Thursday, June 23, 2011

'बाप' माणूस...

त्यांनी टोपी काढली, घाम पुसला. पायऱ्या चढून आल्यामुळे लागलेली धाप कमी होण्याची वाट पहात शांतपणे खुर्चीत बसून राहिले. वयाने बहुधा पासष्टी ओलांडली असावी; पण अगदी अपटुडेट होते.
"वयाच्या मानाने झेपत नाही. पायऱ्या चढल्या की धाप लागते'' स्वगत बोलावे तसे ते टेलीफोन ऑपेरटरशी बोलले. मग शांतपणे उठले. हळूहळू जाहिरात विभागात गेले.
जाहिरात घेणाऱ्याकडे पाहून ओळखीचं हसले. त्यानेही फोनवर बोलतच हसून दाद दिल्याने त्यांना जरा बरं वाटलं. त्याने आजोबांना खुर्चीकडे हात करून बसण्याची खूण केली. आजोबांनी खुर्चीवर बसून शरीर काहीसं सैलावलं आणि त्याच्या फोन संपण्याची वाट पाहू लागले.
फोन संपवून तो म्हणाला, ""बोला आजोबा. किती उन्हात आलात? काल रात्रीच नाही का यायचं? ऊन तरी लागलं नसतं''
"ठरवलं होतं यायचं, पण जमलंच नाही. आज येण्याशिवाय पर्याय नव्हता.''
मला त्यांचा संवाद ऐकू आला आणि माझं त्यांच्याकडे लक्ष गेलं. मी पाहतोय हे पाहिल्यावर ते माझ्याकडे पाहून ओळखीचं हसले. त्यांच्या नजरेत मला हरवलेपण जाणवलं. माझ्या चेहऱ्यावरील स्मित पाहून बहुधा त्यांनाही बरं वाटलं.
दोघांत काहीतरी बोलणं झालं. त्यांनी खिशातून कसलासा लिहिलेला कागद काढून त्याच्याकडे दिला. त्यानं खात्री केली आणि पैसै घेतले.
"बराय निघतो मी, पुढील आठवड्यात येणार आहेच''
"ओके, आजोबा ! बाकी कसं काय चाललंय?''
"खरं सांगू मरण येत नाही म्हणून म्हातारपणाचं ओझं जेवढे दिवस वागवता येईल तेवढे वागवतो आहे; मग जगतोच आहे, तर जास्तीत जास्त समाधानाने कसं जगता येईल ते पाहतो. रोज फिरायला जाऊन प्रकृती उत्तम राखण्यासाठी प्रयत्न करतो. दिवसभरात सोसायटीमधील लोकांची जमतील तेवढी कामं करतो. सायंकाळी लहान मुलांना घेऊन गोष्टी सांगत बालपण शोधतो. रात्री मंदिरात भजन-कीर्तनाला जातो. जेवढं म्हणून आनंदी राहता येईल तेवढा आनंदी राहतो. जगण्याची शिक्षा मिळालीच आहे तर ती आनंदानं कशी भोगता येईल हे पाहतो. बराय चलतो. फार वेळ घेतला तुमचा, येतो.'' असं म्हणून पिशवी सावरत ते दरवाजाबाहेर पडले.
त्यांचं बोलणं ऐकून मी त्याला विचारलंच कोण होते हे आजोबा आणि कशासाठी आले होते?
त्यानं जे सांगितलं ते ऐकून मी सुन्न झालो....
माझ्यासमोर आजोबांनी दिलेला फोटो धरत तो म्हणाला, "" हा फोटो पाहिलांत, हा त्यांच्या 20 वर्षांच्या मुलाचा आहे. त्याच्या श्रद्धांजलीची जाहिरात द्यायला आले होते ते. दरवर्षी येतात न चुकता''
"कशानं गेला तो?''
"इंजिनिअरींगच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. कॉलेजमध्ये गॅदरींग होतं. मित्रांसोबत राबून त्यानं त्याची तयारी केली. गॅदरींगच्या आदल्या दिवशी डिसेंट्री लागल्याचं निमित्त झालं आणि त्यातून तो उठलाच नाही. हाता-तोंडाशी आलेल्या लेकाचं निष्प्राण कलेवर थकलेल्या खांद्यावरून आजोबांना वहावं लागलं.''
"बाप रे, केवढा मोठा आघात!'' माझा स्वर जड झाला.
"सर ते मघाशी म्हणाले नं पुढील आठवड्यात येणार आहे, का माहित आहे?''
"का?''
"बायकोला आदरांजली वाहण्याची जाहिरात द्यायला''
"काय...?''
"हाता-तोंडाशी आलेला मुलगा गेल्याचा धक्का ती माऊली सहन नाही करू शकली. तिने अंथरूण धरलं आणि त्यातून ती उठलीच नाही. त्या दिवसापासून गेली काही वर्षे आजोबा आपल्या एका मुलीसह राहत आहेत. इतर दोन मुलींची चांगल्या घरात लग्ने झाली आहेत. घरी आहे त्या मुलीला फिट्‌सचा विकार आहे, त्यामुळे ती त्यांच्याबरोबरच राहते. दोघंच एकमेकांचे आधार.''
"काय सालं नशीब!' केवढे हे आघात आणि ते सर्व सहन करणारा पहाडासारखा बाप माणूस. अडचणींचे एवढे अडथळे येऊनही मोडून न पडता जगण्याशी दोन हात करून जगण्यावर विजय मिळविण्याचा प्रयत्न करणारा बाप माणूस... त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करताना माझ्या डबडबलेल्या डोळ्यांतून दोन थेंब ओघळलेच.

7 comments:

भानस said...

त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करताना माझ्या डबडबलेल्या डोळ्यांतून दोन थेंब ओघळलेच. +1

कुढत, रडत जगण्यापेक्षा आनंद देण्याचा प्रयत्न करुन आनंद घेण्याची वृत्ती बाणवणं आणि त्यानुसार वागणं... मानले आजोबांना.

prajkta said...

thank u भानस. bhetlo tyadiwshi me sunn zalo hoto....

videsh said...

baap re! kaay baap manoos ahe bhannaat!

prajkta said...

thank u videsh

आनंद पत्रे said...

मानलं.. इतकी हिंम्मत अशक्य!!

prajkta said...

thank u anand

saumiti said...

प्राक्तन म्हणतात ते हेच बहुतेक... ना?