Thursday, September 22, 2011

परिवर्तन

रोज रात्री ऑफीस सुटलं की बाईकवरून जाताना कधी एकदा घर गाठेन असं होऊन जातं. पंधरा-सोळा किलोमीटरचं अंतर पार करून घरी पोचेपर्यंत पार गळाटून जातो. बरं मध्यरात्रीनंतरची वेळ असल्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांशिवाय रस्त्यावर विरंगुळा तो कसला नाहीच. भरधाव वेगाने जाणारी वाहने, पुलावरून जाताना वाहणाऱ्या नदीचे जाणवणारे अस्तित्व, आजूबाजूच्या शेतातील पिकांची, झाडांची सळसळ आणि बाईकचा अखंड सोबत करणारा आगळावेगळा आवाज. शहरात प्रवेश केला की रस्त्यांच्या मधोमध उभे राहून दोन्ही बाजूंना पिवळसर प्रकाशाची उधळण करणारे विजेचे खांब. खचित गस्त घालत फिरणारी आणि कधीमधी भेटणारी पोलिस व्हॅन. चौकांतील एखाद्या कोपऱ्यात गाडी उभी करून गप्पांत रंगलेली दोस्त मंडळी, तसेच काही पोलिस. दिवसभर व्यवसाय करून आवराआवर करणारे राजाभाऊ भेळच्या गाड्यावरील मंडळी. मध्यवर्ती स्टॅंड परिसरात उभ्या खासगी गाड्या, त्या गाड्यांसाठी प्रवासी शोधत फिरणारे पंटर, माणसांची आवक-जावक. एखाद्या दडग्या कोपऱ्यांवर चमकत्या कपड्यांत उभे "ते' आणि "त्या'. त्यांच्या आजूबाजूला कानोसा घेत दबक्‍या पावलाने चालणारी "ती" मंडळी. काही ठिकाणी त्यांच्यात सुरू असलेले हास्यविनोद, भांडणे. रोजचंच हे दृष्य. गेल्या कित्येक वर्षांमध्ये यातील एखादीच बाब मागे पुढे झाली असेल अन्यथा फरक कसलाही नाही. रोज त्या-त्या ठिकाणी ते-ते भेटणार हे नक्की. त्यामुळे रोजच्या प्रवासातला हा रुटीनचाच भाग. नाही म्हणायला सण-समारंभाच्या दिवशी रस्ते काही प्रमाणात माणसांनी वाहते आणि कोपरे आणखीनच जागे, कुजबुज वाढलेले.
या रोजच्या चित्रामध्ये काही महिन्यांपूर्वी आणखी एक भर पडली. म्हणजे "तिचं' अस्तित्व जाणवू लागल्यामुळे भर पडली म्हणता येईल. "ती' पूर्वीपासूनच असणार फक्त तिचं ठिकाण माझ्या रोजच्या वाटेवर नक्कीच नव्हतं. ती होती एक अजागळ बाई.

एक दिवस चटकन बाईकचा प्रकाश तिच्या तोंडावर पडला आणि तिच्या अस्तित्वाची दखल माझ्याकडून घेतली गेली आणि त्यानंतर वरील सर्व गोष्टींप्रमाणे दररोज तिही भेटू लागली. मी तिला नोटीस करू लागलो. केस विस्कटलेले, कित्येक महिने त्यांनी बहुधा तेल पाहिलेलं नसावं. अंगावरील साडी गलिच्छ भिकाऱ्यासारखी, कशीबशी अंगाभोवती गुंडाळलेली. तिचा चेहरा कधीच निरखून पाहिला नाही पण, तो फारसा पाहण्यासारखा नसावा. डोळ्यांचा पांढरा भाग प्रकाश पडला की चमकत असे. ठरावीक परिसरात ती ठरावीक स्थितीत उभी राहिलेली. येणाऱ्या जाणाऱ्यांकडे आशाळभूतपणे पाहणारी तिची नजर अस्वस्थ करणारी. त्या डोळ्यांत भूक, असाह्यता, जगण्याची धडपड काठोकाठ भरलेली. अरेच्चा म्हणजे ही "तसली' बाई. बापरे....कोणी तिच्या सावलीलाही उभे राहणार नाही एवढी ती गलिच्छ आणि उभी राहते व्यवसायासाठी. (एरव्ही अशा बायकांच्या अंगावरील कपडे लांबूनही पटकन ध्यानी येतात) एखादे तरी गिऱ्हाईक येईल आणि टिचभर पोटाची तजवीज होईल, या आशेवर ती उभी राहत असावी. म्हणजे पूर्वी तिने "हेच" केलेले असणार आणि आताही शरिराची लक्तरे सांभाळत जगण्यासाठी तिच्या लेखी दुसरा कुठलाच मार्ग शिल्लक राहिलेला नसणार. म्हणून मग पुन्हा ती कोपरा पाहून उभी असते होते का काय तजवीज हे पाहत. काय असेल तिचं विश्‍व? ती आत्तापर्यंत कशी जगत होती? ती काय खाते? कोठे राहते? कशी जगते? ती जगण्यासाठी दुसरं काही का स्वीकारत नाही? का तिला मध्यरात्री कोपऱ्यावर येऊन उभे रहावे वाटते. ही तिची असाह्यता आहे की तिला आता काहीच समजेनासं झालंय? की ती काहीच करू शकत नाही? तिला दुसरं कोणी आहे की नाही? बरं कडाक्‍याच्या थंडीत आणि भर पावसातही ती उभी असलेली भेटते. म्हणजेच तिला जगण्यासाठी तिथं उभं राहणं भागच पडतंय. ते का?

किती प्रश्‍न. या प्रश्‍नांनी गेल्या काही दिवसांत डोक्‍याचा अक्षरशः रोज भुगा झाला. बरं थांबून विचारण्याएवढी आपल्या अंगात हिंम्मतही नाही. ती नेमकी काय आहे? हे गुढ उलघडण्यासाठी बाईक तिच्याजवळ थांबवायला हवी, तिच्यासोबत बोलायला हवं, ती थांबविण्याची आपली मानसिकताच नाही. तरीही तिच्या त्या दिसण्यानं आपण अस्वस्थ होतोय, विचारांत गुरफटलं जातोय हे नक्की. कोण आहे ती? नक्की कोण? हा प्रश्‍न काही पिच्छा सोडत नाही.

परवा रात्री नेहमीप्रमाणे येताना. "त्या' कोपऱ्यावर गर्दी जमलेली दिसली. न राहवून बाईकचा वेग कमी केला आणि रस्त्याकडेला उभी केली. गर्दीच्या दिशेने गेलो. दहा-बारा जण कोंडाळं करून उभे राहिले होते. दोन पोलिसही त्यांच्यासोबत होते. जरा डोकावून पाहिलं तर "ती' खाली पडलेली दिसली. सगळेजण वाकून तिला पाहत होते. मी पोलिसांकडे चौकशी केली. काय झालं हो या बाईला?

माझ्याकडे विक्षिप्त नजरेनं पाहत,"मेली, आजारी होती, कुठं राहते माहित नाही, रोग झाला असणार....' शिपायाचे पुढचे शब्द माझ्या कानावर पडलेच नाहीत.
मी विचार करू लागलो,"गेली बरं झालं! नरकयातनांमधून सुटली एकदाची. पण कशानं गेली, रोगानं की भुकेनं की आणखी कशानं? कोण होती ती? तिचा आगापिछा काय? असलेच तर तिच्या घरच्यांना कसे समजणार? तिच्या जगण्याचं प्रयोजन काय होतं आता मेली तर...? बरं मेली तिही रस्त्यावर तिच्या रोजच्याच जागेवर, याला काय म्हणायचं? पुन्हा अनुत्तरीत प्रश्‍नांचा गुंता वाढत राहिला. मी बाईकला कीक मारली, आता ती दिसणार नाही. बहुधा परिवर्तन यालाच म्हणत असावेत.

5 comments:

प्रशांत दा.रेडकर said...

छान लिहिले आहे,
माझ्या अनुदिनीचा पत्ता: http://prashantredkarsobat.blogspot.com/

prajkta said...

redekar blogwar swagat....thank u. blog nakki wachto.

आनंद पत्रे said...

सहसा दखल न घेण्याजोग्या गोष्टींची दखल घेतलीत ..बर्‍याच गोष्टी आपण बदलू शकत नाहीत.. :(

prajkta said...

100 takke khare aahe..anandji....thank u aani blogwar swagat

Sonal said...

mala naahi watat ki he pariwartan asawa... ya nantar ashi koni "Ti" kimva "to" dislyawar jar bike thambawun tumhi sahajach chaukashi keli tar pariwartanakade taklela ek paaul asen.... mi pariwartan kadhi mhanen... tumhi / konihi ekhada asha awasthetil "tila" kimva "tyala" vinasaayaas madaticha haat pudhe karen te pariwartan!

ha tumchya amchya sobat nehemi milnaara anubhav.