Monday, August 1, 2011

हार आणि फक्त हारच! (लंडन डायरी)


खेळामध्ये हार जीत ठरलेली आहे. कोणीतरी एक हरतो म्हणूनच तर कोणीतरी जिंकतो. मात्र हरतानाही त्यामध्ये प्रतिकार केल्याचे, लढल्याचे समाधान मिळविता आणि इतरानाही देता येते. मात्र काही पराभव जिव्हारी लागणारे असतात. सोमवारी नॉटींगहॅमला झालेला 319 धावांनी झालेला दणदणीत पराभव असाच तमाम भारतीय क्रिकेटप्रेमींच्या जिव्हारी लागणारा आणि चिड आणणाराच ठरला. बाद झालेल्या बेलला पुन्हा बोलावून खेळण्याची संधी देऊन सर्वांना जिंकणाऱ्या धोनी सेनेने जिंकता येईल अशी कसोटी गमावली ती निव्वळ बेजबाबदारीने. पहिल्या दिवशी इंग्लंड संघाला दीडशेमध्ये गुंडाळण्याची संधी दवडली. त्यानंतर फलंदाजी करताना मोठी आघाडी मिळविण्याची संधी अशाच बेफिकीरीने विकेट फेकून गमावली. धावांची आघाडी दीडशेच्या घरात असती तरी ही कसोटी भारतीय संघ किमान हरला तरी नसता; पण बहुधा नियतीला ते मंजूर नसावे. ज्या खेळपट्टीने ब्रॉडचे बोट धरले त्याच खेळपट्टीने दुसऱ्या डावात प्रवीणकुमार, इशांत, श्रीशांतला दमविले. पुन्हा बेल फलंदाजी करत असताना याच खेळपट्टीने त्याच्या फटक्‍यांसाठी कोणतीही अडकाठी येऊ दिली नाही; मात्र तेथेच दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांविरुद्ध ब्रेस्नन वर अगदी दिलोजानसे फिदा झाली इतकी की त्याच्या खिशात पाच बळींचा खुराक टाकून रिकामी झाली. खेळपट्टीने जरी रंग सरड्यासारखे बदलले असले तरी भारताच्या पराभवाला फक्त तीच एकटी जबाबदार नाही तर तिच्यापेक्षा शतपटीने भारतीय फलंदाजांची हाराकिरी कारणीभूत आहे. पहिल्या डावात राहुल द्रविड वगळता एकही पठ्ठ्या खेळपट्टीवर टिकून राहू शकला नाही. दुसऱ्या डावात काही प्रमाणात सचिन तेंडुलकर (पण त्याच्या खेळात कसलीच जान नव्हती). कर्णधार महेंद्रसिंग धोनी तर फलंदाजी करण्याचेच विसरून गेल्यासारखी परिस्थिती आहे. दोन कसोटी चार डावांत मिळून त्याने अवघ्या 49 धा
वा फटकावलेल्या आहेत. राहुल द्रविड आणि लक्ष्मण वगळता एकही खेळाडू सायबांच्या गोलंदाजीचा समाचार घेण्यात यशस्वी ठरलेले नाहीत. पहिल्या कसोटीमधील जोरदार पराभवाच्या धक्‍क्‍याने भारतीय खेळाडूंनी कसलाही बोध घेतलेला नसल्याचे नॉटींगहॅम कसोटीमध्ये दिसून आले. स्विंग गोलंदाजीला एकीकडे द्रविड समर्थपणे तोंड देत असताना इतर स्पेशालिस्ट फलंदाज मात्र त्यापुढे लोटांगण घालताना दिसले. एकाच्याही खेळामध्ये ब्रॉड, अंडरसन, ब्रेस्नन आदींचा सामना करण्याची, त्यांच्यावर वर्चस्व गाजविण्याची धमक दिसली नाही. भारतीय फलंदाजीच्या 158 धावांत ठिकऱ्या उडाल्या. सामना वाचविण्याच्या दिशेने एकही भागिदारी झाली नाही. उसळत्या चेंडूवरली भंबेरी साऱ्या क्रिकेट जगताने पाहिली. 478 धावांचा डोंगर चढावयाचा असताना खेळपट्टीवर नांगर टाकायचा असतो हे आता पुन्हा एकदा भारतीय फलंदाजांना शिकविण्याची वेळ आली आहे.
पहिली कसोटी हरल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार नासिर हुसेनने भारतीय खेळाडूंवर जोरदार टिकास्त्र सोडले होते. त्यावेळी त्याने भारतीय खेळाडू थकले असून ते क्रिकेटसाठी शंभर टक्के योगदान देत नसल्याचे म्हटले होते. त्या वेळी त्याचा जाम राग आला होता; मात्र सोमवारची भारताची फलंदाजी पाहिली असता तो किती योग्य बोलला होता तंतोतंत पटते. कसोटी क्रमवारीतील अग्रस्थान जवळपास गमावल्यात जमा असलेल्या भारतीय संघाला सर्वच पातळ्यांवर कामगिरी उंचावण्याचे आव्हान आता आहे. धोनीसेनेने गेल्या दोन वर्षांत मिळविलेले यश पहिल्या दोन सामन्यात पार रसातळाला गेले आहे. विश्‍वकरंडकाची धुंदी आणि आयपीएलमधून मिळालेल्या पैशाचा खळखळाट यामध्ये भारतीय संघ हरवू लागला आहे काय? असा प्रश्‍न पडल्यावाचून राहत नाही. पहिल्या दोन पराभवाने भारतीय संघाची अब्रू तर इंग्लंडच्या वेशीवर टांगली गेली आहेच. निदान येत्या दोन सामन्यांत उरलीसुरली प्रतिष्ठा सांभाळण्यासाठी किमान प्रयत्न होतील अशी आशा आहे.

1 comment:

भानस said...

संपूर्ण हाराकिरी... :(:(:(