Monday, July 25, 2011

फक्त रैनाच लढला! (लंडन डायरी)


लॉर्डसवरील कसोटीचा निकाल चौथ्याच दिवशी नक्की झाला होता. एकतर भारत हरणार किंवा सामना ड्रॉ राहणार हे स्पष्ट होते. पाचव्या दिवशी पराभवावर शिक्कामोर्तब झाले. चौथ्या डावामध्ये फलंदाजी करणे हे नेहमीच अवघड असते. त्यातही जर 458 धावांचे ओझे तुमच्या मानेवर असेल तर फलंदाजी करताना देव आठवणारच; मात्र जगातील सर्वात भक्कम फलंदाजी आणि कसोटी क्रमवारीतील क्रमांक एकच्या संघाकडून निदान प्रतिकार तरी होण्याची अपेक्षा होती. प्रत्यक्षात लक्ष्मणचा काहीसा आणि त्यानंतर रैना वगळता इतरांनी त्यांच्या लौकिकाला साजेसा खेळ केलाच नाही. त्यातही दैवाचे सगळे फासे भारताच्या विरोधातच पडले. एकतर गंभीर पूर्णतः तंदुरुस्त नसताना मैदानात उतरला आणि सचिन अंगात ताप असताना फलंदाजीला आला. त्यामुळे भारतीय फलंदाजीही डळमळली. कालच्या आश्‍वासक सुरवातीमुळे द्रविड आणि लक्ष्मण अखेरच्या दिवशीही भक्कम खेळी करतील ही अपेक्षा अँडरसनने मोडून काढली. पहिल्या डावात भारताचे वस्त्रहरण रोखणाऱ्या द्रविडला दुसऱ्या डावात फारशी संधीच मिळाली नाही. जखमी गंभीर मैदानात उतरला खरा पण कोपराच्या कळा सोसत त्याने कशीबशी 22 धावांची मजल मारली. त्यानंतर मात्र सचिन, लक्ष्मण, सचिन, धोनी, हरभजन यांना अँडरसन, ब्रॉड जोडगोळीने फारशी संधी दिली नाही. एकीकडे रैनाने नांगर टाकलेला असताना त्याला दुसऱ्या बाजूने पुरेशी साथच मिळाली नाही. त्याने ब्रॉड, अँडरसन, ट्रेमलेट स्वॉन यांचा मारा खेळून काढताना त्यांना चौकार लगावण्याचे धारीष्ट्यही दाखविले. या ऐतिहासीक सामन्यातील भारताचा पराभव आधी टाळण्याचा आणि नंतर लांबविण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. सराव सामन्यात शतक झळकवून लॉर्डस्‌वर खेळण्याची संधी मिळविलेल्या रैनाने दुसऱ्या डावामध्ये इंग्लंड गोलंदाजीचा कसून प्रतिकार केला. लढाऊ वृत्ती दाखवली. त्याने खेळपट्टीचा अंदा
ज घेऊन फलंदाजी केली. आक्रमक स्वभावाला पूर्णपणे मुरड घालून अत्यंत संयमाने फलंदाजी केली. 78 धावांच्या खेळीसाठी त्याने 136 चेंडू घेतले. तब्बल 207 मिनिटे त्याने किल्ला लढविण्याचा प्रयत्न केला. त्याच्या सोबत आणखी एक दोन मोठ्या भागीदारी झाल्या असत्या तर हा सामना भारतीय वाचवू शकले असते; मात्र प्रत्यक्ष मैदानात सायबांच्या गोलंदाजीने भारतीय फलंदाजीला खिंडार पाडले ते पाडलेच. एकटा रैनाच अखेरपर्यंत लढत राहिला. पहिल्या दिवसापासूनच अनेक बाबी भारतीय संघाच्या विरोधात गेल्या. झहीर जायबंदी झाला, गंभीर जखमी झाला, सचिन ताप अंगात असताना खेळला. तर गोलंदाजी करून काही प्रमाणात आपल्या गोलंदाजांना विश्रांती देण्याचा प्रयत्न करणारा कर्णधार धोनी फलंदाजी करताना दोन्ही डावांत सपशेल अपयशी ठरला. जिव्हारी लागला असला तरी या पराभवातून भारतीय संघ शिकेल आणि नॉटींगहॅममध्ये शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या कसोटीमध्ये पुन्हा नव्याने उभारी घेईल ही आशा आहे.

2 comments:

भानस said...

:( :(

पुढच्या कसोटीत चांगले खेळतील अशी आशा करुयात... :)

प्रसाद, तुझ्यामुळे काही चुकलेले डिटेल्स कळत आहेत. धन्यू रे! :)

prajkta said...

thank u.....so much