Thursday, June 23, 2011

'बाप' माणूस...

त्यांनी टोपी काढली, घाम पुसला. पायऱ्या चढून आल्यामुळे लागलेली धाप कमी होण्याची वाट पहात शांतपणे खुर्चीत बसून राहिले. वयाने बहुधा पासष्टी ओलांडली असावी; पण अगदी अपटुडेट होते.
"वयाच्या मानाने झेपत नाही. पायऱ्या चढल्या की धाप लागते'' स्वगत बोलावे तसे ते टेलीफोन ऑपेरटरशी बोलले. मग शांतपणे उठले. हळूहळू जाहिरात विभागात गेले.
जाहिरात घेणाऱ्याकडे पाहून ओळखीचं हसले. त्यानेही फोनवर बोलतच हसून दाद दिल्याने त्यांना जरा बरं वाटलं. त्याने आजोबांना खुर्चीकडे हात करून बसण्याची खूण केली. आजोबांनी खुर्चीवर बसून शरीर काहीसं सैलावलं आणि त्याच्या फोन संपण्याची वाट पाहू लागले.
फोन संपवून तो म्हणाला, ""बोला आजोबा. किती उन्हात आलात? काल रात्रीच नाही का यायचं? ऊन तरी लागलं नसतं''
"ठरवलं होतं यायचं, पण जमलंच नाही. आज येण्याशिवाय पर्याय नव्हता.''
मला त्यांचा संवाद ऐकू आला आणि माझं त्यांच्याकडे लक्ष गेलं. मी पाहतोय हे पाहिल्यावर ते माझ्याकडे पाहून ओळखीचं हसले. त्यांच्या नजरेत मला हरवलेपण जाणवलं. माझ्या चेहऱ्यावरील स्मित पाहून बहुधा त्यांनाही बरं वाटलं.
दोघांत काहीतरी बोलणं झालं. त्यांनी खिशातून कसलासा लिहिलेला कागद काढून त्याच्याकडे दिला. त्यानं खात्री केली आणि पैसै घेतले.
"बराय निघतो मी, पुढील आठवड्यात येणार आहेच''
"ओके, आजोबा ! बाकी कसं काय चाललंय?''
"खरं सांगू मरण येत नाही म्हणून म्हातारपणाचं ओझं जेवढे दिवस वागवता येईल तेवढे वागवतो आहे; मग जगतोच आहे, तर जास्तीत जास्त समाधानाने कसं जगता येईल ते पाहतो. रोज फिरायला जाऊन प्रकृती उत्तम राखण्यासाठी प्रयत्न करतो. दिवसभरात सोसायटीमधील लोकांची जमतील तेवढी कामं करतो. सायंकाळी लहान मुलांना घेऊन गोष्टी सांगत बालपण शोधतो. रात्री मंदिरात भजन-कीर्तनाला जातो. जेवढं म्हणून आनंदी राहता येईल तेवढा आनंदी राहतो. जगण्याची शिक्षा मिळालीच आहे तर ती आनंदानं कशी भोगता येईल हे पाहतो. बराय चलतो. फार वेळ घेतला तुमचा, येतो.'' असं म्हणून पिशवी सावरत ते दरवाजाबाहेर पडले.
त्यांचं बोलणं ऐकून मी त्याला विचारलंच कोण होते हे आजोबा आणि कशासाठी आले होते?
त्यानं जे सांगितलं ते ऐकून मी सुन्न झालो....
माझ्यासमोर आजोबांनी दिलेला फोटो धरत तो म्हणाला, "" हा फोटो पाहिलांत, हा त्यांच्या 20 वर्षांच्या मुलाचा आहे. त्याच्या श्रद्धांजलीची जाहिरात द्यायला आले होते ते. दरवर्षी येतात न चुकता''
"कशानं गेला तो?''
"इंजिनिअरींगच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. कॉलेजमध्ये गॅदरींग होतं. मित्रांसोबत राबून त्यानं त्याची तयारी केली. गॅदरींगच्या आदल्या दिवशी डिसेंट्री लागल्याचं निमित्त झालं आणि त्यातून तो उठलाच नाही. हाता-तोंडाशी आलेल्या लेकाचं निष्प्राण कलेवर थकलेल्या खांद्यावरून आजोबांना वहावं लागलं.''
"बाप रे, केवढा मोठा आघात!'' माझा स्वर जड झाला.
"सर ते मघाशी म्हणाले नं पुढील आठवड्यात येणार आहे, का माहित आहे?''
"का?''
"बायकोला आदरांजली वाहण्याची जाहिरात द्यायला''
"काय...?''
"हाता-तोंडाशी आलेला मुलगा गेल्याचा धक्का ती माऊली सहन नाही करू शकली. तिने अंथरूण धरलं आणि त्यातून ती उठलीच नाही. त्या दिवसापासून गेली काही वर्षे आजोबा आपल्या एका मुलीसह राहत आहेत. इतर दोन मुलींची चांगल्या घरात लग्ने झाली आहेत. घरी आहे त्या मुलीला फिट्‌सचा विकार आहे, त्यामुळे ती त्यांच्याबरोबरच राहते. दोघंच एकमेकांचे आधार.''
"काय सालं नशीब!' केवढे हे आघात आणि ते सर्व सहन करणारा पहाडासारखा बाप माणूस. अडचणींचे एवढे अडथळे येऊनही मोडून न पडता जगण्याशी दोन हात करून जगण्यावर विजय मिळविण्याचा प्रयत्न करणारा बाप माणूस... त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करताना माझ्या डबडबलेल्या डोळ्यांतून दोन थेंब ओघळलेच.

Sunday, June 19, 2011

बापपण अनुभवताना...

कानावर तुझा रडण्याचा पहिलावहिला ट्याहां ट्याहांचा स्वर पडला अन्‌ आनंदानं छाती गच्च भरून आली.
तुझा जन्मसोहळा सुखरूप पार पडावा म्हणून हातांची बोटे होती त्या वेळी एकवटलेली परमेश्‍वरचरणी.
दुपट्यात गुंडाळलेली मऊसुत सावरीपरी तू आलीस सामोरी खरी; मात्र तेव्हा पापण्यांवर थबकल्या थेंबांतून तू भेटलीस मला धूसर धूसर.
मला सुचलेच नाही तुला अनुभवण्याचे, ना हृदयाशी कवटाळण्याचे.
मग आलं भान जरा, इवल्याशा तुला मी धरलं
हृदयाला आणि बापपणाचा अर्थ पोचला पार मनाच्या तळाला.
तुझ्या लुकलुकत्या डोळ्यांनी, बालमुठीत एकवटलेल्या असंख्य स्वप्नांनी घातली मला साद आणि आनंदाने भरून वाहत राहिला माझा श्‍वास अन्‌ श्‍वास.

------------------------
आळसावलेलाच होता तो माझा दिवस जरा.
भोवताली तुझं रांगत-रांगत खेळणं, मध्येच येऊन पुस्तक ओढणं, मस्ती करणं आणि सुरू होतं खळाळून हास्यफुलं उधळणं.
खेळता खेळता एकवटलंस बळ आणि राहिलीस क्षणभरच पहिल्यांदाच उभी स्वतःच्या पायावर.
पाहिलंस माझ्याकडे तेव्हा डोळ्यांत तुझ्या उसळला होता आत्मविश्‍वासभरला सागर.
हसलीस छानसं गोड आणि टाकलंस पहिलं अडखळतं पाऊल.
गेला तोल तुझा, सावरलं मी तुला अलगद हातांवर.
तुझ्या चेहऱ्यावर आनंद उमटला आणि माझ्या विस्फारल्या बाहुल्यांनी साठविला तो क्षण डोळाभर.

------------------------
त्या दिवशी पोचलो पाऊसधारांना सोबत घेतच शाळेवर.
मस्त गुलाबी ड्रेस खुलला होता तुझ्या नाजुकशा अंगावर.
गोड-गोड बोलत, समजावून सांगत, कॅडबरीचं प्रॉमिस करत सोडलं तुला वर्गाच्या दारात.
बाईंनी तुला घेतलं आत आणि लावून घेतलं दार.
बंद होणाऱ्या दारांच्या फटीतून दिसली मला तुझी भरून आलेली नजर आणि जाणवली त्यामध्ये दूर जातानाची असहायता, माझ्यावर आलेला मोठ्ठा राग आणि व्यक्त न करता येणारी घुसमट. बोलत होती नजर, "बाबा, तू वाईट्ट आहेस, सोडून मला नको जाऊस...' आईशपथ सांगतो त्या नजरेनं कालवला जीव. शहारा उमटला देहभर.

------------------------
कॅलेंडरवरील तारखा राहिल्या फडफडत, अंगणातला पारिजातकही फुलत राहिला काठोकाठ.
उगवणाऱ्या प्रत्येक सोनेरी दिवसाचं बोट धरून तू आनंदाच्या किरणांनी शिंपलेस आपलं अंगण.
समाधानाचे क्षण गुंफत राहिलीस एक-एक आणि घट्ट होत गेले आपसुक सारे भावबंध.
तुझे यशाचे क्षण घेऊन आले आनंदसरींची बरसात आणि चिंब न्हात राहिलं आपलं घर.
कधी पुरवून घेतलास हट्ट, कधी रुसलीस, कधी लटक्‍यानेच रागावलीस, भांडलीसही, मोठी होऊनही "गट्टी फू' करताना तू माझ्यासाठी मात्र सानुलीच राहिलीस.
तुझ्या कर्तृत्वाने आकाश आमचे उजळले, यशाचे ते सोनभरले क्षण भरून ठेवले मनाच्या कुपीत.
वाटली जेव्हा काळजी पहिल्यांदा तुझ्याबद्दल, तेव्हा खांद्यावर हात ठेवून म्हणालीस, "पिलावर विश्‍वास नाही का तुमचा बाबा?'
गैरविश्‍वास नव्हता गं! आतून आलेले तुझ्याबद्दलचे काळजी वाहणाऱ्या बापाचे भेदरलेपण.
ते भेदरलेपण मोडताना भक्कम अस्तित्वाने तू घालत राहिलीस सतत फुंकर.
ओळखतात जेव्हा मला "तुझा बाबा' म्हणून, अभिमानाने भरलं माझं मन हिंदोळत राहतं वाऱ्याच्या लहरींवर.

------------------------
पाहू या- करू या... करत मी ढकलत राहिलो तुझ्या आयुष्यातला तो सोनेरी दिवस.
मात्र अखेर आलाच "तो क्षण', जो माहीत असूनही लपवत राहिलो स्वतःपासून आयुष्यभर.
सनई, चौघडे वाजू लागले, घर सजलं, अंगण मांगल्यानं काठोकाठ भरलं.
सनईच्या सुरावटीने भारला सारा भवताल. पळ भरले आणि आली लग्नघटिका समीप.
"शुभमंगल....' शब्द-सूर उच्चारत गेले आणि फुटणारा बांध कसा आवरू आवरू झाले.
...आठवला तुझा जन्मसोहळा, तुझा पहिला मृदू सहवास, लुकलुकणारे डोळे, तुझं पहिलं पाऊल, पहिलं यश.
आठवला तुझा मला धीर देणारा स्पर्श, मैत्रीण होऊन झेलताना लुटलेला बापपणाचा आनंद.
उभे राहिले डोळ्यांसमोर तुझ्यासोबतचे लटके रागाचे क्षण, कधी तरी चुकून उचलला गेलेला हात आणि मग कुशीत शिरून मुसमुसणाऱ्या तुला सावरताना माझ्यातला गळून पडलेला कठोर बाप.
"कन्यादानाचं पाणी सुटलं हातातून अन्‌ जाणवलं आपलं पिलू आपल्याला कायमचं दुरावलं...'
उंबरठा ओलांडण्यास निघाली अन्‌... "बाबा।।। म्हणून धावत शिरलीस आवेगाने माझ्या कुशीत...'
खरं सांगतो पोरी, तेव्हा कढ दाटल्या हृदयातलं बापपण धो धो रितं होत राहिलं अश्रूंमधून..
also on: http://72.78.249.107/esakal/20110619/5214167252538387743.htm

Thursday, June 9, 2011

पाऊस



पाऊस उधाणलेला
दर्यावर स्वार झालेला!
पाऊस इंद्रधनूतला
सप्तरंगातून उमटलेला!
पाऊस छत्रीतला
थेंब-थेंब वेचलेला!
पाऊस पागोळ्यांतला
रात्रभर जागलेला!
पाऊस मनातला
तुफानाला नमविलेला!
पाऊस तुझ्या-माझ्यातला
मौनाला बोलकं केलेला!
पाऊस चिंब ओला
देह भरून मनात उतरलेला!
पाऊस तुझा, माझ्यासवे
सप्तपदी चाललेला!

Saturday, April 2, 2011

Dhonis world cup winning sixer



Dhoni lift this ball in the air and it goes for six at that moment crowed chiared and enjoying the crown of champion. All boyes deserved himself...they becom winner...they win all idians hearts.

Tuesday, March 29, 2011

पुन्हा आले डोळा पाणी!


"दमलेल्या बाबाची कहाणी...' हे गाणं साधारणपणे दोन वर्षांपूर्वी झालेल्या "आयुष्यावर बोलू काही'च्या पाचशेव्या भागामध्ये सलील आणि संदीप यांनी सादर केलं आणि पाहता पाहता अवघ्या मराठी मनाला "बाबा'ला वाटणारी काळजी अंगावर आली. समस्त बाबा लोकांनी त्यावेळी लपून-छपून का होईना रडली. त्यानंतर या गाण्याची पारायणं करत अनेक बाबांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. आईपुरतीच मर्यादीत राहिलेली "माया' संदीपने "बाबा'साठीही किती मोलाची आहे हे शब्दबद्ध केले आणि बाबा लोक भावनांना वाट मोकळी करून देऊ लागले. पहिल्यांदा झालेल्या या कार्यक्रमात ही कविता ऐकताना घराघरांतून बाबा लोक आपल्या लेकीसह रडले. बाबा आणि मुलीमधील असलेल्या नाजूक नात्यातला ओलावा, जिव्हाळा, माया, काळजी सगळं सगळं अगदी थेटपणे समोर आलं आणि काळजाला भिडलं. संदीपने लिहिलं अप्रतिम पण त्या जोडीला दोघांनी ते सादरही केलं अप्रतिम.
दोन वर्षानंतर जेव्हा "आयुष्यावर बोलू काही'चा भाग "साम'मराठीवरून 30 तारखेला प्रक्षेपीत झाला तेव्हाही दोन वर्षांपूर्वीचाच अनुभव अनेकांना आला. गाणं संपताना गालावरून ओघळलेल्या अश्रूंनी सलील-संदीपला दाद दिली. (गेल्या वर्षभरात अनेकांनी तो अनेकदा घेतला. हे गाणं म्हणजे त्यांच्या भावना मोकळ्या करण्याचं जणू साधनच बनलं) सातशेव्या भागातही दोघांनी ही कविता सादर करताना तेवढ्याच आर्तपणे सादर केली आणि उपस्थितांना पुन्हा एकदा विचार करायला भाग पाडलं, हे त्यांच्या सादरीकरणाचं शंभरनंबरी यश.
एवढ्या तेवढ्या कारणांनी वाद घालणारे, रुसवा धरणारे, इगो कुरवाळत आपल्या हाताशी असलेले सुंदर क्षण गमावणारे आपण किती करंटे आहोत. हे पुन्हा एकदा ही कविता ऐकताना जाणीव झाली. म्हणजे पहा..."लग्न ठरल्यावर कसे होईल...' या कल्पनेनं डोळ्यांच्या कडा भरून येतात आणि जवळ असताना आपण त्याची फारशी फिकीर करत नाही हा विरोधाभास आपण जपत राहतो. म्हणूनच मग संदीप-सलीलला मनापासून दाद द्यावी वाटते. त्यांच्यामुळे कोठेतरी माणूसपण जागं राहतं. काही क्षण का होईना आपल्याच प्रतिरुपासाठी डोळे ओलावतात. तिच्या भविष्याच्या काळजीने मन भरून येतं. काही क्षण काही होईना "मी' विसरतो, इगो बाजूला राहतो, प्रत्येकातील "बाबा' हुरहुरतो.

Monday, February 14, 2011

अखेरचा डाव!

बेल वाजली तिनं दार उघडलं ! धाप आवरत तो घरात आला. तिनं पटकन आत जाऊन पाण्याचा ग्लास आणला.
"तो' पाणी पित असताना तिनं खुणेनंच चहाविषयी विचारलं! त्यानं होकारार्थी मान हलविली.
आता त्याची धापही थांबली! त्यानं शर्ट काढला. तिथंच खुर्चीवर टाकला. त्याच खुर्चीवर रेलून पाय लांबविले आणि "ऐ मेरी जोहराजबी तुझे मालूम नही...' ची मस्त शीळ देत डोळे मिटले.
चहा घेतोस नं!
तिच्या हाकेनं तो भानावर आला. त्यानं कप घेतला आणि चहाचे घोट घेऊ लागला.
ती समोरच्या खुर्चीवर बसून चहा घेऊ लागली आणि त्याच्या "हॅपी मूड'मुळे सुखावली.
आजारपणामुळे त्याचं हास्य विरलंय हे तिला माहित होतं, त्यामुळेच त्याचा आजचा मूड पाहून तिला बरं वाटलं.
न राहवून तिनं विचारलंच,""आज एकदम मूड चेंज, काय भानगड?'
""ह्या, भानगड-बिनगड काहीही नाही! असंच! बरं पटकन आवर. बाहेर जायचंय. किशोरीच्या कार्यक्रमाची दोन तिकिटं आणलीत!''
तिच्या परवानगीची वाट न पाहता तो उठून आवरू लागला!
क्षणभर तिला काही कळेचना. तिनंही झटपट आवरलं! त्याला आवडणारी गुलाबी रंगाची साडी नेसून ती तयार झाली.
तिला पाहताच पुन्हा एकदा त्याच्या ओठांवर "ए मेरी जोहराजबी...'ची शीळ आलीच.
"चलायचं!
दोघेही रस्त्यावर आले. नेहमीप्रमाणे तिची पावलं बसस्टॉपकडे वळली, तोच "टॅक्‍सी' या त्याच्या हाकाऱ्याने ती उडालीच. आज टॅक्‍सी!
दोघे टॅक्‍सीत बसले! तिला आज तो नेहमीपेक्षा वेगळा-वेगळा भासला! आज त्याचा मूड एकदम कसा काय बदलला?
थिएटरच्या गेटसमोर टॅक्‍सी उभी राहिली आणि तिची विचारांची श्रृंखला खंडित झाली.
त्यानं टॅक्‍सीवाल्याला पैसे दिले. तिच्या हातात कार्यक्रमाची तिकिटे देऊन तिला पुढे जाण्यास सांगितले.
तिकिटं घेऊन ती अँपी थिएटरच्या पाठीमागील बाजूस गेली. समोर उभ्या स्वयंसेवकाच्या हातात तिकिटं दिली आणि बसण्याची जागा विचारली!
त्यानं तिकिटं हातात घेतली आणि मागून येण्याविषयी खुणावलं! ती पाठोपाठ चालू लागली. "किशोरी' मंचावर जेथे बसणार त्याच्या बरोबर समोर भारतीय बैठकीकडे त्या स्वयंसेवकाने खूण केली! काहीशी अवघडून ती त्या बैठकीवर जाऊ बसली! आत्तापर्यंतचे पाहिलेले सर्व कार्यक्रम थिएटरच्या शेवटच्या कोपऱ्यात बसूनच पाहिलेले असल्याने एकदम पहिल्या रांगेत जाऊन बसणे ही कल्पनाच ती करू शकत नव्हती आणि आत्ता तर खास बैठकीवर. तिचं लक्ष तिकिटांकडे गेलं. पहिल्या रांगेतील खास तिकिटे होती.
एवढ्यात तो ही आलाच!
""जरा तिकडं बघतेस!' असं म्हणून त्यानं तिच्या केसांत मोगऱ्याचा गजरा माळला.''
अपूर्वाईने मोहरलेल्या तिच्या श्‍वासांत मोगऱ्याचा गंध काठोकाठ भरला! ती त्याच्या चेहऱ्याकडे एकटक पाहू लागली.
तिची नजर चुकवत तो कार्यक्रम सुरू होण्याची वाट पाहू लागला!
तब्बलजीने तबला ठीक केला, तानपुऱ्यावरील मुलीनं तारांना ताण दिला. सतारीचे स्वर ठीक केले गेले आणि त्याच वेळी किशोरी मंचावर आल्या...
स्वरांच्या एकेक लडी उलगडल्या आणि मैफलीत रंग भरू लागला.
"जाईन विचारीत रानफुला...' किशोरींनी सुरू केलं आणि... वाह।।। च्या उत्स्फूर्त प्रतक्रिया उमटल्या!
त्यानंही तशीच दाद दिली. तल्लीन होऊन किशोरी ऐकत असताना त्यानं तिचा हात हातात घेतला आणि त्याच्या स्पर्शाचं गाणं तिच्याभोवती फेर धरून नाचू लागलं!
ती गाणं विसरली. भूतकाळात गेली. पाच वर्षांपूर्वी अखेरच्या स्टेजच्या कॅन्सरशी झगडत असताना "तो' आयुष्यात आला!
ंसह घरातील सर्वांनी जेव्हा आपल्याला दूर लोटलं तेव्हा त्याने आधार दिला. जगण्याची उमेद जागवली. वर्षभर सेवा केली! मरण लांबवलं! सहवासानं ओढ वाढली!
एक दिवस चहाला म्हणून रेस्टॉरंटमध्ये गेलो, तेथे लग्नाविषयी विचारलं! स्वतःविषयी सांगितलं! दोन मुलं अमेरिकेत! त्यांना बापाची गरज नाही. नातवंडांसाठी आजोबा अनोळखी. पत्नी दहा वर्षांपूर्वीच गेली! घरी एकटाच राहतो. कॅन्सरग्रस्तांच्या रुग्णालयात सेवाभावी वृत्तीनं काम करतो आणि आता आधाराची गरज आहे.
"नाही म्हणूच शकले नाही!'
सहजीवन नव्याने सुरू झालं. सुखाचे दिवस आल्याचं वाटत असताना "त्याला'ही ब्रेन ट्यूमर असल्याचं समजलं आणि आशेच्या पालवीने नव्याने फुललेल्या झाडाला दुःखाची वाळवी लागली! गेले वर्षभर दोघेही एकमेकांच्या आधाराने जगत अखेरच्या दिवसाची वाट पाहत असताना... आज अचानक?
टाळ्यांचा गजर झाला आणि तिची विचारमालिका भंगली.
दोघेही उठले...बाहेर आले...
त्यांच्या आवडीच्या रेस्टॉरंटमध्ये जेवले! तेथून बाहेर पडले आणि चालत चालत नदीकाठी आले.
नेहमीप्रमाणे अनेक जोड्या बसलेल्या.
दोघेही एका ठिकाणी बसले... बराच वेळ कोणीच काही बोलले नाही!
पाण्यावर उमटणाऱ्या तरंगावर चांदणप्रकाशाचा खेळ रंगलेला.
तिनं मौनाला बोलतं केलं!
"काय विशेष? स्वारी आज एकदम वेगळ्या मूडमध्ये...घरात शीळ घालून गाणं काय?, येताना टॅक्‍सी, मग "किशोरी' तीही पहिल्या रांगेत बसून...गजरा...रेस्टॉरंट आणि आता इथे... काय दोघांच्या मरणाची तारीख समजली की काय?
तो काहीच बोलला नाही! फक्त नदीकडे पाहत राहिला!
"बोल ना काही तरी! नाही तर जाऊ या घरी' म्हणून ती उठू लागली!
आता त्याचं मौन सुटलं! तो आश्‍वासक हसला!
हसतोस काय? आपण अवघ्या काही दिवसांचे पाहुणे आहोत हे विसरलास काय?
काहीही विसरलो नाही! असं म्हणत त्यानं शर्टाच्या आतून छानसा गुलाब आणि पाकीट काढलं आणि तिच्या हाती दिलं, म्हणाला, "हॅपी व्हॅलेंटाईन!'
आता तिला दिवसभराच्या त्याच्या वागण्याचा अर्थ उमगला! तिचे डोळे भरले! जाता जाताही तो आपल्याला आनंदाचे क्षण देतोच आहे! तिच्या तोंडून हुंदका बाहेर पडला!
बराच वेळ रडल्यानंतर तिनं डोळे पुसले आणि पाकीट फोडून पाहिले.
कसली तिकिटं आहेत?
"पुढच्या आठवड्यात आपण लंडनला जातोय!'
"कशाला?'
"दोघांवरही शस्त्रक्रिया करायची आहे. दोघांचेही कॅन्सर शेवटच्या स्टेजला असले तरी होप्स आहेत! मग निदान जाता जाता दोघांसाठी एक डाव खेळून बघायला काय हरकत आहे! त्याचीच ही गिफ्ट! हॅपी व्हॅलेंटाईन!
त्यानंतर दोघे कितीतरी वेळ भविष्याविषयी बोलत राहिले!

Tuesday, December 21, 2010

स्टॅंड लागलंय!

शीर्षक वाचून हा काय प्रकार? असा प्रश्‍न तुम्हाला नक्कीच पडला असेल. जरा थांबा खुलासा करतोच. त्याचं काय झालं परवा असाच बाईकवरून फेरफटका सुरू होता. ट्रॅफिकमधून वाट काढत निघालो होतो. एवढ्यात एक मोटरसायकलस्वार बाजूने पुढे निघून गेला, जरा घाईतच दिसला. त्याच्या पाठोपाठ एक सॅंट्रोवालाही पुढे गेला. दोन्हीही माझ्या अगदी नजरेसमोर. एवढ्यात सॅंट्रोवाल्याने गाडीचा वेग वाढविला आणि तो त्या मोटरसायकलस्वाराजवळ गेला आणि ओरडला,
भाईसाब स्टॅंड लागलंय!फ
मोटरसायकलस्वारानं खाली पाहिलं, मोटरसायकलचा वेग कमी केला. सराईतपणे स्टॅंड पायानं मागं ढकललं आणि सॅंट्रोवाल्याकडे पाहत अगदी मनापासून मान हलवून आभार मानून निघूनही गेला. त्याच्या आभार मानण्याने सॅंट्रोवाल्याच्या चेहऱ्यावर छानशी स्उिमटली आणि तोही त्याच्या मार्गे रवाना झाला.
बाब अगदी साधी पण मला खात्री आहे, आपणही अनेकदा असा प्रसंग पाहिलेला असेल. आपल्यापैकी काहींनी अनुभवलाही असेल. आपण कित्येकदा विसरतो तसंच हा मोटरसायकलस्वार कोठे तरी उभा राहिला असणार आणि त्यानंतर गाडीला कीक मारून सुसाट निघाला असणार. गडबडीत स्टॅंड काढायचं राहिलं असणार. नेमकं हेच त्या सॅंट्रोवाल्याच्या लक्षात आलं आणि तो पटकन मोटरसायकलस्वाराला धोसुचना देऊन मोकळा झाला.
मला प्रश्‍न पडला त्या सॅंट्रोवाल्यानं हे का सांगितलं? त्याचा काय संबंध? त्या मोटरसायकलस्वाराचं आणि त्याचं नातं काय? समजा त्या तशा स्टॅंडमुळे तो मोटरसायकलस्वार पडला असता, त्याला काही दुखापत झाली असती तरी त्या सॅंट्रोवाल्याचं काहीही बिघडलं नसतं किंवा त्याचं काही नुकसानही झालं नसतं. जे काही नुकसान झालं असतं ते मोटरसायकलस्वाराचं; पण...
दोस्तांनो हा पणफच इथं खूप महत्त्वाचा आहे. त्या सॅंट्रोवाल्याच्या साध्या कृतीनं माणुसकीचा झरा वाहता आहे, तो अद्याप आटलेला नाही हे अधोरेखीत झालं. लागलेल्या स्टॅंडमुळे तो मोटरसायकलस्वार पडेल आणि त्याला काही तरी इजा होईल, ही काळजी वाटल्याने सॅंट्रोवाल्याने त्याला तातडीनं सांगितलं. त्याच्यातल्या माणुसकीनं त्याला साद घालून तातडीनं व्यक्त होण्यास भाग पाडलं आणि कदाचित होऊ घातलेला एक अपघात, एखाद्या कुटुंबावर होणारा आघात टळला.
तर दुसरीकडे च्या बीजाची एका ह्रदयातून दुसऱ्या ह्रदयात आपसूक पेरणी झाली. धोका असताना दुसऱ्याला सावधान करण्याची साधी माणुसकी जपली पाहिजे हा संदेश एकाकडून दुसऱ्याकडे अगदी अलवारपणे पोचला. मला खात्री आहे आता पुन्हा तो मोटरसायकलस्वार दुसऱ्या कुणाच्या गाडीचे स्टॅंड लागलेलं दिसेल तेव्हा तातडीनं त्याला त्याबाबत सांगेल कारण आता तो मोटरसायकलस्वार या वाहत्या झऱ्यातील एक धार बनला आहे. त्याच्या परीने तो जेव्हा जेव्हा वेळ येईल तेव्हा हा झरा अखंड वाहता राहण्यासाठी प्रयत्नशील राहील.
या आणि अशा छोट्या-छोट्या बाबींमुळेच जगाचे रहाटगाडगे काहीसे व्यवस्थीत सुरू आहे. नाहीतर आजूबाजूला पाहिलं तर फारसं सुखावह चित्र दिसतच नाही; मग अशावेळी असे काहीसे निर्मळ झरे नजरेला पडतात आणि आपल्या पावित्र्याने आपल्यालाही त्याचा एक भाग बनण्यासाठी साद घालतात. मी ठरवलं आहे या सादेला प्रतिसाद देण्याचं!... तुम्ही?