Tuesday, December 21, 2010

स्टॅंड लागलंय!

शीर्षक वाचून हा काय प्रकार? असा प्रश्‍न तुम्हाला नक्कीच पडला असेल. जरा थांबा खुलासा करतोच. त्याचं काय झालं परवा असाच बाईकवरून फेरफटका सुरू होता. ट्रॅफिकमधून वाट काढत निघालो होतो. एवढ्यात एक मोटरसायकलस्वार बाजूने पुढे निघून गेला, जरा घाईतच दिसला. त्याच्या पाठोपाठ एक सॅंट्रोवालाही पुढे गेला. दोन्हीही माझ्या अगदी नजरेसमोर. एवढ्यात सॅंट्रोवाल्याने गाडीचा वेग वाढविला आणि तो त्या मोटरसायकलस्वाराजवळ गेला आणि ओरडला,
भाईसाब स्टॅंड लागलंय!फ
मोटरसायकलस्वारानं खाली पाहिलं, मोटरसायकलचा वेग कमी केला. सराईतपणे स्टॅंड पायानं मागं ढकललं आणि सॅंट्रोवाल्याकडे पाहत अगदी मनापासून मान हलवून आभार मानून निघूनही गेला. त्याच्या आभार मानण्याने सॅंट्रोवाल्याच्या चेहऱ्यावर छानशी स्उिमटली आणि तोही त्याच्या मार्गे रवाना झाला.
बाब अगदी साधी पण मला खात्री आहे, आपणही अनेकदा असा प्रसंग पाहिलेला असेल. आपल्यापैकी काहींनी अनुभवलाही असेल. आपण कित्येकदा विसरतो तसंच हा मोटरसायकलस्वार कोठे तरी उभा राहिला असणार आणि त्यानंतर गाडीला कीक मारून सुसाट निघाला असणार. गडबडीत स्टॅंड काढायचं राहिलं असणार. नेमकं हेच त्या सॅंट्रोवाल्याच्या लक्षात आलं आणि तो पटकन मोटरसायकलस्वाराला धोसुचना देऊन मोकळा झाला.
मला प्रश्‍न पडला त्या सॅंट्रोवाल्यानं हे का सांगितलं? त्याचा काय संबंध? त्या मोटरसायकलस्वाराचं आणि त्याचं नातं काय? समजा त्या तशा स्टॅंडमुळे तो मोटरसायकलस्वार पडला असता, त्याला काही दुखापत झाली असती तरी त्या सॅंट्रोवाल्याचं काहीही बिघडलं नसतं किंवा त्याचं काही नुकसानही झालं नसतं. जे काही नुकसान झालं असतं ते मोटरसायकलस्वाराचं; पण...
दोस्तांनो हा पणफच इथं खूप महत्त्वाचा आहे. त्या सॅंट्रोवाल्याच्या साध्या कृतीनं माणुसकीचा झरा वाहता आहे, तो अद्याप आटलेला नाही हे अधोरेखीत झालं. लागलेल्या स्टॅंडमुळे तो मोटरसायकलस्वार पडेल आणि त्याला काही तरी इजा होईल, ही काळजी वाटल्याने सॅंट्रोवाल्याने त्याला तातडीनं सांगितलं. त्याच्यातल्या माणुसकीनं त्याला साद घालून तातडीनं व्यक्त होण्यास भाग पाडलं आणि कदाचित होऊ घातलेला एक अपघात, एखाद्या कुटुंबावर होणारा आघात टळला.
तर दुसरीकडे च्या बीजाची एका ह्रदयातून दुसऱ्या ह्रदयात आपसूक पेरणी झाली. धोका असताना दुसऱ्याला सावधान करण्याची साधी माणुसकी जपली पाहिजे हा संदेश एकाकडून दुसऱ्याकडे अगदी अलवारपणे पोचला. मला खात्री आहे आता पुन्हा तो मोटरसायकलस्वार दुसऱ्या कुणाच्या गाडीचे स्टॅंड लागलेलं दिसेल तेव्हा तातडीनं त्याला त्याबाबत सांगेल कारण आता तो मोटरसायकलस्वार या वाहत्या झऱ्यातील एक धार बनला आहे. त्याच्या परीने तो जेव्हा जेव्हा वेळ येईल तेव्हा हा झरा अखंड वाहता राहण्यासाठी प्रयत्नशील राहील.
या आणि अशा छोट्या-छोट्या बाबींमुळेच जगाचे रहाटगाडगे काहीसे व्यवस्थीत सुरू आहे. नाहीतर आजूबाजूला पाहिलं तर फारसं सुखावह चित्र दिसतच नाही; मग अशावेळी असे काहीसे निर्मळ झरे नजरेला पडतात आणि आपल्या पावित्र्याने आपल्यालाही त्याचा एक भाग बनण्यासाठी साद घालतात. मी ठरवलं आहे या सादेला प्रतिसाद देण्याचं!... तुम्ही?

Tuesday, December 14, 2010

सैर माडबनची


ही वाट दूर जाते... स्वप्नामधील गावा...
जैतापूरला अणुऊर्जा प्रकल्प होण्याचे नक्की काय झालं आणि "माडबन' साऱ्या जगभर प्रकाशझोतात आलं. कारण हा प्रकल्प होणार आहे माडबनच्या हद्दीमध्ये. कोकणातील टिपीकल छोटंसं खेडं असलेल्या माडबन आणि परिसरावर निसर्गानं सौंदर्याची अगदी मुक्त हस्ते उधळण केलेली आहे. माडबनच्या किनाऱ्यावरून पश्‍चिमेकडे समुद्राच्या लाटांशी झुंजणारा विजयदुर्ग पहावयास मिळतो. तर येथील समुद्र किनाऱ्याला असलेल्या सुरूच्या बनातूनच किनाऱ्यावर छोट्याशा पायवाटेच्या साथीने येता येते. पायवाट संपून जेव्हा आपण किनाऱ्यावर पोचतो तेव्हा आपले स्वागत स्वच्छ, शांत, सुरक्षीत मऊशार वाळूंचा किनारा करतो. या वाळूच्या अंगणात ठिकठिकाणी खेकड्यांनी रेखाटलेली नक्षी पहावयास मिळते. छोट्या छिद्रांभोवती रेखलेली ही नक्षी पाहण्याची मौज काही औरच. शांतपणे काठावर बसून पहात राहिलं तरी आपल्या डोळ्यांदेखत अशा नक्षी उमटून येताना पहावयास मिळते. तुरूतुरू धावणारे लहान-मोठे खेकडे या वाळूवर एकसे एक नक्षी रेखाटतात आणि त्यांच्या कलाकारीला दाद दिल्याशिवाय राहवत नाही. साधारण किलोमीटरभर लांबीच्या या किनाऱ्यावर अगदी निर्धोकपणे फिरण्याचा आनंद घेता येतो, तर कंबरेएवढ्या पाण्यात जाताना कसलीही भीती वाटत नाही. येथील पाण्याला तुलनेत ओढ कमी असल्यामुळे अगदी बिनधास्त पाण्यात फिरता येते; मात्र सोबत गावातील कोणीतरी असणं आवश्‍यक आहेच बरं. जर वातावरण स्वच्छ असेल तर विजदुर्ग किल्ल्याच्या परिसरातील हालचालीही आपण सहज पाहू शकतो.
साधारण साडेसातशे लोकसंख्या असलेलं माडबन टिपीकल कोकणी गाव. चिऱ्यातील घरे, त्यावर कौलारू छत, अंगणात आणि परसात माड, सुपारी, आंबा, काजू, रातांब्याची झाडे. स्वच्छ अंगण आणि प्रत्येक अंगणाला चिऱ्याच्या भिंतीचे कुंपण, त्याला लावलेला कुडाचा दरवाजा. गावाला लागूनच असलेली भाताची खाचरे. त्यातल्या त्यात सधन घरापुढे उभ्या गाड्या. भगवतीचे सुरेख मंदिर आणि तिची तेवढीच सुंदर, सुबक मूर्ती. उतारावरून गावात आल्यानंतर साऱ्या जगाशी कसलाही संपर्क नसलेलं सुंदर देखणं गाव. यावं प्रेमात पडावं आणि येथील होऊन जावं असं मनात रुतून बसणारं माडबन. (सध्या जैतापूर अणूऊर्जा प्रकल्पविरोधातील हालचालींचे प्रमुख केंद्र बनल्याने गाव शांतता हरवून बसले आहे)

हे आहे खेकड्याचे घर

खेकड्यांनी मिळून नक्षी काढून सजवलेला रुपेरी वाळूचा किनारा

हा सागरी किनारा...

कोकणातलं टिपीकल घर आपुलकीनं बोलावणारं

Thursday, November 11, 2010

मोगरा फुलला


टेरेसचा दरवाजा उघडून सवयीप्रमाणे दूरवर दिसणाऱ्या पन्हाळ्याच्या डोंगररांगेकडे पाहिले तर धुक्‍याच्या पडद्याआड ती हरवून गेलेली; पण वातावरण एकमद मस्त. माझ्याभोवतीही धुक्‍याचे काही कण रेंगाळत-रेंगाळत पुढे चाललेले. त्याच्या स्नेहार्द स्पर्शाने सकाळ आणखीनच प्रसन्न झाली. नेमका हाच मोका साधून मोगऱ्याच्या हळूवार गंधाने नाकाशी येऊन साद घातली. डोळे आपोआप वळले मोगऱ्याच्या कुंडीकडे तर हिरव्याकंच पानांच्या पार्श्‍वभूमीवर पांढऱ्या शुभ्र शलाका उमटून आलेल्या. वाऱ्याच्या मंद झुळकीशी मस्तपैकी खेळत असलेल्या. पाच टप्पोऱ्या शलाका.
वर्षभरापूर्वी लावलेला मोगरीचा वेल त्याच्या वकुबानुसार फुलला. माझे प्रयत्न सुरूच होते; पण या वेलीचं वैशिष्ट्य असं की हिला नवी फांदी फुटली की पहिल्यांदा त्यावर कळी डोले आणि मगच फांदी वाढे. बरं कुंडीतली वेल ती कितीशी वाढणार? तिला फारसं बाळसं नाही; मात्र असलेल्या चार पाच छोट्याश्‍या फांद्यांवरही सातत्याने फुले उमललीच. परवा मात्र या वेलीनं एकाच दिवशी चक्क ओंजळभर फुलांचं दान आम्हाला दिलं; मग मात्र मोह आवरला नाही. आमच्या मित्रवर्यांना आमंत्रित करून छानसं फोटो सेशन उरकलं. (आमचं त्याबाबतीतल ज्ञान जरा तुटपुंजंच आहे) आमच्या कुटुंबानेही त्यादिवशी समजुतदारपणा दाखवताना या फुलांचा वेलीवरच डोलण्याचा आनंद मुळीच हिरावून घेतला नाही, त्यामुळे संपूर्ण दिवस या शुभ्र शलाकांच्या सुगंधाने घराचा परिसर भरून राहिला.

