Monday, August 22, 2011

नंबर वन...(इंग्लंड डायरी)


भारताचा इंग्लंड दौरा सुरू झाल्यानंतर जेव्हा शाब्दिक युद्ध छेडले, त्यावेळची गोष्ट. "या इंग्लंड दौऱ्यामध्ये भारतीय संघाच्या हाती फारसे काही लागणार नाही, उलट भारतीय संघाला नंबर एकचा किताब गमवावा लागेल, असे भाकित इंग्लंडचा माजी कर्णधार नासीर हुसेनने केले होते. त्यावेळी भारतीय संघाचे पाठिराखे त्याच्यावर तुटून पडले होते. हुसेनच्या डोक्‍यावर परिणाम झालेला आहे, असे म्हणण्यापर्यंत त्याच्यावर टीका झाली; पण नासीरने भविष्य पाहिले होते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्याने केलेल्या भविष्यवाणीला कोणत्याही प्रकारचा तडा जाणार नाही, अशा पद्धतीने भारतीय संघ खेळला. (अपवाद फक्त राहुल द्रविडचा. तो एकटाच लढला.) क्रिकेटच्या सर्व पातळ्यांवर स्ट्रॉसच्या संघाने धोनीच्या संघाला चारीमुंड्या चीत केले. भारतीय संघाला दुखापतीने घेरले, असे लंगडे समर्थन होऊ शकते; पण असे म्हणून इंग्लंडच्या खेळाडूंनी घेतलेल्या कष्टाला कमी लेखण्याचा अधिकार नक्कीच कोणाला नाही. इंग्लंड संघाने दौऱ्याच्या सुरवातीपासून अत्यंत योजनाबद्ध असा खेळ केला. चार कसोटी सामन्यांतील आठ डावांत त्यांनी भारतीय संघाला बाद केले. बरं, हे बाद करताना त्यांनी अखेरच्या कसोटीचा अपवाद (पहिल्या डावात 300 धावा केल्या होत्या.) वगळता तीनशे धावांचा टप्पा पार करू दिलाच नाही. भारताच्या दिग्गज फलंदाजांना त्यांनी पद्धतशीरपणे जखडून ठेवले. त्यांच्यावर उसळत्या चेंडूंचा मारा करतानाच हळूवारपणे चेंडू स्विंग करून भारतीय फलंदाजांना सेटच होऊ दिले नाही. राहुल द्रविडचा अपवाद वगळता एकाही खेळाडूला ब्रॉड, अँडरसन, ब्रॉस्नन आणि स्वॉन यांची तगडी गोलंदाजी खेळता आली नाही तसेच समजलीही नाही. या सर्व गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांचा अगदी बारकाईने अभ्यास करून गोलंदाजी केली. घरच्या मैदानांवर आणि जिवंत खेळपट्ट्यांवर त्यांना फा
यदा होणार, हे नक्कीच होते. भारतीय फलंदाजांना येथील चारही खेळपट्ट्यांना त्यांच्याच गोलंदाजांविरोधात फूस लावता आली नाही. द्रविडने खेळपट्ट्यांना आपल्या बाजूने वळविण्याचा केलेला प्रयत्न यशस्वी झाला. या खेळपट्ट्यांनी त्याच्या पदरात धावांचे माप अगदी पुरेपूर टाकले. सगळे सहकारी धडाधड पडत असताना या पठ्ठ्याने या खेळपट्ट्यांवर तीन शतकांसह 461 धावांचा रतीब घातलाच. बरं, प्रत्येक वेळी त्याने भारतीय संघाचा पराभव लांबविण्याचा कसोशीने प्रयत्न केला. त्याला पुढून साथच मिळाली नाही आणि पराभवाचे शिक्के बसत गेले.
फलंदाजीमध्येही पीटरसन, बेल, प्रायर, कुक यांनी कोणतीही कसूर बाकी ठेवली नाही. कुक, पीटरसन आणि बेलने भारतीय गोलंदाजांची शिकार करून द्विशतकांचे ताव मारले आणि तृप्तीचे ढेकर दिले. कमकुवत भारतीय गोलंदाजांना इंग्लंडच्या भक्कम फलंदाजीला संपूर्ण उद्‌ध्वस्त करण्यात फारसे यश मिळालेच नाही. इंग्लंडच्या सर्वच प्रमुख फलंदाजांनी धावांची लयलूट केली आणि नंबर एकचा मुकुट अगदी दिमाखाने आपल्या डोक्‍यावर चढविला. चारही सामने मोठ्या फरकाने जिंकणाऱ्या इंग्लंडने कसोटी क्रिकेटविश्‍वात आपणच नंबर एक आहोत, याची द्वाही फिरविली. खेळाच्या सर्वच आघाड्यांवर उत्तम कामगिरी करून नंबर एकच्या सिंहासनावर विराजमान होण्यासाठी लागणारे सर्व गुण दाखवून दिले. भारतीय क्रिकेट किती बेभरवशी आहे, हे जगासमोर उघडे केले. कर्णधार झाल्यापासून कसोटीमध्ये अपयश न पाहिलेल्या कर्णधार महेंद्रसिंग धोनीला प्रथमच मोठा पराभव पत्करावा लागला. यामधून सावरून तो नक्कीच बाऊन्स बॅक करेल, अशी आशा आहे; मात्र सद्या तरी इंग्लंडच्या रस्त्यांवर भारतावरील विजयाचा जल्लोष साहेब करत आहेत आणि त्यासाठी ते खरोखरच पात्र आहेत. भारतीय संघाने आत्मचिंतन करून वनडे मालिकेसाठी कम बॅक करावे, हीच अपेक्षा.

Saturday, August 20, 2011

धुलाई (इंग्लंड डायरी)


भारतीय संघाचे नष्टचक्र सुरूच आहे. शुक्रवारी पीटरसन (175) आणि इयान बेलने (नाबाद 181) भारतीय जखमांवर अक्षरशः मीठ चोळले. त्यांनी अर्धमेल्या भारतीय गोलंदाजीवर घणाघाती हल्ला केला आणि धावांची पुन्हा एकदा लयलुट केली. काही तरी चुकत आहे; पण नेमकं काय हे कर्णधार धोनीसह कोणालाच कळेनासे झाले आहे. खराब कामगिरी होऊ शकते याबद्दल कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही. पण एवढी वाईट कामगिरी गेल्या काही वर्षांत भारतीय संघाची झालेली नव्हती. पहिल्या पराभवानंतर भारतीय संघ "बाऊन्स बॅंक' करून सायबांसोबत दोन हात करेल या आशेचा पार चक्काचूर झाला. भारतीय संघ सपाटून मार खात आहे आणि सायबांचे फलंदाज भारतीय गोलंदाजीला धोपटून काढत आहेत. भारतीय संघाची अवस्था अक्षरशः गलीतगात्र झालेली आहे.
खेळामध्ये हारजीत नक्कीच असते; मात्र पराभवानंतर पेटून उठण्याची वृत्ती दाखविणेही गरजेचे असते. यापूर्वी भारतीय संघाने कितीतरी वेळा अशी वृत्ती दाखवून ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघांनाही नामोहरम केले आहे. ऑस्ट्रेलियाला पराभूत करता येते याचा वस्तूपाठ भारतीय संघानेच साऱ्या क्रिकेटजगताला घालून दिला. कित्येक सामन्यामध्ये अगदी बॅकफुटवरून येऊन अवघड विजय मिळवून दाखवून भारतीयांना जल्लोष करण्याची संधी याच भारतीय संघाने दिलेली आहे. मात्र सध्याचे खेळाडू जान नसल्याप्रमाणे मैदानात उतरताना दिसत आहेत. मैदानावरील त्यांचा वावरही गेल्या काही दिवसांत खांदे पाडूनच सुरू आहे. चौथ्या कसोटीमध्येही गेल्या तीन कसोटी सामन्यांतील अपयशाचा सिलसिला सुरूच राहिला. अवघे तीन गडी बाद होताना सायबांनी धावांचा डोंगर उभा केला. भारतीय संघाचा व्हाईटवॉश करण्याच्याच इराद्याने इंग्लंडचे फलंदाज मैदानात उतरल्याचे दिसते तर अब्रू कशी वाचवता येईल या विवंचनेत भारतीय गोलंदाज आहेत. कधी नव्हे एवढी भारतीय गोलंदाजी मोडून पडलेली आहे. बळीच मिळत नसल्याने त्यांचा आत्मविश्‍वासच गमावलेला आहे. हरभजन निष्प्रभ ठरला आणि कसोटीमधून बाहेर पडला. त्याच्या जागी आलेल्या मिश्राला अद्याप काहीही करामत दाखविता आलेली नाही. श्रीशांत, इशांत आणि आर. पी. सिंग यांना गोलंदाजीची लयच सापडलेली नाही. त्यांच्या गोलंदाजीमध्ये कोठेही आक्रमकता दिसत नाही आणि जेव्हा त्यांनी संधी निर्माण केल्या तेव्हा त्या क्षेत्ररक्षकांनी वाया घालविल्याचेही आपण पाहतो आहोत. गोलंदाजी, क्षेत्ररक्षणापाठोपाठ फलंदाजीतही खेळपट्टीवर नांगर टाकायची जिद्द कोणाचीच दिसत नाही. सर्वच आघाड्यांवर निष्प्रभ ठरणाऱ्या भारतीय संघावर निर्णायक घाव घालण्याच्या इराद्याने पीटरसन, बेल यांनी फलंदाजी करून संघाच्या नजरेच्या टप्प्यात यश आणून ठेवलेले आहे. शुक्रवारी त्यांनी कोणत्याही गोलंदाजाला दयामाया न दाखविता फोडून काढले आहे. शनिवारीही ते धावांचा डोंगर उभा करतील आणि उरलेल्या अडीच दिवसांत भारतीय संघाचे शिरकाण करण्याचा प्रयत्न करतील हे नक्की.

Thursday, August 18, 2011

शुक्‍लकाष्ठ सुरूच...


सायबांच्या भूमीवर उतरल्यापासून भारतीय संघाच्या पाठीमागे सुरू असलेले शुक्‍लकाष्ठ ओव्हलवरही कायम राहिले. सलग पराभवांमुळे गेलेली अब्रू काही प्रमाणात मिळविण्यासाठी गुरुवारी चौथ्या कसोटी सामन्यातून भारतीय संघ मैदानावर उतरला खरा पण, तो मैदानात उतरण्यापूर्वीच बऱ्यापैकी गोलंदाजी करणारा प्रवीणकुमार गमवावा लागला होता. या दुबळया गोलंदाजीचा समाचार घेत स्ट्रॉस आणि कुक यांनी संघाला नाबाद 75 धावांची सलामी दिली. पाऊस आला आणि दोन्ही संघांना पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. 75 धावांची सलामी देताना दोघांनीही भारतीय गोलंदाजीच्या सुमारपणावर शिक्कामोर्तब केले. पाऊस देवासारखा धावला आणि अब्रूच्या आणखी चिंध्या होण्यापूर्वी भारतीय संघ खांदे पाडून ड्रेसिंग रुममध्ये परतला. काहीच मनासारखं घडत नसल्याचे भाव त्या वेळी सर्वांच्या चेहऱ्यावर होते. सामन्यातील एक दिवस वाया गेल्यामुळे या सामन्यात यश मिळवून गेलेली पत मिळविण्याची संधीही काही प्रमाणात दुरावल्याचे दिसत आहे. शुक्रवारी गोलंदाजांची कामगिरी कशी होईल त्यावर भारतीय संघाचे यशापयश अवलंबून असेल.

Saturday, August 13, 2011

पायउतार...(इंग्लंड डायरी)


भारतीय क्रिकेटचं काहीतरी बिनसलं आहे हे नक्की. अति क्रिकेट, मिळणारा अतिपैसा, विश्‍वकरंडक विजेतेपदाचे डोक्‍यात गेलेलं यश, खेळाबद्दल खेळाडूंमध्ये असलेली बेफिकीरी आणि काही देणं घेणं नसल्यासारखा मैदानावरील वावर. या सगळ्यांचा परिपाक इंग्लंड दौऱ्यात दिसला आणि शनिवारी त्यावर कळस चढला. श्रीशांत बाद झाला आणि भारतीय संघ एक डाव 242 धावांनी पराभूत झाला. भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात लाजिरवाण्या पराभवापैकी एक पराभव नोंदला गेला. गेली दोन वर्षे भारतीय क्रिकेटच्या सुरू असलेल्या घोडदौडीला आज सायबांनी लगाम घातला.
जगातली सर्वात भक्कम फलंदाजी असणाऱ्या संघाचे बुरुज ब्रॉड, अँडरसन, ब्रॉस्नन यांनी एकापाठोपाठ उध्वस्त केले आणि कसोटी क्रिकेटच्या अव्वलस्थानाच्या सिंहासनावर हक्क सांगितला. क्रिकेटची मायभूमी गेली कित्येक वर्षे अव्वलस्थानाला पोरकी झाली होती. भारतीय संघाला एजबस्टनमध्ये नमवून सायबांनी हा मुकुट हिसकावून घेतला. भारतीय संघ अव्वस्थानावरून पायउतार झाला. गेल्या तिन्ही सामन्यांमध्ये इंग्लंड संघाने केलेली कामगिरी खरोखरच कौतुक करण्यासारखी आहे. त्यांच्या फलंदाजांनी वसुली केल्याप्रमाणे भारतीय संघाच्या गोलंदाजांना ठोकून काढले. धावांच्या राशी ओतल्या. भारतीय क्रिकेटने भविष्यात गोलंदाजीसाठी खास मेहनत घेतली पाहिजे हे वाजवून सांगितले. झहीरखानशिवाय भारतीय गोलंदाजी रांगल्याचं या दिवसांत पहावयास मिळालं. इतर गोलंदाजांना इंग्लंडच्या फलंदाजांना रोखणे जमलेच नाही. त्याच्याबरोबर उलट परिस्थिती इंग्लंड गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांची केली. पहिल्या दोन सामन्यात राहुल द्रविड आणि अखेरच्या सामन्यात कर्णधार धोनी वगळता एकाही भारतीय फलंदाजाला त्यांनी हुकुमत गाजवू दिली नाही. उलट प्रत्येक धाव घेण्यासाठी त्यांना कमालीचा घाम गाळण्यास भाग पाडले. क्रिकेटच्या देवाचे महाशतक हा क्रिकेटरसिकांमध्ये चेष्टेचा विषय बनला. एकाही सामन्यात त्याची बॅट बोलू दिली नाही. इतरांनाही त्यांनी फारशी करामत दाखवू दिलीच नाही. करामत दाखविण्यापूर्वीच त्यांनी आपल्या खेळपट्ट्यांना आपल्याच मुठीत ठेवले आणि त्यावर भारतीय फलंदाज अगदी टिपून बाद केले. येथील वातावरण, खेळपट्टी आणि हात-हात स्विंग होणारे चेंडू यांच्या चक्रव्युहातून भारतीय संघ बाहेर पडूच शकला नाही. भारतीय संघाचा तारणहार असा गाजावाजा करत बोलावलेला सेहवाग फलंदाजी विसरल्याप्रमाणे अखेरच्या कसोटी सामन्याच्या दोन्ही
डावांत खेळला. उभ्या उभ्या फटके मारण्याची त्याची सवय जाता जात नाही हेच खरे. त्यातही समोर जगातील सर्वोत्तम गोलंदाज आहेत हेही तो विसरला. परिणाम त्याला दोन्ही डावांत भोपळा फोडताच आला नाही आणि इतर फलंदाज प्रतिकार करण्यापूर्वी बाद होत गेले. त्यामध्ये नवा-जुना असा भेदच राहिला नाही. मोठी खेळी करून संघाला बाहेर काढायचे असते हेच बहुधा भारतीय संघ विसरला. झहीरमुळे लंगडी झालेल्या गोलंदाजीची धुरा प्रवीणकुमारने वाहण्याचा प्रयत्न केला खरा पण; त्याला दुसऱ्या बाजूने जरासुद्धा आश्‍वासक साथ मिळाली नाही. इशांत, श्रीशांत यांना खूप काही शिकावे लागणार हे या दौऱ्याने अधोरेखीत केले. गॅरी कर्स्टन यांनी प्रशिक्षकपदावर आल्यानंतर भारतीय संघाला क्रिकेटच्या सर्व प्रकारांत अव्वलस्थानी पोचविण्यासाठी मेहनत घेतली. यामध्ये सातत्य ठेवण्यात सध्यातरी डंकन फ्लेचर यांना अपयश आले आहे. गेलेली अब्रू आणि पत परत मिळविण्यासाठी त्यांना कंबर कसून कामाला लागावे लागेल हे नक्की.

Friday, August 12, 2011

पाऊले चालती पराभवाची वाट (इंग्लंड डायरी)


पूर्ण दोन दिवस, 180 षटके आणि नऊ खेळाडू शिल्लक. इंग्लंड दौऱ्यातील आत्तापर्यंतचा सर्वात मानहानीकारक पराभव टाळण्यासाठी आणखी 451 धावांचे डोक्‍यावर असलेले ओझे. "केविलवाणे' या शब्दाला लाजवेल अशी झालेली भारतीय संघाची अवस्था. ही कसोटी वाचविण्यासाठी काहीतरी चमत्कार व्हावा, अशीच सच्च्या क्रिकेटप्रेमींची अपेक्षा; पण चमत्कार करणार कोण? ज्याच्याकडून चमत्काराची अपेक्षा बाळगू शकतो, जो काही षटकांमध्ये सामन्याचा नूर बदलू शकतो तो वीरेंद्र सेहवाग पहिल्याच चेंडूवर बाद. बरं त्याला बाद होताना पाहिल्यानंतर क्‍लब क्रिकेटमधील खेळाडू जशा बालीश चुका करतात तशीच चूक करून त्याचं बाद होणं हे हृदयाचा ठोका चुकविणारं होतं. तो आला, पहिला चेंडू खेळला आणि बाद झाल्यानंतर मान खाली घालून परतला, हे साऱ्या क्रिकेटविश्‍वाने पाहिले. त्याला बाद करण्याचं श्रेय शंभर टक्के अँडरसनचे. सेहवाग काय चूक करू शकतो हे अचूक ध्यानी घेऊन त्याने चेंडू टाकला. सेहवागच्या बॅटजवळून चेंडू हळूवार बाहेर काढला आणि या सापळ्यात सेहवाग अलगद फसला. बाकीचं काम कर्णधार स्ट्रॉसनं स्लीपमध्ये केलं. भारतीय संघाच्या वर्मावर पहिला घाव घालण्यात साहेब यशस्वी झाले. दिवसभरात त्यांनी गंभीर आणि द्रविडवर दडपण राखण्यात यश मिळविले. भारतीय संघाचा पराभव अटळ आहेच. हा पराभव फक्त लहरी निसर्ग लांबवू शकतो जर तो पावसाच्या रुपात बरसला तर. सर्व फलंदाजांचा कस पाहणारी स्थिती येऊन ठेपलेली आहे. सर्व खेळाडूंनी मिळून ही परिस्थिती हाताळली, समजून उमजून फलंदाजी केली तरच काहीतरी होऊ शकतो अन्यथा...
त्यापूर्वी आज दिवसभरात पुन्हा एकदा भारतीय गोलंदाजीचा मनोभंग करत कुकने मॉर्गन (104) आणि ब्रेस्नन (53) यांच्या संगतीने आजची दिवसभराची परिस्थिती हाताळली. ज्या खेळपट्टीवर दिग्गज भारतीय फलंदाज गळपटले त्याच खेळपट्टीला वश करून घेऊन भारतीय संघाचं क्रमांक एकचं बिरुद हिसकावून घ्यायचंच या हेतूने कुकने आजही कालचाच कित्ता पुढे गिरवताना 294 धावांची खेळी साकारली. बिचाऱ्याचे त्रिशतक हुकले. सायबांच्या सर्वच यशस्वी फलंदाजांनी भारतीय गोलंदाजीचा पार लोळा गोळा करून टाकला. एकालाही लय मिळू दिली नाही की बळी मिळू दिले नाहीत. संघाला कॉंक्रीट स्थितीत पोचविण्याची एकही संधी त्यांनी सोडली नाही. हिरव्यागार आऊटफिल्डवर भारतीय क्षेत्ररक्षक चेंडू आणून गोलंदाजांकडे देण्याचे काम दिवसभर करत राहिले. काल दिवसभरात सोडलेल्या झेलांचे मोल किती मोठे होते हे कुक आणि मॉर्गनच्या खेळीवरून भारतीय खेळाडूंच्या लक्षात आलेच. दिवसभर घाम गाळल्यानंतर भारतीय गोलंदाजांना बळी मिळाले अवघे चार; मात्र तोपर्यंत धावांनी सातशेचा टप्पा ओलांडला होता. हरभजनसिंगच्या जागेवर मोठा गाजा-वाजा करत आलेल्या मिश्राची डाळ सायबांनी मुळी शिजूच दिली नाही. त्याचे चेंडू फिरक घेत होते; पण त्याला खेळण्यात इंग्लंडच्या फलंदाजांना फारशी अडचण आलीच नाही.
उद्या उपाहारापूर्वी सामन्याचा निकाल नक्की झालेला असणार आहे. भारतीय फलंदाज टिकून आणि टिच्चून खेळले तरच निभाव लागणार आहे, अन्यथा आणखी एक मानहानीकारक पराभव भाळी लिहिला जाणार हे नक्की.

कुकने दिले धडे (इंग्लंड डायरी)


हिंदी सिनेमामध्ये पहिला चित्रपट सुपरडुपर हिट दिल्यानंतर अनेक हिरो गायब झाल्याची कितीतरी उदाहरणे आहेत. भारतीय क्रिकेट संघाची अवस्था सध्या तरी डिट्टो तशी झाली आहे. विश्‍वकरंडक जिंकल्यामुळे हिरो बनलेल्या भारतीय संघाबद्दल चाहत्यांच्या मनामध्ये अपेक्षांचा डोंगर उभा राहिलेला आहे. त्यात हा संघ कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावरील त्यामुळे तर यश मिळालेच पाहिजे अशी अपेक्षाही बाळगली जात आहे. प्रत्यक्षात इंग्लंड दौऱ्यात राहुल द्रविड वगळता एकाही भारतीय खेळाडूला त्याच्या लौकिकाला साजेशी कामगिरी मैदानावर दाखवण्यात यश आलेले नाही. दौऱ्याच्या सुरवातीपासून आजपर्यंत भारतीय संघाच्या बाजूने एक गोष्ट होईल तर शपथ. खेळाडू जायबंदी होण्याचा ससेमिरा, गोलंदाजांना मिळत नसलेले अपेक्षित यश आणि पूर्णपणे ढेपाळलेली फलंदाजी अशी केविलवाणी अवस्था संघाची झालेली आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यांत दणकून मार खाल्यानंतर भारतीय संघ "बाऊन्स बॅक' करेल अशी भाकिते वर्तविली जात होती, प्रत्यक्षात एजबस्टन कसोटीच्या पहिल्या दोन दिवसांत तरी "मागचे पाढे पंचावन्न' अशीच स्थिती आहे. पहिल्या दोन पराभवानंतर भारतीय संघ काही शिकलाय असे वाटत नाही, उलट भारतीय संघाचे मनोधैर्य पूर्णपणे खच्ची झाल्याचे मैदानावर सातत्याने दिसत आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यातही खराब फलंदाजीनंतर गोलंदाजांनाही ही खेळपट्टी समजलेली नाही. स्वैर गोलंदाजीचा पुरेपूर समचार साहेबांनी घेतला. विशेषतः ऍलिस्टर कुकने गेल्या दोन कसोटी सामन्यांतील अपयशाची पुरेपूर भरपाई करताना या सामन्यात भारतीय गोलंदाजीवर हुकुमत गाजवली. गेल्या वर्षभरातील कामगिरीवर त्याने चार चांद लावणारी खेळी केली. अर्थात त्यामध्ये त्याला मिळालेल्या जीवदानाचा वाटा मोठा आहे. त्याने उत्तम सलामीवीर कसा असतो याचा वस्तूपाठ गुरुवारी घालून दि
ला. त्याने स्ट्रॉससोबत आधी भक्कम भागिदारी केली आणि त्यानंतर पीटरसनसोबत संघाला आघाडीवर नेले. कारकिर्दीतील 19वे शतक झळकवताना त्याने दाखविलेली मॅच्युरिटी "काबीले तारीफ' अशीच होती. त्याने एकाही भारतीय गोलंदाजाला हुकुमत गाजवू दिली नाही. आक्रमण, बचाव आणि संधीचा लाभ कसा घ्यायचा असतो हे भारतीय फलंदाजांना दाखवून दिले. ज्या खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांनी लोटांगण घातले त्याच खेळपट्टीवर हा पठठ्या पाय रोवून उभा राहिला. त्याने आपली कामगिरी पार पाडताना संघाला दोनशेच्यावर आघाडी मिळवून देण्यात मोलाची कामगिरी बजावली आहेच. शिवाय संघाच्या विजयाचा पाया भक्कम करण्यात कोणतीही कसूर ठेवलेली नाही. आपल्या 182 धावांच्या खेळीत त्याने मैदानाच्या चौफेर धावांची वसुली केली. त्याच्या धडाक्‍यासमोर भारतीय गोलंदाज हतबलतेने गोलंदाजी करताना दिसत होते. भरीत भर म्हणून क्षेत्ररक्षकांनीही जेवढी म्हणून करता येईल तेवढी सुमार कामगिरी केली. कुकने भारतीय संघाच्या डोक्‍यावरील एक नंबरचा मुकुट काढून घ्यायला हात घातला आहे. हा सामना संपेल तेव्हा तोच मुकुट इंग्लंड संघाच्या डोक्‍यावर कदाचीत विराजमान झालेला असेल.

Thursday, August 11, 2011

धोनी धावला...एकदाचा (इंग्लंड डायरी)


भारतीय क्रिकेट संघाची अवस्था वादळात सापडलेल्या नौकेसारखी सध्या झालेली आहे. इंग्लंडमधील वातावरण, तेथील खेळपट्ट्यांना भारतीय संघ नेमका कधी जुळवून घेणार याचे उत्तर दौरा निम्म्यावर आला तरी अद्याप मिळालेले नाही. तिसऱ्या कसोटीमध्ये भारताने कसाबसा दोनशे धावांचा टप्पा ओलांडला. मोठ्या गाजावाजा करत संघात दाखल झालेला सेहवाग शुन्यावर बाद झाला. (याबद्दल त्याला दोष देता येणार नाही, कारण त्यालाही खेळपट्टीसोबत जुळवून घ्यायला थोडा वेळ लागणारच) गंभीरची सुरवात झकास झाली पण पुन्हा एकदा तो मोठी खेळी उभारण्यात अपयशी ठरला. मग भिंत स्वस्तात ढासळली आणि व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण स्पेशल करण्यापूर्वीच परतला. महाशतकामुळेच गेले काही दिवस चर्चेत असलेला मास्टर ब्लास्टरने भोपळा फोडला पण त्यापेक्षा जास्त काही करण्यापूर्वी त्याची बॅट थंड करण्यात आली. रैनाची दैना याही सामन्यात संपली नाही आणि पाहता पाहता सहा फलंदाज शंभर धावांत तंबूत. ही अवस्था पाहिल्यानंतर एकवेळ भारतीय संघ दीडशे धावांचा टप्पा पाहील ही अपेक्षा चाहत्यांनी सोडून देऊन स्टॅंडमधून बाहेर पडायला सुरवातही केली; मात्र कसा कोण जाणे पण आज धोनी पेटला. दौऱ्यात प्रथमच त्याची बॅट मैदानावर चालली. "आक्रमण हाच उत्तम बचाव' हे सूत्र अंगीकारून धोनीने प्रवीणकुमारसह सायबांच्या गोलंदाजीवर हल्लाबोल केला आणि मग मात्र धावफलक वेगाने हलता झाला. धोनी दोन षटकार ठोकून मैदानात चैतन्य आणले. जो भारतीय संघ दीडशे धावांचा टप्पा गाठेल असे छातीठोकपणे सांगता येत नव्हते. त्या संघाने दोनशे धावांचा टप्पा ओलांडला तो धोनी आणि कुमारच्या धडाकेबाज खेळीमुळे. धोनीच्या खेळीमध्ये क्रिकेटमधील फारसे आदर्श फटके नव्हतेच पण तो खूप दिवसानंतर त्याच्या शैलीत खेळला आणि त्याच्या बॅटला धावांचा खुराक मिळाला. तो बाद झाला तेव्हा समोर त्याला ज
ोडीला फारशा आशा राहिलेल्या नव्हत्या; मात्र त्याच्या 77 धावांच्या खेळीने संघाची अब्रू काही प्रमाणात तरी झाकली. गेल्या काही सामन्यांत पूर्णतः सूर हरपलेल्या धोनीने बुधवारच्या खेळीने काही प्रमाणात पुन्हा एकदा लय पकडण्याचा प्रयत्न केला. गोलंदाजांनी गुरुवारी जर करामत दाखवली तर धोनीच्या 77 धावांचे मोल नक्कीच समजेल. तूर्त एवढेच म्हणता येईल. रथी-महारथींच्या बॅटा थंडावलेल्या असताना धोनीची बॅट तळपली. संघ अडचणीत असताना कर्णधाराने धावून जायचे असते, याला बुधवारी एकदाचा काही प्रमाणात का होईना न्याय दिला. आता इतर आघाड्यांवरही असाच आक्रमकपणा दाखवून भारतीय संघाची गेलेली पत, अब्रू काही प्रमाणात का होईना परत येऊ शकेल अर्थात त्याला इतर खेळाडूंचीही तेवढ्याच समरसतेने साथ मिळण्याची आवश्‍यकता आहे.

Thursday, August 4, 2011

परीक्षा

गाडीला जास्तीत जास्त वेग देण्याचा प्रयत्न करून परीक्षेला वेळेत पोचण्यासाठी तो धडपडत होता. मूठ वाढवतानाच त्याचे घड्याळाकडे सारखे लक्ष जात होते. पेपर सुरू व्हायला अवघी काही मिनिटे बाकी होती आणि अजून दोन-तीन किलोमीटर तरी त्याला जायचं होतं. एवढ्यात त्याचं लक्ष फुटपाथच्या बाजूला उभ्या मुलीकडं गेलं. परीक्षेची वेळ गाठायची धांदल असतानाही त्याचे तिच्याकडे लक्ष जाण्याचं कारण तिची सुरू असलेली धडपड. त्याच्या हाताची मूठ आपसुक सैलावली आणि गाडीचा वेग कमी झाला. ती मुलगी वैतागलेली दिसत होती आणि गाडी सुरू करण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती. त्यानं बाईक वळविली आणि तो तिच्याजवळ जाऊन उभा राहिला. गाडी सुरू होत नसल्यामुळे एकाचवेळी रडकुंडीला येऊन आणि चरफडत ती गाडी सुरू करण्याचा प्रयत्न करत होती. त्याने तिच्या बाजूला बाईक उभी केली आणि विचारलं,
"काय झालं?'
त्याच्या अनाहूत प्रश्‍नावर तिनं काहीच उत्तर दिलं नाही. उलट त्याच्याकडे दुर्लक्ष करून गाडी सुरू करण्याचा प्रयत्न करू लागली.
तिचे गाडी सुरू करण्याचे प्रयत्न खूप वेळापासून सुरू आहेत हे तिच्या कपाळावर जमलेल्या घामाच्या थेंबांवरून दिसत होतं. आपल्या प्रश्‍नाला उत्तर न आल्याने तो पुढे झाला आणि त्यानं पुन्हा तिला विचारलं, "गाडी सुरू होत नाही का?'
आता मात्र ती वैतागली. साधारण तिच्यापेक्षा वर्षभराने तो मोठा असावा. गोल, हसऱ्या चेहऱ्याचा.
"दिसत नाही, किका मारतेय ते? परीक्षेला जायचं असताना कोणी टाईमपास म्हणून रस्त्याकडेला गाडी उभे करून अशी झटापट करत बसेल का?'
तिनं सटकून उत्तर दिलं.
त्यानं खुणेनंच "मी पाहू का?' असं विचारलं.
त्यावर तिनं "नको...' म्हणून गाडी सुरू करण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला.
"ओके' खांदे उडवून तो म्हणाला आणि त्याने बाईक सुरू केली. ती वळवून तो जाणार एवढ्यात काय झालं कोण जाणे. ती वरमली. म्हणाली, "पाहता का प्लीज!'
त्यानं बाईक बंद केली आणि तिची गाडी पाहू लागला. झटापट करून दहा-पंधरा मिनिटांत त्याने तिच्या गाडीचा प्रॉब्लेम सोडविला. तिला गाडी सुरू करायला सांगितलं. गाडी सुरू होताच त्याच्या चेहऱ्यावर समाधान तर तिच्या चेहऱ्यावर मस्त हास्य फुललं. तिची गाडी सुरू झालेली पाहून तो बाईकवर बसला आणि तेथून सटकला... आता त्याला त्याचा वर्ग दिसत होता...
--
"अरे आपण साधं त्याला थॅंक्‍सही म्हणालो नाही... त्याच्यामुळं आता निदान वेळेत पेपर तरी गाठता येईल,' असं स्वतःशी म्हणत तिनंही गाडीला वेग दिला.
--
तो वेगात कॉलेजात पोचला. गाडी गडबडीने स्टॅंडला लावून तो पळत पळत वर्गात गेला. तर पेपर सुरू होऊन अर्धा तास होऊन गेला होता. वर्गावरील प्राध्यापकांनी वेळ का झाला? कळत नाही का? काळजीच नाही... कॉलेज म्हणजे काय धर्मशाळा आहे काय? असं सुनावत त्याची उलटतपासणी सुरू करत आणखी दहा-पंधरा मिनिटे खाल्ली. अखेर त्याने गयावया केल्यानंतर त्याला वर्गात प्रवेश दिला. पेपर लिहिण्यासाठी त्यानं पेन उघडला खरा, पण त्याचे दोन्ही हात काळेकुट्ट झाले होते. आधीच वेळ झालेला असल्यामुळं वर्गावरील शिक्षकांना विचारायची सोय नव्हती. कसेबसे रुमालाने हात स्वच्छ करून मिळालेल्या वेळेत होईल तेवढा पेपर उरकण्यास सुरवात केली.
ती कॉलेजात पोचली. गाडी स्टॅंडला लावून वर्गाकडे निघाली तर तिला मघाची बाईक दिसली. "अरेच्चा! म्हणजे हा आपल्याच कॉलेजात शिकतो तर; पण त्याचा तर पेपर असणार, म्हणजे आपली गाडी दुरुस्त करण्याच्या नादात त्याला पेपरला पोचायला वेळ झाला असणार. बापरे! आपल्यामुळे त्याचे नुकसान होणार? पण काहीही असो. त्याच्या हातात जादू आहे. केवळ एका स्क्रू ड्रायव्हरने त्याने आपली गाडी दुरुस्त केली. पण आपल्यामुळे त्याचं नुकसान होणार हे नक्की. काय करावं?...पटकन्‌ काही तरी आठवून तिनं वहीत पटापट काहीतरी लिहिलं आणि तो कागद फाडून त्याच्या बाईकच्या हॅंडलला अडकवून ती पेपरला निघून गेली.
--
पेपर सुटला. काहीसा चेहरा पाडून तो वर्गातून बाहेर आला. हा विषय काही सुटत नाही. बाबा जाम धूर काढणार. काय सांगायचं त्यांना? काय अवदसा आठवली आणि त्या पोरीला मदत करत बसलो. पण दिसत होती गोड. अशी छान मैत्रीण असावी आपली. पण आता बाबांना काय सांगायचं? विचार करत तो बाईकजवळ आला. किक मारणार एवढ्यात त्याचं लक्ष समोर हॅंडलला अडकवलेल्या कागदाकडे गेलं. कुतूहलाने त्याने कागद काढला आणि वाचला. पेपर अवघड गेल्याचे दुःख कोठच्या कोठे पळून गेलं. त्याच्या चेहऱ्यावर आनंदाचे ताटवे फुलून आले. मस्त शीळ मारत, त्याच खुशीत त्याने बाईकला किक मारली.
--
कागदावर लिहिलं होतं...
""मी रमा... एक्‍स्ट्रीमली सॉरी; पण स्वतःचा पेपर असतानासुद्धा तू मघाशी माझी गाडी दुरुस्त करण्यासाठी थांबलास. मी अडचणीत असताना धावलास. स्वतःचे नुकसान करून माझी मदत केलीस. तुझ्यामुळे मी परीक्षा देऊ शकले; मात्र तू पेपरला उशिरा पोचलास. तू खरंच सच्चा माणूस आहेस. असं म्हणतात, संकटावेळी धावतो तो खरा मित्र. आज मला एक सच्चा मित्र गवसला. संध्याकाळी आपण भेटू आणि मैत्रीची पहिली भेट साजरी करू कॉफी घेऊन. नक्की ये...हॅपी फ्रेंडशीप!'

Monday, August 1, 2011

हार आणि फक्त हारच! (लंडन डायरी)


खेळामध्ये हार जीत ठरलेली आहे. कोणीतरी एक हरतो म्हणूनच तर कोणीतरी जिंकतो. मात्र हरतानाही त्यामध्ये प्रतिकार केल्याचे, लढल्याचे समाधान मिळविता आणि इतरानाही देता येते. मात्र काही पराभव जिव्हारी लागणारे असतात. सोमवारी नॉटींगहॅमला झालेला 319 धावांनी झालेला दणदणीत पराभव असाच तमाम भारतीय क्रिकेटप्रेमींच्या जिव्हारी लागणारा आणि चिड आणणाराच ठरला. बाद झालेल्या बेलला पुन्हा बोलावून खेळण्याची संधी देऊन सर्वांना जिंकणाऱ्या धोनी सेनेने जिंकता येईल अशी कसोटी गमावली ती निव्वळ बेजबाबदारीने. पहिल्या दिवशी इंग्लंड संघाला दीडशेमध्ये गुंडाळण्याची संधी दवडली. त्यानंतर फलंदाजी करताना मोठी आघाडी मिळविण्याची संधी अशाच बेफिकीरीने विकेट फेकून गमावली. धावांची आघाडी दीडशेच्या घरात असती तरी ही कसोटी भारतीय संघ किमान हरला तरी नसता; पण बहुधा नियतीला ते मंजूर नसावे. ज्या खेळपट्टीने ब्रॉडचे बोट धरले त्याच खेळपट्टीने दुसऱ्या डावात प्रवीणकुमार, इशांत, श्रीशांतला दमविले. पुन्हा बेल फलंदाजी करत असताना याच खेळपट्टीने त्याच्या फटक्‍यांसाठी कोणतीही अडकाठी येऊ दिली नाही; मात्र तेथेच दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांविरुद्ध ब्रेस्नन वर अगदी दिलोजानसे फिदा झाली इतकी की त्याच्या खिशात पाच बळींचा खुराक टाकून रिकामी झाली. खेळपट्टीने जरी रंग सरड्यासारखे बदलले असले तरी भारताच्या पराभवाला फक्त तीच एकटी जबाबदार नाही तर तिच्यापेक्षा शतपटीने भारतीय फलंदाजांची हाराकिरी कारणीभूत आहे. पहिल्या डावात राहुल द्रविड वगळता एकही पठ्ठ्या खेळपट्टीवर टिकून राहू शकला नाही. दुसऱ्या डावात काही प्रमाणात सचिन तेंडुलकर (पण त्याच्या खेळात कसलीच जान नव्हती). कर्णधार महेंद्रसिंग धोनी तर फलंदाजी करण्याचेच विसरून गेल्यासारखी परिस्थिती आहे. दोन कसोटी चार डावांत मिळून त्याने अवघ्या 49 धा
वा फटकावलेल्या आहेत. राहुल द्रविड आणि लक्ष्मण वगळता एकही खेळाडू सायबांच्या गोलंदाजीचा समाचार घेण्यात यशस्वी ठरलेले नाहीत. पहिल्या कसोटीमधील जोरदार पराभवाच्या धक्‍क्‍याने भारतीय खेळाडूंनी कसलाही बोध घेतलेला नसल्याचे नॉटींगहॅम कसोटीमध्ये दिसून आले. स्विंग गोलंदाजीला एकीकडे द्रविड समर्थपणे तोंड देत असताना इतर स्पेशालिस्ट फलंदाज मात्र त्यापुढे लोटांगण घालताना दिसले. एकाच्याही खेळामध्ये ब्रॉड, अंडरसन, ब्रेस्नन आदींचा सामना करण्याची, त्यांच्यावर वर्चस्व गाजविण्याची धमक दिसली नाही. भारतीय फलंदाजीच्या 158 धावांत ठिकऱ्या उडाल्या. सामना वाचविण्याच्या दिशेने एकही भागिदारी झाली नाही. उसळत्या चेंडूवरली भंबेरी साऱ्या क्रिकेट जगताने पाहिली. 478 धावांचा डोंगर चढावयाचा असताना खेळपट्टीवर नांगर टाकायचा असतो हे आता पुन्हा एकदा भारतीय फलंदाजांना शिकविण्याची वेळ आली आहे.
पहिली कसोटी हरल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार नासिर हुसेनने भारतीय खेळाडूंवर जोरदार टिकास्त्र सोडले होते. त्यावेळी त्याने भारतीय खेळाडू थकले असून ते क्रिकेटसाठी शंभर टक्के योगदान देत नसल्याचे म्हटले होते. त्या वेळी त्याचा जाम राग आला होता; मात्र सोमवारची भारताची फलंदाजी पाहिली असता तो किती योग्य बोलला होता तंतोतंत पटते. कसोटी क्रमवारीतील अग्रस्थान जवळपास गमावल्यात जमा असलेल्या भारतीय संघाला सर्वच पातळ्यांवर कामगिरी उंचावण्याचे आव्हान आता आहे. धोनीसेनेने गेल्या दोन वर्षांत मिळविलेले यश पहिल्या दोन सामन्यात पार रसातळाला गेले आहे. विश्‍वकरंडकाची धुंदी आणि आयपीएलमधून मिळालेल्या पैशाचा खळखळाट यामध्ये भारतीय संघ हरवू लागला आहे काय? असा प्रश्‍न पडल्यावाचून राहत नाही. पहिल्या दोन पराभवाने भारतीय संघाची अब्रू तर इंग्लंडच्या वेशीवर टांगली गेली आहेच. निदान येत्या दोन सामन्यांत उरलीसुरली प्रतिष्ठा सांभाळण्यासाठी किमान प्रयत्न होतील अशी आशा आहे.