Friday, August 16, 2013

अवघा रंग...!

स्वातंत्र्य या शब्दाचा नेमका अर्थ काय? 
स्वतंत्र होणं...एखाद्याच्या गुलामगिरीतून मुक्त होणं, स्वतःच्या मनासारखं जगणं, हवं तसं वागणं, आई-वडिलांच्या छत्रछायेखालून बाहेर येऊन स्वतःचं आभाळ निर्माण करणं, नव्या अवकाशात भरारी घेणं... 
...काय, नेमका अर्थ काय लावायचा? 
काय सालं... 
स्वातंत्र्य या एका शब्दानं पार डोक्‍याचा भुगा करून सोडला. का, तर म्हणे तिला माझ्यापासून स्वतंत्र व्हायचं आहे म्हणून... 

आई-बाबांचं घर सोडलं आणि मी स्वतःच्या पायांवर उभा राहिलो. माझं वेगळं घरटं पाहून आई-बाबांना झालेला आनंद म्हणजे माझ्या यशाची पोचपावती... 
कधीतरी एकदा ती भेटली आणि या हृदयीचं त्या हृदयी गुज सांगितलं गेलं. त्याला विश्‍वासाचं कोंदण जडलं...गाठ बांधली गेली...एक नवं स्वतंत्र नातं जन्माला आलं...अगदी आनंदाचे डोही आनंद तरंग असं... थोडं वळून पाहिलं... आशीर्वादासाठी उंचावलेल्या आई-बाबांच्या हातामागील चेहऱ्यांवर अपार समाधान दिसलं...डोळ्यांत आनंद काठोकाठ भरलेला...पोरगं स्वतंत्र उभं राहिलं हे दर्शविणारे भाव... मनाला सुखावून गेले... 

नवलाई संपून संसार सुरू झाला... फुलपंखी हिंदोळ्यांवरील झुले बाजूला टांगले गेले...संसार नावाचा यज्ञ सुरू झाला...मग जरासे चटकेही जाणवू लागले... 
पण...समजुतीनं...जाणिवेनं...सांभाळून घेत...कमीत कमी झळ लागेल याची काळजी घेत पावले पुढे पडत राहिली...थोडी फार ज्वाळा भडके; पण अगदी किरकोळ... 
पण परवा जरा भडका जास्तच उडाला...ऑफिसातून यायला वेळ काय लागला...तिला दिलेला शब्द मोडला गेला... आणि मग भांड्याला भांडं लागलंच...ताव ताव तावलो...एकमेकांची उणीदुणी निघाली...अबोला धरला...अढीची पहिली गाठ बसली... दोघेही ठाम, त्यामुळे ती सुटण्याचं काही चिन्ह दिसेना...अचानक एकमेकांच्या स्वातंत्र्यावर घाला वगैरे घातल्यासारखं वाटू लागलं... 

....ही माझ्या आयुष्यात आली आणि माझं स्वातंत्र्य हिरावलं...आयुष्य तिच्या दावणीला बांधलं गेलं...माझं काही मतच शिल्लक राहिलं नाही...इत्यादी इत्यादी.... हे मनात म्हणत राहिलो... 

ती थेटपणे म्हणाली....""तू नव्हतास तोपर्यंत मी माझी होते....तू आलास आणि मी माझी राहिलेच नाही...तुझ्या अंमलाखाली माझं स्वतंत्र अस्तित्वच संपलं... मला या परजीवी जगण्याचा कंटाळा आलाय... मला तुझ्यापासून मोकळा श्‍वास हवाय... माझा जीव गुदमरतोय तुझ्या सहवासात... हे घर म्हणजे तुरुंग भासतोय... प्रत्येक ठिकाणी तूच का? मी का नाही... मी कोठे आहे?... मला मी हवी आहे... बास... आता मी कदापि सहन करणार नाही... माझंही काही मत असू शकतं.. माझंही व्यक्तिमत्त्व आहे...मी तुझ्यापासून वेगळं होणार... उद्याच्या उद्या तुला वकिलाकडून नोटीस येईल... मग दे त्याला काय द्यायचं ते उत्तर... सही कर आणि मला मोकळं कर...'' 

""जा, गेलीस उडत...तुझ्यासारख्या छप्पन्न.....'' तिच्या भरलेल्या डोळ्यांकडे लक्ष गेले आणि पुढील शब्द घशातच अडकले... बॅग भरून ती गेली तरातरा निघून आणि तो अडकला "तुझ्यासारख्या 56....' वर 

तिच्या शेवटच्या करवादलेल्या वाक्‍याने तो मुळापासून हलला... बाहेर पडणाऱ्या पावसाचा आवाज आता त्याला सतावू लागला... पडणाऱ्या प्रत्येक थेंबागणिक विचारांचा ढोल त्याच्या मेंदूवर वाजू लागला... 
ती आपल्यापासून दूर निघाली आणि आपण काय बोललो हे... असं असतं का? आपण इतके कसे घसरलो...एवढ्याचसाठी सगळा अट्टहास केला होता का? ती मिळावी म्हणून काय नाही केलं आपण? तिच्या आयुष्यात येण्यानं आयुष्याचा सगळा अर्थच बदलला आपल्या. बेताची नोकरी असतानाही तिनं आपल्यावर प्रेम केलं... सुरवातीचे काही महिने फक्त मी नोकरीत कसा स्ट्रॉंग होईन यासाठी तिनं मेहनत घेतली...स्वतःचं करिअर तिनं बाजूला ठेवलं...माझ्या रंगात रंगून गेली...कधीही ती दिसली नाही... तिच्यातही मला मीच दिसत राहिलो... आपली चूक झाल्यानंतर तिनं ती आपल्याला दाखविली तर आपल्याला एवढा का राग आला... आपला इगो एवढा का मोठा झाला, की आपण आपल्याच प्रतिमेसोबत भांडलो... आपल्या आयुष्यात येताच तिनं तिच्या स्वतंत्र अस्तित्वाला जणू तिलांजलीच दिली...तिचा प्रत्येक श्‍वास आपल्या श्‍वासाचा एक भाग बनला आणि आज आपल्या श्‍वासाची माळ तुटू लागलीय आणि आपण "तुझ्यासारख्या 56...' म्हणू कसे शकतो? 
....का वाटलं तिला आपल्यापासून वेगळं व्हावं असं... याचा का नाही मी विचार केला... माझी चूक माझ्या लक्षात कशी नाही आली... अरे बापरे, हे काय करून बसलो...माझी चूक झाली...माझी चूक झाली...मला ती सुधारलीच पाहिजे.... 

तो अंगावरील कपड्यानिशी पळत सुटला...स्टेशन गाठलं...शोध शोध शोधलं...तिच्या गावची शेवटची गाडी गेल्याचं समजलं आणि...स्वतःवर चरफडला...काय केलं आपण...आपल्या सावलीवर कोण चिडतं का? सकाळी पहिल्या गाडीनं गाव गाठायचं. तिची माफी मागायची... नाक घासायचं पण तिला घेऊन यायचं... पुन्हा असं कधी कधी नाही करायचं... 

घरी आला...कोचावर बसला विषण्ण मनाने... छातीत कढ दाटला... डोळ्यांतून पाणी वाहू लागलं... 
""कॉफी लगेच घेणार आहेस की...?'' 

सर्रकन काटा आला अंगावर.... 
नजर वर गेली...समोर ती उभी...तेवढीच शांत...मोठं वादळ पचवून उभी! 

""...तू गेली नाहीस...? कोठे होतीस...? 
""कोठे जाणार तुला सोडून... तू आणि मी, आपण वेगळे कोठे आहोत? माझं अस्तित्वच तुला जोडलं गेलं आहे... माझा रंग तुझा झाला असताना तो कसा वेगळा होईल...आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे...आपल्या दोघांचं एक वेगळं स्वतंत्र जग आहेच की...ते सोडून कोठे जाणार? कशी जगणार...तुझ्याशिवाय मी, हा विचार नाही करता येत मला...तू ओरडलास...भांडलास...त्याचं नाही वाईट वाटलं फारसं...पण तू म्हणालास ना...की "तुझ्यासारख्या 56...' त्यानं मी दुखावले... माझ्यासाठी ऑलमोस्ट तू एकटाच आहेस...तुझ्याशिवाय मला मिळालेलं स्वातंत्र्य.. मला नाही वाटत मी त्यात मोकळा श्‍वास घेऊ शकले असते...'' 
""असं नको बोलूस...जर दोघांचा रंग एक असेल तर तो वेगळा कसा होईल... मी बोलताना चुकलोच... मला समजलंय...माझा इगो मोठा झाला आणि स्वतंत्रपणाचा फुगा फुगला...पण तो आता फुटलाय...आता पुन्हा कधीही फुगणार नाही...इट्‌स प्रॉमिस...''

3 comments:

भानस said...

घरोघरी हे असे मनरुपी खांब घट्ट पाय रोवून उभे आहेत. :)

आवडली रे!

prajkta said...

kothe patta aahe....aajch tumchi aathwan aaliiiiii

Unknown said...

msta lihilay !! Keep it up..