Saturday, July 30, 2011

बेभरवसा = भारतीय फलंदाजी (इंग्लंड डायरी)


भारतीय फलंदाजी आणि सलमान खान यांच्यामध्ये सर्वात मोठे साम्य कोणते असेल? दोघेही प्रचंड बेभरवशाचे. सलमान कधी शर्ट काढून सिक्‍स पॅक्‍स दाखवेल सांगता येत नाही आणि भारतीय फलंदाजी भक्कमपणे वाटचाल करत आहे, असे वाटत असताना कधी कोसळेल याचा नेम नाही. नॉटींगहॅमला दुसऱ्या कसोटीच्या शनिवारी दुसऱ्या दिवशी पहिल्या दोन सत्रांमध्ये इंग्लंड गोलंदाजीवर वर्चस्व गाजवून मोठी आघाडी मिळविण्याची स्वप्ने पाहणारी भारतीय फलंदाजी चहापानानंतर काही वेळात पत्त्याचा बंगल्याप्रमाणे कोसळली आणि पदरात पडली नाममात्र आघाडी. ज्या ब्रॉडला पहिल्या दोन सत्रांमध्ये द्रविड, लक्ष्मण आणि युवराज यांनी रट्टे दिले, त्या ब्रॉडची उधारी चुकती करायची असल्यासारख्या विकेटही टाकल्या. पाच बाद 267 धावा अशा भक्कम स्थितीतील संघ 288 मध्ये माघारी परतला होता. अवघ्या 21 धावांत पाच फलंदाज "तू आधी का मी आधी' अशा पद्धतीने भोंज्या शिवल्यासारखे मैदानावर जाऊन माघारी आले. फलंदाजीवेळी बॅट घेऊन आडवा आलेला ब्रॉड गोलंदाजी करताना अंगावर धाऊन आला. त्याला मग शिंगावर घेण्याची हिम्मत ना द्रविडला दाखवता आली ना युवराजला. रैना, सचिन, कर्णधार धोनी, हरभजन, प्रवीणकुमार आदींनी रजा पडू नये, म्हणून ज्याप्रमाणे मस्टरवर सही करून ऑफिसमध्ये उपस्थिती दाखवतात तशी येऊन हजेरी लावली. फलंदाजी केल्यासारखं दाखविलं आणि पुन्हा पॅव्हेलियनची वाट धरली. विक्रमादित्य सचिनचा बॅड पॅच शनिवारीही सुटला नाही. तो तिसऱ्यांदा ब्रॉडचा गिऱ्हाईक झाला. ब्रॉडने लॉर्डस्‌च्या खेळपट्टीप्रमाणे नॉटींगहॅमच्या खेळपट्टीलापण स्विंगचे अमिष दाखवून वश करून घेतले आणि कसोटी क्रिकेटमध्ये हॅटट्रीक नोंदविण्याची कामगिरी लिहिली. पडझड सुरू असताना खेळपट्टीवर नांगर टाकून शतक झळकावणारा आणि भारतीय फलंदाजीला आघाडीचा किनारा दाखविणाऱ्या राहुल द्रविडनेही (117)
आता बास झालं करत बॅट फिरवली आणि चेंडूने त्याला बरोबर गंडवले. संयम सुटला आणि त्याचा खेळ संपला. त्यापूर्वी त्याने युवराजबरोबर कामगिरी चोख बजावली खरी; पण अल्पसंतुष्टपणे त्याच्या माघारी जाण्याने या कसोटीवर वर्चस्वाची मोठी संधी भारताने गमावली ती गमावली. युवराजने अर्धशतकी (65) खेळी केली खरी पण अजूनही त्याला कसोटीसाठीचा संयम राखता येत नाही हे दिसून आले अर्थात ब्रॉडने त्याला टाकलेला चेंडूही तसाच अफलातून होता.
ज्या खेळपट्टीने वाकुल्या दाखविल्या त्याच खेळपट्टीला ब्रॉडने स्वींगने गुलाम बनविले. चेंडूला वेग देतानाच त्याने चेंडू फलंदाजाच्या बॅटपासून हळूच बाहेरही काढला. इनकटर आणि इनस्विंगचे शस्त्र त्याने वापरले आणि एकाच षटकात नाट्य घडवून भारतीय फलंदाजी कापून काढली. 46 धावांत सहा बळी घेत आपली भेदकता सिद्ध केली हे जसे खरे आहे, तसेच भारतीयांनी त्याच्या चेंडूचे अंदाज न घेता अत्यंत बेजबाबदार फटके मारले हे ही तितकेच खरे.

Friday, July 29, 2011

ब्रॉड आडवा आला (लंडन डायरी)



लॉर्डस्‌वर भारताला पराभूत करण्यामध्ये ख्रिस ब्रॉडचा वाटा मोठा होता. गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये त्याने धडाकेबाज कामगिरी करताना भारतीय संघाची भंबेरी उडवली होती. ज्या खेळपट्टीवर त्याच्या गोलंदाजीवर भारतीय फलंदाजांना खेळता आले नव्हते, त्याच खेळपट्टीवर भारतीय जलदगती गोलंदाजीचा मारा त्याने फोडून काढला. त्याने प्रायरसोबत भक्कम भागीदारी नोंदवताना भारताच्या पराभवाचा पाया रचला होता. आजही भारतीय संघ पूर्ण वर्चस्व मिळवण्याच्या वाटेवर असताना ब्रॉड भक्कमपणे आडवा आला आणि संघाला दोनशे धावांच्या पार नेले. ब्रॉड खेळला नसता तर इंग्लंडचा डाव दीडशेच्या आत खल्लास झाला असता; पण ब्रॉडने प्रवीणकुमार, इशांत आणि तेजतर्रार श्रीशांतसह हरभजनसिंगच्या गोलंदाजीचा यथेच्छ समाचार घेतला. त्याने जोरदार प्रतिआक्रमण करून भारताचे मनसुबे पुरते उधळून लावले. त्याने 66 चेंडूंमध्ये 64 धावा फटकावताना नऊ चौकार लगावले. त्याने हे आक्रमण रचताना स्वानला हाताशी धरले. संघाची धावसंख्या 124 असताना स्वान मैदानात उतरला होता. त्यानंतर दोघांनी भारतीय गोलंदाजीवर प्रहार करण्यास प्रारंभ केला. कुमारच्या गोलंदाजीवर मुकुंद झेल घेईपर्यंत संघाची धावसंख्या 197 वर पोचली होती. त्यानंतर अँडरसनच्या साथीने ब्रॉडने इंग्लंडला दोनशेचा टप्पा पार करून 221 वर पोचविले. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ब्रॉड गेल्या काही सामन्यांत कामगिरी करत आहे. विशेषतः जेव्हा संघ अडचणीत असतो तेव्हा तो अलीकडे खेळताना दिसतोय.
ब्रॉडचे प्रतिआक्रमण वगळता आज भारतीय गोलंदाजांची तारीफ करावी तेवढी थोडीच आहे. झहीरच्या अनुपस्थितीत संधी मिळालेल्या श्रीशांतने डोके शांत ठेवत गोलंदाजी करताना आपला क्‍लास आज तरी दाखवलाच. त्याच्या संगतीने इशांत आणि प्रवीणकुमारने नॉटिंगहॅमच्या जिवंत खेळपट्टीचा फायदा अगदी अधाशासारखा उठविला. भारतीय क्षेत्ररक्षकांनी दोन-तीन झेल सोडले नसते तर इंग्लंडला आणखी स्वस्तात तंबूत पाठविण्यात या जलद त्रिकुटाला नक्की जमले असते. तिघांनीही अचूक गोलंदाजी करताना स्विंगवर भर दिला. विशेष म्हणजे तिघांनीही टप्पा बिलकूल भरकटू दिला नाही. तिघेही एकमेकांना मार्गदर्शन करताना दिसत होते आणि हे चित्र निश्‍चितच सुखावणारे होते. झहीरच्या नसण्याचा कोणताही परिणाम होऊ न देण्याचा विडा तिघांनी उचलल्याप्रमाणे गोलंदाजी केली आणि मग बळीही समसमान वाटून घेतले. त्यामुळे हरभजनला फार काही करायची वेळ आली नाही. त्याने अखेरचा घाव घालताना ब्रॉडला बाद केले आणि सायबांना 221 धावांवर रोखले.



धावांची रास ओतायला हवी
सायबांना स्वस्तात बाद करण्यात जरी यश मिळाले असले तरी त्यांच्याकडे अँडरसन, ब्रॉडसारखे भेदक गोलंदाज आहेत हे विसरून चालणार नाही. हा सामना जिंकण्यासाठी जगातली सर्वात भक्कम फलंदाजी असल्याचे बिरूद मिळविणाऱ्या भारतीय संघाला धावांची रास ओतण्याची गरज आहे. पहिल्याच चेंडूवर मुकुंदला गमावणाऱ्या भारतीय खेळाडूंना किमान दोन मोठ्या भागीदाऱ्या या मैदानावर करण्याची गरज आहे. खेळपट्टीचा रंग पाहता हे काहीसे अवघड आहे; मात्र "धोनीसेनेला' हे करावेच लागेल; अन्यथा गोलंदाजांनी घाम गाळून जे कमावले ते फलंदाजांनी गमावले, असे म्हणण्याची वेळ भारतीयांवर येऊ शकते.

Thursday, July 28, 2011

लढाई अस्तित्वाची (लंडन डायरी)


कसोटी क्रमवारीत हा संघ अव्वल आहे. वेस्ट इंडीजमध्ये कसोटी मालिकाही जिंकलीय. वनडेचा विश्‍वकरंडकही पटकावलाय. अशा भारतीय संघाच्या इंग्लंड दौऱ्याची सुरवात पराभवाने झाली आणि कोट्यवधी क्रिकेटरसिक चुकचुकले. भारतीय संघाच्या अव्वल स्थानाविषयीच प्रश्‍नचिन्ह उभे केले जाऊ लागले. शुक्रवारपासून नॉटींगहॅमच्या वेगवान खेळपट्टीवर सुरू होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला अस्तित्वाची लढाई लढावी लागणार आहे. लॉर्डस्‌च्या खेळपट्टीने भारतीय फलंदाजांना खेळवले. त्यापेक्षा वेगळी परिस्थिती नॉटींगहॅमला नाही; मात्र येथे असणाऱ्या कोरड्या वातावरणाचाच पडला तर फरक पडू शकतो. तसे पाहता हे मैदान भारतीयांसाठी लकी आहे. या मैदानावर भारतीय संघाने इंग्लंडमधील विजय साकारलेला आहे. या मैदानावर सचिनची बॅटही चमकलेली आहे. या मैदानावर सचिनने सत्तरपेक्षा जास्त सरासरीने धावा करताना शतकही झळकावलेले आहे. हे सर्व जरी खरे असले तरी भारतीय संघापुढील मुख्य समस्या गोलंदाजीची आहे. झहीरखान नाही, हरभजन निष्प्रभ ठरतोय (अर्थात वेगवान खेळपट्टीवर त्याच्याकडून किती अपेक्षा करणार म्हणा), इशांत, प्रवीणकुमार प्रयत्न करताहेत पण ते पुरेसे नाहीत. झहीर खेळू शकणार नसल्यामुळे श्रीशांत किंवा मुनाफ पटेलला संधी मिळण्याची शक्‍यता आहे. श्रीशांतला संधी दिल्यास त्याचा "आक्रमक' स्वभाव उपयोगी पडू शकतो अर्थात तो गोलंदाजीमध्येच जास्त वापरला गेला तर. दुसरीकडे फलंदाजी भक्कम असली तरी गंभीर खेळणार की नाही या विषयी मोठे प्रश्‍चचिन्ह आहे. गंभीर न खेळल्यास युवराजसिंगला संधी मिळू शकते. युवराज संघात आल्यास मुकुंदसह पुन्हा एकदा द्रविडलाच सलामीला उतरावे लागणार हे नक्की.

