Saturday, February 18, 2012

"राजसाहेब' बाळाच्या पायात "बळ' भरलं

                                             
                                               छायाचित्र संकेस्थळावरून साभार 

"अवघ्या सहा वर्षांपूर्वी माझ्या पक्षाचा जन्म झाला आहे. लगेच त्याच्याकडून कोणत्याही चमत्काराची अपेक्षा करू नका; देणार असाल तर एकहाती सत्ता द्या, माझ्यात नवनिर्माणाची धमक आहे. संधी द्या सोनं कसं करतात ते मी दाखवून देईन'

हे आत्मविश्‍वास भरले आवाहन गेल्या काही दिवसांत "मनसे' करणारे राज ठाकरे यांचा आत्मविश्‍वास शुक्रवारी जेव्हा महापालिकांचा निकाल लागला तेव्हा नक्कीच दुणावला असेल. मुंबईवर जरी महायुतीचा भगवा फडकला असला तरी त्याचवेळी मनसेच्या पदरातही मतदारांनी झुकते माप टाकलेच याकडे दुर्लक्ष करताच येणार नाही. विशेषतः दादर-गिरगावच्या पट्ट्यामध्ये मनसेने धडक मारताना शिवसेनेचा बालेकिल्ला उध्वस्त करून "मराठी टक्का' आपल्याकडे वळविण्यात मिळविलेले यश शिवसेना नेतृत्वाला विचार करावयास लावणारे आहे.
प्रभावी वक्तृत्व, महाराष्ट्राच्या नवनिर्माणासाठी महाराष्ट्राला घातलेल्या सादेला जनतेने सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे हे मनसेला मुंबई, नाशिक, पुणे या महानगरांत मिळालेल्या जागांवरून स्पष्ट होत आहे. नाशकात हा पक्ष पहिल्या क्रमांकावर आहे. पुण्यात राष्ट्रवादीपाठोपाठ तो दुसऱ्या क्रमांकावर आहे; तर ज्या मुंबईमध्ये त्यांना किंगमेकर होण्याची मनिषा होती तेथेही त्यांनी आपली ताकद चौपट वाढविण्यात यश मिळविलेले आहे. हे नक्कीच पक्ष विस्तारत आहे, बळ भरत आहे हे दर्शविणारे आहे.
नाशकात तर हा पक्ष निर्विवादपणे किंगमेकर ठरू शकतो. आकडेवारीचा हिशोब केला तर आघाडी किंवा युती स्वबळावर सत्तेवर येऊच शकत नाही. एकतर दोघांना हातात घालावा लागेल किंवा मनसेच्या इंजिनाला जोडून घेऊन सत्तेचा प्रवास करावा लागेल हे स्पष्ट आहे. पुण्यात आघाडीची सत्ता येणार असली तरी प्रबळ विरोधी पक्ष म्हणून दोन्ही कॉंग्रेसला हा पक्ष जेरीस आणू शकतो.
राज्यातील या प्रमुख तीन महानगरांत उत्तम कामगिरी करणारा हा पक्ष रांगत आहे असे सांगणाऱ्यांना हे बाळ आता खऱ्या अर्थाने दमदार पावले टाकू लागले आहे हे समजून चुकले असेल.
ज्याप्रमाणे शिवसेनेमध्ये बाळासाहेबांचाच काही वर्षांपूर्वीपर्यंत एकहाती करिष्मा होता.( गेल्या काही वर्षांपासून उद्धव ठाकरे पक्षासाठी वर्षांत जीवतोड मेहनत घेत आहेत हे मुळीच नाकारता येत नाही, सर्व विरोधात असूनही त्यांनी मुंबईत सत्ता राखण्यात मिळविलेले यश त्यांची मुत्सद्देगिरी दाखवून देतेच.) त्याप्रमाणेच सध्या राज यानी मनसेसाठी एकहाती यश मिळवून दिले आहे. यामध्ये ज्याप्रमाणे त्यांचे कौतुक आहे, त्याचप्रमाणे त्यांच्यावर विश्‍वास ठेऊन त्यांच्यासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचेही आहे. राज यांच्यावरही जीव ओवाळून टाकणारी एक पिढी निर्माण होऊ लागली आहे, हेही या निकालाने स्पष्ट झाले. संपूर्ण महाराष्ट्रात पोचण्यासाठी राज यांना आणखी कष्ट घ्यावे लागणार आहेत हे नक्की. सध्या त्यांच्या पक्षाचा पाया महानगरांत विस्तारतो आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचे स्वप्न पाहताना महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात पक्ष पोचणे हेही अत्यंत आवश्‍यक आहे. (जिल्हा परिषदांचे निकाल पक्षासाठी अंतर्मुख करणारे आहेत, अर्थात तेथे राज यांनी ताकद लावलेली नाहीच हेही तेवढेच खरे, ज्या काही जागा निवडून आल्यात त्या राज यांचे नेतृत्व स्वीकारलेल्या शिलेदारांच्या कष्टाचा आरसा आहे. हेच शिलेदार भविष्यात मनसेचे भक्कम आधारस्तंभही होऊ शकणार आहेत. याकडे राज यांनी जाणीवपूर्वक लक्ष देणे आवश्‍यक आहे) अर्थात या सर्वांची जाणीव राज यांना नक्कीच असेल.
यदाकदाचित राज यांच्या हाती नाशकात सत्तेच्या चाव्या आल्याच तर त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी असेल. नवनिर्माणाचे मॉडेल ते येथे सादर करू शकतील आणि त्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेला विश्‍वास देऊ शकतील. जर ते तसे नाही करू शकले तर त्यांनी दाखविलेली स्वप्ने ही भाषणांतील स्वप्नरंजनच ठरेल. एकमात्र खरे सध्या तरी प्रमुख महानगरांतील काही टक्के नागरिकांनी राज यांच्या नेतृत्वावर, त्यांच्या स्वप्नांवर विश्‍वास दाखविलेला आहे. भविष्यात हे बळ वाढविणे आणि स्वप्नपूर्तीच्या दिशेने पाऊल टाकणे हेच मनसे नेतृत्वापुढे आव्हान असेल. तुर्तास या यशाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस अगदी मनसे शुभेच्छाः
जय महाराष्ट्र! 

2 comments:

UEH said...

सुंदर मांडणी. उत्कृष्ट लिखाण .
माझ्या माहिती तंत्रज्ञानाशी निगडीत असलेल्या ब्लोग ला विझिट द्यायला विसरू नकोस
http://themarathi-blog.blogspot.in/

prajkta said...

thank u tanmay...blogwar swagat.