Wednesday, September 7, 2011

पुढच्या वर्षी लवकर या!


बहुतेक घरगुती गणपतींचे मंगळवारी गौरीसोबतच विसर्जन सुरू झालं आणि घरामध्ये जेथे गजाननाची प्रतिष्ठापना केलेली होती तो कोनाडा, कोपरा, ती आरास रिकामी रिकामी झाली. गेले सहा दिवस पूजा, मंत्रोच्चार, आरती यांनी भारून गेलेलं घर सायंकाळनंतर उदास उदास झालं. विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमनाने आठवडाभर साऱ्या घरात चैतन्य भरून राहिलं. गणरायाच्या स्वागताची उडालेली धांदल, आरास मांडताना त्यात हरवून जाणं, आठवडाभर त्याच्या सेवेत कोणतीही कसूर होऊ नये यासाठीची धडपड. बालगोपालांसाठी तर गणपती घरी येणं आनंदोत्सवाची पर्वणीच. उंबरठा ओलांडून गणराया घरात आले आणि मनं आनंदाने अगदी काठोकाठ भरून वाहिली. आनंदसोहळा रंगला पुढील सहा दिवस. आरतींचे मंगलमयी सूर घराघरांतून उमटत राहिले. धुपाचा गंध दरवळत तर भक्ती, श्रद्धेचा संगम खळाळत राहिला...
पण आता मात्र काहीसं रितं रितं वाटतंय. हातातून निसटल्यासारखं, कदाचित पुन्हा गवसण्यासाठी. आता काय पुढील पाच दिवस सार्वजनिक गणेशोत्सवाची धूम अनुभवायची आणि या रितेपणावर फुंकर घालायची.

No comments: