नाटक संपलं, तिनं मेकअप उतरला, आवराआवर केली आणि गाडीत जाऊन बसली. सीटवर डोकं टेकून मागे रेलली आणि डोळे मिटून त्याची वाट पाहू लागली. तिच्या डोळ्यासमोर नाटकातील प्रसंग उभा राहिला.
---
तो म्हणाला,""सीते...मला माहित आहे, तू पवित्र आहेस. रावणानं तुझं हरण केलं होतं तो विधीचा संकेत होता. आपण त्या संकेतानुसार वागलो. आत्ताही मी ह्रदयावर दगड ठेऊन त्या संकेतानुसारच तुझा त्याग करणार आहे. मी तुझ्यावर अन्याय करतोय पण तू मला समजून घेशील...''
"माझी काहीच तक्रार नाही. तुम्ही आहात म्हणून मी आहे. माझा जन्मच मुळी सोसण्यासाठी झाला आहे. तुमचा जेवढा संग मला लाभला त्यावरच मी तृप्त आहे. तुमच्या सोबत असणाऱ्या आठवणी माझ्यासाठी खूप आहेत. तुम्ही नका वाईट वाटून घेऊ''
...पडदा पडला आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. नाटक छान रंगलं. दोघांचं ट्युनिंग आजही प्रेक्षकांना आवडलं. दोघांमधील प्रसंग विशेष खुलत आणि ते पाहण्यासाठीच प्रेक्षक गर्दी करत असं बोललं जाई. दोघांच्या अभिनयाला रसिक प्रेक्षक अगदी मनापासून दाद देत. सातत्याने प्रयोग होऊनही हाऊसफुल्लचा बोर्ड काही हटलेला नव्हता. डिमांड शो वाढत होते आणि पैसा, प्रसिद्धीचा दोघांवरही वर्षाव होत होता. पुरस्कारांनी दिवाणखाना भरून गेला होता. जोडीलाच आणखीही दोन नाटकं सुरू होती. त्यांनाही प्रतिसाद मिळत होता. सर्व प्रकारच्या भूमिका "ती' उत्तम प्रकारे करू शकते असा विश्वास दिग्दर्शक, निर्मात्यांना असल्यामुळे ते पैसे लावायला तयार होते.
---
गाडीचे दार लावल्याचा आवाज आला आणि तिची तंद्री भंगली. तो येऊन शेजारी रेलला. दारूचा दर्प तिच्या नाकात घुसला.
"ड्रायव्हर चल' ती म्हणाली आणि गाडी मार्गस्थ झाली.
तो अर्धवट शुद्धीत होता. प्रयोग झाल्याबरोबर त्यानं मेकअप उतरवला आणि तेथेच बसून सुरवात केली. जणू प्रवेश संपण्याची तो वाटच पाहत होता. बराच वेळ तो पित बसला आणि ती त्याच्यासाठी गाडीत वाट पहात बसली. थिएटर बंद करण्याची वेळ झाली तशी तेथील पोऱ्याने त्याला धरून आणून गाडीजवळ सोडले.
गाडी सुरू झाली आणि तिच्या विचारचक्राने वेग घेतला.
चार वर्षांपूर्वी आपण रंगमंचावर पहिल्यांदा पाऊल ठेवले तेव्हा तो अगदी भरात होता. त्याच्यासोबत सीतेची भूमिका करताना मजा यायची. आपण अगदी समरसून सीतेची भूमिका साकारत असू. हळू हळू तो आपल्या प्रत्यक्ष जीवनातील "राम' आहे असेच वाटू लागले आणि पाहता पाहता आपण त्याचे कधी झालो हे समजलेच नाही. तो किती अदबीने वागायचा आपल्यासोबत. प्रयोग झाले की जेवण एकत्र घ्यायचा. विकेंडला फिरायला घेऊन जायचा. घरी येऊन आई-बाबांसोबत झकास गप्पा मारायचा. घरातला एक होऊन जायचा. वेगवेगळ्या वस्तू आणून द्यायचा आणि मुख्य म्हणजे किती प्रेमाने बोलायचा आपल्यासोबत. माझा होकार मिळविल्यानंतर आई-बाबांना म्हणाला,""फुलासारखं जपेन तुमच्या मुलीला. तिच्याशिवाय माझं जगणं अपुरं अपुरं आहे. मला ज्या जीवनसाथीचा शोध होता, ती तुमची मुलगीच आहे. तिच्या येण्याने माझ्या आयुष्याला पूर्णरूप येईल, नाही म्हणू नका.''
प्रतिथयश जावई मिळतोय आणि माझा होकार आहे हे लक्षात आल्यावर नकाराचा प्रश्नच उरला नाही. धुमधडाक्यात लग्न झालं. पहिले काही महिने अगदी मजेत, मस्त, फुलपंखी होते. सुख पायाशी लोळण घेत होतं. म्हणेल ती बाब समोर उभी राहत होती. त्याची बायको म्हणून मिरविण्यात पराकोटीचा आनंद मिळत होता. त्याच्यासोबत फिरणे, पार्ट्या, नाटकांच्या तालमी, दौरे सगळं कसं स्वर्गीय वाटत होतं. तो सुखांचा वर्षाव करत होता आणि आपली अवस्था "किती घेशील दोन करांनी' अशी झाली होती. माझ्यासाठी तो रामच बनला होता.
---
या सुखाला दृष्ट लागली. परगावी नाटकाच्या दौऱ्यावर असताना एकदा तो भरपूर प्याला आणि नाटकातल्या नायिकेसोबत लगट केली. त्याचा बभ्रा झाला. त्यानं प्रयत्न करूनही झाला प्रकार तिच्या कानावर आलाच. तो दौऱ्यावरून आल्यावर दोघांत "त्या' प्रकरणावरून भरपूर वाद झाला. काही दिवस अबोल्यात गेले. नाटक करतानाच काय ते दोघांचे बोलणे होई. एरव्ही संवाद बंद. असेच खूप दिवस गेले. मग तिनेच पडती बाजू घेतली. हळू हळू अबोला दूर झाला. तिनं सगळं पाठीवर टाकलं; मात्र अविश्वासाची एक फट दोघांत कायमची निर्माण झाली. करियरसाठी मूल होऊ न देण्याचा तिनं घेतलेला निर्णय आणखी ठाम झाला. त्याची "नट' म्हणून नव्याने ओळख झाल्याने ती मनोमन दुखावली; पण तरीही हे दुखावलेपण तिनं आत खोलवर ठेवलं. तिच्यापुढेही कितीतरी मोहाचे क्षण आले पण, तिने त्यावर प्रयत्नपूर्वक मात केली कारण नाटकातली सीता तिच्यात पुरेपूर भिनली होती; मात्र त्याच्या करणीने नाटकातली सीता आता ती यंत्रवत सादर करू लागली. त्या भूमिकेशी समरस होणं तिलां जड जाऊ लागलं. तिच्यातल्या अभिनेत्रीला मिळणारी दाद तिला स्वस्थ बसू देत नव्हती आणि म्हणून त्याला सहन करत ती स्टेजवर सीता साकारत राहिली.
---
गाडी बंगल्यात शिरली. तिच्या विचारांच्या गाडीला ब्रेक लागला. ती उतरून आत गेली. नोकराने त्याला आणून बेडवर झोपवलं. तिनं आवरलं आणि बेडवर पुन्हा विचारांत बुडून गेली. त्याच्या बरळण्यामुळे तिच्या विचारांना आणखी खाद्य पुरविलं. बराच वेळ तो बरळत होता आणि ती ऐकत राहिली. त्याचे शब्द तिच्या कानात शिशाचा रस ओतल्यासारखे शिरले. ऐकून ती खूप वेळ तशीच दगडासारखी बसून राहिली. बरळता-बरळता त्याची शुद्ध हरपली.
---
सकाळी उठल्याबरोबर त्यानं सवयीनं हाक मारली. प्रतिसाद आला नाही. त्याचा आवाज ऐकून नोकर चहा घेऊन आला. सोबत आणलेलं पत्र त्यानं त्याच्या हातात दिलं. म्हणाला "बाईसाहेब देऊन गेल्या.'
त्यानं पत्र फोडलं.
""...........
रात्री तू खूप बडबडलास. स्वतःबद्दल, माझ्याबद्दल. तू स्वतःबद्दल बडबडलास तेथपर्यंत सारं ऐकलं, सहन केलं कारण मला त्याची सवय झालीय; मात्र तू माझ्याबद्दलही गरळ ओकलीस. तुझी प्रत्येक चूक पोटात घालून तुझं असणं सहन करत राहिले. तुझ्या वागणुकीचे शिंतोडे माझ्या अंगावर उडूनही मी त्याबद्दल एक शब्दही काढला नाही. नाटकाच्या दौऱ्यांवर मी एकटी गेले त्यावर प्रश्नचिन्ह उभं केलंस. तू झोपेत का होईना पण माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडविलेसच. जे तू बोललास ते एक स्वाभीमानी स्त्री म्हणून सहन करण्यापलीकडचं आहे त्यामुळे मी तुझ्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय. वाईट एकाच गोष्टीचं वाटतं. नाटकात तू राम साकारायचास पण वास्तवात तू कधीच राम होऊ शकला नाहीस आणि मी मात्र नाटकात सीता झाले आणि वास्तवातही सीताच राहिले. खऱ्या रामायणात रामासाठी सीता धरणीच्या कुशीत लुप्त झाली. मी मात्र माझ्यातल्या स्त्रीसाठी तुझ्यापासून विभक्त होत आहे सीतेचा धर्म पाळण्यासाठी.''