावर बसून पहात राहिलं तरी आपल्या डोळ्यांदेखत अशा नक्षी उमटून येताना पहावयास मिळते. तुरूतुरू धावणारे लहान-मोठे खेकडे या वाळूवर एकसे एक नक्षी रेखाटतात आणि त्यांच्या कलाकारीला दाद दिल्याशिवाय राहवत नाही. साधारण किलोमीटरभर लांबीच्या या किनाऱ्यावर अगदी निर्धोकपणे फिरण्याचा आनंद घेता येतो, तर कंबरेएवढ्या पाण्यात जाताना कसलीही भीती वाटत नाही. येथील पाण्याला तुलनेत ओढ कमी असल्यामुळे अगदी बिनधास्त पाण्यात फिरता येते; मात्र सोबत गावातील कोणीतरी असणं आवश्‍यक आहेच बरं. जर वातावरण स्वच्छ असेल तर विजदुर्ग किल्ल्याच्या परिसरातील हालचालीही आपण सहज पाहू शकतो.
साधारण साडेसातशे लोकसंख्या असलेलं माडबन टिपीकल कोकणी गाव. चिऱ्यातील घरे, त्यावर कौलारू छत, अंगणात आणि परसात माड, सुपारी, आंबा, काजू, रातांब्याची झाडे. स्वच्छ अंगण आणि प्रत्येक अंगणाला चिऱ्याच्या भिंतीचे कुंपण, त्याला लावलेला कुडाचा दरवाजा. गावाला लागूनच असलेली भाताची खाचरे. त्यातल्या त्यात सधन घरापुढे उभ्या गाड्या. भगवतीचे सुरेख मंदिर आणि तिची तेवढीच सुंदर, सुबक मूर्ती. उतारावरून गावात आल्यानंतर साऱ्या जगाशी कसलाही संपर्क नसलेलं सुंदर देखणं गाव. यावं प्रेमात पडावं आणि येथील होऊन जावं असं मनात रुतून बसणारं माडबन. (सध्या जैतापूर अणूऊर्जा प्रकल्पविरोधातील हालचालींचे प्रमुख केंद्र बनल्याने गाव शांतता हरवून बसले आहे)

हे आहे खेकड्याचे घर

खेकड्यांनी मिळून नक्षी काढून सजवलेला रुपेरी वाळूचा किनारा

हा सागरी किनारा...

कोकणातलं टिपीकल घर आपुलकीनं बोलावणारं