Friday, July 29, 2011

ब्रॉड आडवा आला (लंडन डायरी)



लॉर्डस्‌वर भारताला पराभूत करण्यामध्ये ख्रिस ब्रॉडचा वाटा मोठा होता. गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये त्याने धडाकेबाज कामगिरी करताना भारतीय संघाची भंबेरी उडवली होती. ज्या खेळपट्टीवर त्याच्या गोलंदाजीवर भारतीय फलंदाजांना खेळता आले नव्हते, त्याच खेळपट्टीवर भारतीय जलदगती गोलंदाजीचा मारा त्याने फोडून काढला. त्याने प्रायरसोबत भक्कम भागीदारी नोंदवताना भारताच्या पराभवाचा पाया रचला होता. आजही भारतीय संघ पूर्ण वर्चस्व मिळवण्याच्या वाटेवर असताना ब्रॉड भक्कमपणे आडवा आला आणि संघाला दोनशे धावांच्या पार नेले. ब्रॉड खेळला नसता तर इंग्लंडचा डाव दीडशेच्या आत खल्लास झाला असता; पण ब्रॉडने प्रवीणकुमार, इशांत आणि तेजतर्रार श्रीशांतसह हरभजनसिंगच्या गोलंदाजीचा यथेच्छ समाचार घेतला. त्याने जोरदार प्रतिआक्रमण करून भारताचे मनसुबे पुरते उधळून लावले. त्याने 66 चेंडूंमध्ये 64 धावा फटकावताना नऊ चौकार लगावले. त्याने हे आक्रमण रचताना स्वानला हाताशी धरले. संघाची धावसंख्या 124 असताना स्वान मैदानात उतरला होता. त्यानंतर दोघांनी भारतीय गोलंदाजीवर प्रहार करण्यास प्रारंभ केला. कुमारच्या गोलंदाजीवर मुकुंद झेल घेईपर्यंत संघाची धावसंख्या 197 वर पोचली होती. त्यानंतर अँडरसनच्या साथीने ब्रॉडने इंग्लंडला दोनशेचा टप्पा पार करून 221 वर पोचविले. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ब्रॉड गेल्या काही सामन्यांत कामगिरी करत आहे. विशेषतः जेव्हा संघ अडचणीत असतो तेव्हा तो अलीकडे खेळताना दिसतोय.
ब्रॉडचे प्रतिआक्रमण वगळता आज भारतीय गोलंदाजांची तारीफ करावी तेवढी थोडीच आहे. झहीरच्या अनुपस्थितीत संधी मिळालेल्या श्रीशांतने डोके शांत ठेवत गोलंदाजी करताना आपला क्‍लास आज तरी दाखवलाच. त्याच्या संगतीने इशांत आणि प्रवीणकुमारने नॉटिंगहॅमच्या जिवंत खेळपट्टीचा फायदा अगदी अधाशासारखा उठविला. भारतीय क्षेत्ररक्षकांनी दोन-तीन झेल सोडले नसते तर इंग्लंडला आणखी स्वस्तात तंबूत पाठविण्यात या जलद त्रिकुटाला नक्की जमले असते. तिघांनीही अचूक गोलंदाजी करताना स्विंगवर भर दिला. विशेष म्हणजे तिघांनीही टप्पा बिलकूल भरकटू दिला नाही. तिघेही एकमेकांना मार्गदर्शन करताना दिसत होते आणि हे चित्र निश्‍चितच सुखावणारे होते. झहीरच्या नसण्याचा कोणताही परिणाम होऊ न देण्याचा विडा तिघांनी उचलल्याप्रमाणे गोलंदाजी केली आणि मग बळीही समसमान वाटून घेतले. त्यामुळे हरभजनला फार काही करायची वेळ आली नाही. त्याने अखेरचा घाव घालताना ब्रॉडला बाद केले आणि सायबांना 221 धावांवर रोखले.



धावांची रास ओतायला हवी
सायबांना स्वस्तात बाद करण्यात जरी यश मिळाले असले तरी त्यांच्याकडे अँडरसन, ब्रॉडसारखे भेदक गोलंदाज आहेत हे विसरून चालणार नाही. हा सामना जिंकण्यासाठी जगातली सर्वात भक्कम फलंदाजी असल्याचे बिरूद मिळविणाऱ्या भारतीय संघाला धावांची रास ओतण्याची गरज आहे. पहिल्याच चेंडूवर मुकुंदला गमावणाऱ्या भारतीय खेळाडूंना किमान दोन मोठ्या भागीदाऱ्या या मैदानावर करण्याची गरज आहे. खेळपट्टीचा रंग पाहता हे काहीसे अवघड आहे; मात्र "धोनीसेनेला' हे करावेच लागेल; अन्यथा गोलंदाजांनी घाम गाळून जे कमावले ते फलंदाजांनी गमावले, असे म्हणण्याची वेळ भारतीयांवर येऊ शकते.

1 comment:

भानस said...

ह्म्म्म्म... २२१ च्या आव्हानाला सामोरे जाताना एक गडी परतलाही आहे... :(:( एका मोठ्या मजबुत पार्टनरशीपची नितांत गरज आहे... कोण करेल??