Sunday, July 24, 2011

कोण-कोण होणार तारणहार?(लंडन डायरी)


लॉर्डस्‌वरील कसोटीत चौथ्या दिवशी सकाळी भारतीय गोलंदाजीला अचानक धार आली आणि पहिल्या डावात पूर्णपणे निष्प्रभ ठरलेला इशांत शर्मा भेदक बनला. त्याने सायबांना गुंडाळून भारताला ड्रायव्हर सीटवर नेण्याचा जोरदार प्रयत्न केला. त्यामध्ये तो काही प्रमाणात यशस्वीही झाला; मात्र दुसऱ्या बाजूने तेवढ्याच ताकदीने साथ मिळाली नाही. साहेबांचे सहा गडी 107 धावसंख्येत तंबूत पाठविल्यानंतर इंग्लंड काहीसे बॅकफुटवर आले होते; मात्र पहिल्या डावाप्रमाणेच दुसऱ्या डावातही प्रायर आडवा आला आणि या वेळी त्याने ब्रॉडला सोबतीला घेतले. पहिल्या दोन तासांतील नूर दोघांनी नंतरच्या सत्रांमध्ये पूर्णपणे बदलून टाकला. पुन्हा एकदा भारतीय गोलंदाजीवर वर्चस्व गाजवून पाहता पाहता संघाची आघाडी चारशेच्यावर नेली; मात्र खेळपट्टी फलंदाजीला साथ देत आहे हे पाहून स्ट्रॉसने डाव लगेच सोडण्याची घाई केली नाही. मग मिळालेल्या संधीचा फायदा उठवून प्रायरने लॉर्डस्‌च्या यादीत आपले नाव कोरताना सुरेख शतकी खेळी साकारली. संघाला पुन्हा ड्रायव्हरसीटवर नेताना त्याने व ब्रॉडने भारतीय गोलंदाजी फोडून काढली. धोनीने पुन्हा एकदा गोलंदाजी करून ही जोडी फोडण्याचा प्रयत्न केला; मात्र प्रायर-ब्रॉडपुढे कोणाचीच डाळ शिजली नाही. अखेरचा सुमारे दोन तासांचा खेळ शिल्लक असताना प्रायरने शतक पूर्ण केले आणि स्ट्रॉसने त्यांना बाल्कनीतून माघारी येण्याची खूण केली.
कसोटी वाचविण्यासाठी चौथ्या दिवसाचे अखेरचे दोन तास आणि पाचवा संपूर्ण दिवस खेळण्याचे आव्हान घेऊन मैदानात उतरणाऱ्या भारतीय संघाला पहिल्या डावातील तारणहार द्रविडला-मुकुंदसह सलामीला उतरवावे लागले. प्रायरच्या स्विपवर गंभीरच्या कोपरावर बसलेला जोरदार तडाखा सहन न होण्यासारखाच होता. द्रविडने मुकुंदसह परवाची उर्वरीत खेळीच सुरू केल्याप्रमाणे सुरवात केली. पहिल्या चेंडूपासूनच तो मस्तपैकी सेट होऊन खेळला. मुकुंदने आश्‍वासक सुरवात केली; पण अनुभवाची कमतरता जाणवली आणि पुन्हा एकदा चेंडू स्टंपवर ओढवून तो बाद झाला. त्यानंतर लक्ष्मण मैदानावर आला आणि भारताच्या या सिनीयर जोडीने दिवसभरात भक्कमपणे किल्ला लढवून कोणतेही खिंडार पडू ने देण्याची काळजी घेतली. विशेष म्हणजे कसोटी वाचविण्याचे ओझे डोक्‍यावर असताना दोघांनी अत्यंत पॉझीटीव्ह खेळ केला. लक्ष्मणने एका षटकात सलग तीन चौकार मारून सामना जिंकण्यासाठीही प्रयत्न करता येऊ शकतो हे दाखवून दिले. आता अखेरच्या दिवशी सामना वाचविण्यासाठी संघासाठी तारणहार होण्याची भूमिका कोण-कोण बजावतो हे पहावे लागेल. त्याचबरोबरीने कोलकत्त्यात ज्याप्रमाणे लक्ष्मणने काही वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पिछाडीवरून येऊन भारतीय संघाला जिंकून दिले होते तसा पराक्रम आताही करणार का हीच उत्सुकता आहे. त्यासाठी 378 धावांचा डोंगर पार करण्याची अवघड कामगिरी त्यांच्यापुढे असेल आणि आणि जेव्हा-जेव्हा भारतीय संघ संकटात सापडला आहे तेव्हा लक्ष्मण त्याच्या पूर्ण क्षमतेने बचावासाठी धावल्याचा लौकिक आहे. अखेरच्या दिवशीही तो आपला हा लौकिक द्रविडच्या साथीने कायम ठेवेल अशी अपेक्षा आहे. फक्त या दोघांसोबत सचिन, धोनी, रैना आणि जखमी गंभीर यांनीही आपला वाटा उचलण्याची आवश्‍यकता आहे.

No comments: