Friday, August 12, 2011

कुकने दिले धडे (इंग्लंड डायरी)


हिंदी सिनेमामध्ये पहिला चित्रपट सुपरडुपर हिट दिल्यानंतर अनेक हिरो गायब झाल्याची कितीतरी उदाहरणे आहेत. भारतीय क्रिकेट संघाची अवस्था सध्या तरी डिट्टो तशी झाली आहे. विश्‍वकरंडक जिंकल्यामुळे हिरो बनलेल्या भारतीय संघाबद्दल चाहत्यांच्या मनामध्ये अपेक्षांचा डोंगर उभा राहिलेला आहे. त्यात हा संघ कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावरील त्यामुळे तर यश मिळालेच पाहिजे अशी अपेक्षाही बाळगली जात आहे. प्रत्यक्षात इंग्लंड दौऱ्यात राहुल द्रविड वगळता एकाही भारतीय खेळाडूला त्याच्या लौकिकाला साजेशी कामगिरी मैदानावर दाखवण्यात यश आलेले नाही. दौऱ्याच्या सुरवातीपासून आजपर्यंत भारतीय संघाच्या बाजूने एक गोष्ट होईल तर शपथ. खेळाडू जायबंदी होण्याचा ससेमिरा, गोलंदाजांना मिळत नसलेले अपेक्षित यश आणि पूर्णपणे ढेपाळलेली फलंदाजी अशी केविलवाणी अवस्था संघाची झालेली आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यांत दणकून मार खाल्यानंतर भारतीय संघ "बाऊन्स बॅक' करेल अशी भाकिते वर्तविली जात होती, प्रत्यक्षात एजबस्टन कसोटीच्या पहिल्या दोन दिवसांत तरी "मागचे पाढे पंचावन्न' अशीच स्थिती आहे. पहिल्या दोन पराभवानंतर भारतीय संघ काही शिकलाय असे वाटत नाही, उलट भारतीय संघाचे मनोधैर्य पूर्णपणे खच्ची झाल्याचे मैदानावर सातत्याने दिसत आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यातही खराब फलंदाजीनंतर गोलंदाजांनाही ही खेळपट्टी समजलेली नाही. स्वैर गोलंदाजीचा पुरेपूर समचार साहेबांनी घेतला. विशेषतः ऍलिस्टर कुकने गेल्या दोन कसोटी सामन्यांतील अपयशाची पुरेपूर भरपाई करताना या सामन्यात भारतीय गोलंदाजीवर हुकुमत गाजवली. गेल्या वर्षभरातील कामगिरीवर त्याने चार चांद लावणारी खेळी केली. अर्थात त्यामध्ये त्याला मिळालेल्या जीवदानाचा वाटा मोठा आहे. त्याने उत्तम सलामीवीर कसा असतो याचा वस्तूपाठ गुरुवारी घालून दि
ला. त्याने स्ट्रॉससोबत आधी भक्कम भागिदारी केली आणि त्यानंतर पीटरसनसोबत संघाला आघाडीवर नेले. कारकिर्दीतील 19वे शतक झळकवताना त्याने दाखविलेली मॅच्युरिटी "काबीले तारीफ' अशीच होती. त्याने एकाही भारतीय गोलंदाजाला हुकुमत गाजवू दिली नाही. आक्रमण, बचाव आणि संधीचा लाभ कसा घ्यायचा असतो हे भारतीय फलंदाजांना दाखवून दिले. ज्या खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांनी लोटांगण घातले त्याच खेळपट्टीवर हा पठठ्या पाय रोवून उभा राहिला. त्याने आपली कामगिरी पार पाडताना संघाला दोनशेच्यावर आघाडी मिळवून देण्यात मोलाची कामगिरी बजावली आहेच. शिवाय संघाच्या विजयाचा पाया भक्कम करण्यात कोणतीही कसूर ठेवलेली नाही. आपल्या 182 धावांच्या खेळीत त्याने मैदानाच्या चौफेर धावांची वसुली केली. त्याच्या धडाक्‍यासमोर भारतीय गोलंदाज हतबलतेने गोलंदाजी करताना दिसत होते. भरीत भर म्हणून क्षेत्ररक्षकांनीही जेवढी म्हणून करता येईल तेवढी सुमार कामगिरी केली. कुकने भारतीय संघाच्या डोक्‍यावरील एक नंबरचा मुकुट काढून घ्यायला हात घातला आहे. हा सामना संपेल तेव्हा तोच मुकुट इंग्लंड संघाच्या डोक्‍यावर कदाचीत विराजमान झालेला असेल.

No comments: