Sunday, November 22, 2009

परुळेकरांचा राग नेमका कुणावर

"लोकप्रभा'मधील "अल्केमिस्ट्री' सदरात परुळेकर यांनी सचिन तेंडुलकरबद्दल लिहिलेला लेख वाचला आणि त्या लेखामध्ये त्यांनी उधळलेली मुक्ताफळे वाचताना परुळेकरांच्या विचारांबद्दल किव आली. सचिन तेंडुलकरला टार्गेट करून लिहिलेला हा लेख परुळेकर यांच्यासारखा "विचारी' माणूस बुद्धी (शंका आहेच) गहाण ठेऊन कसा काय लिहू शकतो याचे आश्‍चर्य वाटले.
मुळात या लेखाचे प्रयोजन अखेरपर्यंत समजत नाही. या लेखात ते सचिन तेंडुलकरला भंपक-ढोंगी म्हणतात, शरद पवार यांच्यावर टिप्पणी करतात, सचिनला ग्लॅडीएटर संबोधून पुन्हा तो कसा भंपक आहे हेच सांगतात. मला त्याच्याबद्दल काहीच वाटत नाही असे एकिकडे लिहितात आणि दुसरीकडे संपूर्ण लेखात मिळेल तेथे सचिनला ओरखडत राहतात हे कशाचे लक्षण.
सचिन खेळतो व चाहते त्याचा आनंद घेतात. तो खेळत नाही तेव्हा हेच चाहते त्याच्यावर टीकेची झोड उठवितात हा साधा सरळ मामला आहे. म्हणूनच मग त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 20 वर्षे पूर्ण केल्याबद्दल त्याचे कौतुकही अगदी दिलदारपणे करतात. त्याबाबत प्रसारमाध्यमांना मठ्ठ म्हणण्याचा अधिकार परुळेकर यांना कोणी दिला? या लेखानुसार इतर सर्व मुर्ख आणि परुळेकरच तेव्हढे शहाणे असे वाटून राहते हे खरे कसे समजायचे? अनेक बाबींची गल्लत करताना अत्यंत गोंधळलेल्या मानसिकतेमध्ये परुळेकर यांनी हा लेख लिहिला असावा असे वाटते पण असे का?
सचिन एक खेळाडू आहे. तो सातत्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर वावरत असतो. मुंबई कोणाची? या प्रश्‍नावर त्याने दिलेले उत्तर अगदी सहज होते; मात्र इलेक्‍ट्रॉनिक प्रसारमाध्यमांनीच सलग दोन दिवस सचिनचे तेच ते वाक्‍य पुनःपुन्हा दाखवून अनावश्‍यक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी परुळेकर काहीच कसे बोलले नाहीत. हा चावटपणा त्यांना दिसला नाही की तो त्यांनी पाहून न पाहिल्यासारखा केला. बरं स्वतः फारसे क्रिकेट न पाहणाऱ्या परुळेकरांनी सचिनबद्दलची फुटपट्टी कशाच्या आधारावर लावली?
प्रकाश-मंदा आमटे, अभय-राणी बंग आदी दिग्गजांबद्दल परुळेकर लिहितात. ते महान आहेतच. त्यांनी कधीही ते महान आहेत याचा ढोल वाजविलेला नाही. ते ही कधी प्रसारमाध्यमांकडे प्रसिद्धी द्या, असे सांगायला गेले नाहीत हे सत्यच आहे कारण त्याची त्यांना गरज वाटत नाही. त्या प्रमाणेच सचिनही कधी प्रसारमाध्यमांकडे आपणहून गेल्याचे ऐकिवात नाही. (अपनालयसारख्या संस्थांना तो मदतीचा हात देतो, हे कित्येक वर्षांनी उघड झाले. जर त्याला सामाजिक भान नसते तर तो अशा बाबी करूच शकला नसता) आत्ताही "माझी आंतरराष्ट्रीय क्रिकेटची 20 वर्षे झाली आहेत, तुम्ही माझ्यावर पुरवण्या काढा, लेख लिहा, चॅनेल दिवसभर ढणढणत ठेवा असे सांगण्यास तो गेलेला नव्हता. कोट्यवधींसाठी विरंगुळ्याचे ठिकाण असलेल्यांना सचिनबद्दल जे वाटते तेच देण्याचा प्रयत्न प्रसारमाध्यमांनी केला आहे व त्यातून व्यवसायही केला आहे. (आत्ता हेच पहा! तुम्ही ही टीकाटीप्पणी का केली? तर हा लेख वाचावा आणि यावर चर्चा सुरू व्हावी हाच तुमचा उद्देश असावा. म्हणजेच हा विषय तुम्हालाही सेलेबल वाटलाच ना? बहुधा हेच प्रयोजन हा लेख लिहिण्याचे असावे.)
मराठी माणसाला मराठी माणसाचे बरे वाटत नाही, असे मात्र हा लेख वाचल्यानंतर वाटून राहते. सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटची वीस वर्षे पूर्ण केल्याबद्दल त्याच्यावर उधळण्यात येत असलेली स्तुतीसुमने परुळेकरांना रुचलेली दिसत नसावीत आणि त्यातूनच हा लेख लिहिला की काय असा प्रश्‍न पडतो.
या लेखामध्ये सचिन श्रीमंत असल्यामुळे त्याला मान देतात असा एक उल्लेख केला आहे. तो उल्लेख वाचल्यानंतर परुळेकरांचा सचिनबद्दलचा आकसच दिसतो. वीस वर्षांपूर्वी जेव्हा सचिन मैदानात उतरला तेव्हा तो सर्वसामान्यच होता. आणि तरी त्यावेळीही जगभरातील क्रिकेट खेळणाऱ्या देशांचा तोच लाडका होता. आपल्या बॅटची मर्दमुकी गाजवून जेव्हा त्याने भारतीय संघाच्या यशात वाटा उचलला तेव्हा लक्ष्मी त्याच्यावर प्रसन्न झाली आणि मग ती त्याच्यावर फिदा झाली; मात्र त्यासाठी त्याला कुणापुढे हात पसरावे लागले नाहीत. तो खेळत राहिला आणि यश त्याला मिळत गेले. कोट्यवधींची स्वप्ने तो मैदानात प्रत्यक्षात उतरवू लागला म्हणूनच वैभवाचा मानकरी तो ठरला.
"मी भारतीय आहे; पण महाराष्ट्रीयन असल्याचा मला अभिमान आहे,' या सचिनच्या वाक्‍याचा अर्थ बहुधा परुळेकर यांना समजलेला नसावा (किंवा त्यांना तो समजून न घेता "सचिन मुंबई भारताची म्हणाला' यावरच बोट ठेवायचे आहे काय? शिवसेना स्टाईल; पण तसा अधिकार शिवसेनाप्रमुखांना आहे. तुम्ही तर पत्रकार) किंवा प्रत्येक वेळा सचिनने "मी मराठी'चा ढोल वाजविलाच पाहिजे' अशी अपेक्षा ठेऊन ती पूर्ण न झाल्याच्या आकसातून हा लेख लिहिला आहे, असे मात्र वाटून राहते. त्यामुळे परुळेकर यांच्या सारख्या साक्षेपी, बहुआयामी, विचारवंत पत्रकाराचा नेमका राग कोणावर आहे? हा प्रश्‍न, प्रश्‍नच राहतो.

Friday, November 13, 2009

प्रिय सचिन

खूप दिवस झाले तुला पत्र लिहिण्याचा विचार डोक्‍यात घोळत होता; पण कारणच सापडत नव्हते. त्याला कारण म्हणजे एक तर तू अपयशी ठरलास की प्रसारमाध्यमं (विशेषतः इलेक्‍ट्रॉनिक्‍स) तुझ्यावर अक्षरशः तुटून पडतात. दिवसभर त्यांचं चॅनेल ढणढणत राहतं आणि पाहणारेही मग हळूहळू सचिन संपलाय, या हाकाटीच्या बाजूने झुकू लागतात. हा गेल्या काही वर्षांमधील अगदी परिपाठ झालेला आहे. तुझ्या निवृत्तीसाठी तर अनेक जण देव पाण्यात ठेवल्याप्रमाणे वागत, लिहीत, बोलत असतात. जेव्हा जेव्हा तुझ्यावर टीकेचे फुटेज सुरू व्हायचे तेव्हा तेव्हा त्या चॅनेलवाल्यांचे तोंड फोडावे असे वाटायचे. बरं तू त्यांना कधीही बोलून उत्तर देत नाहीस. तुला जे काही बोलायचे असते ते तू तुझ्या बॅटनेच बोलतोस. मग माझ्यासारख्या तुझ्या चाहत्याला तू सुंदर खेळी केलीस की चेव चढतो. तरी बरं एक बाब खूप महत्त्वाची. आपले बहुतेक सारे मराठी पेपरवाले मात्र तुझ्या पाठीशी ठाम उभे राहतात. (खरे तर महाराष्ट्रात पाय ओढण्याची परंपरा आहे. तुझ्याबाबतीत मात्र ही परंपरा मोडली गेलीय ही अतिव आनंदाची बाब आहे) असो...परवा तुझे संघ सहकारी हैदराबादी बिर्याणी झोडत होते, तेव्हा तू मात्र त्यांच्यात नव्हतास. दुसऱ्या दिवशी त्याचा परिणाम जाणवला. तू तडाखेबंद 175 धावांची खेळी करून पुन्हा एकदा टीकाकारांचे तोंड फोडलेस आणि ज्यांच्या कौतुकांचे पूल बांधले जात होते ते फ्लॉप झाले. विशेष म्हणजे कधी नव्हे ते हिंदी इलेक्‍ट्रॉनिक्‍स मीडियाने दिवसभर तुझ्यावर स्तुतिसुमने उधळली. खरं सांगू, त्या दिवशी कधी नव्हे ते टीव्ही पुनःपुन्हा पाहावासा वाटला. त्या दिवशीची ऑस्ट्रेलियाविरुद्धची तुझी तडाखेबंद, सौंदर्यखणी खेळी खरोखरच मनाच्या कुपीत जपून ठेवावी अशीच होती. ऐन तारुण्यात असताना तू ज्याप्रमाणे गोलंदाजांना सीमारेषेच्या बाहेर उर्मटपणे भिरकावून द्यायचास, तोच पुन्हा अवतरल्याचा भास झाला. रिकी पॉंटिंगचा चेहरा तर पाहवत नव्हता. खडूस ऑस्ट्रेलियन्सची कशी ठेचायची असते ते तू पुन्हा एकदा दाखवून दिलेस. अगदी झोकात तू सतरा हजार धावांचा टप्पा ओलांडलास; मग तू अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर मात्र तुझी रनमशिन धडधडू लागली आणि धावांची रास पाहता पाहता उभी राहिली. क्रिकेटचे सर्व फटके पुन्हा एकदा "याची डोळा याची देही' अनुभवण्यास मिळाले. अगदी धन्य धन्य झालो. त्या दिवशी अगदी टेचात मित्रमंडळींत फिरलो. तुझ्या अनेक परममित्रांचे चेहरे वाचताना मी त्या दिवशी अगदी असुरी आनंद लुटला. अनेकदा त्यांनी सचिन कसा संपलाय हे अगदी बेंबीच्या देठापासून सांगण्याचा प्रयत्न केला होता ना! (सामना तुझ्या नाकर्त्या सहकाऱ्यांमुळे हरल्याचे जराही दुःख वाटले नाही). त्यानंतर मालिका भारत हरला; मात्र तुझ्या खेळीच्या हॅंगओव्हरमधून आम्ही काही बाहेर आलो नाही. त्यावर कळस चढला गुरुवारी मुंबईत झालेल्या कार्यक्रमामुळे. सुनील गावस्कर आणि गुंडाप्पा विश्‍वनाथ यांचा साठीनिमित्त झालेला सत्कार सोहळा. या सोहळ्यात चित्रपटसृष्टीचा शहेनशाह अमिताभ बच्चन (यशाच्या शिखरावर असूनही विनम्रतेचा कळस म्हणजे हा माणूस), यांच्यासोबत तुला त्या व्यासपीठावर पाहून कृतकृत्य झाल्याचे समाधान लाभले. या कार्यक्रमात तू ज्याप्रमाणे बोललास किंवा तुझ्याबद्दल अमिताभ, सुनील जे बोलले ते पाहताना डोळ्यांचे पारणे फिटले. तू कसा ग्रेट आहेस हेच पुन्हा एकदा पाहावयास मिळाले.आजच हे सारं पुन्हा तुला लिहिण्याचे कारण म्हणजे, 15 नोव्हेंबरला तुझ्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीस वीस वर्षे पूर्ण होत आहेत. सध्याच्या फास्ट क्रिकेटच्या युगात तू तब्बल वीस वर्षे भारतीय क्रिकेटसाठी स्वतःला वाहून घेतलेस. या कालावधीत खेळाच्या प्रत्येक क्षणाचा आनंद तू मनमुरादपणे लुटलास आणि क्रिकेटचा देव बनलास. जगभरात चाहते निर्माण केलेस, धावांच्या एव्हरेस्टची उंची अधिकच उंच केलीस. बरं एवढं करूनही तू धावांसाठी आजही लहान मुलासारखाच भुकेलेला आहेस. भारतीय संघाला विश्‍वकरंडक जिंकून देण्याचे स्वप्न पाहत आहेस आणि एका अर्थाने पुन्हा एकदा विश्‍वकरंडक उंचावल्याचे स्वप्न दाखवत आहेस. कोट्यवधींचा मानकरी तू निश्‍चित असशील; पण कोट्यवधींच्या हृदयात तुझ्याबद्दल असलेल्या प्रेमाची गणतीच होणार नाही. तुझी ती श्रीमंती मोजताच येणार नाही.या पुढेही तू यशाचे नवे शिखर गाठून स्वतःचा अमिट ठसा उमटवावास याच शुभेच्छा!

तुझाच चाहता

Wednesday, November 4, 2009

घे भरारी...

वैताग आणलाय या चिमण्यांनी !
हिचा वैतागलेला स्वर कानावर पडला.
काय झालं? विचारत मी गॅलरीत गेलो; तर तेथे दोन चिमण्या चिवचिवाट करत इकडून तिकडं-तिकडून इकडं भरारत होत्या. त्यांच्या चिवचिवाटानं "ही' पुरती वैतागलेली. न राहवून हिनं त्या चिमण्यांना हुसकावलंच, तशी त्या तेथून जरा दूर पळाल्या.
असू दे गं! अशी तिची समजूत काढत मी तिला आत घेऊन गेलो (जाताना हिचा तोंडाचा पट्टा सुरूच) आणि चहाचा कप घेऊन पुन्हा गॅलरीत आलो. खुर्चीत पाय ताणवून बसलो आणि चहाचे घोट घेऊ लागलो. तेवढ्यात मघाच्या दोन्ही चिमण्या पुन्हा परतल्या. माझी कसलीच दखल न घेता पण माझ्यावर लक्ष ठेवून कोपऱ्यात अडकवलेल्या कपाटाच्या वरच्या बाजूस बसून काही तरी खुडबूड करू लागल्या. आता मात्र माझी उत्सुकता ताणली आणि मी दोन्ही चिमण्यांचं निरीक्षण करू लागलो.
एक चिमणी उडून जाई, चोचीतून काटक्‍या घेऊन येई, कपाटाच्या वरच्या बाजूस जाई, काहीबाही करीत बसे, तोपर्यंत दुसरी बाहेर राखण करी. आतलीचं काम संपलं की दोघं मिळून उडून जात आणि पुन्हा चोचीतून काहीबाही घेऊन येत.
अरेच्चा म्हणजे ही जोडी घरटे बांधणार तर!
यस्सऽऽऽ मी सुखावलो. माझ्या घरात नव्या पाहुण्यांनी केलेल्या घुसखोरीवर मी जाम खूश झालो.
आता छानसं घरटं तयार होणार... त्यामध्ये चिमणी अंडी घालणार... काही दिवसांनी त्या अंड्यांतून नवा जीव जग पाहणार... त्याला मोठे करण्यासाठी दोघी धडपडणार... चिमणचारा भरवणार आणि तो मला पाहायला मिळणार... त्याचं प्रत्येक घासासाठीचं आसुसलेपण पाहायला मिळणार... थोडं मोठं झालं की ते घरट्यातून उडू पाहणार... मग दोन्ही चिमण्या त्याच्या पंखात बळ भरणार... आणि एक दिवस आई-बाबांना मागं ठेवून ते उंच भरारी घेणार...
वाऽऽऽ हा सारा सृजनसोहळा माझ्या घराच्या गॅलरीत रंगणार... क्‍या बात है!
----------
""अहो, आंघोळीला पाणी काढलंय... येताय ना?''
हिच्या पुकाऱ्याबरोबर भानावर येऊन आत पळालो.
""एक रिक्वेस्ट होती!''
""बोला, काय?''
"ए त्या चिमण्यांना तिथून हुसकावू नकोस प्लीज ! हवं तर त्यांनी केलेली घाण मी स्वच्छ करतो. ''
"तुम्ही ना!''
तिच्या त्या लटक्‍या रागाबरोबरच मिळालेल्या होकाराने मी खूश.
------
आता माझं चिमणी निरीक्षण नेमानं सुरू झालं. आमच्या विश्‍वासावर "त्यांचं' इटुकलं घरकुल हळूहळू तयार झालं. माझा रोजचा चहा... त्यांच्या साक्षीने होऊ लागला आणि चिमण्यांनी केलेली घाण "ही' माझ्यावर डोळे मोठे करत साफ करू लागली. कधीतरी... "काय म्हणतात तुमचे लव्ह बर्डस्‌?' अशी विचारणाही ती करे; पण घुश्‍शातच केवळ माझ्यासाठी ती त्यांना सहन करीत होती.
एक दिवस दोन्ही चिमण्या नसताना त्या घरट्यात डोकावून पाहिलं तर दोन अंडी तेथे दिसली; मग तर मी त्या चिमण्यांची काळजी घेऊ लागलो. त्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आणि थोडासा खाऊही ठेवू लागलो. मला वेध लागले बाळचिमण्यांचे.
-----
एक दिवस सकाळी-सकाळी, ""अहो उठा लवकर. ते पाहा तुमचे लव्ह बर्डस्‌ चार झालेत'' असे सांगत हिनेच मला "गुड न्यूज' दिली.
मी डोळे चोळत गॅलरीत आलो... तर घरट्यातून डोकावणाऱ्या छोट्या चोची दिसल्या आणि त्यांच्या चोचीत चोच घालून त्यांच्यावर माया करणाऱ्या चिमण्या पाहताना आनंदाने डोळ्यांच्या कडा ओलावल्या. नवजीवाच्या जन्माच्या आनंदसोहळ्याचे आम्ही साक्षीदार झाल्याचा आनंद आम्हीही साजरा केला. आता आम्ही दोघेही त्या जिवाच्या बाललीला पाहण्यात रंगून जाऊ लागलो.(हिचाही त्रागा काहीसा कमी झाला) आता त्यांचा चिवचिवाट आम्हाला हवाहवासा, आपला वाटू लागला.
----
एका रविवारी कामानिमित्त परगावी जाऊन आलो. सोफ्यावर डोळे मिटून शांत बसलो होतो. तेवढ्यात हिची गॅलरीतून हाक ऐकू आली.
""अहो इकडं या बघू...'' तिचा घाबरा स्वर ऐकून
""काय झालं गं?'' म्हणत मी तातडीने गॅलरीत पोहोचलो.
तिनं चिमण्यांच्या घरट्याच्या दिशेनं हात केला आणि छातीत धस्स झालं.
घरटं विस्कटलं होतं... खाली काड्या पडल्या होत्या... काही पिसंही पडलेली होती... आणि एका बाजूला एक पिलू निष्प्राण होऊन पडलं होतं आणि त्याला सर्व बाजूंनी मुंग्या डसल्या होत्या... दोन्ही चिमण्या जोरजोरात चिवचिवत होत्या... घरटे केलेल्या जागेजवळ जाऊन पुन्हा माघारी अशा भिरभिरत होत्या. पिलांच्या जाण्यानं त्या सैरभैर झाल्या होत्या... काळजाचा तुकडा हरवल्याचं दुःख सहन करण्याचा प्रयत्न करीत होत्या... पिलांच्या आठवणींनी त्या मोडलेल्या घरट्याजवळ पुनःपुन्हा जाऊन पिलांना शोधत होत्या.
माझा श्‍वास काहीसा जड झाला...
मी हिच्याकडं पाहिलं... तर चिमण्या आल्यादिवशी संतापलेल्या हिचे डोळे पाण्यानं काठोकाठ भरले होते.
-----
परवा सकाळी...
"अहो उठा पटकन'च्या हाकेनं जागा झालो.
""काय झालं?''
चला म्हणत तिनं मला ओढत गॅलरीत नेलं आणि तिनं बोट केलेल्या दिशेकडं पाहिलं. चिमण्या पुन्हा परतल्या होत्या आणि आमची दखल न घेता घरकुल बांधण्यात दंग झाल्या होत्या...

Wednesday, October 28, 2009

जुबेर...

महालक्ष्मी मंदिराच्या प्रांगणात भाविकांची नेहमीप्रमाणे वर्दळ. कोणी देवीकडे काही मागायला आलेला, कोणी असाच, कोणी अभ्यासासाठी, कोणी कोणाला तरी भेटण्यासाठी, कोणी मनःशांतीसाठी, कोणी रोजच्या धबडग्यातून बदल म्हणून. मीही त्यापैकीच एक. त्या दिवशी आत दर्शनाला जाण्यापूर्वी बाहेर रेंगाळत होतो. एवढ्यात फुग्याच्या चर्र चर्र आवाजाच्या दिशेने छोटीने केलेली खूण आणि तिच्या इटुकल्या डोळ्यांतून होत असलेल्या मागणीकडे माझे लक्ष गेले आणि मी त्या दिशेने ओढला गेलो. समोरच्या छोकऱ्याने फुगा तिच्या समोर धरला आणि तिच्या चेहऱ्यावर आनंदाने फेर धरला. फुगा हाती येताच तिच्या मुठीमध्ये आनंद शिगोशिग भरला आणि डोळ्यांच्या विस्फारलेल्या बाहुल्यांत फुग्याचे रंग उमटू लागले. तिच्या चेहऱ्यावरील आनंदाचे क्षण मी टिपत असताना, पुन्हा एकदा फुग्यांवर हात घासून काढलेला चर्र..चर्र..आवाज माझ्या कानावर आला आणि मी त्या फुगेवाल्या छोकऱ्याकडे ओढला गेलो.
त्याच्यापासून काही अंतर ठेवून उभा राहिलो आणि त्याच्या नकळत त्याला वाचू लागलो. वय जेमतेम 13-14 वर्षांचे, चण छोटीशी, काहीसा गोरा, स्मार्ट, गालावर खळी असावी आणि डोळ्यांत छानशी चमक.
त्याने एक फुगा काढला. आस्ते.. आस्ते फुगविला. एकदा न्याहाळला. मनासारखा फुगल्याचे समाधान त्याच्या चेहऱ्यावर उमटले. सराईतपणे फुग्याला त्याने रबर लावला आणि सोडून दिला; मग आणखी एक... त्यानंतर एक... असे काही फुगे त्याने फुगविले.
फुगा फुगविताना त्याच्या गळ्याच्या ताणल्या जाणाऱ्या शिरा स्पष्ट दिसत होत्या आणि त्यामुळे त्याला होणाऱ्या वेदनाही जाणवत होत्या. मध्येच येणाऱ्या एखाद्या गिऱ्हाईकाला हवा तो फुगा तो देई आणि पुन्हा त्याचे पुढचे काम सुरू राही.
आता मात्र मला राहावले नाही. मी पुढे झालो आणि त्याच्या पाठीवर थाप टाकली. मघाशीच फुगा घेतलेला असल्याने तो ओळखीचं हसला.
काय रे रोज इथंच असतोस?
नाही, शुक्रवार, शनिवार आणि रविवारीच फक्त असतो.
विक्री किती होते?
होते दोनअडीचशे रुपयांची; पण छोटी-छोटी पोरं फुगं घेतात आणि आनंदानं जातात. मला पैसे मिळतात; पण त्या पोरांच्या चेहऱ्यावरील आनंद बघून बरं वाटतं. मलापण आनंद होतो.
शाळेत जातोस की?
जातो तर! आठवीत आहे. आता सुटीमुळे रोजच इथं असतो.
फुगे फुगवायला पंप नाही तुझ्याकडे?
आहे; पण मनासारखे फुगे फुगत नाहीत.
त्रास होत नाही?
होतो की! जीव पार घाईला येतोय. सारखी तहान लागते.
मग काय करतोस?
काही नाही थुंकी गिळतो. हे त्याने अगदी सहज सांगितलं.
(बोलत बोलत त्याचा उद्योग सुरू होता)
घरी कोण कोण असतं? ते पण हाच धंदा करतात? माझा पुढचा प्रश्‍न.
घरी आई-बाबा आणि आजी आहे. बाबा इथंच असतो, चुलता, आज्जापण मंदिर आणि परिसरात फुगंच विकतात.
शाळेचं काय?
रोज जातो, संध्याकाळी शाळा सुटली की तासभर अभ्यास करतो आणि मग येतो फुगे विकायला.
कंटाळा येत नाही?
कंटाळा येऊन कसं चालंल? घरी मदत करायला नको का?
त्याच्या उत्तरानंतर माझे प्रश्‍नच संपले. एवढ्या लहान वयात एवढी जाण. कुठुन मिळत असेल सारं पेलण्याचं बळ!
"अहो चला!'ने भानावर आलो आणि जायला निघालो. न राहवून आणखी एक फुगा घेतला. छोटी डबल खूश. पैसे दिले आणि चालू लागलो.
काहीसं आठवलं म्हणून पुन्हा माघारी वळलो. त्या छोकऱ्याजवळ आलो आणि विचारले, नाव काय रे तुझे?
जुबेर... आणि तो छानसं हसला.
त्याचा हसरा चेहरा क्‍लिक झाला. एवढा कष्टावूनही तो आनंदी वाटला आणि मी छोटीच्या चेहऱ्यावरील आनंदात जुबेरचे समाधान कोठे सापडते का, हे शोधत बाहेर पडलो.

Saturday, October 3, 2009

कोजागिरीला चांदणेच फितूर

को जागर्ति?.... कोण जागं आहे? असं विचारत अश्‍विन पौर्णिमा येते आणि शरदाचं चांदण सर्वत्र भरून राहतं. केसरयुक्त दुधाचा आस्वाद घेत चंद्रबिंब न्याहाळणं आणि त्याच्या साक्षीने गप्पांची मैफल रंगविणे यापरता आनंद तो कोणता. कोजागिरीला बहुतेक असाच काहीसा माहौल सर्वत्र असतो. ठिकठिकाणी मित्रमंडळींचा कट्टा जमतो आणि उत्साहात पौर्णिमेचं चांदणं वेचलं जातं.
यंदा मात्र या साऱ्यावर पावसाने अक्षरशः पाणी ओतले. गेले चार दिवस पाऊस मी म्हणतोय. काही ठिकाणी तर तो सुपाने ओततोय. सिंधुदुर्गसह कोकण किनारपट्टीवर पावसाच्या तांडवाने सारी जनता भयभीत झाली आहे. गेले चार दिवस येथील लोक रात्र जीव मुठीत घेऊन कंठत आहेत. त्यामुळे कोठेही फारसा गप्पांचा फड रंगलेला दिसला नाही आणि फेसाळणारे दुधाचे ग्लासही एकमेकांना भिडल्याचे दिसले नाहीत. चार भिंतींच्या आत काही प्रमाणात ते भिडले असतील तरच. चंद्रच ढगांआड लपून फितूर झाल्याने मग हा आनंद यंदा तरी नशिबी नाही. असो पुढच्या वर्षी कोजगिरीला ही कसर भरून काढावी लागणार हे नक्की

Tuesday, September 29, 2009

यंदाचा विजय मूळस्थानचा

विट्यात लाखो नागरिकांच्या साक्षीने मूळस्थानच्या सिद्धनाथाच्या पालखीने यंदा विजयादशमीला शीलंगणाचे सोने लुटले. अखेरच्या टप्प्यात अत्यंत अटीतटीने झालेली ही शर्यत मूळस्थानच्या पालखीने जिंकली. विट्याची रेवणनाथाची पालखी पळविणाऱ्या खांदेकऱ्यांनी केलेली प्रयत्नांची शर्थ अखेरच्या टप्प्यात काहीशी कमी पडली आणि सलग तिसऱ्या वर्षी शर्यत जिंकण्याची संधी यंदा हुकली. पहिल्यापासून अखेरपर्यंत अंतर ठेवून विजय मिळविताना मूळस्थानच्या कसबी खांदेकऱ्यांनी कोठेही विजय हुलकावणी देणार नाही याची काळजी घेतली. विट्याचे खांदेकरी अखेरच्या टप्प्यात काहीसे कमी पडले आणि पिछाडी भरून काढून विजय मिळविण्यात कमी पडले. कोण जिंकले कोण हरले यापेक्षा यंदा पालख्यांचा खेळ जिंकला.

विट्याची वैशिष्ट्यपूर्ण विजयादशमी


विजयादशमी सीमोल्लंघनाचा सण. वाईट प्रवृत्ती नष्ट करून नवे घडविण्याच्या दिशेने पाऊल टाकण्याचा सण. दुष्ट प्रवृत्ती-मनोवृत्ती, तमोगुण, रजोगुण दूर सारण्यासाठी संकल्प सोडण्याचा दिवस. साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ दिवस. या दिवशी कोणतेही कार्य सुरू करावे आणि ते निर्विघ्नपणे पार पडावे, ही आपली संस्कृती. या संस्कृतीला जोडून काही परंपराही रूढ झाल्या आहेत. कोल्हापूर, म्हैसूर येथे साजरे होणारा शाही दसरा हे त्याचेच मूर्तिमंत रूप. येथील सोहळ्याएवढा मोठा नसला तरी बहुतेक महाराष्ट्राला परिचित असलेला आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण दसरा विट्याचा. सांगली जिल्ह्यातील विट्यात विजयादशमीला देवांना (मुखवट्यांना) पालख्यांत ठेवून त्यांना पळविण्याची अनेक वर्षांची परंपरा असून ती आजही तेवढ्याच श्रद्धेने, भक्तीने आणि उत्साहाने जपली जाते. नोकरी-कामधंद्यानिमित्त देशभर असलेले विटेकर व परिसरातील नागरिक ही शर्यत पाहण्यासाठी आवर्जून या दिवशी उपस्थिती लावतातच.आश्‍विन शुद्ध प्रतिपदेला नवरात्रोत्सवास प्रारंभ होतो आणि विविध मंदिरांत विधिपूर्वक घटस्थापना केली जाते. या कालावधीमध्ये मंदिरांतील मूर्तींना वेगवेगळे पोशाख करतात. विजयादशमी हा मुख्य दिवस असतो आणि याच दिवशी दुपारी पालख्यांच्या शर्यती रंगतात.मूळस्थानची म्हणजे सुळेवाडी येथील सिद्धनाथाची पालखी व विट्यातील सोनार गल्लीमधील रेवणनाथाची पालखी यांच्यामध्ये ही शर्यत होते. फार पूर्वी लाकडाचाच अधिक उपयोग करून या पालख्या बनविल्या जात. त्यामुळे त्या खूप वजनदार असत. तरीही कसबी खांदेकऱ्यांमध्ये त्या पळवत नेण्याची रग असे. कालांतराने या पालख्यांमध्ये बदल होत गेले आणि आताच्या पालख्या तुलनेत वजनाने हलक्‍या बनल्या. पाळणा, त्यावर बसविलेले दांडा आणि त्यावर तांबड्या रंगाची पिंजरी बसविलेली असते. पिंजरी झेंडूच्या फुलांनी व गोंड्यांनी सजविलेली असते. शर्यतीच्या धामधुमीतही ही पिंजरी निघणार नाही अशारीतीने ती घट्ट बांधलेली असते. ही पालखी खांद्यावरून पळविणे सोपी बाब नाही; पण पळविणारे जोशात ही शर्यत खेळतात. पालख्या पळविताना पालखीला खांदा देणे व खांदा काढून घेऊन दुसऱ्याच्या खांद्यावर पालखी देणे ही कला खांदेकऱ्यांना अवगत असणे अत्यंत आवश्‍यक असते.दुपारी तीनच्या सुमारास नाथ मंदिराच्या प्रांगणात भैरवनाथ, म्हसवडसिद्ध, भैरोबा, सिद्धनाथ (मूळस्थान) व रेवणनाथाच्या पालख्या एकत्र येतात. येथून त्या वाजत-गाजत येथील मुख्य पेठेतील काळेश्‍वर मंदिराजवळ आणल्या जातात. तेथे मानकऱ्यांच्या हस्ते मूळस्थानच्या पालखीला निरोप दिला जातो आणि विट्यातील रेवणसिद्धाच्या पालखीसोबत शर्यत सुरू होते. पालखी शर्यत सुरू होऊन काळेश्‍वर मंदिर, पाण्याची टाकी, शिवाजी चौक, बसस्थानकमार्गे शीलंगण मैदान असा शर्यतीचा मार्ग असतो. पालख्यांची शर्यत सुरू होण्यापूर्वी आबदागिरी व छत्र पळवत नेले जाते. त्यामुळे पालखी शर्यत लगेचच सुरू होत असल्याची वर्दी उपस्थितांना मिळते.मूळस्थानची सिद्धनाथाची पालखी पाहुणी असल्यामुळे तिला शर्यतीच्या रेषेपासून दहा पावले पुढे उभे राहण्याचा मान दिला जातो. त्या वेळी विट्याच्या सिद्धनाथाची पालखी डाव्या बाजूला उभी असते. मानकऱ्यांनी निरोपाचे विडे देताक्षणी पालख्यांच्या शर्यतीला प्रारंभ होतो आणि सुरू होतो थरार. साधारण दोन किलोमीटर अंतराची ही शर्यत पाहताना उपस्थितांचे श्‍वास रोखलेले असतात. "पालखी आली'च्या आरोळ्यांनी परिसर भरून राहतो. दोन्ही पालख्या पळविणारे खांदेकरी पालखी पळविण्यासाठी शर्थ करतात. प्रचंड चुरशीने पंधरा-वीस मिनिटांत होणारा हा शर्यतीचा थरार एकदा तरी अनुभवण्यासारखाच असतो. शर्यत जिंकण्यासाठी एकमेकांच्या पालख्या पकडण्याचेही प्रयत्न होतात.सपकाळ वस्तीवरील ओढ्यापासून चढ सुरू झाल्यानंतर खांदेकऱ्यांची दमछाक होते. या वेळी वाहणाऱ्या गर्दीमधून हेलकावत पालख्या पुढे सरकत असतात. शर्यत पाहण्यासाठी रस्ता दोन्ही बाजूने फुलून गेलेला असतो. पालख्या शीलंगण मैदानावर पोहोचल्यानंतर खांदेकरी आणि उपस्थित एकच जल्लोष करतात आणि मूळस्थानच्या पालखीला निरोप दिला जातो. नंबर कोणाचा आला याला येथे गौण स्थान असते येथे "खेळ' होणे महत्त्वाचे मानले जाते. शर्यत संपल्यानंतर गावातील नागरिक मैदानावर येतात. तेथे सामुदायिकरित्या शमीच्या पानांचे पूजन होते. एकमेकांना आपट्याची पाने अर्थात सोने देऊन शुभेच्छा दिल्या जातात आणि पावले परतीच्या वाटेला लागतात. जाताना चर्चा रंगते काही वेळापूर्वी रंगलेल्या थरारक शर्यतीची.

Thursday, July 9, 2009

अस्पर्श अन रमणीय...

अगर फिरदौस...बररुए...हमी अस्त, जमी अस्त, जमी अस्त....अशी, स्वर्गीय अनुभूती देणारी अनेक ठिकाणे या भूतलावर आहेत. केरळचा विचार केल्यास हे राज्य पृथ्वीवरील स्वर्गच आहे. म्हणूनच केरळला "गॉडस्‌ ओन कंट्री' म्हटले जाते. मोसमी पावसाचे प्रवेशद्वार असणाऱ्या केरळवर निसर्गसौंदर्याने मुक्तहस्ते उधळण केलेली आहे. समुद्रावरून साऱ्या किनारपट्टीला कवेत घेणारा भन्नाट वारा. माडांच्या सळसळणाऱ्या आवाजाने भरून राहिलेला परिसर. बॅकवॉटरच्या पाण्याशी सलगी करताना सूर्यकिरणांनी पाण्यावर बनविलेल्या चांदण्यांचे दागिने मिरवत प्रवास करणाऱ्या छोट्या-छोट्या नौका. जैवविविधतेने नटलेले मुन्नार, पलक्कड, पेरियारचे जंगल. हजारो वर्षांची परंपरा जपणारा आयुर्वेदाचा समृद्ध वारसा. हत्तींचे माहेरघर असलेले हे राज्य त्यामुळेच पर्यटकांच्या आवडीचे राज्य म्हणून अव्वल स्थानी आहे.1980 पर्यंत केरळची अवस्था कस्तुरी मृगाप्रमाणे होती. निसर्गसौंदर्याची खाण असूनही त्या खाणीचा उपयोग करून विकास साधण्याचे कसबच त्यांना साधलेले नव्हते. पर्यटक येत होते, पर्यटनाचा आनंद त्यांच्या परीने लुटत होते; मात्र त्याचा फारसा फायदा स्थानिकांना होत नव्हता. त्यामुळे पर्यटनाच्या माध्यमातून पैसाही मिळवता येतो, याबाबत फारसा विचार झालेला नव्हता. त्यानंतर मात्र चित्र बदलले. केरळ पर्यटन विकास महामंडळाने विविध योजना राबविल्या आणि गेल्या पंचवीस वर्षांत त्यांनी केरळच्या पर्यटन उद्योगाचा चेहरामोहराच बदलून टाकला. "गॉडस्‌ ओन कंट्री' ही कॅच लाईन घेऊन केरळने पर्यटनाचे सर्व आयाम बदलून टाकले. जगातले सर्वांत झपाट्याने पर्यटनाच्या दृष्टीने विकसित होणारे राज्य असा मानही पटकाविला. ल भौगोलिक परिस्थितीचा जास्तीत जास्त उपयोग करून घेताना हजारो वर्षांच्या परंपरांना ऊर्जितावस्था आणली आणि ती जागतिक स्तरावर नेऊन पोहोचविली.पर्यटनच्या अंगाने केरळाच विचार केला असता त्याची पाच भागात विभागणी होऊ शकते. स्वच्छ सुंदर समुद्रकिनारे, येथील बॅकवॉटर, जंगले आणि थंड हवेची ठिकाणे आणि महत्त्वाचा वाटा उचलणारे येथील आयुर्वेदिक औषधोपचार. या सर्व घटकांचा पर्यटनासाठी केरळ सरकारने अत्यंत खुबीने उपयोग केला आहे. पर्यटकांच्या वाढत्या ओघाची आकडेवारी पाहिली की पर्यटन वाढीसाठी केरळने घेतलेली मेहनत जाणवतेच. 2006 मध्ये केरळला साडेआठ लाखांवर पर्यटकांनी भेट दिली होती. 2008 मध्ये हाच आकडा साडेनऊ लाखांवर गेला. विशेष म्हणजे गेल्या पाच वर्षांत विदेशी पर्यटकांचे प्रमाणही 25 टक्‍क्‍यांवर गेले आहे. त्यातून मिळणारे परकीय चलनही त्याच पटीत वाढले आहे.1980 मध्ये केरळची अर्थव्यवस्था काहीशी नाजूक बनलेली होती. साक्षरतेचे प्रमाण मोठे असल्यामुळे येथे साक्षर जास्त; पण त्यांच्या हाताला काम नाही, असे चित्र होते. त्यामुळे येथे शिकलेल्यांनी आखाती देशांची वाट धरली होती. येथे शिकायचे, आखाती देशांमध्ये जायचे, तेथे पैसा कमवायचा आणि पुन्हा येऊन काहीबाही उद्योगधंदा करावयाचा असे चक्र सुरू होते. या जाण्या-येण्यासाठी येथे मोठ्या प्रमाणावर प्रवासी कंपन्या सुरू झाल्या होत्या. त्यामुळे काही प्रमाणात पर्यटनाच्या जवळ जाणारा उद्योग मूळ धरू लागला. एकीकडे आखाती देशात जाण्यासाठी कंपन्या कार्यरत होत असतानाच, काही कंपन्यांनी राज्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी सुविधा देण्यास सुरवात केली. पर्यटनाच्या माध्यमातून पैसा करण्याचा आणखी एक मोठा स्त्रोत बेरोजगारांच्या हाताला उपलब्ध झाला आणि पाहता पाहता या व्यवसायाने जोम धरला. 2000 मध्ये केरळमध्ये पर्यटन व्यवसाय एकदम भरभराटीला आला. राज्याला डॉलरमध्ये कमाई होऊ लागली. अनेक बेरोजगार हातांना काम मिळाले. अनेक कलावंतांना न्याय मिळू लागला, अनेक कलाकारांच्या कलांचे चीज होऊ लागले. 2003 मध्ये जगातील सर्वांत वेगाने विकसित होणारे पर्यटन राज्य म्हणून केरळचा नावलौकिक झाला. सध्या येथे वाढीचा वेग 13.31 टक्के इतका झाला आहे.वैद्यकीय पर्यटनाची नवी दिशाऍलोपॅथी उपचारांच्या अतिरेकाला कंटाळून अनेकांनी आयुर्वेदाचा मार्ग धरला. केरळमध्येच वर्षानुवर्षे आयुर्वेदिक उपचार पद्धती सुरू असून नव्या जमान्यामध्ये त्यामध्ये बदल तसेच सुधारणा घडवून ती अधिक सक्षम बनविली आहे. याचा पर्यटनाच्या दृष्टीने खुबीने उपयोग करून घेताना केरळ सरकारने आयुर्वेदिक उपचार केंद्रांसाठी भरघोस सुविधा देऊन ती केंद्रे सुसज्ज बनविली. जुन्या उपचार पद्धतीमध्ये आमूलाग्र सुधारणा आणून त्याचे ब्रॅंडिंग केले. त्यांच्या मोठ्या प्रमाणात जाहिराती केल्या. मोठमोठी आयुर्वेदिक केंद्रे उभारण्यासाठी प्रोत्साहन, सोयी-सवलती दिल्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर येथे पर्यटक उपचार करून घेण्यासाठी येतात.केरळ पर्यटन विकास महामंडळाने खास केरळी पद्धतीने आयुर्वेदिक उपचार करण्यासाठी रिसॉर्टची उभारणी केली आहे.एकूण काय तर नियोजनबद्ध विकासामुळे केरळातले पर्यटन बहरले आहे.---------------पर्यटनाची प्रमुख वैशिष्ट्येकेरळला लाभलेल्या अनेक देणग्यांपैकी 580 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा ही सर्वांत मोठी देणगी आहे. या समुद्रकिनाऱ्यावरच केरळच्या अर्थव्यवस्थेचा डोलारा बऱ्यापैकी तोलला आहे. या किनाऱ्यांचा बहुतांश भाग वालुकामय आहे. येथील कोवालम्‌ बीचला सर्वाधिक पर्यटक भेट देतात. याशिवाय अलप्पुझाचे बॅकवॉटर पर्यटकांना खुणावते.बॅकवॉटरच्या माध्यमातून केरळ सरकारला कोट्यवधी रुपये मिळतात. येथे 38 नद्या, सुमारे पंधराशे किलोमीटर लांबीचे कालवे, तसेच पाच मोठे तलाव जोडले गेलेले आहेत. येथे प्रामुख्याने बोटींमधूनच वाहतूक करण्यात येते. पूर्वी फक्त वाहतुकीसाठी असणाऱ्या या बोटींचा उपयोग व्यावसायिकदृष्ट्या होऊ लागला आणि अनेकांची आर्थिक गणिते सुटली. येथे असणाऱ्या विविध प्रकारच्या बोटींमधून पर्यटक केरळच्या अंतर्भागातील सौंदर्याचा आनंद यथेच्छ लुटतात. अलेप्पीला "पूर्वेकडील व्हेनिस' असेही म्हणतात. ऑगस्टमध्ये येथे ओनमनिमित्त होणाऱ्या नावांच्या शर्यती पाहण्यासाठी देशविदेशातून पर्यटक मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावतात.राज्यात थंड हवेची ठिकाणेही पर्यटकांना खेचून घेतात. पश्‍चिम घाटाच्या बहुतांश पर्वतरांगा जंगलांनी व्यापलेल्या आहेत; तर उर्वरित भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर चहा व कॉफीचे मळे आहेत. यापैकी काही मळे दोनशे वर्षांपूर्वीचे आहेत. जंगलाने व्याप्त या राज्यात हत्तींची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. येथे अनेक खेड्यांमध्ये हत्तींचा रोजच्या कामामध्येही उपयोग करून घेतला जातो. हत्तींना खास प्रशक्षण देण्यासाठी पाथनमिथ्थीताजवळ कोन्नी प्रशक्षण केंद्रही आहे. हत्तींशिवाय येथील जंगलांतून वाघ, बिबटे, सिंह, उडणारी खार, अस्वले तसेच माकडांचे तसेच सापांच्या विविध जातीही आढळतात. त्यामुळे येथे आयुर्वेद उपचार केंद्रांना मोठे महत्त्व आहे.

Monday, March 16, 2009

कुछ कुछ होता है!

दुपारचं जेवण उरकलं आणि माझं रिमोट घेऊन चॅनेल सर्फिंग सुरू झालं. एका पाठोपाठ एक चॅनेल मागे पडत गेलं आणि एका ठिकाणी थबकलो. शाहरूख-काजोल-राणीचा "कुछ कुछ होता है' सुरू असल्याचं पाहिलं आणि हिला हाक दिली. कामाने वैतागलेली "ही' काहीशी चरफडतच बाहेर आली. काय आहे? (तमाम नवरा जमातीवर वैतागलेला प्रश्‍न)तिच्या प्रश्‍नाकडे (सवयीनं) दुर्लक्ष करीत, अगं "कुछ कुछ होता है' लागलाय आवरून ये. काय? म्हणताना तिचा मघाचा त्रासिक भाव कुठल्या कुठे पळाला आणि आलेच म्हणत ती किचनमध्ये शब्दशाः पळालीसुद्धा. पटणार नाही; पण पाचव्या मिनिटाला ती पदराला हात पुसत आली. अहो कुठपर्यंत आलाय सिनेमा? असा नेहमीचा टिपीकल प्रश्‍न फेकत उत्तराची वाट न पाहता तिने माझ्या शेजारी बैठक मारली.झालं सिनेमातील एक-एक प्रसंग सरकू लागले आणि शेजारी हिच्या डोळ्यांतून गंगा-जमुना वाहू लागल्या. हिचा मुसमुसणारा आवाज ऐकला आणि पडद्यावरचा सिनेमा बाजूलाच राहिला. माझ्या मनःचक्षूवर वेगळाच सिनेमा सुरू झाला. माझ्या मनानं गतकाळाच्या डोहात बुडी मारली. अगदी चित्रपटात असतो तस्साच फ्लॅशबॅक सुरू झाला.... दहा वर्षांपूर्वीची पुण्यातली ती दुपार अवतरली. निलायम चित्रपटगृहासमोरची गर्दी आणि तुफान गर्दीत सुरू असलेल्या "कुछ कुछ होता है' या चित्रपटाची तिकीटे मिळविण्यासाठीची माझी धडपड. हा चित्रपट पाहण्याचे प्लॅनींग हिच्यासोबत मी केलं तेव्हाच, तिकीटे मिळणार का? हा गुगली टाकून हिनं मला बोल्ड करायचा प्रयत्न केला होता. तेव्हा मी राणा भीमदेवी गर्जना केली होती," तिकीट ब्लॅकनं घेईन पण तुला शिनुमा दाखविन.' (तेव्हा आम्ही लग्नाआधीच्या प्रेमात आकंठ बुडालो होतो ना! त्यामुळे बहुधा असेल. आता नाही तर नाही...) गर्जनेप्रमाणे तिकीटे अक्षरशः ब्लॅकनेच घेऊन आम्ही चित्रपटगृहात प्रवेश केला. नेहमीप्रमाणे लेट लतीफ आम्ही इतरांचे पाय तुडवत कसे-बसे आमच्या सीटपर्यंत पोहोचलो. सिनेमा सुरू झाला असल्याने सुरवात *********!...ऍक्‍चुली मी सिनेमा "एंन्जॉय' करण्यासाठी गेलो होतो, झालं मात्र भलतंच. चित्रपटातील भावूक प्रसंग सुरू झाले आणि मला मुसमुसलेला आवाज ऐकू येऊ लागला. शेजारी पाहतोय तर तोंडाला रुमाल लावून माझी सखीच हुंदके देत होती; आता मात्र माझं चित्रपटातलं लक्ष उडालं आणि अधून मधून ही किती रडतेय हे पाहण्यातच माझा वेळ चालला. प्रत्येक प्रसंगानंतर हिचे हुंदके वाढतच, गेले. सिनेमा संपेपर्यंत हिच्याजवळील दोन रुमालांसह माझ्याकडील रुमाल अक्षरशः ओले चिंब. तिचं ते चित्रपटातील व्यक्तीरेखांशी एकरूप होऊन चित्रपट अनुभवण्याची, जगण्याची मला कमालच वाटली. सिनेमा पाहताना अनेक जण तो चित्रपट जगतात हे मी ऐकलं होतं. ते अगदी जवळून अनुभवलं. त्या क्षणी मी मात्र कोरडाच. तिच्या शेजारी बसून अख्खा सिनेमा पाहिला, हिचं मुसमुसणं अनुभवलं; पण माझी सखी ज्या भावनांत वाहिली "त्या' भावना मात्र माझ्यापर्यंत पोहचल्याच नाहीत. खरंतर त्यानंतर अनेकदा हा चित्रपट आमच्या दोघांमधील चेष्टेचाच विषय ठरला. (फ्लॅशबॅकमधून मी वर्तमानात)---आजही पुन्हा तोच अनुभव... सिनेमा संपेपर्यंत हिचं अखंड मुसमुसणं सुरूच. चित्रपट पाहून उठत-उठत ही म्हणाली, काजोल खरंच ग्रेट आहे नं ! माझ्या डोक्‍यात प्रश्‍न वळवळला...म्हणजे आज ही काजोलची भूमिका जगली ?खरंच असं काय आहे या सिनेमात? साधा, स्वच्छ प्रेमाचा त्रिकोण आणि शाहरूख-काजोल आणि राणी मुखर्जीच्या अप्रतिम अभिनयाची केमिस्ट्री. प्रचंड प्रेम असूनही न मिळणारा सखा (शाहरूख) आणि "त्याच्या' प्रेमात आपण अडसर ठरू नये म्हणून कसलीही खूण मागे न ठेवता निघून गेलेली आणि प्रेमाचा त्याग केलेली सखी (काजोल). निखळ मैत्रीच्या आतमध्ये असणारं एकमेकांवरील गाढ प्रेम, प्रेमातीत विश्‍वास आणि एकमेकांसोबतच आयुष्य जगणार असल्याची ग्रहीतकं. या ग्रहीतकांना बसलेला धक्का. त्यामुळे अक्षरशः कोलमडून गेलेली सखी. त्यातून तिचं "त्या' दोघांमधून निघून जाणं. सखीच्या सोडून जाण्याने प्रेम मिळूनही अस्वस्थ झालेला सखा. प्रत्यक्ष त्याची असणारी "ती' (राणी मुखर्जी). तिचं त्याच्या आयुष्यात अचानक येणं आणि तेवढ्याच अचानकपणे एक गोड छोकरी देऊन काळाच्या प्रवासाला निघून जाणं. कथेची गुंफण प्रेक्षकाला न गुंतवेल तर नवलच.... सिनेमा प्रेक्षकांच्या ह्रदयाला हात घालणाराच. निदान माझ्या सखीसारख्या असंख्य संवेदनशील, हळव्या मनांसाठी तरी नक्कीच.... एक कबुली देतो. खरं तर आज सिनेमा पाहताना माझ्याही डोळ्यांच्या कडा ओलावल्या. एखादा थेंबही बहुदा बाहेर ओघळला; पण माझी सखी तेव्हा का रडली होती? याचं उत्तर मात्र मला आज मिळालं. मी आज तो चित्रपट "अनुभवला' खरंच प्रेमाच्या त्या अवस्थांत "कुछ कुछ होता है.' हे मला पटलं. गम्मत अशी की जेव्हा चित्रपटाची "सिच्युएशन' मी प्रत्यक्ष जगत होतो तेव्हा मात्र मी चित्रटाशी समजरस झालोच नव्हतो...