लॉर्डस्‌वरील मोठ्या पराभवामुळे भारतीय संघाच्या एकूणच दर्जाविषयी प्रश्‍नचिन्ह उभारण्याची अहमहिका लागलेली आहे; मात्र त्याविषयी कोणतेही भाष्य न करता कर्णधार धोनीने सामन्याच्या पुर्वसंध्येला आम्ही सकारात्मक मानसिकतेने या सामन्यात उतरू असे सांगून प्रत्यक्ष मैदानातच उत्तर देण्याची मानसिक तयारी केल्याचे स्पष्ट होत आहे. यापूर्वीचा इतिहास पाहता अनेकदा भारतीय संघ परदेशी भूमीवर सलामीच्या सामन्यात अपयशी ठरल्यानंतर पुन्हा उसळून आला असून उत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न भारतीय संघाने केलेला आहे. नॉटींगहॅमच्या मैदानावरही अशाप्रकारेच भारतीय संघ पुन्हा एकदा उत्तम कामगिरीसाठी उसळी घेण्याची अपेक्षा आहे. हे जरी खरे असले तरी गेल्या सामन्यात भारतीय फलंदाजी कापून काढणाऱ्या अँडरसनची या मैदानावरील कामगिरी अफलातून अशी आहे. चार सामन्यात त्याने 28 बळी मिळविलेले आहे. त्यामध्ये चार वेळा त्याने पाचपेक्षा जास्त बळी मिळविलेले आहेत हे विसरून चालणार नाही. सध्या पूर्ण फॉर्मात असलेल्या अँडरसनचे हे फेव्हरीट मैदान आहे. त्याच्या जोडीला ब्रॉड आहेच. भारतीय संघाला पराभूत करून नंबर एकचा मुकुट हिसकावून घेण्यास स्ट्रॉस आणि कंपनी एकीकडे सज्ज होत असताना जिव्हारी लागलेल्या पराभवावर विजयाचे मलम लावून आम्हीच "नंबर एक' आहोत हे दाखवून देण्यासाठी भारतीय संघ नक्कीच प्रयत्न करेल अशी आशा आहे. पाहुया शुक्रवारी सकाळीच या फैसल्याला सुरवात होईल आणि मग नॉटींगहॅमच्या खेळपट्टीचे खरे रंग दिसायला सुरवात होईल.

Monday, July 25, 2011

फक्त रैनाच लढला! (लंडन डायरी)


लॉर्डसवरील कसोटीचा निकाल चौथ्याच दिवशी नक्की झाला होता. एकतर भारत हरणार किंवा सामना ड्रॉ राहणार हे स्पष्ट होते. पाचव्या दिवशी पराभवावर शिक्कामोर्तब झाले. चौथ्या डावामध्ये फलंदाजी करणे हे नेहमीच अवघड असते. त्यातही जर 458 धावांचे ओझे तुमच्या मानेवर असेल तर फलंदाजी करताना देव आठवणारच; मात्र जगातील सर्वात भक्कम फलंदाजी आणि कसोटी क्रमवारीतील क्रमांक एकच्या संघाकडून निदान प्रतिकार तरी होण्याची अपेक्षा होती. प्रत्यक्षात लक्ष्मणचा काहीसा आणि त्यानंतर रैना वगळता इतरांनी त्यांच्या लौकिकाला साजेसा खेळ केलाच नाही. त्यातही दैवाचे सगळे फासे भारताच्या विरोधातच पडले. एकतर गंभीर पूर्णतः तंदुरुस्त नसताना मैदानात उतरला आणि सचिन अंगात ताप असताना फलंदाजीला आला. त्यामुळे भारतीय फलंदाजीही डळमळली. कालच्या आश्‍वासक सुरवातीमुळे द्रविड आणि लक्ष्मण अखेरच्या दिवशीही भक्कम खेळी करतील ही अपेक्षा अँडरसनने मोडून काढली. पहिल्या डावात भारताचे वस्त्रहरण रोखणाऱ्या द्रविडला दुसऱ्या डावात फारशी संधीच मिळाली नाही. जखमी गंभीर मैदानात उतरला खरा पण कोपराच्या कळा सोसत त्याने कशीबशी 22 धावांची मजल मारली. त्यानंतर मात्र सचिन, लक्ष्मण, सचिन, धोनी, हरभजन यांना अँडरसन, ब्रॉड जोडगोळीने फारशी संधी दिली नाही. एकीकडे रैनाने नांगर टाकलेला असताना त्याला दुसऱ्या बाजूने पुरेशी साथच मिळाली नाही. त्याने ब्रॉड, अँडरसन, ट्रेमलेट स्वॉन यांचा मारा खेळून काढताना त्यांना चौकार लगावण्याचे धारीष्ट्यही दाखविले. या ऐतिहासीक सामन्यातील भारताचा पराभव आधी टाळण्याचा आणि नंतर लांबविण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. सराव सामन्यात शतक झळकवून लॉर्डस्‌वर खेळण्याची संधी मिळविलेल्या रैनाने दुसऱ्या डावामध्ये इंग्लंड गोलंदाजीचा कसून प्रतिकार केला. लढाऊ वृत्ती दाखवली. त्याने खेळपट्टीचा अंदा
ज घेऊन फलंदाजी केली. आक्रमक स्वभावाला पूर्णपणे मुरड घालून अत्यंत संयमाने फलंदाजी केली. 78 धावांच्या खेळीसाठी त्याने 136 चेंडू घेतले. तब्बल 207 मिनिटे त्याने किल्ला लढविण्याचा प्रयत्न केला. त्याच्या सोबत आणखी एक दोन मोठ्या भागीदारी झाल्या असत्या तर हा सामना भारतीय वाचवू शकले असते; मात्र प्रत्यक्ष मैदानात सायबांच्या गोलंदाजीने भारतीय फलंदाजीला खिंडार पाडले ते पाडलेच. एकटा रैनाच अखेरपर्यंत लढत राहिला. पहिल्या दिवसापासूनच अनेक बाबी भारतीय संघाच्या विरोधात गेल्या. झहीर जायबंदी झाला, गंभीर जखमी झाला, सचिन ताप अंगात असताना खेळला. तर गोलंदाजी करून काही प्रमाणात आपल्या गोलंदाजांना विश्रांती देण्याचा प्रयत्न करणारा कर्णधार धोनी फलंदाजी करताना दोन्ही डावांत सपशेल अपयशी ठरला. जिव्हारी लागला असला तरी या पराभवातून भारतीय संघ शिकेल आणि नॉटींगहॅममध्ये शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या कसोटीमध्ये पुन्हा नव्याने उभारी घेईल ही आशा आहे.

Sunday, July 24, 2011

कोण-कोण होणार तारणहार?(लंडन डायरी)


लॉर्डस्‌वरील कसोटीत चौथ्या दिवशी सकाळी भारतीय गोलंदाजीला अचानक धार आली आणि पहिल्या डावात पूर्णपणे निष्प्रभ ठरलेला इशांत शर्मा भेदक बनला. त्याने सायबांना गुंडाळून भारताला ड्रायव्हर सीटवर नेण्याचा जोरदार प्रयत्न केला. त्यामध्ये तो काही प्रमाणात यशस्वीही झाला; मात्र दुसऱ्या बाजूने तेवढ्याच ताकदीने साथ मिळाली नाही. साहेबांचे सहा गडी 107 धावसंख्येत तंबूत पाठविल्यानंतर इंग्लंड काहीसे बॅकफुटवर आले होते; मात्र पहिल्या डावाप्रमाणेच दुसऱ्या डावातही प्रायर आडवा आला आणि या वेळी त्याने ब्रॉडला सोबतीला घेतले. पहिल्या दोन तासांतील नूर दोघांनी नंतरच्या सत्रांमध्ये पूर्णपणे बदलून टाकला. पुन्हा एकदा भारतीय गोलंदाजीवर वर्चस्व गाजवून पाहता पाहता संघाची आघाडी चारशेच्यावर नेली; मात्र खेळपट्टी फलंदाजीला साथ देत आहे हे पाहून स्ट्रॉसने डाव लगेच सोडण्याची घाई केली नाही. मग मिळालेल्या संधीचा फायदा उठवून प्रायरने लॉर्डस्‌च्या यादीत आपले नाव कोरताना सुरेख शतकी खेळी साकारली. संघाला पुन्हा ड्रायव्हरसीटवर नेताना त्याने व ब्रॉडने भारतीय गोलंदाजी फोडून काढली. धोनीने पुन्हा एकदा गोलंदाजी करून ही जोडी फोडण्याचा प्रयत्न केला; मात्र प्रायर-ब्रॉडपुढे कोणाचीच डाळ शिजली नाही. अखेरचा सुमारे दोन तासांचा खेळ शिल्लक असताना प्रायरने शतक पूर्ण केले आणि स्ट्रॉसने त्यांना बाल्कनीतून माघारी येण्याची खूण केली.
कसोटी वाचविण्यासाठी चौथ्या दिवसाचे अखेरचे दोन तास आणि पाचवा संपूर्ण दिवस खेळण्याचे आव्हान घेऊन मैदानात उतरणाऱ्या भारतीय संघाला पहिल्या डावातील तारणहार द्रविडला-मुकुंदसह सलामीला उतरवावे लागले. प्रायरच्या स्विपवर गंभीरच्या कोपरावर बसलेला जोरदार तडाखा सहन न होण्यासारखाच होता. द्रविडने मुकुंदसह परवाची उर्वरीत खेळीच सुरू केल्याप्रमाणे सुरवात केली. पहिल्या चेंडूपासूनच तो मस्तपैकी सेट होऊन खेळला. मुकुंदने आश्‍वासक सुरवात केली; पण अनुभवाची कमतरता जाणवली आणि पुन्हा एकदा चेंडू स्टंपवर ओढवून तो बाद झाला. त्यानंतर लक्ष्मण मैदानावर आला आणि भारताच्या या सिनीयर जोडीने दिवसभरात भक्कमपणे किल्ला लढवून कोणतेही खिंडार पडू ने देण्याची काळजी घेतली. विशेष म्हणजे कसोटी वाचविण्याचे ओझे डोक्‍यावर असताना दोघांनी अत्यंत पॉझीटीव्ह खेळ केला. लक्ष्मणने एका षटकात सलग तीन चौकार मारून सामना जिंकण्यासाठीही प्रयत्न करता येऊ शकतो हे दाखवून दिले. आता अखेरच्या दिवशी सामना वाचविण्यासाठी संघासाठी तारणहार होण्याची भूमिका कोण-कोण बजावतो हे पहावे लागेल. त्याचबरोबरीने कोलकत्त्यात ज्याप्रमाणे लक्ष्मणने काही वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पिछाडीवरून येऊन भारतीय संघाला जिंकून दिले होते तसा पराक्रम आताही करणार का हीच उत्सुकता आहे. त्यासाठी 378 धावांचा डोंगर पार करण्याची अवघड कामगिरी त्यांच्यापुढे असेल आणि आणि जेव्हा-जेव्हा भारतीय संघ संकटात सापडला आहे तेव्हा लक्ष्मण त्याच्या पूर्ण क्षमतेने बचावासाठी धावल्याचा लौकिक आहे. अखेरच्या दिवशीही तो आपला हा लौकिक द्रविडच्या साथीने कायम ठेवेल अशी अपेक्षा आहे. फक्त या दोघांसोबत सचिन, धोनी, रैना आणि जखमी गंभीर यांनीही आपला वाटा उचलण्याची आवश्‍यकता आहे.

