Friday, September 6, 2013

...गुरुरदेवो महेश्वरा...

आई-वडील हे आपले आद्य गुरू (त्यांची तुलना कोणासोबतही होऊ शकत नाही). त्यांचे बोट पकडून आपण चालू लागतो आणि सुरू होतो आयुष्याचा प्रवास. या प्रवासात आपल्याला सक्षमपणे उभे करण्यात सर्वात मोलाचा वाटा असतो तो भेटणाऱ्या शिक्षकांचा; सर्वत्र शिक्षकदिन साजरा होत असताना मला आज माझ्या तीन शिक्षकांची अगदी प्रकर्षाने आठवण आली. अर्थात ज्या-ज्या शिक्षकांच्या वर्गात बसण्याची संधी मला मिळाली त्या सर्व शिक्षकांकडून अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी शिकण्यास मिळाल्या. अगदी पटकन आठवतात अशी नावे म्हणजे, पारखे बाई, पुणेकर बाई, गुरव बाई, एम. एम. पवारमॅम, श्री. लिगाडे सर, श्री. वाघमोडे सर, काळेबाग मॅम, श्री. डी. एस. माने सर, तांबोळी मॅम, चौगुले सर, श्री. प्रकाश कुंभारसर, श्री. पिरजादे, एस. एच. पाटील, पाटील मॅम आणि इतरही शिक्षक-शिक्षिका. 
या सर्वांसोबतच आयुष्यावर सर्वाधिक प्रभाव पडला असे तीन शिक्षक म्हणजे क्षीरसागर बाई, एम. एम. शिकलगार मॅम आणि देशमुख सर.
---
ज्या वयात खूप उत्तम वाचणे, उत्तम ऐकणे, उत्तम वर्क्तृत्व म्हणजे काय आणि चांगला माणूस म्हणून जगणे म्हणजे काय याचे संस्कार होण्याची आवश्‍यकता असते अशा वयातच बाईंकडून शिकण्याची आणि त्यांच्या घरामध्ये वावरण्याची मला संधी मिळाली. त्यांनी माझ्यावर अगदी मुलाप्रमाणे प्रेम केले. नवनव्या बाबींची ओळख करून दिली. चांगली पुस्तके हातात ठेवली. ह्रदयनाथांना मी मनापासून ऐकले त्यांच्या "औदुंबर'मध्ये. मी जे काही थोडंफार लिखाण करतो त्याची पहिली ठिणगी माझ्यामध्ये चेतविण्याचं काम बाईंनी आणि त्यांची कन्या प्रियाताईने केले. क्षीरसागर गुरुजी माझ्या बाबांचे शिक्षक (त्यांनीही बाबांवर उत्तमादी उत्तम संस्कार केले) त्यामुळे त्यांच्यापासून मी बहुतेकदा दूरच असे; मात्र बाईंनी नेहमीच मला ममत्वाने अनेक गोष्टी शिकविल्या. ज्याच्या शिदोरीवर माझं आयुष्य घडतं आहे.(आणखी खूप खूप सांगता येईल)
---
दुसरे व्यक्तित्व भेटले महाविद्यालयाच्या फुलपंखी आयुष्यात. श्री. देशमुख सर. मी महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि त्याच वर्षी ते पुण्यातून बदलून बळवंत महाविद्यालयात राज्यशास्त्र शिकविण्यास आले. सगळं आयुष्य पुणे शहर आणि जिल्ह्यात घालविलेल्या देशमुख सरांनी मी आणि आमच्या ग्रुपच्या ज्ञानाच्या कक्षांना रुंदावल्या. त्यांनी आम्हाला जगाकडे पाहण्यास शिकविले. केवळ राज्यशास्त्र हा विषय त्यांनी शिकविला नाही तर आयुष्याचं शास्त्र कसं असतं हे पदोपदी सांगितलं. बाहेरच्या जगात नेमकं काय सुरू आहे आणि आम्ही काय करण्याची आवश्‍यकता आहे हे त्यांनी सांगितलं. स्पर्धेची जाणीव करून दिली. त्यांच्या विषयाशिवाय इतर विषयांबाबतही ते सातत्याने मार्गदर्शन करत राहिले. दुर्दैवाने काही वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले; मात्र त्यांनी शिकविलेल्या काही बाबींमधून ते आजही सोबतच आहेत.
---
तिसरं आणि माझ्या आयुष्याला पूर्णपणे बदलून टाकणारे व्यक्तिमत्व म्हणजे शिकलगार मॅम यांचे. दुसरे वर्ष सुरू झाले आणि साधारण दोन-एक महिने झाल्यानंतर आमच्या कॉलेजमध्ये शिक्षणशास्त्र विषय शिकवण्यासाठी त्या पुण्याहून बदलून आल्या. प्रसन्न आणि हसतमुख व्यक्तिमत्वाच्या शिकलगार मॅम नेट उत्तीर्ण झालेल्या. माझा शिक्षणशास्त्र विषय नव्हता. त्यामुळे थेट त्यांच्या वर्गात बसण्याचा प्रश्‍नच नव्हता; जनरल नॉलेज स्पर्धेसाठी विद्यार्थी निवडण्याच्या निमित्ताने मी आणि मित्र संदीप पाटील त्यांना पहिल्यांदा भेटलो-बोललो आणि अक्षरशः भारावलो. त्यांचा अभ्यास, त्यांच्याकडे असलेली माहिती, स्पर्धा परीक्षेतील बारकावे यापूर्वी आम्ही कधीही न ऐकलेल्या गोष्टी त्यांच्याकडून आम्हाला समजल्या आणि त्यानंतर मात्र त्यांच्यासोबत आमचा एक ग्रुपच बनून राहिला. या ग्रुपमध्ये धर्मेंद्र पवार, सराटे-पाटील, धनवडे, सूर्यवंशी आणि आणखी एक-दोन जणांचा समावेश होता; मग आम्ही स्पर्धांमधून भाग घेतला. वेगवेगळ्या विषयांवर चर्चा, वाद-संवाद घडला. वेगवेगळी पुस्तके वाचण्यासंबंधी चर्चा झडल्या. अपडेट कसे रहावे याच्या टिप्स आणि खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्व घडण्यासाठी आवश्‍यक असंख्य बाबी समजत राहिल्या...
---
....या तिघांच्या संस्कारांमुळेच आजपर्यंतची वाटचाल करू शकलो आहे. खूप लिहिता येईल त्यावर. यापुढेही त्यांच्याकडून मिळालेल्या शिदोरीवरच वाटचाल सुरू राहील. बाई आणि मॅम दोघींनाही परमेश्‍वराने दीर्घायुराराग्य प्रदान करो याच सदिच्छा-शुभेच्छा!

Friday, August 16, 2013

अवघा रंग...!

स्वातंत्र्य या शब्दाचा नेमका अर्थ काय? 
स्वतंत्र होणं...एखाद्याच्या गुलामगिरीतून मुक्त होणं, स्वतःच्या मनासारखं जगणं, हवं तसं वागणं, आई-वडिलांच्या छत्रछायेखालून बाहेर येऊन स्वतःचं आभाळ निर्माण करणं, नव्या अवकाशात भरारी घेणं... 
...काय, नेमका अर्थ काय लावायचा? 
काय सालं... 
स्वातंत्र्य या एका शब्दानं पार डोक्‍याचा भुगा करून सोडला. का, तर म्हणे तिला माझ्यापासून स्वतंत्र व्हायचं आहे म्हणून... 

आई-बाबांचं घर सोडलं आणि मी स्वतःच्या पायांवर उभा राहिलो. माझं वेगळं घरटं पाहून आई-बाबांना झालेला आनंद म्हणजे माझ्या यशाची पोचपावती... 
कधीतरी एकदा ती भेटली आणि या हृदयीचं त्या हृदयी गुज सांगितलं गेलं. त्याला विश्‍वासाचं कोंदण जडलं...गाठ बांधली गेली...एक नवं स्वतंत्र नातं जन्माला आलं...अगदी आनंदाचे डोही आनंद तरंग असं... थोडं वळून पाहिलं... आशीर्वादासाठी उंचावलेल्या आई-बाबांच्या हातामागील चेहऱ्यांवर अपार समाधान दिसलं...डोळ्यांत आनंद काठोकाठ भरलेला...पोरगं स्वतंत्र उभं राहिलं हे दर्शविणारे भाव... मनाला सुखावून गेले... 

नवलाई संपून संसार सुरू झाला... फुलपंखी हिंदोळ्यांवरील झुले बाजूला टांगले गेले...संसार नावाचा यज्ञ सुरू झाला...मग जरासे चटकेही जाणवू लागले... 
पण...समजुतीनं...जाणिवेनं...सांभाळून घेत...कमीत कमी झळ लागेल याची काळजी घेत पावले पुढे पडत राहिली...थोडी फार ज्वाळा भडके; पण अगदी किरकोळ... 
पण परवा जरा भडका जास्तच उडाला...ऑफिसातून यायला वेळ काय लागला...तिला दिलेला शब्द मोडला गेला... आणि मग भांड्याला भांडं लागलंच...ताव ताव तावलो...एकमेकांची उणीदुणी निघाली...अबोला धरला...अढीची पहिली गाठ बसली... दोघेही ठाम, त्यामुळे ती सुटण्याचं काही चिन्ह दिसेना...अचानक एकमेकांच्या स्वातंत्र्यावर घाला वगैरे घातल्यासारखं वाटू लागलं... 

....ही माझ्या आयुष्यात आली आणि माझं स्वातंत्र्य हिरावलं...आयुष्य तिच्या दावणीला बांधलं गेलं...माझं काही मतच शिल्लक राहिलं नाही...इत्यादी इत्यादी.... हे मनात म्हणत राहिलो... 

ती थेटपणे म्हणाली....""तू नव्हतास तोपर्यंत मी माझी होते....तू आलास आणि मी माझी राहिलेच नाही...तुझ्या अंमलाखाली माझं स्वतंत्र अस्तित्वच संपलं... मला या परजीवी जगण्याचा कंटाळा आलाय... मला तुझ्यापासून मोकळा श्‍वास हवाय... माझा जीव गुदमरतोय तुझ्या सहवासात... हे घर म्हणजे तुरुंग भासतोय... प्रत्येक ठिकाणी तूच का? मी का नाही... मी कोठे आहे?... मला मी हवी आहे... बास... आता मी कदापि सहन करणार नाही... माझंही काही मत असू शकतं.. माझंही व्यक्तिमत्त्व आहे...मी तुझ्यापासून वेगळं होणार... उद्याच्या उद्या तुला वकिलाकडून नोटीस येईल... मग दे त्याला काय द्यायचं ते उत्तर... सही कर आणि मला मोकळं कर...'' 

""जा, गेलीस उडत...तुझ्यासारख्या छप्पन्न.....'' तिच्या भरलेल्या डोळ्यांकडे लक्ष गेले आणि पुढील शब्द घशातच अडकले... बॅग भरून ती गेली तरातरा निघून आणि तो अडकला "तुझ्यासारख्या 56....' वर 

तिच्या शेवटच्या करवादलेल्या वाक्‍याने तो मुळापासून हलला... बाहेर पडणाऱ्या पावसाचा आवाज आता त्याला सतावू लागला... पडणाऱ्या प्रत्येक थेंबागणिक विचारांचा ढोल त्याच्या मेंदूवर वाजू लागला... 
ती आपल्यापासून दूर निघाली आणि आपण काय बोललो हे... असं असतं का? आपण इतके कसे घसरलो...एवढ्याचसाठी सगळा अट्टहास केला होता का? ती मिळावी म्हणून काय नाही केलं आपण? तिच्या आयुष्यात येण्यानं आयुष्याचा सगळा अर्थच बदलला आपल्या. बेताची नोकरी असतानाही तिनं आपल्यावर प्रेम केलं... सुरवातीचे काही महिने फक्त मी नोकरीत कसा स्ट्रॉंग होईन यासाठी तिनं मेहनत घेतली...स्वतःचं करिअर तिनं बाजूला ठेवलं...माझ्या रंगात रंगून गेली...कधीही ती दिसली नाही... तिच्यातही मला मीच दिसत राहिलो... आपली चूक झाल्यानंतर तिनं ती आपल्याला दाखविली तर आपल्याला एवढा का राग आला... आपला इगो एवढा का मोठा झाला, की आपण आपल्याच प्रतिमेसोबत भांडलो... आपल्या आयुष्यात येताच तिनं तिच्या स्वतंत्र अस्तित्वाला जणू तिलांजलीच दिली...तिचा प्रत्येक श्‍वास आपल्या श्‍वासाचा एक भाग बनला आणि आज आपल्या श्‍वासाची माळ तुटू लागलीय आणि आपण "तुझ्यासारख्या 56...' म्हणू कसे शकतो? 
....का वाटलं तिला आपल्यापासून वेगळं व्हावं असं... याचा का नाही मी विचार केला... माझी चूक माझ्या लक्षात कशी नाही आली... अरे बापरे, हे काय करून बसलो...माझी चूक झाली...माझी चूक झाली...मला ती सुधारलीच पाहिजे.... 

तो अंगावरील कपड्यानिशी पळत सुटला...स्टेशन गाठलं...शोध शोध शोधलं...तिच्या गावची शेवटची गाडी गेल्याचं समजलं आणि...स्वतःवर चरफडला...काय केलं आपण...आपल्या सावलीवर कोण चिडतं का? सकाळी पहिल्या गाडीनं गाव गाठायचं. तिची माफी मागायची... नाक घासायचं पण तिला घेऊन यायचं... पुन्हा असं कधी कधी नाही करायचं... 

घरी आला...कोचावर बसला विषण्ण मनाने... छातीत कढ दाटला... डोळ्यांतून पाणी वाहू लागलं... 
""कॉफी लगेच घेणार आहेस की...?'' 

सर्रकन काटा आला अंगावर.... 
नजर वर गेली...समोर ती उभी...तेवढीच शांत...मोठं वादळ पचवून उभी! 

""...तू गेली नाहीस...? कोठे होतीस...? 
""कोठे जाणार तुला सोडून... तू आणि मी, आपण वेगळे कोठे आहोत? माझं अस्तित्वच तुला जोडलं गेलं आहे... माझा रंग तुझा झाला असताना तो कसा वेगळा होईल...आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे...आपल्या दोघांचं एक वेगळं स्वतंत्र जग आहेच की...ते सोडून कोठे जाणार? कशी जगणार...तुझ्याशिवाय मी, हा विचार नाही करता येत मला...तू ओरडलास...भांडलास...त्याचं नाही वाईट वाटलं फारसं...पण तू म्हणालास ना...की "तुझ्यासारख्या 56...' त्यानं मी दुखावले... माझ्यासाठी ऑलमोस्ट तू एकटाच आहेस...तुझ्याशिवाय मला मिळालेलं स्वातंत्र्य.. मला नाही वाटत मी त्यात मोकळा श्‍वास घेऊ शकले असते...'' 
""असं नको बोलूस...जर दोघांचा रंग एक असेल तर तो वेगळा कसा होईल... मी बोलताना चुकलोच... मला समजलंय...माझा इगो मोठा झाला आणि स्वतंत्रपणाचा फुगा फुगला...पण तो आता फुटलाय...आता पुन्हा कधीही फुगणार नाही...इट्‌स प्रॉमिस...''

Thursday, July 4, 2013

पाऊस तिचा...त्याचा!

परवा तो खिडकीशी बसलेला. काहीसा उदास... पाऊस सरींचा राग ऐकत. एखादा मुरलेला कलाकार जसे सतारीवर एकापाठोपाठ एक रागांच्या लडी छेडतो त्याप्रमाणे बरसणाऱ्या सरींचं सुरू होतं... कधी तरल... कधी अवखळ... कधी विरह... कधी व्याकूळ... कधी रौद्र... तर कधी अगदीच सुनं सुनं... म्हणजे सरी जशा बरसतील तसा हा आभास होत राहिला... बरं सुरावटीमध्ये विविधता असूनही ती ऐकण्याची ओढ अगदी काठोकाठ भरलेली... ऐकता ऐकता त्यानं ओंजळ भरून घेतली आणि एक अनामिक शिरशिरी अंगावर उमटून गेली... तिच्या आठवणीची... 
 
एकदा असाच पाऊस सुरू असताना ती अचानक घरी आली. म्हणाली, "चल फिरायला जाऊ..' त्याच्या नको म्हणण्याकडे दुर्लक्ष करत तिने त्याला जर्किन अडकवलं, अगदी लहान मुलासारखं आणि दुडदुडत पायऱ्या उतरून गाडीशी पोचलीसुद्धा. 

आता त्याचा नाईलाज. खाली पोचला तो बाईसाहेबांनी गाडी सुरू केलेली. खूप उतावीळ झालेली पाऊस झेलायला. मग तो सावरून बसला तिच्या पाठी. गाडीने वेग घेतला... दहा एक मिनिटांत शहरभरचा पाऊस झेलत गाडीने घाट रस्ता पकडला आणि हिरवाईतून प्रवास सुरू झाला... त्याचंही कोरडेपण संपलं... तिचा पाऊस पिण्यातला आनंद त्याला जाणवू लागला... 

किती लहान मुलासारखं करते. पाऊस म्हणजे तिचा जीव की प्राण... त्याला पाऊस आवडतो प्रचंड... पण तो खिडकीतून. हे तिलाही माहिती आहे म्हणूनच ती त्याला मुद्दाम आज खिडकीबाहेरचा पाऊस अनुभण्यासाठी घेऊन आली. आता ती बडबडत होती... पावसाच्या कविता सांगत होती... गाण्यांतला पाऊस मांडत होती... आणि तो तिचा पाऊस अनुभवण्यात अगदी तल्लीन झाला. 

गाडीने वळणावर टर्न घेतला. तिने घाईने गाडी उभी केली आणि गाडी सोडून समोरच्या कठड्यावर धावली. काय म्हणायचं तिच्या या बालीशपणाला... त्याला येण्यासाठी खुणावलं. तो तिच्याजवळ पोचला. समोरच्या दरीकडे तिने बोट केलं. 

"दरीतून धुक्‍यांचे लोट वर येत होते... हिरवाईवर शुभ्र नक्षी अलगद हेलकावत होती... वरून रिमझिमणारा पाऊस आणि हिरवाईतून येणारे शुभ्र धुके... आहाहा... ती दूरवरील निसर्गसौंदर्य टिपण्यात मग्न... आणि तो तिला पाहण्यात. "ती एक चित्र बनून राहिलेली... तिच्या चेहऱ्यावरून निथळणारा पाऊस... वाऱ्यावर भुरभुरणारी एकच सुटलेली बट... चेहऱ्यावर असिम समाधान... मिटलेल्या पापण्यांआड बहुधा निसर्ग कवेत घेतल्याचा परमानंद... ती अगदी अविचल... मूर्तीरुप... पावसात पाऊस बनलेली... थेंबांतून अगदी मिसळून गेलेली... तिचं वेगळं अस्तित्वच नव्हतं जाणवत... अचानक वीज चमकली... 
 
समोर विजेचा लोळ चमकला आणि पाठोपाठ कडकडाट शांतता भेदून गेला. सुरांची मैफल विस्कटली. भान आलं... घरातच असल्याचं... मोबाईलची रिंग वाजली... तिचे शब्द कानी पडले... "मला न्यायला येतोस... तुझ्याशिवाय कशी राहू...' या शब्दांनी जादू केली... आलोच म्हणत तो धडधडत पायऱ्या उतरला... गाडी काढली आणि स्टेशनच्या दिशेने सुसाट निघाला... सरी झेलत... त्याचा खराखुरा पाऊस त्याला भेटीला आला होता... दोन महिन्यांचं मौन सुटलं होतं... मोडणारं घर सावरणार होतं... स्टेशनचं अंतर कमी होऊ लागलं... पाऊस बरसतच राहिला... त्याच्या डोळ्यांमधून... आनंद ओसंडत राहिला...!

पाऊस तिचा...त्याचा!

परवा तो खिडकीशी बसलेला. काहीसा उदास... पाऊस सरींचा राग ऐकत. एखादा मुरलेला कलाकार जसे सतारीवर एकापाठोपाठ एक रागांच्या लडी छेडतो त्याप्रमाणे बरसणाऱ्या सरींचं सुरू होतं... कधी तरल... कधी अवखळ... कधी विरह... कधी व्याकूळ... कधी रौद्र... तर कधी अगदीच सुनं सुनं... म्हणजे सरी जशा बरसतील तसा हा आभास होत राहिला... बरं सुरावटीमध्ये विविधता असूनही ती ऐकण्याची ओढ अगदी काठोकाठ भरलेली... ऐकता ऐकता त्यानं ओंजळ भरून घेतली आणि एक अनामिक शिरशिरी अंगावर उमटून गेली... तिच्या आठवणीची... 
 
एकदा असाच पाऊस सुरू असताना ती अचानक घरी आली. म्हणाली, "चल फिरायला जाऊ..' त्याच्या नको म्हणण्याकडे दुर्लक्ष करत तिने त्याला जर्किन अडकवलं, अगदी लहान मुलासारखं आणि दुडदुडत पायऱ्या उतरून गाडीशी पोचलीसुद्धा. 

आता त्याचा नाईलाज. खाली पोचला तो बाईसाहेबांनी गाडी सुरू केलेली. खूप उतावीळ झालेली पाऊस झेलायला. मग तो सावरून बसला तिच्या पाठी. गाडीने वेग घेतला... दहा एक मिनिटांत शहरभरचा पाऊस झेलत गाडीने घाट रस्ता पकडला आणि हिरवाईतून प्रवास सुरू झाला... त्याचंही कोरडेपण संपलं... तिचा पाऊस पिण्यातला आनंद त्याला जाणवू लागला... 

किती लहान मुलासारखं करते. पाऊस म्हणजे तिचा जीव की प्राण... त्याला पाऊस आवडतो प्रचंड... पण तो खिडकीतून. हे तिलाही माहिती आहे म्हणूनच ती त्याला मुद्दाम आज खिडकीबाहेरचा पाऊस अनुभण्यासाठी घेऊन आली. आता ती बडबडत होती... पावसाच्या कविता सांगत होती... गाण्यांतला पाऊस मांडत होती... आणि तो तिचा पाऊस अनुभवण्यात अगदी तल्लीन झाला. 

गाडीने वळणावर टर्न घेतला. तिने घाईने गाडी उभी केली आणि गाडी सोडून समोरच्या कठड्यावर धावली. काय म्हणायचं तिच्या या बालीशपणाला... त्याला येण्यासाठी खुणावलं. तो तिच्याजवळ पोचला. समोरच्या दरीकडे तिने बोट केलं. 

"दरीतून धुक्‍यांचे लोट वर येत होते... हिरवाईवर शुभ्र नक्षी अलगद हेलकावत होती... वरून रिमझिमणारा पाऊस आणि हिरवाईतून येणारे शुभ्र धुके... आहाहा... ती दूरवरील निसर्गसौंदर्य टिपण्यात मग्न... आणि तो तिला पाहण्यात. "ती एक चित्र बनून राहिलेली... तिच्या चेहऱ्यावरून निथळणारा पाऊस... वाऱ्यावर भुरभुरणारी एकच सुटलेली बट... चेहऱ्यावर असिम समाधान... मिटलेल्या पापण्यांआड बहुधा निसर्ग कवेत घेतल्याचा परमानंद... ती अगदी अविचल... मूर्तीरुप... पावसात पाऊस बनलेली... थेंबांतून अगदी मिसळून गेलेली... तिचं वेगळं अस्तित्वच नव्हतं जाणवत... अचानक वीज चमकली... 
 
समोर विजेचा लोळ चमकला आणि पाठोपाठ कडकडाट शांतता भेदून गेला. सुरांची मैफल विस्कटली. भान आलं... घरातच असल्याचं... मोबाईलची रिंग वाजली... तिचे शब्द कानी पडले... "मला न्यायला येतोस... तुझ्याशिवाय कशी राहू...' या शब्दांनी जादू केली... आलोच म्हणत तो धडधडत पायऱ्या उतरला... गाडी काढली आणि स्टेशनच्या दिशेने सुसाट निघाला... सरी झेलत... त्याचा खराखुरा पाऊस त्याला भेटीला आला होता... दोन महिन्यांचं मौन सुटलं होतं... मोडणारं घर सावरणार होतं... स्टेशनचं अंतर कमी होऊ लागलं... पाऊस बरसतच राहिला... त्याच्या डोळ्यांमधून... आनंद ओसंडत राहिला...!