Thursday, October 2, 2008

माणुसकीचाघालू जागर

माणुसकीचाघालू जागर
घटस्थापनेने विधिवत नवरात्र सुरू होईल आणि सारा भवताल भक्तीच्या जागराने भरून आणि भारून जाईल. पहाटेच्या काकडआरतीपासून रात्रीच्या शेजारतीपर्यंत मंदिरांना जाग राहील. घराघरांतील देवघरांत बसविलेले घट, अखंड तेवणारा नंदादीप, भक्तीभरल्या मनाला मिळणारी मिणमिणत्या प्रकाशाची आश्‍वासक ऊब आणि मुखी परमेश्‍वराचे नामस्मरण, असं वातावरण आपल्या सभोवताली राहील. सश्रद्ध मनांसाठी हा उत्सव प्रेरणा, आश्‍वासन आणि दिलासा घेऊन येणाराच असेल; मात्र आजूबाजूला पाहिल्यास सध्या सामाजिक भान हरवल्यासारखी स्थिती आहे. ऐहिक सुखापाठी लागलेला एक समाज आणि टीचभर पोटाचे खळगे भरण्यासाठी खुरटणारा समाज हा ठळक विरोधाभास संवेदनशील मनाला बोचणारा आहे. ही बोच जाणवू न घेता "मला काय त्याचे?' म्हणत कोषात जगणाराही एक समाज फोफावतोय हे खरे दुःख आहे.बुद्धीदेवता श्री गणेशाच्या विसर्जन मिरवणुकीत डोकी तापतात, त्याचे पर्यवसान छोट्या-मोठ्या मारामारीत होते. कुणाला याचं काही देणं-घेणं नसतं! रस्त्यावर एखादी मोटारसायकल घसरते, त्यावरील दोघे जखमी होऊन तळमळत उपचाराची वाट पाहत पडतात. येणारे-जाणारे नुसतेच बघे. जखमी तरुण तडफडत असतो. मग कुणीतरी "हृदय' असलेला माणूस मदतीचा हात देतो; पण तोपर्यंत उशीर झालेला असतो. वीज वाहक तारेच्या स्पर्शाने एक माऊली जिवाला मुकते. कोणाच्या तरी बेफिकिरीची सजा कोणाला तरी मिळते. अशा कितीतरी घटना सभोवती घडत असतात आणि मला काय त्याचे? करत जगणारा समाज पुढचा दिवस गाठण्यातच मग्न असतो. या घटनांमुळे संवेदनशील मने मात्र हळहळतात. चुकचुकतात. मनातच आक्रंदत राहतात. काही तरी करायला हवं या जाणिवेने पेटून उठतात; पण त्यांच्या पेटण्याची धग चौकटीआडच बंदिस्त राहते. पुन्हा घटना घडते, पुन्हा तसंच होतं. दिवस कॅलेंडरवर उलटला जातो. आक्रंदणारी मनं म्हणतात हे बदलायला कोणीतरी मसिहा, देवदूत जन्मास यायला हवा! आणि मग बेटं मन वाटेकडे डोळे लावून बसतं.... ...आपण किती दिवस असं वाट पाहत राहायचं. ज्या समाजाचे आपण घटक आहोत, तो कुणामुळे तरी डागाळतो. तो तसा होऊ द्यायचा का? याचा विचार आपणच करायला हवा. आजपासून सुरू होणारं नवरात्र त्यासाठीचा अगदी उत्तम मुहूर्त आहे असे मानू! चौकटीआड बंदिस्त झालेली पेटून उठण्याची, काहीतरी उत्तम, समाजहित साधण्याची, अंधार दूर लोटण्याची धग खुशाल भडकू देऊ. आहे रे-नाही रेची दरी सांधणारा सेतू बनू! समाजाचा रंग एकच बनण्यासाठी आपले मूळचे रंग विसरून जाऊ. गावगप्पांतून इमले न बांधता प्रत्यक्ष कृती करू. नवरात्रात दररोज अंबेचा जागर होईल. आपणही मिळून सारे माणुसकीचा जागर घालू!

Wednesday, September 17, 2008

शब्दांमधला कागद

विद्यापीठात खिडकीजवळ फी भरण्यासाठी मुलांची रांग लागलेली. रांगेत मीही उभा. माझी भिरभिरती नजर भवतालचे प्रसन्न चेहऱ्यावरचे भाव टिपण्यात मग्न. काही चेहरे काळजीने भरलेले, काहीसे बेफिकीर, काही नुसतेच टाईमपाससाठी रेंगाळलेले, काही स्वतःच्याच मस्तीत. वातावरण भारून टाकणारे. तेथून एखादी गेली तरी सुगंध पेरून जाणारी. काही शोधक-चिकित्सक; तर काही अनामिक भीतीने व्यापलेले. मौज होती एकापाठोपाठ एक चेहरे वाचताना आणि मुखवटेही. चेहऱ्यांनी माझं वाट पाहणं काहीसं सुसह्य केलं. एखादी छबी रेंगाळतानाचा दुसरी तिची जागा घ्यायची अगदी अलगद. बाहेर पावसाची सर आली आणि अनेक पावलांनी आमच्या आजू-बाजूचा जागा आपलीशी केली. काही मिनिटं गलका झाला. चेहऱ्यांची दुनिया आणखी संपन्न झाली. रांग सरकू लागली. नजर एका ठिकाणी स्थिरावली. बाजूच्या उघड्या दरवाजातून तिने आत डोकावले. "ते दोघे' बहुधा गप्पात रंगले असावेत. एक खुर्चीत बसलेला, दुसरा उभाच. गलक्‍याने कानावर काही येत नव्हते पण ; पण नजर वारंवार तेथेच रेंगाळली. काय बोलत असावेत बरं?खुर्चीतल्याला चष्मा होता. शर्ट व्यवस्थित खोचलेला. समोरचा उभाही अगदी स्वच्छ कपड्यता, हातात वही घेतलेला. दोघेही विद्यार्थीच असावेत. त्यांचे आजूबाजूला लक्षच नव्हते. मध्येच उभा राहिलेला बसलेल्याच्या जवळ येई. दोघेही एकमेकांकडे टक लावून बोलत, चेहरे उजळत, खळखळत आणि टाळी देत. झकास चालेलेलं. उभा असलेला सटकला. दोघांत बिनसले असावे. बसलेल्यावर तो काहीसा चिडलेला दिसला. मग बसलेल्याने त्याची समजूत काढली. पुन्हा हसले. काय बोलत असावेत बरं? मागच्या मुलाचा धक्का बसला तंद्री भंगली. रांग पुढे सरकली. ते मला दिसेनासे झाले. रांगेतले माझे काम उरकले आणि मग पुन्हा त्यांची आठवण झाली. पावले आपसूकच मघाच्या खोलीकडे वळली. तेथे आता तो एकटाच खुर्चीत कसल्याशा विचारात. मी त्याच्यापुढे गेलो, हात पुढे केला "हाय!' त्याने हातात हात घेतला व नुसताच हसला. मी पुन्हा म्हणालो, "हाय !' तो बोलला काहीच नाही. त्याने माझा हात हळूवार दाबला. सात काळजाच्या आतलं माझं घरं थोडं हललं. तरीही मी पुन्हा विचारलं, "नाव काय, तुझं?'
त्याच्या चेहऱ्यावर मोठे प्रश्‍नचिन्ह------------------------------------------------------------------------आवाज वाढवायला नको होता असं आता वाटतंय पण काय करायचं किती सहज आणि स्वस्त शब्द उच्चारतो मी. "नाव काय तुझं!' त्याने हातवारे करुनच सांगायला सुरवात केली आणि मला अपराध्यासारखं वाटू लागलं.त्याने माझा हात पुन्हा हातात घेतला आणि खूणेनी बोलता व ऐकताही येत नसल्याचे सांगितले. मी खिशातून कागद काढला. त्यावर "तुझं नाव काय?' असं लिहिलं आणि त्याच्या समोर धरलं.त्यावर त्यानं लिहिलं "संतोष'. पाहता पाहता कागद बोलू लागले. ओळखीचा पूल बनत गेला आणि रस्ता छान वळणे घेत-घेत पुन्हा भेटूच्या थांब्यावर थांबला. विद्यापीठातच "संतोष'चा मित्रासही काम करीत असल्याचे समजले. शहरात होस्टेलवर राहून दोघे घरी मदत करत होते. ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------दोन दिवसांपूर्वी छोट्या मैत्रिणीसोबत रेल्वे स्टेशनावर गेलो होतो. आमच्यात छान गप्पा रंगलेल्या. तिचे प्रश्‍न आणि माझी उत्तरांची जुगलबंदी चाललेली. एवढ्यात पाठीवर गाढ मैत्रीची थाप पडली. मागे वळून पाहिले तर "संतोष'. पुढचा कितीतरी वेळ आम्ही दोघ कागदावर काय लिहितोय ते ती पाहतच राहिली.....

Wednesday, August 27, 2008

शब्दातीत

शब्दातीत
का कोणास ठावूकतू समोर आलीस आणि आजशब्दांनी मनात फेर धरला !तशी तू रोजच भेटतेस, कधी प्रत्यक्ष... कधी अप्रत्यक्ष,कधी अस्पर्श, कधी स्पर्श भरून...कधी तशीच...आज तू भेटलीस...वेगळीच भासलीस...तारा छेडल्याच...मग कुठून सुरू करू?सारे मला शब्दप्रभू म्हणतात पण... सालं आज शब्दच फितूर!पण तरीही कविता करायची इच्छा आहेच.तुझे भुरभुरणारे केस...थरथरणारे ओठ...गुलाबी गाल...भाव विभोर का काय म्हणतात ते डोळे...सारं सामावून घेणारी नजर...च्या मारी सुचायला लागलं की,पण किती दमछाक !जावू दे... कशाला गुंतून पडाउपमा, अलंकार, विशेषणात...सौंदर्य अनुभवायचं सोडूनमी विडावलोयते शब्दांत पकडायला...पण खरं सांगूअवखळ वारा...उधाणलेला दर्या......आणि बेलगाम मन...कधी मावलंय का शब्दांत.तू ही तशीच अमर्याद...शब्दातीत

Friday, August 1, 2008

ती...

ती...
भुरभुरणारा पाऊस झेलत मी क्षितीज न्याहळत उभा. कलू लागलेल्या सूर्याच्या साक्षीने हाताशी वाफाळलेला गरम चहा आणि नाकाशी गाड्यावरच्या गरम भज्याचा रेंगाळलेला खमंग स्वाद. हिरवाईला साद घालत चिंब टेकड्या. थेंबांचे सगेसोयरे एकमेकांच्या हातात-हात घालून प्रवाही होऊन निघालेलेले अवखळपणे सरीतेच्या भेटीला. डोळ्यांच्या बाहुल्या मोठ्या करीत मी सारं पहात उभा, हाताशी गरम चहा आणि विचारांची मैफल स्टॅंडींग.तंद्री भंगली मोबाईल रिंगने...पाहिले, अंदाज खरा ठरला, तिचाच होता.ती ः तू कुठायस? काय करतोयस? आपलं ठरलं होतं ना? पाऊस पडतोय? तू भिजतोयस? रेनकोट घातलास? बाईकवर आहेस?मी ः थोडा श्‍वास घे!!! घेतलास हां आता विचार उरलेले प्रश्‍न !ती ः चेष्टा करतोस? मी आलेय, तू केव्हा येणार? माझी छत्री? तू काही खाल्लस? चहा तरी पिलास? ऑफिसातून बाहेर पडलास?.... पुन्हा प्रश्‍नच.मी ः तुझे प्रश्‍न संपलेत? पलीकडून तिची बडबड...चिंब भिजून मी कोरडाच. का? कोणास ठावूक! कानावर शब्द तिचे आत द्वंद माझेच.ती ः तुझं लक्ष नाही का? मी बंद करू का? हल्ली तू मला टाळतोस!मी ः ए वेडाबाई चल काही तरीच काय? (तू मला टाळतोसच्या वाक्‍यासरशी मी अगदी भानावर. हिरवाई गायब, खमंग स्वाद गायब, सरीतेच्या भेटीने निघालेले प्रवाह गायब. द्वंद बंद. कान तिच्या शब्दांकडे आणि हातात चहा व डोक्‍यात विचारांची बदललेली मैफल स्टॅंडींग.ती ः एक काय झालं? सॉरी ! दुखावलास? तुला "हर्ट' नव्हतं रे करायचं! पण...मी ः छे गं! मीच सॉरी. माझं लक्ष नव्हतं. पण काय?माझ्या त्या पण काय? वर बहुधा तिच्याही डोक्‍यांत विचारांचं काहूर माजलं असणार. (मायला माझी ती विचारांची मैफल, तिचे विचार ते काहूर?)ती ः तू भिजलायस का? (विषय बदलला)मी ः तुला कसं कळलं?ती ः मला कळतं सारं !!! मी तिथेच आहे.मी ः काय???( मी मोठा आ वासतो. माझी नजर तिच्या अस्तित्वाच्या शोधात भिरभिरते)ती ः मला शोधलसं? (तिच्या हसण्याचा खळखळाट आणि मन माझे चिंब...चिंब...) मी ः हो... (मी इनोसंटली बोलून गेलो...पण हिला कसं कळलं? च्यायला एवढ्या झकास वातावरणातही विचार आहेतच )ती ः काय झालं? कुठे हरविलास?मी ः ए मी फोन बंद करतो...दहा मिनिटांत पोहोचतो.ती ः प्रॉमीस! मी ः एस माय डियर!ती ः आता छान वाटलं. ये सावकाश. वाट पाहतेय तुझी...मग ठरवू...(अगदी लहान मुलासारखां वागतो हा काही वेळेस)फोन बंद. माझी मैफल पुन्हा रंगात. केवढे प्रश्‍न मघाशी तिने अधीरपणे विचारले. आता एकदम माघार. खरंच लवकर पोहोचायला हवं. पावसाला सोबतीला घेऊनच तिला गाठावं. एखादा गजरा घ्यावा का तिला? किती मुर्ख मी.घेतोच. फुलुन येईल चेहरा तिचा. लगेच माळेल गजरा; मग तिच्या चेहऱ्यावरचा आनंद टिपताना माझी धांदल उडणार. उडू दे तिच्या मारी. माझ्या आयुष्यात समाधानाची फुले फुलविण्यासाठी तीच तर आहे; मला माझ्यापेक्षा तीच तर जास्त ओळखते. म्हणून तर एवढे प्रश्‍न विचारते!मी नशिबवान. ती बायको बनलीच नाही कधी. नेहमीच बनली माझी सखी, मैत्रीण, प्रेयसी आणि खूप काही. च्यायला हातात चहा, मैफल स्टॅंडीगंच!