Saturday, July 23, 2011

द्रविड कृष्ण बनून आला (लंडन डायरी)


लॉर्डसच्या खेळपट्टीने तीन दिवसांत वेगवेगळे रंग दाखवले. पहिल्या दिवशी झहीर, दुसऱ्या दिवशी पीटरसन तर तिसऱ्या दिवशी तिने ब्रॉडला सहकार्य केलं. तिचा नेमका रंग काय या बाबत अंदाज बांधणेच अवघड बनले आहे. एकीकडे ब्रॉड आणि ट्रेम्पलेटला पूर्ण सहकार्य करत असतानाच तिने द्रविडचा हातही अखेरपर्यंत मुळीच सोडला नाही. म्हणजे जो कर्तृत्व दाखवेल त्याच्या पाठीशी "ती' असंच काहीसं दृष्य गेल्या तीन दिवसांत दिसलं आणि आपल्याला क्रिकेटची पंढरी का म्हणतात ते दाखविले.
झकास ओपनींग देऊन भारतीय सायबांना चोख उत्तर देणार असं वाटत असतानाच स्टुअर्ट ब्रॉडने खेळपट्टीला स्वींगची लालूच दाखविली आणि पाहता पाहता उभा राहू पाहत असणारा डाव पुरता विस्कटला. मुकुंद अर्धशतक पूर्ण करता करता राहिला तर गंभीरला लय सापडत असताना गेला. मुकुंदच्या रुपाने कसोटीसाठी आणखी एक सलामीवीर मिळू शकेल याची चुणुक दिसली. ज्याच्या महाशतकाची वाट क्रिकेटरसिक पाहत होते त्या सचिनने सुरवात झकास केली; मात्र ब्रॉडने या मैदानावरील आधीची सर्वोच्च धावसंख्याही त्याला गाठू दिली नाही. लक्ष्मण आणि रैना मैदानावर अगदी पाहुण्यासारखे आले. उपस्थिती लावली आणि विकेटचा आहेर देऊन गेले. कर्णधार धोनीने प्रयत्न केले; पण त्याची बॅटही शांत केली गेली. एकीकडून इंग्लीश गोलंदाजांकडून जगातल्या अव्वल संघाचे वस्त्रहरण सुरू असताना क्रिकेटरसिकांनी राहुल द्रविडचा धावा सुरू केला आणि द्रविड कृष्ण बनून धावला. त्याने भारतीय संघाची अब्रू झाकण्यासाठी मैदानावर घट्ट नांगर रोवला. एक-एक धावेचे वस्त्र तो भारतीय फलंदाजीभोवती गुंडाळत राहिला आणि फालोऑनची नामुष्की टाळून त्याने संपूर्ण वस्त्रहरण रोखले. शतकी खेळी करून या मैदानावर शतक ठोकण्याचा पंधरा वर्षांचा वनवासही त्याने संपविला. सचिन मैदानात आल्यानंतर ज्या प्रमाणे त्याच्याबद्दलच्या अपेक्षांनी टाळ्या वाजल्या. त्यापेक्षा जास्त टाळ्या द्रविडने मैदानातून बाहेर जाताना घेतल्या. एक दोन अपवाद वगळा पूर्णतः निर्दोष खेळी त्याने सादर करून लॉर्डसच्या यादीत नाव कायमचे कोरले. मैदानावर तो भींतीसारखा उभा राहिला आणि या भिंतीवर ब्रॉड, ट्रेम्पलेट प्रभूतींना डोके आपटण्यास भाग पाडले. पंधरा चौकारांची नजाकत, वेळेनुरूप संयम आणि समोरील जोडीदाराला बरोबर घेऊन जाण्याची धमक त्याने दाखवून दिली. झळकलेले शतक त्याच्या नावावर लागलेच पण संघाची अ
ब्रू वाचवली हीच फार मोलाची कामगिरी ठरली. ही कामगिरी करतानाच त्याने सर्वाधीक धावांच्या स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या रिकी पॉंटींगला मागे टाकले. आता तो सचिनच्या धावांच्या एव्हरेस्टच्या पाठोपाठ आपले शिखर घेऊन उभा राहिला आहे.

Friday, July 22, 2011

पीटरसन पेटला (इंग्लंड डायरी)


पहिल्या दिवशी खेळ करणारा पाऊस दुसऱ्या दिवशी खुपसा शहाण्यासारखा वागला आणि नेमका त्याच वेळी झहीरखान मैदानाबाहेर राहिला. या दोन्ही बाबींचा पुरेपूर फायदा साहेबांनी विशेषतः पीटरसनने उठविला आणि भारतीय गोलंदाजीविरुद्ध धावांचा वणवा पेटवला. काल सावधपणे खेळून खेळपट्टीचा आणि भारतीय गोलंदाजीचा अंदाज घेतलेला केवीन पीटरसन आज चांगलाच पेटला. त्याने झहीरशिवाय भारतीय गोलंदाजी कशी तकलादू आहे हे दाखवून दिले. आपल्या डावात त्याने "पलटी' शॉट्‌सही अगदी लिलया खेळले. त्याने ट्रॉट आणि प्रायर यांना जोडीला घेऊन संघाची धावांची भिंत अगदी भक्कम बांधली. दिवसभरात झालेल्या 347 पैकी 180 धावा एकट्या पीटरसनने फोडून काढल्या. सामन्या दरम्यान त्याच्यात आणि प्रवीणकुमारमध्ये थोडी नोकझोंक झाली; पण त्याचा परिणाम केविनने आपल्या खेळीवर होऊ दिला नाही. उलट शतक पूर्ण केल्यानंतर आणखी आक्रमक होत द्विशतकही पूर्ण करून त्याने ऐतिहासीक कसोटीसोबत आपले नावही कायमचे कोरले. यशस्वी ठरत असलेल्या प्रवीणकुमारसह भारताच्या सर्वच गोलंदाजांना त्याच्या झळीचा चटका बसलाच. त्याने एक षटकारासह 21 चेंडू सीमापार करताना लॉर्डस्‌च्या खेळपट्टीला आपले गुलाम केले. काल झहीरच्या गोलंदाजीच्या प्रेमात पडलेली खेळपट्टी आज ऊन लागताच बदलली आणि पीटरसनवर फिदा झाली. तिने पीटरसनला पूर्णपणे साथ दिली आणि धावांचा किल्ला बांधण्यास हातभार लावला. संपूर्ण दिवसभराच्या खेळात तो दोनदाच बाद होता होता वाचला. विशेष म्हणजे या वेळी गोलंदाज होता भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी. हे दोन अपवाद वगळता पीटरसनने आपला फलंदाजीचा क्‍लास लॉर्डस्‌वर उपस्थित क्रिकेटप्रेमींपुढे पेश केला. संपूर्ण दिवसभर फलंदाजी केल्यानंतरही त्याची शरीरभाषा सकारात्मक होती. सहकारी टप्प्या टप्प्याने पॅव्हेलियनमध्ये परतत असताना. त्याने खेळपट्टीवर भ
क्कम नांगर टाकला तो अखेरपर्यंत काढलाच नाही. कर्णधार स्ट्रॉसनेही त्याच्या द्विशतकाची वाट पाहिली आणि ते पूर्ण होताच डाव घोषित केला आणि मानवंदना स्वीकारत पीटरसन दिमाखात परतला.

धोनीच्या हाती चेंडू
लंचनंतर भारतीय खेळाडू जेव्हा मैदानात उतरले तेव्हा यष्टीरक्षकाचे ग्लोव्हज द्रविडच्या हातात दिसले तेव्हा धोनी गोलंदाजी करण्याचा प्रयोग करतोय काय असा प्रश्‍न पडला आणि त्याचे उत्तर लगेचच मिळाले. लंचनंतरची पहिले षटक टाकून धोनीने सगळ्यांनाच आश्‍चर्याचा धक्का दिला. एवढ्यावरच न थांबता त्याने सलग पाच षटके टाकून आपल्या मुख्य गोलंदाजांना काहीशी विश्रांती दिली. दुसऱ्या ओव्हरमध्ये तर त्याच्या गोलंदाजीवर चेंडू पीटरसनच्या बॅटच्या जवळून द्रविडच्या ग्लोव्हजमध्ये विसावल्यानंतर बिली बॉडेन यांनी झेलबाद दिले; मात्र पीटरसनने त्याविरुद्ध रिव्ह्यू मागितला आणि तेथे तो नाबाद ठरला. धोनीने गोलंदाजीवरही हात साफ करताना आठ षटके टाकली आणि धावा दिल्या 23.

Thursday, July 21, 2011

पाऊसच जास्त खेळला! (इंग्लंड डायरी)


छायाचित्र संकेतस्थळाच्या सौजन्याने
----------------
कसोटी क्रिकेटमधील दोन हजारावी कसोटी खेळण्याचे सुवर्णपान लिहिले जात असताना वरुणराजालाही आवेग अनावर झाला आणि तो मुक्तपणे धारांतून लॉर्डस्‌वर बरसला आणि ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार बनला. दिवसभर प्रत्यक्ष क्रिकेटच्या बरोबरीने त्यानेही मैदानावर खेळ मांडून गोलंदाजांसाठी पोषक वातावरण बनविले. या पोषक वातावरणाचा फायदा उठविण्यासाठी भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने टॉस जिंकून गोलंदाजी घेतली खरी; मात्र त्याचा फायदा झहीरखान वगळता इतर कोणालाही उचलता आला नाही. अर्थात त्यांनी प्रयत्न केलेच नाहीत असे नाही; पण बिचाऱ्यांना नशिबाची साथ काही लाभली नाही. प्रवीणकुमारचे चेंडू स्विंग झाले; मात्र त्याला खेळून काढण्यात साहेबांनी यश मिळविले; तर इशांतला त्यांनी खेळविले. इशांत प्रयत्नात कोणतीही कसूर करत नाही; पण आजचा दिवस त्याचा नव्हताच. हरभजनने सुरवातीपासूनच लय पकडून जोनाथन ट्रॉटला जाळ्यात अडकवण्याचा केलेला प्रयत्न अगदी थोडक्‍यात फसला. चेंडू द्रविडच्या हाताला लागून खाली पडला. त्यावेळी हरभजन द्रविडवर आणि द्रविड स्वतःवरच जाम वैतागलेला दिसला. एक संधी हुकल्याची खंत दोघांच्या चेहऱ्यावर उमटली. दुसरीकडे पहिल्या चेंडूपासूनच उत्तम लाईन आणि लेंथ पकडलेल्या झहीरखानने लॉर्डस्‌च्या खेळपट्टीला पहिल्या काही षटकांतच वश करून घेतले मग आधी कुकला आणि नंतर नेहमीचं गिऱ्हाईक असलेल्या स्ट्रॉसला बाद करून कर्णधाराचा विश्‍वास सार्थ ठरविला. त्या वेळी भारतीय संघ पहिल्याच दिवशी मजबूत पकड घेणार अशी हवा तयार झाली; मात्र ही हवा त्यानंतर पार विरून गेली.

स्ट्रॉसचा बळी पंचविसाव्या षटकात गेला आणि त्यानंतरच्या 24 षटकांत पीटरसन आणि दोनवेळा नशिबवान ठरलेल्या ट्रॉटने भारतीय गोलंदाजांना संधीच दिली नाही आणि धावांची भरही घातली. ट्रॉटला हरभजनच्या गोलंदाजीवर द्रविडने सोडल्या
नंतर झहीरच्या गोलंदाजीवरही पहिली स्लीप आणि यष्टीरक्षक यापैकी कोणी झेल घ्यायचा या संभ्रमात चेंडू सटकला. द्रविड आणि धोनी दोघेही चेंडू पकडण्यात अपेशी ठरले. यानंतरचा खेळ मात्र पीटरसन आणि ट्रॉटनेच केला. त्यांनी पावसाळी वातावरण इंग्लंडच्या पाठीराख्यांना आणखी बोचरे होऊ नये याची काळजी घेतली आणि डाव स्थिर केल्याचे समाधान दिले. ट्रॉटने अर्धशतकी खेळी करताना दोन जीवदानांचा पुरेपूर लाभ उठविला. प्रवीणकुमार, इशांत शर्मा आणि हरभजनने जाता जाता झटका देण्याचा केलेला प्रयत्न अपुरा पडलाच. चहापानाला खेळ थांबला आणि मग पुन्हा एकदा वरुणराजाने अस्तित्व दाखवताना मनसोक्त खेळ मांडला तो मांडलाच. आता उद्या भिस्त पुन्हा एकदा झहीरवरच, पण त्याला दुखापत झालीय. रात्रीत तो तंदुरुस्त व्हावा यासाठी धोनी देव पावसात न ठेवेल तर नवल.

Wednesday, July 20, 2011

क्रिकेट युद्धाला तोंड फुटणार


आज (ता. 21) सकाळी लॉर्डस्‌च्या हिरवळीवर भारत आणि इंग्लंड संघातील खेळाडू पाय ठेवतील तेव्हा क्रिकेटच्या इतिहासातील आणखी एक सुवर्णपान लिहिलं जाईल. 2 हजाराव्या कसोटीमध्ये वर्चस्वासाठी दोन्ही संघ आमने-सामने उभे ठाकतील तेव्हा या ऐतिहासिक घटनेसोबत धोनीब्रिगेड आणि स्ट्रॉस सेना आपसुक जोडली जाईल. सायबांना त्यांच्याच घरात पराभवाचे खडे चारण्यास धोनीसेना उत्सुक असताना प्रत्यक्ष लॉर्डस्‌वर उपस्थित राहून तसेच दूरचित्रवाणीच्या माध्यमातून कोट्यवधी क्रिकेटरसिक या क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतील.
15 ते 19 मार्च 1877 मध्ये पहिला कसोटी सामना खेळल्यानंतर गेली 144 वर्षे क्रिकेटच्या मैदानावरील हा सिलसिला अखंड सुरूच आहे. या प्रवासात क्रिकेटमध्ये आमुलाग्र बदल घडला असून आणि यापुढेही घडण्याची नांदी होऊ घातली आहे. कसोटी सामने दिवस-रात्र खेळविण्याविषयी गांभीर्याने चर्चा सुरू आहे. एकदिवसीय सामन्यांमुळे कसोटी क्रिकेटची लोकप्रियता काही प्रमाणात कमी झाली असली तरी गेल्या काही वर्षांत कसोटी सामने निकाली होऊ लागल्याने पुन्हा एकदा प्रेक्षक या सामन्यांकडे वळू लागला आहे. कसोटी खेळणे म्हणजेच क्रिकेट खेळणे ही भावना अद्यापही क्रिकेटपटूंमध्ये दृढ असल्याने कसोटी क्रिकेट जिवंत राहणार हे नक्की.
भारत आणि इंग्लंड यांच्यात शंभरावी लढत होत असताना इंग्लंड भूमीवर भारतीय संघाची कामगिरी म्हणावी तशी बहरलेली नाही. पंधरा लढतींपैकी अवघी एक लढत जिंकण्यात भारतीय संघ यशस्वी ठरला आहे, तर दहा पराभव पदरी पडलेत. तर 99 पैकी 19 लढतींमध्येच भारतीय संघ विजय मिळवू शकला आहे. इंग्लंडने 34 विजय मिळवताना 46 लढती अनिर्णित राखल्यात. सध्या भारतीय संघ कसोटी क्रमवारीमध्ये अव्वल स्थानी आहे. कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली इतिहास बदलण्यासाठी हा संघ उत्सुक आहे; मात्र स्ट्रॉसच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघाविरुद्ध त्यांच्याच मैदानावर खेळताना धोनीसेनेचा कस लागणार आहे हे नक्की.

लॉर्डसवर सचिन मोका साधणार?
ही कसोटी जशी ऐतिहासिक आहे. तसेच क्रिकेटच्या पंढरीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर कारकिर्दीतील शंभरावे शतक झळकावून मणिकांचन योग साधण्यात यशस्वी होणार का, याकडेही क्रिकेटरसिकांचे लक्ष लागलेले आहे. यापूर्वी या मैदानावरील त्याची कामगिरी जरी सुमार असली तरी हा भूतकाळ पुसून हा मोका साधण्याचा प्रयत्न सचिन नक्कीच करेल अशी आशा आहे.

Thursday, July 14, 2011

तो एक पाऊस


आज दर्याचा नूर तिला नेहमीपेक्षा वेगळा जाणवत होता. जाऊ नको म्हटलं तरी त्यानं पहाटे होडी घातलीच समुद्रात. नको म्हटलं तर म्हणाला, "अगं आता तीन महिने नाहीच जायचं दर्यावर. आज मिळेल तेवढी मासळी आणतो. तेवढेच चार पैसे जादा होतील आणि दुसरं कोण नाही म्हटल्यावर मलाच जादा मासोली गावणार. तू नको काळजी करू. मी येतो सुखरूप' असं म्हणत त्यानं होडी समुद्रात लोटलीपण. पहाटेच्या अंधारानं त्याला लगेच कवेत घेतलं. होडीवरचा मिणमिणता कंदिल दिसला बराच वेळ आणि नंतर तो ही दिसेनासा झाला. तो गेला तेव्हा समुद्र अगदी शांत होता शहाण्या मुलासारखा. किनाऱ्यासोबत लाटांचा खेळ सुरू होता. फेसाळणाऱ्या लाटा तिच्या पायाला स्पर्शून जात होत्या. गाज कानाला गोड वाटत होती.
त्याचं अस्तित्वच धुसर झालं तशी ती माघारी वळून चालू लागली आणि विचारांच्या लाटा तिच्या मनात उसळू लागल्या.
"हा ऐकतच नाही माझं. तू देशील त्यामध्ये मी सुखी राहीन म्हटलं की म्हणतो, "अगं तू माझी राणी होणार. तुला अगदी फुलासारखं ठेवणार मी. पण त्यासाठी पैसे नको? नुसत्या प्रेमानं पोट नाही भरत. या चार दिवसांत वेगळी-वेगळी मासळी मिळाली तर पैसैही जास्त मिळतील आणि आपल्याला उपयोगही होईल.'
किती वेगळा आहे हा. शिकलाय चांगला, कोठेही शहरात नोकरी मिळू शकली असती, पण आई एकटी कशी राहणार म्हणून शहरात जात नाही. शेती, मच्छिमारी करतो. कोणाच्याही मदतीला हा पहिला. सगळ्या वाडीत त्याला नावाजतात. एरव्ही कोणाच्या अध्यात ना मध्यात. त्याच्या आईनं माझ्याबद्दल वडिलांना विचारलं तेव्हा आपल्या पदरात समुद्राच्या पोटात मावणार नाही एवढी खुशी पडली. अशा तरुणाबरोबर लग्न करणार या कल्पनेनेच आपण मोहरून गेलो.'
--
एकदम माडांची सळसळ वाढली आणि तिचे विचार थांबले. पाठोपाठ पावसाचे मोठे-मोठे थेंब येऊ लागले. पळत तिनं घर गाठलं. तरी ती भिजलीच. अवघ्या अर्ध्या तासात सगळा नूर पालटला. जोरदार वादळ सुरू झालं आणि जोडीला पाऊस धो धो कोसळू लागला. आता तिच्या मनातही विचारांचं वादळ थैमान घालू लागलं.
"जाऊ नको म्हटलं तरी ऐकलं नाही. आता काय करणार तो? दर्यापण खवळलेला असणार. हा घरी कसा येणार? कशा अवस्थेत असेल तो?'
तिच्या डोळ्यासमोर भर समुद्रात उधाणलेल्या लाटांसोबत झगडणारा तो दिसू लागला. हेलकावणारी होडी जीवाच्या कराराने सावरत पाण्याच्या माऱ्याला तोंड देताना त्याची होणारी दमछाक तिला दिसू लागली.
आता तिचा जीव कासावीस होऊ लागला. दोघांनी संसाराची पाहिलेली स्वप्ने तिच्या डोळ्यासमोर तरळू लागली आणि काही विपरीत घडलं तर... हा विचार येता क्षणी तिचा ठाव सुटला आणि धो-धो पावसात ती समुद्राच्या दिशेने धावत सुटली...
----
ठणकणाऱ्या डोक्‍यावर तिचा हात गेला आणि ती जागी झाली. तीन दिवसांनंतर. समोर आबा, त्याची आई आणि शेजाऱ्यांना पाहताच तिला काही कळेना. तिची नजर त्याला शोधू लागली.
"काकी तो आला का? कुठे आहे तो?'
तिच्या प्रश्‍नावर त्याच्या आईनं तोंडाला पदर लावला आणि ती मुसमुसू लागली.
म्हणजे, तो अजून आला नव्हता. कधी येणार तो? त्याला मी सांगितलं होतं जाऊ नकोस. ऐकल नाही माझं, येतो म्हणाला, काळजी करू नकोस. तो येईल, हो आत्ता. आत्ताशी सूर्य मावळतीला आला आहे. मला जायला पाहिजे. असं म्हणून ती उठू जाऊ लागली. तशी पाठीतून एक सणक आली. काकींनी तिला सावरून पुन्हा झोपवलं.

तिला आठवलं, पाऊस सुरू झाला म्हणून आपण समुद्राच्या दिशेने धावत सुटलो आणि पाण्यात शिरलो. समुद्राने आधी आत ओढून घेतलं आणि उसळलेल्या लाटेने आपल्याला पुन्हा बाहेर फेकून दिलं. त्यानंतर...
----
आज पंधरा दिवसांनंतरही भर पावसात तिचं समुद्राकाठी येणं आणि त्याची वाट पाहणं यात खंड पडलेला नव्हता. समुद्रातून त्याची होडी येतेय आणि आपण त्याच्याकडे धावतोय, हेच दृष्य सारखं तिच्या डोळ्यासमोर तरळत राही. तुफान पडणाऱ्या पावसामुळे त्याच्या शोधासाठीचे प्रयत्न बंद पडले आणि पंधरा दिवसानंतर सगळ्यांनी आशाही सोडून दिली. सगळी वाडी त्याच्याबद्दल हळहळत होती आणि हिच्या डोक्‍यावर परिणाम झालाय म्हणून कुजबुजत होती. पण, तिला त्याची कसलीच जाणीव नव्हती. ती ना सरळ जेवत होती, ना झोपत होती. संध्याकाळच्या वेळी ती समुद्राकाठी भर पावसातही फिरत राही. रात्र चढू लागली की कोणीतरी तिला घरी घेऊन जाई.
--
खोल गेलेले डोळे. नजरेत वाट पाहण्याची काठोकाठ भरलेली आर्तता. थकून गेलेलं शरीर आणि मनात फक्त तो नक्की येणार हा विश्‍वास घेऊन आजही ती किनाऱ्यावर फिरत होती. दिवस मावळला आणि ती ठरलेल्या खडकावर जाऊन त्याची वाट पहात बसली. रात्र चढू लागली. पाऊस सुरूच होता. एवढ्यात काठावर एका सावलीचा तिला भास झाला. ती निरखून पाहू लागली. देहयष्टी त्याच्या सारखीच वाटली. हळू-हळू ती आकृती पाण्यातून बाहेर आली आणि काठावर कोसळली. धप्प आवाजाने तिची तंद्री भंगली.
पायांत बळ एकटून ती उठली. हळू-हळू खडकावरून वाळूत उतरली. पडलेल्या व्यक्तीच्या दिशेने प्रचंड आशेने धावत सुटली. जवळ जाऊन त्याचा चेहरा अंधारात पाहण्याचा प्रयत्न केला. पण दाढीमुळे काहीच समजत नव्हतं. ती निराश झाली. त्याला सोडून उठली; मात्र तिच्या स्पर्शाने काहीशा भानावर आलेल्या त्या व्यक्तीच्या तोंडून तिचंच नाव बाहेर पडलं आणि... मग आनंदाश्रूंचा पाऊस अखंड कोसळू लागला...!