Thursday, July 28, 2011

लढाई अस्तित्वाची (लंडन डायरी)


कसोटी क्रमवारीत हा संघ अव्वल आहे. वेस्ट इंडीजमध्ये कसोटी मालिकाही जिंकलीय. वनडेचा विश्‍वकरंडकही पटकावलाय. अशा भारतीय संघाच्या इंग्लंड दौऱ्याची सुरवात पराभवाने झाली आणि कोट्यवधी क्रिकेटरसिक चुकचुकले. भारतीय संघाच्या अव्वल स्थानाविषयीच प्रश्‍नचिन्ह उभे केले जाऊ लागले. शुक्रवारपासून नॉटींगहॅमच्या वेगवान खेळपट्टीवर सुरू होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला अस्तित्वाची लढाई लढावी लागणार आहे. लॉर्डस्‌च्या खेळपट्टीने भारतीय फलंदाजांना खेळवले. त्यापेक्षा वेगळी परिस्थिती नॉटींगहॅमला नाही; मात्र येथे असणाऱ्या कोरड्या वातावरणाचाच पडला तर फरक पडू शकतो. तसे पाहता हे मैदान भारतीयांसाठी लकी आहे. या मैदानावर भारतीय संघाने इंग्लंडमधील विजय साकारलेला आहे. या मैदानावर सचिनची बॅटही चमकलेली आहे. या मैदानावर सचिनने सत्तरपेक्षा जास्त सरासरीने धावा करताना शतकही झळकावलेले आहे. हे सर्व जरी खरे असले तरी भारतीय संघापुढील मुख्य समस्या गोलंदाजीची आहे. झहीरखान नाही, हरभजन निष्प्रभ ठरतोय (अर्थात वेगवान खेळपट्टीवर त्याच्याकडून किती अपेक्षा करणार म्हणा), इशांत, प्रवीणकुमार प्रयत्न करताहेत पण ते पुरेसे नाहीत. झहीर खेळू शकणार नसल्यामुळे श्रीशांत किंवा मुनाफ पटेलला संधी मिळण्याची शक्‍यता आहे. श्रीशांतला संधी दिल्यास त्याचा "आक्रमक' स्वभाव उपयोगी पडू शकतो अर्थात तो गोलंदाजीमध्येच जास्त वापरला गेला तर. दुसरीकडे फलंदाजी भक्कम असली तरी गंभीर खेळणार की नाही या विषयी मोठे प्रश्‍चचिन्ह आहे. गंभीर न खेळल्यास युवराजसिंगला संधी मिळू शकते. युवराज संघात आल्यास मुकुंदसह पुन्हा एकदा द्रविडलाच सलामीला उतरावे लागणार हे नक्की.

लॉर्डस्‌वरील मोठ्या पराभवामुळे भारतीय संघाच्या एकूणच दर्जाविषयी प्रश्‍नचिन्ह उभारण्याची अहमहिका लागलेली आहे; मात्र त्याविषयी कोणतेही भाष्य न करता कर्णधार धोनीने सामन्याच्या पुर्वसंध्येला आम्ही सकारात्मक मानसिकतेने या सामन्यात उतरू असे सांगून प्रत्यक्ष मैदानातच उत्तर देण्याची मानसिक तयारी केल्याचे स्पष्ट होत आहे. यापूर्वीचा इतिहास पाहता अनेकदा भारतीय संघ परदेशी भूमीवर सलामीच्या सामन्यात अपयशी ठरल्यानंतर पुन्हा उसळून आला असून उत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न भारतीय संघाने केलेला आहे. नॉटींगहॅमच्या मैदानावरही अशाप्रकारेच भारतीय संघ पुन्हा एकदा उत्तम कामगिरीसाठी उसळी घेण्याची अपेक्षा आहे. हे जरी खरे असले तरी गेल्या सामन्यात भारतीय फलंदाजी कापून काढणाऱ्या अँडरसनची या मैदानावरील कामगिरी अफलातून अशी आहे. चार सामन्यात त्याने 28 बळी मिळविलेले आहे. त्यामध्ये चार वेळा त्याने पाचपेक्षा जास्त बळी मिळविलेले आहेत हे विसरून चालणार नाही. सध्या पूर्ण फॉर्मात असलेल्या अँडरसनचे हे फेव्हरीट मैदान आहे. त्याच्या जोडीला ब्रॉड आहेच. भारतीय संघाला पराभूत करून नंबर एकचा मुकुट हिसकावून घेण्यास स्ट्रॉस आणि कंपनी एकीकडे सज्ज होत असताना जिव्हारी लागलेल्या पराभवावर विजयाचे मलम लावून आम्हीच "नंबर एक' आहोत हे दाखवून देण्यासाठी भारतीय संघ नक्कीच प्रयत्न करेल अशी आशा आहे. पाहुया शुक्रवारी सकाळीच या फैसल्याला सुरवात होईल आणि मग नॉटींगहॅमच्या खेळपट्टीचे खरे रंग दिसायला सुरवात होईल.

2 comments:

Anonymous said...

इंग्लंड २००च्या आसपास आटपेल पण नंतर भारतीय शंभर मध्ये आटपणार नाही याची हमी नाही

भानस said...

घोडामैदान समोरच आहे... पाहुया काय काय घडतेय. :)