Monday, August 22, 2011

नंबर वन...(इंग्लंड डायरी)


भारताचा इंग्लंड दौरा सुरू झाल्यानंतर जेव्हा शाब्दिक युद्ध छेडले, त्यावेळची गोष्ट. "या इंग्लंड दौऱ्यामध्ये भारतीय संघाच्या हाती फारसे काही लागणार नाही, उलट भारतीय संघाला नंबर एकचा किताब गमवावा लागेल, असे भाकित इंग्लंडचा माजी कर्णधार नासीर हुसेनने केले होते. त्यावेळी भारतीय संघाचे पाठिराखे त्याच्यावर तुटून पडले होते. हुसेनच्या डोक्‍यावर परिणाम झालेला आहे, असे म्हणण्यापर्यंत त्याच्यावर टीका झाली; पण नासीरने भविष्य पाहिले होते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्याने केलेल्या भविष्यवाणीला कोणत्याही प्रकारचा तडा जाणार नाही, अशा पद्धतीने भारतीय संघ खेळला. (अपवाद फक्त राहुल द्रविडचा. तो एकटाच लढला.) क्रिकेटच्या सर्व पातळ्यांवर स्ट्रॉसच्या संघाने धोनीच्या संघाला चारीमुंड्या चीत केले. भारतीय संघाला दुखापतीने घेरले, असे लंगडे समर्थन होऊ शकते; पण असे म्हणून इंग्लंडच्या खेळाडूंनी घेतलेल्या कष्टाला कमी लेखण्याचा अधिकार नक्कीच कोणाला नाही. इंग्लंड संघाने दौऱ्याच्या सुरवातीपासून अत्यंत योजनाबद्ध असा खेळ केला. चार कसोटी सामन्यांतील आठ डावांत त्यांनी भारतीय संघाला बाद केले. बरं, हे बाद करताना त्यांनी अखेरच्या कसोटीचा अपवाद (पहिल्या डावात 300 धावा केल्या होत्या.) वगळता तीनशे धावांचा टप्पा पार करू दिलाच नाही. भारताच्या दिग्गज फलंदाजांना त्यांनी पद्धतशीरपणे जखडून ठेवले. त्यांच्यावर उसळत्या चेंडूंचा मारा करतानाच हळूवारपणे चेंडू स्विंग करून भारतीय फलंदाजांना सेटच होऊ दिले नाही. राहुल द्रविडचा अपवाद वगळता एकाही खेळाडूला ब्रॉड, अँडरसन, ब्रॉस्नन आणि स्वॉन यांची तगडी गोलंदाजी खेळता आली नाही तसेच समजलीही नाही. या सर्व गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांचा अगदी बारकाईने अभ्यास करून गोलंदाजी केली. घरच्या मैदानांवर आणि जिवंत खेळपट्ट्यांवर त्यांना फा
यदा होणार, हे नक्कीच होते. भारतीय फलंदाजांना येथील चारही खेळपट्ट्यांना त्यांच्याच गोलंदाजांविरोधात फूस लावता आली नाही. द्रविडने खेळपट्ट्यांना आपल्या बाजूने वळविण्याचा केलेला प्रयत्न यशस्वी झाला. या खेळपट्ट्यांनी त्याच्या पदरात धावांचे माप अगदी पुरेपूर टाकले. सगळे सहकारी धडाधड पडत असताना या पठ्ठ्याने या खेळपट्ट्यांवर तीन शतकांसह 461 धावांचा रतीब घातलाच. बरं, प्रत्येक वेळी त्याने भारतीय संघाचा पराभव लांबविण्याचा कसोशीने प्रयत्न केला. त्याला पुढून साथच मिळाली नाही आणि पराभवाचे शिक्के बसत गेले.
फलंदाजीमध्येही पीटरसन, बेल, प्रायर, कुक यांनी कोणतीही कसूर बाकी ठेवली नाही. कुक, पीटरसन आणि बेलने भारतीय गोलंदाजांची शिकार करून द्विशतकांचे ताव मारले आणि तृप्तीचे ढेकर दिले. कमकुवत भारतीय गोलंदाजांना इंग्लंडच्या भक्कम फलंदाजीला संपूर्ण उद्‌ध्वस्त करण्यात फारसे यश मिळालेच नाही. इंग्लंडच्या सर्वच प्रमुख फलंदाजांनी धावांची लयलूट केली आणि नंबर एकचा मुकुट अगदी दिमाखाने आपल्या डोक्‍यावर चढविला. चारही सामने मोठ्या फरकाने जिंकणाऱ्या इंग्लंडने कसोटी क्रिकेटविश्‍वात आपणच नंबर एक आहोत, याची द्वाही फिरविली. खेळाच्या सर्वच आघाड्यांवर उत्तम कामगिरी करून नंबर एकच्या सिंहासनावर विराजमान होण्यासाठी लागणारे सर्व गुण दाखवून दिले. भारतीय क्रिकेट किती बेभरवशी आहे, हे जगासमोर उघडे केले. कर्णधार झाल्यापासून कसोटीमध्ये अपयश न पाहिलेल्या कर्णधार महेंद्रसिंग धोनीला प्रथमच मोठा पराभव पत्करावा लागला. यामधून सावरून तो नक्कीच बाऊन्स बॅक करेल, अशी आशा आहे; मात्र सद्या तरी इंग्लंडच्या रस्त्यांवर भारतावरील विजयाचा जल्लोष साहेब करत आहेत आणि त्यासाठी ते खरोखरच पात्र आहेत. भारतीय संघाने आत्मचिंतन करून वनडे मालिकेसाठी कम बॅक करावे, हीच अपेक्षा.

No comments: