Wednesday, March 31, 2010

थोडी चंमत ग!

1)मुंबईमधील एका कार्यक्रमात स्टेजवर एका बाजूने अभिनेते अमिताभ बच्चन आणि दुसऱ्या बाजूने मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अचानक एंट्री केली आणि संयोजकांचे धाबे दणाणले. त्यांच्या चेहऱ्यावर "अगा मी ब्रह्म पाहिले' असे भाव पाहून मुख्यमंत्र्यांनी खुलासा केला, ""हायकमांड'च्या आदेशानेच अमिताभ बच्चन यांच्यासोबत आमचा "मिले सूर मेरा तुम्हारा'. घाबरू नका!'' त्यांचे स्पष्टीकरण ऐकताच संयोजकांपैकी एकाने तातडीने दोघांना एकच हार घालून त्यांचे स्वागत केले. दोघांनीही छायाचित्रकारांना छानशी पोझ दिली आणि तीच वर्तमानपत्रात पहिल्या पानावर झळकली.

2)एकदिवसीय सामन्यात नुकतेच द्विशतक झळकविलेल्या आणि सध्या आयपीएलमध्ये सुसाट सुटलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तातडीने निवृत्ती पत्करत असल्याची घोषणा केली. नव्या रक्ताला वाव देण्यासाठी मी हा निर्णय अत्यंत आनंदाने घेत असल्याचे सांगितले. त्याच्या फ्यूचर प्लॅनविषयी विचारले असता, सचिन नेहमीप्रमाणे काहीसा लाजला. म्हणाला, ""मी हिंदी चित्रपट साईन केलेला आहे व लवकरच त्याचे शूटिंग सुरू होत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन आमीर खान करणार असून माझ्या उंचीला सूट होणाऱ्या आणि अभिनय येणाऱ्या नायिकेचा शोध सुरू आहे. निर्मिती अर्थातच "अंबानी ग्रुप' करणार आहे. मी या नव्या इनिंगसाठी एक्‍साईट आहे.''

3)मुंबईच्या कुठल्याशा पंचतारांकित हॉटेलात पत्रकार परिषदेत अभिनेता आमीर खान भुताच्या वेशात प्रगटला आणि विचित्र आवाजात किंचाळल्याने काही महिला पत्रकार बेशुद्ध पडल्या. आमीर सावरायला गेला, तर काही अर्धवट शुद्धीत येऊन पुन्हा बेशुद्ध पडल्या (त्यांना मग बाहेरच नेण्यात आले). येऊ घातलेल्या नव्या चित्रपटात आमीर एका भुताची भूमिका करणार असून ती भूमिका वास्तववादी व्हावी यासाठी त्याने केस, भुवया, मिशा, हाता-पायांची नखे वाढविली आहेत. त्यामुळे चॉकलेट हिरो आमीर अगदीच भेसूर दिसू लागला आहे. हा गेटअप केल्यापासून तो आपल्या पत्नीला भेटलेला नाही. कारण पहिल्यांदा असे पाहिल्यावर तिला सडकून ताप भरला होता म्हणे.

4)राज्यातील बहुतेक सर्व शहरांत काल रात्री जे पाणी सुरू झाले ते अद्याप थांबण्याचे नावच घेत नाही. बाया-बापड्यांनी घरामधील ज्या-ज्या म्हणून भांड्यांत पाणी साठविणे शक्‍य आहे त्यामध्ये केवळ पाणीच भरून ठेवले. काहींनी घरातील वाट्या, फुलपात्रे, छोटी गाडगी, माळ्यावर ठेवलेले डबे, झाडांच्या मोकळ्या कुंड्या, दिसेल त्या खोलगट भागात पाणी साठवून ठेवले. ज्याअर्थी आज दिवसभर नळाला पाणी राहिले याचा अर्थ पुढचा आठवडाभर तरी पाणी येणार नसल्याचा त्यांचा संशय बळावला. काय करणार, नेहमीचा अनुभव. हा प्रकार बहूतेक शहरांतील पालिका-महापालिका प्रशासनाला समजल्यानंतर त्यांनी गाड्या फिरवून शहराला येथून पुढे कायमच 24 तास अखंड पाणी सुरू राहणार असल्याचे सांगितले तेव्हा नागरिक फक्त पडायचे बाकी राहिले.

5)काय, वरील सर्व घटनांबाबत वाचून धक्का बसला ना? कांदा, फाटकी चप्पल, लिंबू आणि वारे घेण्यासाठी पेपरही घेऊन ठेवलाय जवळ तुम्ही! छे, सगळं आधी बाजूला ठेवा आणि पहिला एअर कूलर, एअर कंडिशनर, पंखा तातडीने सुरू करा आणि जरा थंड व्हा! अहो, आता अखंड वीज तुमच्या घरातच राहणार आहे. आपल्या ऊर्जामंत्र्यांनी काल रात्रीच तसा आदेश दिलाय, "राज्यात अखंड वीजपुरवठ्याचा.' अरे, हे काय, तुम्ही चक्क नाचायला लागला....
.....हो..हो, जरा थांबा. जरा कॅलेंडर पाहा ! थोडी चंमत गं! रागावू नका बरं! एप्रिल फूल केलं बुवा जरा!

6 comments:

आनंद पत्रे said...

haa...haa...
Happy fools day...u will get lot of them around u

Yogesh said...

प्रा....सही लिहल आहेस!!! मस्त आहे चंमत गparim

prajkta said...

आनंद आणि मनमौजी खूप-खूप धन्यवाद...थोडीशी मजा हवीच की! ती तुमच्यासोबत एन्जॉय केली.

रविंद्र "रवी" said...

पुंडलिक वरदा हरी विठठ्ल! छान लिहिले आहे बर कां!!!

prajkta said...

ravindra raviji thank u so much

Anonymous said...

te batmi tevhada awadla barka! - a. bapu