Thursday, November 4, 2010

स्वागतिका


आश्‍विन महिन्याला सोबतीला घेऊन धुक्‍यासोबत हातात हात घालून थंडीचे आगमन होतं आणि पांढुरक्‍या धुक्‍याची दुलई साऱ्या सृष्टीवर अलगद पांघरली जाते. सारे चराचर दबबिंदूंचे कण टिपून घेण्यासाठी उतावीळ असते. पाऊस पिलेला निसर्गही थंडीचे अमृत पिण्यासाठी आसुसलेला असतो. खळ्यावरून घराच्या अंगणात आलेल्या समृद्धीच्या सोन्यामुळे बळिराजाही मनोमन आनंदलेला असतो. नोकरदारांच्या हातात खुळखुळणारा ज्यादाचा पैसा सुखाची सोबत करतो. मनामनांचे गाभारे आनंदाच्या दीपोत्सवाने उजळून निघालेले असतात. नव्या नवलाईमुळे घराघरांतून आनंदाचे दीप प्रकाशमान होऊन सुखाच्या रेशीमलडी उलगडतात. हे रेशीम आणखी चमकदार बनविण्यासाठी दिवाळी येते. अशा वेळी पहाटे गाणं कानावर पडतं ...
उठी श्रीरामा पहाट झाली...
पूर्व दिशा उजळली...
उभी घेऊनी कलश दुधाचा
कौसल्या माऊली!
आणि दिवाळीची जाणीव भोवती रुंजी घालू लागते. भल्या पहाटे काकणभरले हात अंगणावरून फिरू लागतात आणि पाहता-पाहता सारे अंगण सजीव होतं, आपल्याशी बोलू लागतं. सारवलेल्या, स्वच्छ अंगणात किणकिण नाद येऊ लागतो आणि एक-एक नक्षी उमटून येऊ लागते. बोटांच्या चिमटीतून लोभस, गहिरे, मनाचा ठाव घेणारे, रंगबिरंगी रंग एकापाठोपाठ एक धरतीशी नातं जोडू लागतात आणि नक्षीची सुरेल मैफल आकार घेऊ लागते. त्या किणकिणणाऱ्या हातांची नजाकतभरी हालचाल एखाद्या चतुरस्त्र चित्रकाराची आठवण करून देतात. (तशी रांगोळी रेखणारी "ती' यजमानांच्या आयुष्यात रंग भरणारी चित्रकारच असते) रांगोळीची शुभचिन्हे गंधभरल्या अंगणावर झर-झर उतरतात आणि सारा माहौल बदलून जातो. कधी हा माहौल ठिपक्‍यांतून बोलतो, तर कधी त्यातील नक्षी तुमच्यासोबत संवादाचा पूल बांधते. कित्येक ठिकाणी फुलांच्या पाकळ्याही सोबतीला येऊन रांगोळीची श्रीमंती अधिक वाढवितात. दिवाळीसाठी घरोघरी येणारी लक्ष्मी अंगणातून प्रसन्न होऊन यावी आणि आपल्या घरीच तिने राहावे, या साठीची ही तयारी.
गारगोटीच्या चुऱ्यापासून बनविलेली पांढरीशुभ्र रांगोळी आणि रंगांची सोबत यांमुळे रांगोळी रेखलेले अंगण, येणाऱ्या प्रत्येकाशी आपसुक संवाद साधते. एरव्ही देव्हारा, तुळशीवृंदावन, जेवणाच्या ताटाभोवती रेखली जाणारी रांगोळी ऐन दिवाळीत मात्र साऱ्या अंगणाची आणि घराची शोभा अगदी काठोकाठ वाढवतं. रंगांच्या या ओळी पवित्रतेचे प्रतीक मानल्या जातात आणि म्हणूनच त्या घराघरांत रेखल्या जातात. सारं अंगण सजिव करून टाकणारी ही रांगोळी असते फक्त गारगोटीचा चुरा पण ती रेखतानाची भावना चैतन्य निर्माण करते. ही रांगोळी बंगालमध्येअल्पना म्हणून, बिहारमध्ये ती अरिपना म्हणून, राजस्थानात मांडना म्हणून, तर दक्षिण भारतात ती कोलाम म्हणून भेटते. केरळात ती पाकल्लम म्हणून समोर येते. महाराष्ट्राशिवाय इतरत्र रांगोळीसाठी तांदळाचे पीठ, फुले, फुलांच्या पाकळ्या, विटकरीचे तुकडे, नैसर्गिक रंग यांचाही उपयोग करतात; तर दक्षिणेत फुलांचा उपयोगाने रांगोळ्यांच्या पायघड्या, गालीचे अंथरले जातात; मात्र गारगोटीचा चुरा आणि रंग हे मात्र कॉमनच.
चिमटीतून सारं भावविश्‍व साकारण्याची किमया साधणारी रांगोळी मनांचा ठाव घेते आणि समृद्धीचा आनंदोत्सव साजरा करण्याचा पवित्र भाव साऱ्या अंगणभर मिरवते, सारा भवताला आनंदी, पवित्र बनवून स्वागतिका बनते.

Saturday, October 30, 2010

ती दोघं

सिग्नल लागला आणि त्यानं गाडी उभी केली. उन्हाच्या तडाख्याने तो जाम वैतागला होता. हातातलं काम उरकून केव्हा एकदा ऑफिसच्या एसीमध्ये शिरतोय असं त्याला झालेलं; पण अजून दोन तास तरी त्याला उन्हात फिरावेच लागणार होते. तो दीड मिनिटे संपण्याची वाट पाहू लागला. टळटळीत उन्हातला प्रत्येक सेकंद त्याला शिक्षा वाटत होती.
"सालं काय आपलं नशिब! दिवसभर वणवण फिरा, क्‍लायंटना कन्व्हीन्स करा. जास्तीत जास्त बिझनेस होण्यासाठी प्रयत्न करा. बॉसपुढं रेकॉर्ड चोख राहील म्हणून धडपडा. करीयर ग्राफ वाढता रहावा, जास्त पैसा मिळावा म्हणून धडपडा. घरतल्यांच्या आनंदासाठी उन्हा-तान्हात हिंडा. चेहरा काळवंडून जातो. संध्याकाळी जीव नकोसा होतो. तरी बरं पैसे बरे सुटतात, नाहीतर...'
खण-खण आवाजाने त्याची विचारांची तंद्री भंगली. त्यानं आवाजाच्या दिशेने नजर टाकली.
फाटके कपडे घातलेली दोन पोरं जीव खाऊन खाली पडलेल्या सिमेंटच्या पिलरवर हातोड्याने घाव घालत होती.
"काय पोरं आहेत! उन्हा-तान्हात कशाला खेळत असतील? असा प्रश्‍न त्याच्या डोक्‍यात वळवळला.
तेवढ्यात पाठीमागून कर्कश्‍श हॉर्न वाजला आणि त्याची विचारांची तंद्री भंगली. सिग्नल सुटला होता. त्यानं किक मारली आणि वाहनांच्या गर्दीतून वाहून जाऊ लागला.
----
तासाभराचे काम आटोपून तो पुन्हा मघाच्याच चौकात आला आणि पुन्हा सिग्नल लागला. आता तो स्वतःवरच वैतागला. दीड मिनिटे पुन्हा रणरणत्या उन्हाची शिक्षा. पुन्हा घाम, चिक-चिक. वैताग साला! एवढ्यात त्याच्या कानावर पुन्हा खण-खण आवाज आला. त्याचे लक्ष तिकडं गेलं. मघाची तीच पोरं जीव खाऊन त्याच पिलरवर हातोड्याने घाव घालत होती.
आता त्याचे कुतुहल जागे झाले. त्याने गाडी वळविली आणि तो त्या पोरांच्या बाजूला जाऊन उभा राहिला.
"काय करताय रे पोरानो?'
त्याच्या प्रश्‍नाने ती पोरं दचकली. त्यांचे हातोडे थांबले. चेहऱ्यावर अनामिक भीती तरळली.
"काही नाही...काही नाही! आम्ही आपलं हे...' असं म्हणून ती पोरं अडखळली.
"अरे घाबरू नका, उन्हा-तान्हात काय खेळताय हे बघायला मी आलोय बाकी काही नाही'
"हात तुझं! असं म्हणून त्यातल्या एकानं पुन्हा हातोडा सरसावला आणि खाणकन पिलरवर घाव घातला.'
दुसरा त्याच्या तोंडाकडं बघत म्हणाला, ""साहेब खेळत नाय काय, या पिलरमधनं लोखंडाचं तुकडं काडतुय.''
"लोखंडाचे तुकडे? आणि त्याचं काय करता?'
"ओ साहेब जाऊ द्या नां! ए वश्‍या आटप लवकर. उगच नको बोलत बसू. त्यांना न्हाई काम. तू मार फटके.'
दुसरा म्हणाला,"" साहेब जावा तुम्ही ह्यो शिवज्या न्हाई शाना, उगीच काय तरी बोलंल तुम्हाला जावा तुम्ही.'
""अरे पण तुम्ही उन्हा-तान्हात या पिलरमधून लोखंडाचे तुकडे का काढत बसलाय? आणि तुम्हाला शाळा नाही?''
""शाळा आणि आमी, काय साहेब चेष्टा करताय काय गरिबाची? आवं हिथ दोन येळचं जेवण मिळावं म्हनून आख्खा दिस उन्हा-तान्हात घालवावा लागतूय. आसं पडक्‍या ठिकाणचं सिमेंटची दगडं, पिलर हुडकायची, दिवसभर हाताला फोड येईस्तवर फोडून त्यातनं लोखंड काढायचं. राती भंगारचं दुकान बंद व्हायच्या आत तिथं जायाचं. फोडून काढलेलं लोखंडाचं तुकडं तिथं द्यायचं. त्याचं वजन करायचं. पाच-पंचवीस रुपये मिळतात. ते घ्यायचं आनी घर गाठायचं. साला तो भंगारवाला त्यात पण काटा मारतोय, पण करणार काय? गुमान दिल ते पैसे घ्यायचं. पैसं आसलं, तर आई घरात घेती, नायतर बोंब मारती. शिव्या घालती''
""का?'' आता त्याची छाती भरून आली. दाटलेल्या आवाजात न राहवून त्यानं मध्येच प्रश्‍न विचारला.
""सावत्र हाय न्हवं! बाचा पत्त्या नाय; पण घरात ठिऊन घेतीया हेच लय झालं. ती पण काय करणार म्हणा. ती चार घरची धुणी भांडी करती. आणखी दोन भनी हायेत. पाच जणांच्या पोटाची खळगी तिला भरायची हाईत. दोनी पोरींना उजवायचं हाय. मग आमी नाय पैसै मिळवायचं तर कुनी, तुमीच सांगा सायेब?''
त्याचं लक्ष दोघांच्या हाताकडं गेलं. हात पार सोलवटून निघालेले; पण डोळ्यात जगण्याची चमक आणि दोन पैसै मिळवायची धमक स्पष्ट.
""आपल्याला जरा ऊन लागलं तर मघाशी आपण स्वतःवरच चरफडलो आणि ही पोरं...
त्याचे डोळे भरले. त्यानं पाकिट काढलं हाताला लागतील तेवढे पैसै घेतले आणि त्या पोराच्या सोलवटलेल्या हातावर ठेवले. दोघांच्याही डोक्‍यावरून हात फिरवला आणि काहीही न बोलता गाडीला कीक मारली.''
""पोरांचे डोळे चमकले. ऊन थंड वाटू लागलं, हातात आणखी बळं आलं. त्यांनी आणखी जोमाने हातोड्याचे घाव घालायला सुरवात केली. आज पोटभर अन्न मिळणार याची त्यांना मनोमन खात्री पटली होती.''

Monday, October 4, 2010

आठवणींचा दरवळ


कोणी येतं आयुष्यात
एक झुळुक बनून!
रेंगाळून राहतं सभोवती
आश्‍वासक होऊन!
स्वप्ने वेडी खुळावती
गुंफल्या मनांतून!
झंकारून उठताती मग
सूरही ह्रदयातून!
ताऱ्यांचा चमकता गावही
मावतो ओंजळीतून!
आणाभाकांचा पर्वत राहतो
उभा शब्दांतून!
---
हाय... दुर्दैव आणते
अघटीत घडवून!
कोसळती स्वप्ने, इमले
पडते सारे मोडून!
फुलणारे नाते कोमेजते
आठवणींचा दरवळ
मागे ठेऊन!

Tuesday, August 10, 2010

म्हणूनच...

केबीनमधून खाडकन आवाज आल्याने बाहेरचे सगळे काम टाकून केबीनच्या दिशेने धावले. तेवढ्यात केबीनचे दार धाडकन ढकलून "तो' रुबाबदार तरूण बाहेर आला. त्याने बाहेर जमलेल्यांवर तुच्छतेने एक नजर टाकली आणि तो तडक तेथून बाहेर पडला. त्याला पाहत पाहत केबीनबाहेर जमलेही आपापल्या जागेवर जाऊन बसले.
--
"तो' घरी आला. कोपऱ्यात शुज काढत त्याने हातातली फाईल टेबलवर ठेवली. कानावर आई म्हणत असलेला श्‍लोक पडल्याने त्याला जरा बरे वाटले आणि मघाच्या प्रसंगाने तापलेलं डोकं काहीसं शांत झालं. त्यानं कपडे काढले आणि तो फ्रेश झाला. त्याच्या येण्याची चाहूल लागल्याने आईने त्याचा अंदाज घेतला आणि अटोपते घेत चहा टाकला.

कशी काय झाली मुलाखत?
ठीक. (आईच्या प्रश्‍नावर त्याने रुक्षपणे उत्तर दिलं)
आज पण काही....म्हणत आईनं त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि तिचं वाक्‍य अर्धवटच राहिलं...
आई! तुला माहित आहे...तरी तू मला तोच प्रश्‍न का विचारतेस?
राहिलं बाबा ! तुला जे योग्य वाटेल ते कर!
---
लक्ष्मीकांत येथेच राहतात का? बाहेरून कोणीतरी विचारले.
आईने बाहेर जाऊन पाहिले. दारात पोलिस.
हो..येथेच राहतो? काय झालं? काय काम आहे?
साहेबांनी त्यांना पोलिस ठाण्यात घेऊन यायला सांगितलंय!
आई कोण आहे गं?
अरे हे पोलिस तुला न्यायला आलेत बघ!
आई अगं घाबरू नकोस, मी पाहतो काय झालं ते!
तो बाहेर गेला, पुन्हा आत आला, "" आई तू जेवून घे, तो पर्यंत मी आलोच! चला!
"तो' पोलिसांबरोबर निघाला. त्याला आपण पोलिस ठाण्यात का निघालो आहोत याचा अंदाज आला; पण आईला त्याने काहीच सांगितले नाही. काही उपयोग होणार नव्हता त्याचा!
-----
या साहेब...बसा ! त्या कॉन्स्टेबलच्या कुत्सीत बोलण्याने त्याची विचारांची मालिका खंडित झाली. "तो' काहीसा दुखावला.
"मला येथे का बोलावलंय?'
आम्हाला वेळ जात नाही, वाईच गप्पा मारायच्या म्हणून ...(ही ही ही.)
त्याच्या हसण्याने खरंतर तो संतापला; पण त्याने संताप आवरला. कारणही तसंच होतं. त्याला पलीकडच्या मुख्य टेबलासमोर खुर्चीत बसलेला पाठमोरा माणूस दिसला.

"बसा! साहेब येऊ देत मग बघू तुमच्याकडे!'
"तो' काही बोलला नाही. शांत बसून राहिलां.
---
तेवढ्यात तेथील वरिष्ठ अधिकारी आले आणि खुर्चीत बसले! समोरच्या व्यक्तीबरोबर त्याचं काहीतरी बोलणं झालं.
तुकाराम..त्यांना घेऊन ये इकडं.
साहेबांनी बोलावलंय.
तो उठला आणि साहेबांपुढे जाऊन उभा राहिला?
""अरे लक्ष्मीकांत तू आणि इथं !''
"सर...मला घरातून बोलावून आणलं म्हणून आलो'
अरे तू आहेस... यांची तुझ्याबद्दल तक्रार आहे...तू म्हणे यांना मारहाण केलीस?
होय सर..मी यांच्या थोबाडीत दिली. त्याने थंडपणे सांगितले.
काय ऽऽऽ तुझ्याकडून अशा अपेक्षा नाहीत आणि तुला याचे परिणाम काय होतील याची कल्पना आहे नं! आणि तरीसुद्धा तू असं टोकांच पाऊल का उचललंस?
"सर तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे; पण आधी त्यांना कारण तरी विचारा'
"काय झालं म्हणून याने तुम्हाला थोबाडीत मारली' त्यांनी त्या व्यक्तीला विचारलं.
...मी यांची मुलाखत घेत होतो? काही प्रश्‍न विचारले बस्स! आणि याने मला थेट मारहाण केली.'
"सर एक मिनिट मी यांना मारहाण केलेली नाही. फक्त एक थोबाडीत लगावली आहे आणि ते ही मला नको तो प्रश्‍न विचारला म्हणून!'
असा काय प्रश्‍न विचारला म्हणून तू त्यांना मारलेस?
"सर विचारा त्यांनाच, त्यांच्या सडक्‍या मेंदूत काय शिजत होतं त्यांनाच माहित!'
"सर काय विचारलंत तुम्ही'
.............(काही वेळ शांततेत गेला)
सर ते काय बोलणार? साऱ्या जगाला ते तत्वज्ञान सांगतात आणि स्वतः वागताना मात्र खालची पातळी गाठतात.' माझी सर्व सट्रीफिकीट यांनी पाहिली. माझे मार्क्‍स पाहिले. ते पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की यांचा "कॅंडीडेट' माझ्यापुढे टिकाव धरू शकणार नाही. मग यांनी माझ्या सर्टीफिकीटवर वाचून पुन्हा-पुन्हा माझी "जात' विचारली. मी एकदा सांगितले तर मला ऐकू कमी येतं जरा मोठ्यानं सांगा म्हणत पुन्हा पुन्हा विचारलं ! मग मी मोठ्यानं सांगितलं. त्यानंतर त्यांनी माझ्यावर जातीवाचक शेरेबाजी केली. मग माझं डोकं फिरलं आणि दिली ठेऊन कानाखाली आता ते नक्कीच पुन्हा कधीच कोणाची "जात' विचारणार नाहीत. विचारा त्यांना.
-----
काय हे खरंय हे?
ती व्यक्ती काहीच बोलली नाही.

लक्ष्मीकांत जा तू... पुन्हा असे करू नकोस. रागावर कंट्रोल कर.
(थॅंक्‍यू सर म्हणून तो बाहेर पडला)
सर तुम्ही असं का केलंत? तुम्ही उच्चविद्याविभूषीत...तुम्ही या पदापर्यंत पोचलात ते कष्टाने, तुमच्या कर्माने. कधी तुमची "हलकी' जात तुमच्या आडवी आली नाही. तुम्हाला सुविधा मिळाल्या, तुम्हाला फायदा झाला म्हणून कोणीही तुमच्या विरोधात बोलल्याचं ऐकिवातही नाही. आम्ही सर्वच तुमचा आदर करतो. तुम्हीही "त्याच' चुका करू लागलात तर कशी सांधणार दुरावलेली मनं?
या तुम्ही. मला वाटतंय आता तुमची काही तक्रार उरली नसले. त्यांच्या उत्तराची अपेक्षा न करता त्यांनी दुसरी फाईल उघडली.

Monday, August 2, 2010

मनातला विठ्ठल!

पहाटे आजी नेहमीप्रमाणे मंदिरात गेल्या, पूजा झाली, काकड आरती झाली. मनोभावे त्यांनी विठ्ठलमूर्तीला नमस्कार केला; मात्र आज पुन्हा त्यांना विठ्ठलाच्या चेहऱ्यावर नेहमीचे तेज दिसलेच नाही. त्या पुन्हा अस्वस्थ झाल्या. गेल्या काही दिवसांत त्यांना विठ्ठलाच्या चेहऱ्यावर तेजच दिसत नव्हतं आणि असं का व्हावं हा विचार त्यांचा पिच्छा सोडत नव्हता. या विचारांच्या तंद्रीतच त्या मंदिरातून बाहेर पडल्या. रेंगाळतच पायऱ्या उतरून चालू लागल्या. पावसाची रिपरिप सुरू झाल्याने चालण्याचा वेग त्यांनी जमेल तसा वाढविला. दोन-चार मिनिटे चालल्यानंतर त्या राहत असलेल्या इमारतीजवळ आल्या. पायऱ्या चढून घरात गेल्या. काहीसा दम लागल्याने दाराजवळच खुर्चीत बसल्या. वेग घेतलेला श्‍वास लयीत येत असताना पुन्हा विठ्ठलमूर्ती आठवू लागल्या.
...पहाट असूनही आज एकादशीमुळे मंदिरात गर्दी होतीच; भक्तांची ये जा सुरू होती; बाहेर भिकारीही नेहमीपेक्षा जास्त दिसत होते. एखादा दुसरा भक्त त्यांच्या हातात चिल्लर भिरकावून निघून जात होता एवढंच. आज आपण पूजेला नेहमीपेक्षा जास्त वेळ दिला. प्रार्थना, अभंगही व्यवस्थीत म्हटले. निदान आज तरी गेले काही दिवस मनात सुरू असलेली अस्वस्थता कमी होईल असं वाटलं होतं, पण छे! असं का व्हावं? याचा विचार करताना त्यांच्या सुरकुतल्या चेहऱ्यावरील चिंतेचं जाळं आणखी दाट होत गेलं. मग मनाशी काय वाटलं! आणि त्या खुर्चीतून उठल्या. स्वयंपाकघरात गेल्या. पातेलं ठेवून त्यात आदण ठेवलं, चहा-साखर घातली, गॅस बारीक केला आणि पिशवी घेऊन होता होईल तेवढ्या वेगाने जिना उतरून खाली आल्या. जवळच्या डेअरीमध्ये जाऊन दुधाच्या पिशव्या घेतल्या आणि पुन्हा घर गाठले. एव्हाना चहा चांगलाच उकळला होता. आणलेलं दूध त्यांनी त्यामध्ये ओतलं. पुन्हा एकदा चहा चांगला उकळून घेतला. हातावर थेंब टाकून चव पाहिली. "ठिक जमलाय' असं दर्शवणारी मान आपसूक हलली. चहा किटलीत ओतला आणि किटली पिशवीत ठेवून त्या पायऱ्या उतरल्या आणि झपझप पुन्हा मंदिर गाठलं!
आता पाऊस थांबला होता; पण गारठा जाणवत होताच. मंदिरातली लगबग सुरूच होती. त्या भिकाऱ्यांजवळ गेल्या आणि एकेकाला चहा देऊ लागल्या. वीस-पंचवीस भिकाऱ्यांना त्यांनी गरम-गरम चहा दिला. चहा वाटून झाल्यानंतर भिकाऱ्यांचे चेहरे पाहून त्यांच्या मनातला मघाचा विचारांचा कल्लोळ काहीसा कमी झाला. चेहऱ्यावरील चिंतेचं जाळं काहीसं सैलावलं. घरी जाण्यापूर्वी पुन्हा मंदिरात गेल्या. विठ्ठलाला हात जोडले आणि जायला निघाल्या. आता त्यांना विठ्ठलाच्या चेहऱ्यावर काहीसं स्मित दिसलं. त्यांना भास झाल्यासारखं वाटलं म्हणून त्यांनी निट निरखून पाहिलं, तर आज त्यांना खरंच विठ्ठलाचा चेहरा प्रसन्न दिसला. विठ्ठलाच्या चेहऱ्यावर त्यांना त्यांच्याच मनातले समाधान उमटून आलेलं दिसलं.

Thursday, July 15, 2010

सलील (तुम्ही) खरंच "दादा' आहे



मला सही..मला सही ! करत हातात वह्या घेऊन गराडा घातलेल्या शंभरावर चिमुरड्यांच्या घोळक्‍यात तुम्ही परवा अगदी हरवून गेला होता आणि न थकता "स्वाक्षरी' देऊन त्या प्रत्येक चिमुरडीला आनंद वाटत होतात. (स्थळ कोल्हापुरातील एक शाळा)
त्या आधी तुम्ही त्याच मुलांवर तुमच्या स्वरांनी अक्षरशः गारूड घातलं होतंत ! म्हणूनच तर सही कशासाठी घ्यायची असते ही माहित नसलेल्या त्या गर्दीतील काही चिमुरड्यांनाही "सलीलदादाची सही' त्यांच्या वहीमध्ये हवीशी झाली. त्या गर्दीतूनच माझ्या छोट्याशा मैत्रीणीनेही अगदी ढकलाढकली करत, संयोजकांचा काहीसा ओरडा खात, दप्तर सांभाळत, खूप वेळ रांगेत उभे राहत तुमची सही मिळवलीच. सही मिळाल्यानंतर "ही बघा मी सलीलदादाची सही मिळविली' हे सांगतानाचा तिचा आनंद आणि चेहऱ्यावरची चमक वर्णनातीत. (असाच आनंद सही घेतलेल्या बहुतेक सर्व चिमुरड्यांच्या चेहऱ्यांवर होता) या आनंदातच मग आमची स्वारी घरापर्यंत तुमच्या सगळ्या कार्यक्रमाचे वर्णन ऐकवत राहिली; पण माझ्या डोळ्यासमोर तिचा फक्त तो आनंदलेला चेहरा आणि तुमचं मुलांत रंगून सह्या देणं एवढंच आठवत राहिलं.
गंम्मत बघा हं ! वर्षभरापूर्वी केशवराव भोसले सभागृहात तुमचा एक कार्यक्रम आम्ही पाहिला होता. त्या वेळी आमच्या छोट्या मैत्रीणीने तुमची सही घेतली होती. ती तिच्या संग्रही आहेच, तरीसुद्धा मैत्रीणींच्या सोबत सही मिळविण्याची तिची धडपड आणि ती मिळाल्यानंतरचा तिचा आनंद शब्दातीत. तुम्ही तेथूनच तिच्यासोबत खऱ्या अर्थाने आमच्या घरी "सलीलदादा' बनून पोचला.
---
तुमच्या स्वरांची मोहिनी अवघ्या महाराष्ट्राला आहे. तुम्ही सादर केलेल्या कविता, गाणी ऐकवूनच आम्ही आमच्या प्रेमाचे, मायेचे, मैत्रीचे धुमारे रुजविले आणि फुलविले. त्याचे काही संस्कार चिमुरड्यांवर केले आणि त्याचे फळ म्हणजे आज तुमची गाणी त्यांना आत्ताच भारून टाकत आहेत. हे निर्विवाद तुमचे आणि संदीप खरे यांचे यश. यश मिळाल्यानंतर माणूस माणसांत मिसळण्याचे टाळतो असे ऐकले होते; पण त्यालाही तुम्ही परवाच्या कृतीने छेद दिलात. चिमुरड्यांच्या गर्दीत तुम्ही त्यांचे "सलीलदादा' बनून राहिलात न थकाता न टाळता त्यांना आनंद वाटत राहिलात म्हणून लिहावं वाटलं. मनापासून वाटतं तुम्ही असेच "दादा' बनून रहा. (थोडं त्रासाचं जरूर आहे.)

स्वान्त सुखाय!

Monday, June 28, 2010

मुक्काम

परवा दुपारी एक ढग
माझ्या खिडकीवर आला
त्याला पाहून चिमुकलीचा
चेहरा आनंदाने खुलला

बोबडे बोल ऐकताना
तो काहीसा रेंगाळला
वहायचं विसरून लगेच
तिच्या भेटीला धावला

एवढ्यात मागचा ढग
म्हणाला "थांबलास काय
चल, पुढचा मुक्काम
गाठायचाय लवकर'

तो हसला म्हणाला,
"सॉरी मित्रा, तू हो पुढं
माझं ठिकाण मी
मघाशीच गाठलंय!

"ती बघ ती चिमुरडी
पाहून मला आनंदलीय
माझ्या भेटीसाठी
किती आतूर झालीय!

मागचा ढग म्हणाला
"ठिक आहे, तू थांब,
पण आपल्यासाठी तिकडे
बळीराजा झुरतोय विदर्भात'

पहिला ढग ओशाळला.
"चिमुरडीकडे पाहून म्हणाला
"गडे टाटा माझा तुला
मी निघतो माझ्या मुक्कामाला'

रागावू नकोस तू माझ्यावर
गालांवर थिजले थेंब घेऊन
एक चिमुरडी बसलीय तिथे
डोळे लावून माझ्या वाटेवर

Thursday, April 22, 2010

एक वही संस्काराची


चिमुकल्यांच्या इवल्याशा हातांतून पाटीवर किंवा वहीवर "श्री' साकारतो आणि शिक्षणाचा श्रीगणेशा होतो. पहिले वहिले अक्षर उमटते आणि आयुष्याचे चित्र हळूहळू आकारू लागते. हे चित्र ज्याच्या त्याच्या वकुबाने रंगत जाते. अनेकांच्या आयुष्यात हे चित्र खूपच रंगीन, मनोवेधक, सुंदर आणि सकारात्मक असते, तर काहींच्या आयुष्यात हे चित्र फिके, रंगहीन आणि अर्धवटही राहते. मात्र, अगदी सुरवातीलाच पहिला श्री साकारतानाच जर हाती वही सोपवणारा जर संस्कारक्षम असेल, तर मग त्यांच्या आयुष्याचे चित्र नक्कीच उठावदार होते.
राजकारणात अलीकडे अपवाद वगळता अशी संस्कारक्षम, अभ्यासू आणि दूरदृष्टीने विचार करणारी आणि त्याप्रमाणे वागणारी व्यक्तिमत्त्वे अभावाने आढळतात. मुळातच अलीकडे राजकारण म्हणजे चिखलफेक, एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या काढणे आणि स्वतःचे उखळ कसे पांढरे होईल हे पाहणे हीच संस्कृती बनली आहे. अनेक जण या संस्कृतीचे पाईक बनले आहेत. अशा वेळी काही व्यक्तिमत्त्वांची वाटचाल वेगळ्या वाटेवरून होताना पाहणे हे वाळवंटातील मृगजळ भेटण्यासारखे आहे. कोल्हापुरातील तरुण आमदार सतेज पाटील हे तसे पक्के राजकारणी; पण त्याबरोबरच त्यांनी काही संस्कारक्षम बाबी स्वतःच्या अंगी बाणविलेल्या आहेत. एरवी राजकारणावेळी राजकारणच करणाऱ्या सतेज यांनी गेल्या काही वर्षांत आपल्या वाढदिनी भेट म्हणून वह्या स्वीकारण्याचा सुरू केलेला उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आणि अनुकरणीय असा आहे. त्यांच्या समवयस्क लोकप्रतिनिधींकडे अशाप्रकारचा संस्कारक्षम उपक्रम राबविण्याचे वेगळेपण अभावानेच दिसते. वह्या गोळा करणे आणि त्या पुन्हा होतकरू विद्यार्थ्यांना देऊन त्यांच्या शिक्षणाला गती देण्याचे महत्त्वपूर्ण काम ते करीत आहेत. विशेष म्हणजे सवंग लोकप्रियता मिळविण्यासाठी काही वेळा असे उपक्रम सुरू केले जातात आणि कालांतराने ते केव्हा बंद पडतात, हे समजतही नाही; मात्र सतेज यांनी होतकरू विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम सुरू केला आणि गेली कित्येक वर्षे तो सातत्याने राबविला आहे. सुरवातीला एक वेगळा उपक्रम म्हणून वह्या जमा होत होत्या; पण आता मात्र त्यांच्यावरील विश्‍वासाने या वह्या जमा होत आहेत, हे विशेष. यंदाच्या त्यांच्या वाढदिनी पाच लाखांवर वह्या जमा झाल्या. विशेष म्हणजे यामधील काही वह्या या छोट्या दोस्तांनी आपल्या खाऊचे पैसै बाजूला काढून ठेऊन आणून सतेज यांच्याकडे मोठ्या विश्‍वासाने दिल्या आहेत म्हण
जेच छोट्या दोस्तांमध्ये संस्कार रुजविण्यात ते यशस्वी ठरले आहेत.
कोल्हापूरच्या परोपकारी प्रतिमेला धरूनच सतेज यांचे एकूण वर्तन आहे; मात्र आता त्याही पुढे एखादे पाऊल त्यांना टाकावे लागेल. कोल्हापूरला विकासाच्या वाटेवर नेताना अनेक सक्षम हातांना काम मिळावे, यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून ठोस प्रयत्न करण्याची अपेक्षा आहे. राजकारणाबरोबरच समाजकारण करताना अनेक संसार उभे करण्याचे, सावरण्याचे श्रेय त्यांनी मिळवावे. राजकारणात त्यांना राजकारण करावेच लागेल; मात्र त्याचबरोबर समाजकारण करताना घेतलेला वसा न टाकता तो आणखी प्रगल्भपणे कसा विस्तारत नेता येईल, हे पाहावे. तरुणांची फळी राजकारणासाठी उभी करतानाच त्यांच्या हाताला काम देऊन त्यांची कुटुंबे सावरण्याचेही काम त्यांना करावे लागणार आहे. ते तरुण आहेत. विकासाची दृष्टी त्यांच्याकडे आहे. तिचा उपयोग कोल्हापूरच्या विकासासाठी ते नक्कीच करतील. येथील तरुणांना सोबत घेऊन विकासाच्या पायवाटेचा ते महामार्ग बनवतील आणि कोल्हापूरचे स्थान जगाच्या नकाशावर ठळक बनवतील असा विश्‍वास वाटतो. वाढदिनी मिळणाऱ्या प्रत्येक वहीतून त्यांच्या आई-वडिलांनी त्यांच्यावर केलेले संस्कार नक्कीच ते घराघरांत पोहचवतील आणि संपन्न कोल्हापूर, संपन्न महाराष्ट्र घडविण्यात मोलाचा वाटा उचलतील. राजकारणाबरोबच समाजकारण करून ते आगळेवेगळे नेतृत्व म्हणून उदयास येतील आणि तसे त्यांनी यावे कारण तो त्यांचा हक्क आहे. त्यांच्या अशा वेगळ्या उपक्रमांमध्ये सातत्य रहावे हीच अपेक्षा.

Wednesday, March 31, 2010

थोडी चंमत ग!

1)मुंबईमधील एका कार्यक्रमात स्टेजवर एका बाजूने अभिनेते अमिताभ बच्चन आणि दुसऱ्या बाजूने मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अचानक एंट्री केली आणि संयोजकांचे धाबे दणाणले. त्यांच्या चेहऱ्यावर "अगा मी ब्रह्म पाहिले' असे भाव पाहून मुख्यमंत्र्यांनी खुलासा केला, ""हायकमांड'च्या आदेशानेच अमिताभ बच्चन यांच्यासोबत आमचा "मिले सूर मेरा तुम्हारा'. घाबरू नका!'' त्यांचे स्पष्टीकरण ऐकताच संयोजकांपैकी एकाने तातडीने दोघांना एकच हार घालून त्यांचे स्वागत केले. दोघांनीही छायाचित्रकारांना छानशी पोझ दिली आणि तीच वर्तमानपत्रात पहिल्या पानावर झळकली.

2)एकदिवसीय सामन्यात नुकतेच द्विशतक झळकविलेल्या आणि सध्या आयपीएलमध्ये सुसाट सुटलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तातडीने निवृत्ती पत्करत असल्याची घोषणा केली. नव्या रक्ताला वाव देण्यासाठी मी हा निर्णय अत्यंत आनंदाने घेत असल्याचे सांगितले. त्याच्या फ्यूचर प्लॅनविषयी विचारले असता, सचिन नेहमीप्रमाणे काहीसा लाजला. म्हणाला, ""मी हिंदी चित्रपट साईन केलेला आहे व लवकरच त्याचे शूटिंग सुरू होत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन आमीर खान करणार असून माझ्या उंचीला सूट होणाऱ्या आणि अभिनय येणाऱ्या नायिकेचा शोध सुरू आहे. निर्मिती अर्थातच "अंबानी ग्रुप' करणार आहे. मी या नव्या इनिंगसाठी एक्‍साईट आहे.''

3)मुंबईच्या कुठल्याशा पंचतारांकित हॉटेलात पत्रकार परिषदेत अभिनेता आमीर खान भुताच्या वेशात प्रगटला आणि विचित्र आवाजात किंचाळल्याने काही महिला पत्रकार बेशुद्ध पडल्या. आमीर सावरायला गेला, तर काही अर्धवट शुद्धीत येऊन पुन्हा बेशुद्ध पडल्या (त्यांना मग बाहेरच नेण्यात आले). येऊ घातलेल्या नव्या चित्रपटात आमीर एका भुताची भूमिका करणार असून ती भूमिका वास्तववादी व्हावी यासाठी त्याने केस, भुवया, मिशा, हाता-पायांची नखे वाढविली आहेत. त्यामुळे चॉकलेट हिरो आमीर अगदीच भेसूर दिसू लागला आहे. हा गेटअप केल्यापासून तो आपल्या पत्नीला भेटलेला नाही. कारण पहिल्यांदा असे पाहिल्यावर तिला सडकून ताप भरला होता म्हणे.

4)राज्यातील बहुतेक सर्व शहरांत काल रात्री जे पाणी सुरू झाले ते अद्याप थांबण्याचे नावच घेत नाही. बाया-बापड्यांनी घरामधील ज्या-ज्या म्हणून भांड्यांत पाणी साठविणे शक्‍य आहे त्यामध्ये केवळ पाणीच भरून ठेवले. काहींनी घरातील वाट्या, फुलपात्रे, छोटी गाडगी, माळ्यावर ठेवलेले डबे, झाडांच्या मोकळ्या कुंड्या, दिसेल त्या खोलगट भागात पाणी साठवून ठेवले. ज्याअर्थी आज दिवसभर नळाला पाणी राहिले याचा अर्थ पुढचा आठवडाभर तरी पाणी येणार नसल्याचा त्यांचा संशय बळावला. काय करणार, नेहमीचा अनुभव. हा प्रकार बहूतेक शहरांतील पालिका-महापालिका प्रशासनाला समजल्यानंतर त्यांनी गाड्या फिरवून शहराला येथून पुढे कायमच 24 तास अखंड पाणी सुरू राहणार असल्याचे सांगितले तेव्हा नागरिक फक्त पडायचे बाकी राहिले.

5)काय, वरील सर्व घटनांबाबत वाचून धक्का बसला ना? कांदा, फाटकी चप्पल, लिंबू आणि वारे घेण्यासाठी पेपरही घेऊन ठेवलाय जवळ तुम्ही! छे, सगळं आधी बाजूला ठेवा आणि पहिला एअर कूलर, एअर कंडिशनर, पंखा तातडीने सुरू करा आणि जरा थंड व्हा! अहो, आता अखंड वीज तुमच्या घरातच राहणार आहे. आपल्या ऊर्जामंत्र्यांनी काल रात्रीच तसा आदेश दिलाय, "राज्यात अखंड वीजपुरवठ्याचा.' अरे, हे काय, तुम्ही चक्क नाचायला लागला....
.....हो..हो, जरा थांबा. जरा कॅलेंडर पाहा ! थोडी चंमत गं! रागावू नका बरं! एप्रिल फूल केलं बुवा जरा!

Tuesday, March 23, 2010

प्रिय ब्लॉगर्स


मराठी सारस्वतातील सर्वात मोठा उत्सव उद्यापासून पुण्यनगरीत सुरू होत आहे. साहित्यिकांच्या मांदियाळीत साहित्याच्या एकेका अंगावर चर्चा झडतील. मराठीच्या भल्या-बुऱ्याविषयी वाद-प्रतिवाद होतील, साहित्याचे अभ्यासक त्यावर अधिकारवाणीने बोलतील आणि तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य रसिकांना आपल्याला आवडणारे अनेक आद्य लेखक, कवी, मान्यवर "याची डोळा' पाहण्याची आणि ऐकण्याची सुवर्णसंधी साधता येईल. ग्रंथदिंडी, परिसंवाद, साहित्य विश्‍वातील नवोन्मेष, नवसाहित्य, इत्यादी-इत्यादी विषयांवरील चर्चांसाठी येथे तीन दिवस अगदी मेळा भरून येईल आणि त्यानंतर पुढे कित्येक दिवस त्याचे कवित्व सांगितले जाईल. एकूणच सरस्वती पूजकांच्या एकत्र येण्याचा सोहळा पुणे मुक्कामी रंगेल आणि प्रसारमाध्यमांतून तो आपल्यापर्यंत पोहोचेल...चला तर मग आपण या आनंदसोहळ्याचे येन-केन प्रकारे साक्षीदार होण्याचा आनंद घेऊ...पण त्यापूर्वी...
-----
...आत्ता हे सर्व लिहिण्याचे कारण म्हणजे, साहित्यसंमेलनातील सरस्वतीपूजकांनी काही प्रमाणात "नवमाध्यमांतील लेखकांकडे पाठ फिरविल्याचे मंगळवारी वाचनात आले. त्यामध्ये आपले "अनिकेत समुद्रे, सोनल वायकुळ यांनी याबाबत खंतही व्यक्त केली. हे वाचल्याने मात्र मन काहीसं खट्टू झालं. (महत्त्वाचे दोघांचेही लेखन अप्रतिम आणि सातत्याने वाचावे असेच असते) साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरच ब्लॉगर्सच्या लिखाणाच्या दर्जावर शिक्कामोर्तब करून घेण्याचा अट्टहास बाळगून आपण आपल्याचा लिखाणाला दुय्यम का ठरवत आहोत, या प्रश्‍नाने अस्वस्थ वाटले.
मनापासून लिहिणाऱ्यांसाठी "ब्लागींग' एक नवे सशक्त आणि नव्या पिढीच्या अधिक जवळ जाणारे माध्यम आहे. ते हाताळताना व त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसादही मिळत असताना कोणाच्या प्रशस्तीपत्रकाची आवश्‍यकता आपल्याला का वाटते? या प्रश्‍नाने पोखरून काढले. ब्लॉगच्या माध्यमातून प्रत्येक जण यथाशक्ती साहित्यामध्ये भरच घालत असतो. या लिखाणाला कसलीही मर्यादा नाही. कोणतेही बंधन नाही. कोणाचीही बांधीलकी नाही. येथे दर्जाची फिकीर नाही. कारण जे व्यक्त व्हायचे ते बिनधास्त व संवेदनशीलतेने. हेच ब्लॉगींगचे मूळ सूत्र आहे. येथे कोणाच्याही लिखाणावर कोणताही शिक्का नाही. येथे कोणत्याही विचारसरणीतून व्यक्त व्हावे त्याला बंधन नाही. कोणत्या शब्दांत व्यक्त व्हावे याचे नियम नाहीत. येथे बंधन एकच "न घसरण्याचे'. नियम एकच कोणालाही अनावश्‍यक न दुखावण्याचे आणि अगदी किरकोळ अपवाद वगळता सर्वच ब्लॉगर्स हे पाळतात. याचा सार्थ अभिमान आपणा सर्वांना असला पाहिजे.
येथे व्यक्त होणाऱ्या प्रत्येकाच्या डोक्‍यात फक्त एकच किडा वळवळत असतो (असावा) आणि तो म्हणजे, आपण जे लिहितोय ते कोणीतरी वाचावे, त्याबद्दल प्रतिक्रिया द्याव्यात आणि या माध्यमातून नव्याने जन्माला येणारे वेगवेगळ्या प्रकारचे लेखन वाचावे.
येथे लिखाणाच्या दर्जाची फुटपट्टी, लिहिणाऱ्याचे केस किती पांढरे झालेत आणि त्याने किती उन्हाळे-पावसाळे पाहिलेत यावर न ठरता लिखाणातील "तो अनुभव, ते शब्द, ते अभिव्यक्ती किती भिडणारी आहे' यावर ठरते.
"तुमचा अमुक-अमुक लेख वाचला आणि माझ्या डोळ्यांत पाणी उभे राहिले,' ही पोस्टच्या खाली पडलेली कॉमेंट (प्रतिक्रिया) साहित्यातील दिग्गजांना त्यांच्या लिखाणाबद्दल जशी दाद मिळते तेवढीच मोलाची आणि महत्त्वाची ठरते. (म्हणूनच मग कौतुकाने ब्लॉगर्स आपल्या लिखाणावर आलेल्या प्रत्येक प्रतिक्रियेला अगदी न थकता उत्तर देत असतात.)
म्हणजेच हे लिखाण तेवढ्याच आवडीने आणि डोळसपणए वाचले जात आहे. यामध्ये एकच मुद्दा येतो तो म्हणजे हे लिखाण मोठ्या प्रमाणावर वाचकांपर्यंत पोहोचते का याचा; पण सध्या ज्या वाचकांपर्यंत ते पोहचते तो वाचक नक्कीच प्रगल्भ होत असलेल्या पिढीचे प्रतिनिधित्व करतो आणि ही पिढी वाढत राहणारी आहे. प्रस्थापित साहित्यविश्‍वाला समांतर जाणाऱ्या महाजालावर ब्लॉगच्या माध्यमातून लिहिणाऱ्यांनी प्रस्थापित साहित्यविश्‍वाकडून मिळणाऱ्या दर्जाच्या शिक्‍क्‍याची फिकिर मुळीच करू नये. लेखकांनी वाचकांना भरपूर आनंद देण्याचा प्रयत्न करावा. संवेदनशीलतेने भवताल टिपावा, वाचकांना अंतर्मुख करणाऱ्या विषयांना स्पर्श करावा, वाचकांची मानसिकता बदलावी, समाजप्रबोधन करावे, विषयांना वाचाही फोडावी, माणुसपणाच्या सीमा अधिक विस्ताराव्यात...
...कोणाकडून त्यावर दर्जाची "मोहोर' उमटविण्याच्या भाबड्या अपेक्षेत राहू नये.
(माझी प्रामाणिक भावना मी मांडली आहे, कुणालाही दुखावण्याचा हेतू येथे मुळीच नाही; पण तरीही एखाद्या शब्दांनी दुखावले असल्यास मनःपूर्वक क्षमस्व)

Sunday, March 7, 2010

"ती'


.........
.........
.........
पत्राच्या वरच्या मायन्यामध्ये सुरवातीला काही ओळी रिकाम्या सोडल्यात त्याला कारण तेथे काय लिहायचे हे सुचलेले नाही असं नाही तर तेथे किती आणि काय-काय लिहायचं यावरून माझ्या मनात प्रचंड गोंधळ माजलेला आहे. खरं तर खूप काही लिहावं, व्यक्त व्हावं, भावनांना वाट मोकळी करून द्यावी असं वाटूनही मी त्यांना बांध घालण्याचा प्रयत्न केलाय कारण तेथे वापरावयाचे शब्दच माझ्यावर रुसलेत ते मला फितूरच होत नाहीत. मग मी तो प्रयत्न सोडून दिलाय. आता तुम्ही म्हणाल असं काय बुवा तेथे लिहिणार होतास?
-------------
खरं तर मीही तोच विचार करतोय, आपण तेथे काय लिहिणार होतो? कारण मी जे लिहायचा विचार करतोय ते शब्दबद्ध करू शकेन हा विश्‍वासच माझ्या ठायी उरलेला नाही. तिच्याबद्दल मी विचार करू लागतो आणि "ती' मला असंख्य रुपात भेटू लागते आणि मग त्यातल्या कोणत्याच रुपाला मी न्याय देऊच शकत नाही याची जाणीव मला मागे खेचून घेते कारण....
-------------
"ती' अंबिका..."ती' दुर्गा..."ती' सरस्वती..."ती' रणचंडिका..."ती' सीता..."ती' मंदोदरी..."ती' अहल्या..."ती' द्रौपदी..."ती' जिजाऊ..."ती' सारा पुराण व्यापून राहिलेली त्यागाची मूर्ती..."ती' देशासाठी रक्त सांडलेली कणखर इंदिरा, "ती' डेअरर किरण बेदी..."ती' वात्सल्यमूर्ती मदर तेरेसा..."ती' अनेक श्‍वासांना थबकवणारी गानकोकिळा लता..."ती' आयर्न लेडी..."ती'....ही यादी खूप मोठी आहे...वाढतच राहणारी आहे...शब्दांत न मावणारी.
--------------------------
पण तरीही "ती'
माझी जन्मदात्री, वात्सल्यसिंधू, माझी दिशादर्शी, माझ्या पाऊलखुणा जपणारी, या जगाची ओळख करून देणारी, मुक्त विहरण्यासाठी माझ्या पंखांत बळ भरणारी, माझ्या यशासाठी कण कण झिजलेली आणि माझ्या इवल्याशा यशानेही यशाने आनंदून तृप्त होणारी आणि खूप्प काही... माझी आई.
---------------------------
"ती' माझ्यावर जीव ओवाळून टाकणारी, माझ्या कर्तृत्वावर विश्‍वास ठेऊन तिच्या आईला दुरावणारी, माझ्या यशावर जानसे फिदा होणारी, माझ्यातल्या मला सावरणारी, मी चूक असलो तरी बरोबर मानून सप्तपदीचा मान राखणारी पत्नी, प्रेयसी, माझी अर्धांगीनी आणि माझ्या पिलांची खास "आई' आणि अद्यापही मला पुरती न उमगलेली माझी सखी.
---------------------------
"ती' माझा अंश, माझी प्रतिमा, माझे प्रतिरूप, माझी स्वप्ने, छोट्याशा बाळमुठींतून माझ्या सुखांचे हळवे कोपरे समृद्ध करणारी, माझ्यावर बिनधास्त विश्‍वासून आयुष्याला बेधडक सामोरी जाणारी, सारं जग मुठीत घेऊन गगनाला गवसणी घालण्याची आकांक्षा बाळगणारी, येणाऱ्या प्रत्येक क्षणांना भिडण्याची पात्रता अंगी बाळगणारी माझी चिमुरडी.
---------------------
याशिवायही "ती' अनेक ज्ञात - अज्ञात रुपांतून अमीट, असामान्य कामगिरी करणारी, जेथे आम्ही श्‍वास घेतो ती "वसुंधरा'.
"ती'....बस्स! आता मात्र किती लिहू आणि काय लिहू असं झालंय म्हणून थांबतो.
----------------------
आता आलं लक्षात मी वरच्या मायन्यामध्ये काहीच का लिहू शकलो नाही. कारण माझ्यात "तिला' शब्दबद्ध करण्याचे बळच नाही. कारण "ती' अमर्याद, उत्तुंग, स्वच्छंद, गहिरी, अथांग, शब्दातीत आणि.... पाहिलंत असं होतं!
"तिला' लाख-लाख प्रणाम.

Saturday, February 13, 2010

तिचा "व्हॅलंटाईन'

गाडीचा हॉर्न वाजला आणि "ती' कानात वारं भरल्यासारखं पळत सुटली. माडीच्या पायऱ्या धाड-धाड उतरत अवघ्या काही सेकंदात ती रस्त्यावर पोहोचली.
"अगं पडशील जरा हळू!' हे अम्माचे शब्द तिच्यापर्यंत पोहोचलेही नाहीत.
खाली "तो' बाईकवर तिची वाट पाहत उभा होता. त्याने दिलेला गुलाबांचा गुच्छ हातात पकडत ती पटकन बाईकवर बसली. बाईकने वेग घेतला आणि त्या गल्लीतून बाहेर पडली. त्याच्या पाठीमागे बसून जाताना तिच्यासाठी स्वर्ग दोन बोटं उरला होता. गाडी हळू-हळू वळण घेत शहरातून बाहेर पडली आणि दोघांतील संवाद आकारू लागला.
तो ः कशी आहेस?
ती ः कशी दिसतेय? तिचा प्रतिप्रश्‍न.
तो ः थोडी खराब झाली आहेस? (तिनं नुसतं हूँ केलं)
ती ः तू कसा आहेस?
तो ः एकदम मस्त आणि आज तू भेटल्यामुळे तर एकदम मुडच मुड.
ती ः आजचं प्लॅनींग काय?
तो ः आज व्हॅलंटाईन डे ना! जाऊ नेहमीच्या ठिकाणी, मस्त गप्पा मारू, रात्री छानसं जेवण घेऊ.
ती ः मी याच दिवसाची तर वाट पाहते. नव्हे त्या साठीच जगते!
तो ः तर..तर कोणी ऐकेल तर काय म्हणेल...! बरं तू काही शॉपींग करणारेस?
ती ः नाही, मला आज फक्त तुझा सहवास हवा बाकी काहीही नको.
तो ः ओके डिअर....
....त्याने गाडीचा वेग वाढविला. तासाभरात दोघांचं फेवरीट ठिकाण आलं! सकाळचे दहा वाजत आलेले असूनही "त्या' टेकडीवरून खाली पाहिलं तरी दाट धुक्‍यामुळं फारसं काही दिसत नव्हतं. त्याने गाडी त्यांच्या ठरलेल्या झाडाखाली लावली. सॅकमधून चटई काढली, झाडाखाली अंथरली आणि तिच्या मांडीवर डोकं ठेऊन छानपैकी ताणून दिली. ती त्याच्या डोक्‍यावरून हात फिरवत राहिली आणि पुन्हा संवादांना जाग आली.
तो ः कशी आहेस?
ती ः आत्ता खरं तर खूप खूष आहे. तू सोबत आहेस ना ! 364 दिवस वाट पाहिल्यानंतर आजचा दिवस उगवतो आणि मग अक्षरशः पिसाटल्यासारखं होतं. काल रात्रीपासून आजच्या सकाळचे वेध लागले होते. मघाशी जेव्हा तुझ्या बाईकवर मागे बसले तेव्हा सारं जग मुठीत आल्यासारखं वाटलं! आपण एरव्ही का भेटत नाही?
तो ः झालं! दरवर्षीप्रमाणे पुन्हा तोच प्रश्‍न विचारलास? आणि तुला माझं उत्तर माहित आहेच. जाऊ दे अम्मा त्रास देते?
ती ः फारसां नाही. वर्षभर तिचं ऐकते; मग आज ती मला काहीही म्हणत नाही. बरं तुझी तब्येत कशी आहे?
तो ः "वेल अँड गुड' हल्ली काम जास्त झालं की थकवा जाणवतो.
ती ः औषधं घ्यावीत. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नये.
तो ः तू आणि तुझा सहवास हेच माझं टॉनिक.
ती ः चल काहीतरीच!
तो ः लाजलीस...हाय कलेजा खल्लास झाला!
----
संवादांचे मळे फुलत राहिले आणि दिवस यथावकाश मावळतीकडे झुकलां. बाईकने पुन्हा शहराच्या दिशेने धाव घेतली. छानशा रेस्टॉरंटमध्ये दोघांनी मस्तपैकी जेवण घेतलं. दिवसभराचा प्रत्येक क्षण एकमेकांच्या सहवासात दोघेही आसुसून जगले आणि निरोपाची वेळ आली.
----
बाईक माडीखाली येऊन उभी राहिली. ती उतरली. त्यानं तिचा हात हातात घेतला.
तो ः पुढच्या वर्षी भेट होईल असं वाटत नाही ! समजा काही घडलंच तर मित्र तुला फोन करेल. जमलंच तर येऊन जा!
ती ः म्हणजे?
तो ः डॉक्‍टरांचं म्हणणं शेवटची स्टेज सुरू आहे. बहुधा महिनाभरच हातात आहे. माझी इच्छा होती फक्त आजचा दिवस मिळावा आणि आज मी तुझ्या सहवासाचा आनंद आकंठ घेऊन जात आहे. जगलोच तर पुढच्या वर्षी भेटूच....नाहीतर फोन येईलच. बाय....
....एवढं म्हणून त्यानं एकदा दिला डोळे भरून पाहून घेतलं. ती काही म्हणण्यापूर्वी तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवून तो निघूनही गेला.
------
जाणाऱ्या बाईकडे पाहत ती मटकन खाली बसली...दिवसभरात एकाही शब्दानं बोलला नाही. कशी तरी बाजूला जाऊन ती माडीच्या पायरीवर बसली आणि भूतकाळ समोर उभा राहिला. पाच वर्षांपूर्वी एचआयव्ही तपासणी कॅंपमध्ये भेटला. किती भरभरून बोलत होता. त्याचं ते बोलणंच आपल्याला आवडलं. आपणहून त्याच्याकडे ओढली गेले. खोलीवर बोलावल्यावर आला. अगदी भरभरून बोलला. बोलताना त्याला चुकीचे रक्त मिळाल्याने एचआयव्ही झाल्याचं समजले; पण सारं विसरून तो जगण्याशी लढतोय आणि इतरांनाही बळ देतोय हे पाहून त्याचा कित्ती हेवा वाटलां. भेटीतून दोघांत प्रेम वाढलं; एकदा अचानक प्रकृती बिघडल्यावर मी अगदी धावत पळत त्याच्याकडे गेले. त्या वेळी त्याने विचित्र अट घातली. "माझ्यावर प्रेम करीत असशील तर वर्षात फक्त एकदाच भेटायचं ते ही "व्हॅलंटाईन डे' ला कारण आपली पहिली भेट त्याच दिवशी झाली होती. त्यानंतर वर्षाचे 364 दिवस वाट पहायचे आणि एक दिवस त्याच्या सोबतीनं जगायचं सुरू झालं...
---
तिनं डोळे पुसले...हळू-हळू माडीच्या पायऱ्या चढून खोलीपाशी आली. अम्मा होतीच.
"कसा गेला दिवस?'
"छान' एवढंच उत्तर दिलं आणि ती आतल्या खोलीत गेली. कपडे बदलताना त्याच्या सहवासाचं सोबत आलेलं अत्तर क्षीण होत गेलं; मात्र सगळा दिवस मनात खोलवर रूतून बसला.
अम्माचे शब्द कानावर पडले, "अगं उद्या रात्री तो शेठ भिकूमल येणार आहे' त्याला खूष कर! दहा हजार देणार आहे. मी ऍडव्हान्स घेऊन ठेवलाय.
-------
"हूँ' म्हणत तिनं लाईट घालविली. आजचा मयूरपंखी दिवस खऱ्या अर्थाने जगल्यानंतर आता ती 364 दिवस रोजच्या मरणाला सामोरे जाणार होती.

Friday, February 5, 2010

धुके दाटलेले


कधी नव्हे ते डोळ्यांना सकाळी लवकरच जाग आली. (तसे आम्ही सूर्यवंशी. साधारण साडे दहा-अकरा हीच उठण्यासाठी आदर्श वेळ अशी आमची ठाम धारणा) डोळे चोळत टेरेसवर आलो आणि सेकंदात झोप उडाली. टेरेसवरून पुढील चार फुटांवरील काहीही दिसत नव्हतं. रात्री झोपेपर्यंत तरी समोर इमारती होत्या हे आठवत होतं. आत्ता मात्र गायब... मग लगेचच लक्षात आलं, अरे हा समोरचा शुभ्रधवल पडदा आहे धुक्‍याचा. गेले काही दिवस धुकं पडत असल्याचं फक्त ऐकलं होतं, आज लवकर उठल्यामुळे ते पहायला मिळालं एवढंच.
धुकं पाहण्याचा कौटुंबिक सोहळा चहा घेत उरकला आणि गाडीवर मांड ठोकली. गच्च धुक्‍याने भवताल भरून गेलेला असल्यामुळे अगदी आस्ते-आस्ते आमची सवारी सुरू झाली. अगदी चार फुटांवरीलही दिसत नसल्याने गाडीच्या लाईट लागलेल्याच होत्या. समोरून येणारे बिचकत, अंदाज घेत मार्गक्रमण करीत होते. हळू-हळू आम्ही रंकाळा गाठला. रंकाळ्याच्या अगदी काठावर उभा राहिलो तरी रंकाळ्याचे अस्तित्वच जाणवत नव्हते. अवघ्या रंकाळ्याला धुक्‍यांनी कवेत घेतलं होतं. रंकाळ्याचे एरव्ही काठाशी सलगी साधणारे पाणीही आज स्तब्ध भासत होतं, बहुधा त्यालाही धुक्‍याने घट्ट मिठीमध्ये सामावून घेतलं असावं. एरव्ही काठाच्या एका बाजूवरून दिसणारा शालीनी पॅलेस धुक्‍यात विरघळून गेल्याचा भास होत होता. फिरायला आलेले नेहमीच्या रस्त्यावरूनही अंदाज घेत फिरत होते. धुक्‍याचे लोटच्या लोट येऊन वातावरण आणखी गहिरं करत होते. जणू ढगांचे पुंजके धरतीच्या भेटीला आलेत असंच वाटत होतं. अनेक उत्साही तरुणांचा या पुंजक्‍यांना पकडण्याचा अपेशी प्रयत्न चाललेला. काय धुकं पडलंय नाही आज! असं ओठांचा चंबू करत काही चर्चेत रंगलेले. छोट्या दोस्तांच्या डोळ्यांच्या बाहुल्या धुक्‍यांचे कण बालमुठींत साठवताना भिरभिरत होत्या. झाडेही आधाशासारखी दवबिंदू टिपून तजेलदार बनू पाहत होती. सारी सृष्टी धुक्‍यांत न्हाऊन निघालेली. हे मोहक रुपडं डोक्‍यांत घट्ट करीत घराचा रस्ता धरला. घरी पोहोचेपर्यंत बऱ्यापैकी धुकं कमी झालेलं.
...घरी आलो. पुन्हा टेरेसवर पोहोचलो. आता सारां परिसर स्वच्छ दिसत होता. सगळ्या इमारती जागच्या जागीच होत्या. (जरां बरं वाटलं) धुकं गायब झालं होतं; मात्र टेरेसवरील फुलझाडांवर ते दवबिंदूच्या रुपात अंग सावरून उरलं होतं.

Tuesday, February 2, 2010

पहिलं वहिलं


पहिल्यावहिल्या प्रत्येक गोष्टीचं अप्रुप सर्वांनाच असतं! पहिला पाऊस, पहिलं प्रेम, पहिली मैत्री (मैत्रीण), पहिलं ".....', पहिलं अपत्य, पहिलं आईपण, पहिलं बापपण इत्यादी इत्यादी. या साऱ्या पहिलेपणाच्या "कळा' (आनंद या अर्थाने) ज्यांनी अनुभवल्यात त्यांनाच त्याच्यातली मजा माहीत.
(वाचकांतील बहुतेकांनी या "कळा' नक्कीच अनुभवल्या आहेत, याबद्दल माझ्या मनात जरासुद्धा शंका नाही) तर असो...
नुकताच मी एक असाच "पहिलावहिला' अनुभव घेतला. नव्या घरात राहायला आल्यापासून खिशाचा सल्ला घेतच अनेक बाबी होत असल्याने अनेक बाबींवर मर्यादा आल्या. त्यातच माझ्यासारख्या उधळ्या माणसाला याची जरा जास्तच झळ बसली. (बहुतेक जण उधळेच असतात) आम्हीही आस्ते-आस्ते घराचा लूक सुंदर करण्यासाठी धडपडत होतो; पण काही मजा येत नव्हती आणि मार्गही सुचत नव्हता. याच दरम्यान आमच्या स्नेह्यांच्या घरी आमचं जाणं झालं. त्यांच्या गॅलरीत मस्त फुललेली फुलझाडे पाहिली आणि आम्हाला "आयडिया' मिळाली. दुसऱ्याच दिवशी तातडीने आमचा मोर्चा आम्ही कुंडीवाल्याकडे वळविला. मनासारख्या सात-आठ कुंड्या आणल्या.
आता चर्चेला मुद्दा घेतला रोपे कोणती आणायची. झालं, त्यावर चहा रिचवत जोरदार चर्चा झडली. अखेर नर्सरीत जाऊन तेथे पाहून रोपे घेण्यावर एकमत झाले; मग आमचा कुटुंबकबिला एका नर्सरीत पोहोचला. अनेक रोपांची निगराणी केल्यानंतर "होम मिनिस्टर'नी काही रोपांबद्दल होकाराची मोहर उमटवली. रोपे घरी आली.
आता आमच्या गाडीने नदीकाठ गाठला. तेथून खास नदीकाठची माती घरी आली. (झाडे कशी लावायची या पुस्तकात "नदीकाठची माती आणा', असेच लिहिले होते. आम्ही ती सूचना तंतोतंत पाळली. माती आणावयास गेल्याचा त्रास आम्हाला झाला; मात्र पुरेपूर आनंद बच्चेकंपनीने मनसोक्त मातीत खेळून लुटला)
दोन दिवसांत शेणखत, गांडूळखत, नारळाच्या शेंड्या असा जामानिमा झाल्यानंतर आणलेल्या रोपांचे शास्त्रोक्त पद्धतीने विधिवत कुंड्यांत रोपण झाले आणि टेरेसवर हिरवाईचे पहिले पाऊल पडले. मग रोज रोपांना पाणी घालणं, ठराविक दिवसांनंतर त्यांच्या मुळातील माती ढिली करणं! खतांचा डोस देणं आणि रोज होणाऱ्या बदलांना अनुभवणं असा दिनक्रम आकार घेऊ लागलां. आस्ते-आस्ते रोपांची मुळे रुजली आणि आणलेल्या रोपांवरील पानांची हिरवाई आणि आमची मैत्री गडद होऊ लागली. शेवंती, जास्वंदीने आम्हाला पहिल्या पंधरा दिवसांतच फुलांचे समाधान दिले. (अर्थात जेव्हा रोपे आणली तेव्हाच त्यांच्यासोबत कळ्याही होत्या) आमचे लक्ष मात्र गुलाबाच्या रोपांकडेच लागलेले. त्याला केव्हा एकदा फूल लागते असेच आम्हाला झालेले. त्यामुळे रोज निरीक्षण सुरूच.
...पंधरा दिवसांपूर्वी एका गुलाबाच्या फांदीवर पानांच्या बेचक्‍यांत फुगीर भाग दिसला आणि गुलाबाला पहिली कळी आल्याची वार्ता आम्हाला मिळाली. मग काय! आम्ही आणखीनच ममत्वाने त्या रोपांकडे पाहू लागलो. आस्ते-आस्ते कळी बेचक्‍यातून बाहेर पडली, वाढू लागली. दोन दिवसांपूर्वी एकमेकांना कळीच्या घट्ट बिलगलेल्या गुलाबी पाकळ्या पाहिल्या आणि आम्ही तो आनंद तिच्याभोवतीच कॉफी पिऊन साजरा केला.
--------------
आज सकाळी-सकाळी आमच्या "होम मिनिस्टर'नी झोपेतून जागं केले आणि खिडकीतून बाहेर बोट दाखविलं. वाऱ्याच्या झुळकीवर तो "गुलाब' मस्त डोलत होता. त्याच्या पाकळ्यांवर अंग चोरून बसलेले तुषार चमचमत होते. व्वा काय सकाळ आहे! पहिला-वहिला गुलाब आमच्या अंगणात फुलला, त्याचं तातडीने फोटोसेशनही केलं आणि हा लाखमोलाचा आनंद दिवसभर आम्ही मिरविला.

Thursday, January 21, 2010

बी ब्रेव्ह...


गेल्या काही दिवसांमध्ये भोवताली घडणाऱ्या घटनांमुळे समाजमनाने अंतर्मुख होण्याची वेळ आली आहे. विशेषतः ज्यांची मुले 16 ते 20 वयोगटांमधील आहेत त्यांच्या पालकांसाठी तरी ही निश्‍चितच धोक्‍याची घंटा आहे. गेल्या पंधरा दिवसांत राज्यात 35 पेक्षा अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आत्महत्या करून आपल्या सुंदर आयुष्याचा शेवट करून घेतला. या घटनांमुळे सारा समाज ढवळून निघाला आहे.
हे असं का घडतंय? याच्या विश्‍लेषणास सुरवात झाली आहे. रकानेच्या रकाने वृत्तपत्रांतून प्रसद्ध होत आहेत. प्रत्येक जण आपापल्या परीने त्याची कारणं शोधण्याचा प्रयत्न करीत आहे. एकीकडे हे प्रयत्न सुरू असताना आपल्या आणखी काही मित्र-मैत्रिणींनी मृत्यूला कवटाळल्यामुळे स्थिती गंभीर बनत आहे.
दोस्तहो, कशासाठी आपण हा जीवघेणा मार्ग पत्करत आहोत? का आपण आपले सुंदर आयुष्य संपवत आहोत? आयुष्याचा डाव छानपैकी रंगवायचा सोडून अर्ध्यावरच का मोडत आहोत? कारणं निश्‍चितच आहेत; पण त्यावर मार्ग काढता नाही का येणार? छोट्या-छोट्या अपयशाने खचून जाऊन आपण लगेचच आपले आयुष्य संपविणे कितपत योग्य आहे? सारं आयुष्य खर्ची घालून आपले आई-बाबा आपल्याला लहानाचे मोठे करतात आणि मग त्यांच्या नशिबी जर हेच पाहणं येत असेल तर?
सध्या जगाच्या बाजारपेठेत तुमची मार्कांची गोणी काठोकाठ भरलेली असेल तरच तुमचा निभाव लागू शकतो असे एक (भयावह) चित्र तयार झाले आहे. या चित्राला आपण सारेच भूलून गेलो आहे. कमी गुणांची शिदोरी आपल्याला कशी उपयोगी पडणार या विचारानेच इथं प्रत्येक जण पोखरलेला आहे. आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये "माणूस' घडण्याची प्रक्रियाच होत नाहीये. यशाच्या साऱ्या फुटपट्ट्याच बदललेल्या आहेत. एवढी विविध क्षेत्रे हात पसरून तुमचे स्वागत करण्यासाठी बाहेर उभी असताना ठराविक क्षेत्राकडेच जाण्याचा ओढा आपल्याला अपयशाच्या गर्तेकडे ओढून नेत आहे हे कळून ही वळत नाही याचंच मोठं आश्‍चर्य आहे.
या समजांना, या गृहितकांना आता धक्का देण्याची वेळ आली आहे. तुम्ही-आम्ही-सगळ्या तरुणाईने बंड करून उठण्याची वेळ आली आहे. गुणांच्या फुटपट्ट्या मोडून फेकून दिल्या पाहिजेत. कमी गुणांच्या भांडवलावर उत्तम, वेगवेगळ्या पद्धतीने आयुष्य जगता येते, यशाचा मार्ग रेखाटता येतो हे दाखवून देण्याची गरज आहे. निव्वळ पैसा आणि यश हेच सर्वस्व न मानता आयुष्य वेगळ्या पद्धतीने कसे फुलविता येईल याचा विचार करण्याची गरज आहे. अपयशाचे फटके बसणार; पण त्यामुळे खचून न जाता, मोडून न पडता "मी उठून लढणार' ही वृत्ती अंगी बाणविण्याची गरज आहे. एकाच एका क्षेत्राकडे न जाता वेगळ्या वाटेने जाण्याचा प्रयत्न करणे आवश्‍यक आहे आणि त्यासाठी प्रचंड मेहनत घ्यायची तयारीही ठेवण्याची गरज आहे. म्हणून म्हणतो दोस्तहो...थोडा विचार करा... निराशा झटकून टाका...आयुष्य सुंदर आहे...ते जगताना संकटांशी दोन हात करा.
निडर बना...बी ब्रेव्ह!