Showing posts with label इंग्लंड डायरी. Show all posts
Showing posts with label इंग्लंड डायरी. Show all posts

Monday, August 22, 2011

नंबर वन...(इंग्लंड डायरी)


भारताचा इंग्लंड दौरा सुरू झाल्यानंतर जेव्हा शाब्दिक युद्ध छेडले, त्यावेळची गोष्ट. "या इंग्लंड दौऱ्यामध्ये भारतीय संघाच्या हाती फारसे काही लागणार नाही, उलट भारतीय संघाला नंबर एकचा किताब गमवावा लागेल, असे भाकित इंग्लंडचा माजी कर्णधार नासीर हुसेनने केले होते. त्यावेळी भारतीय संघाचे पाठिराखे त्याच्यावर तुटून पडले होते. हुसेनच्या डोक्‍यावर परिणाम झालेला आहे, असे म्हणण्यापर्यंत त्याच्यावर टीका झाली; पण नासीरने भविष्य पाहिले होते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्याने केलेल्या भविष्यवाणीला कोणत्याही प्रकारचा तडा जाणार नाही, अशा पद्धतीने भारतीय संघ खेळला. (अपवाद फक्त राहुल द्रविडचा. तो एकटाच लढला.) क्रिकेटच्या सर्व पातळ्यांवर स्ट्रॉसच्या संघाने धोनीच्या संघाला चारीमुंड्या चीत केले. भारतीय संघाला दुखापतीने घेरले, असे लंगडे समर्थन होऊ शकते; पण असे म्हणून इंग्लंडच्या खेळाडूंनी घेतलेल्या कष्टाला कमी लेखण्याचा अधिकार नक्कीच कोणाला नाही. इंग्लंड संघाने दौऱ्याच्या सुरवातीपासून अत्यंत योजनाबद्ध असा खेळ केला. चार कसोटी सामन्यांतील आठ डावांत त्यांनी भारतीय संघाला बाद केले. बरं, हे बाद करताना त्यांनी अखेरच्या कसोटीचा अपवाद (पहिल्या डावात 300 धावा केल्या होत्या.) वगळता तीनशे धावांचा टप्पा पार करू दिलाच नाही. भारताच्या दिग्गज फलंदाजांना त्यांनी पद्धतशीरपणे जखडून ठेवले. त्यांच्यावर उसळत्या चेंडूंचा मारा करतानाच हळूवारपणे चेंडू स्विंग करून भारतीय फलंदाजांना सेटच होऊ दिले नाही. राहुल द्रविडचा अपवाद वगळता एकाही खेळाडूला ब्रॉड, अँडरसन, ब्रॉस्नन आणि स्वॉन यांची तगडी गोलंदाजी खेळता आली नाही तसेच समजलीही नाही. या सर्व गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांचा अगदी बारकाईने अभ्यास करून गोलंदाजी केली. घरच्या मैदानांवर आणि जिवंत खेळपट्ट्यांवर त्यांना फा
यदा होणार, हे नक्कीच होते. भारतीय फलंदाजांना येथील चारही खेळपट्ट्यांना त्यांच्याच गोलंदाजांविरोधात फूस लावता आली नाही. द्रविडने खेळपट्ट्यांना आपल्या बाजूने वळविण्याचा केलेला प्रयत्न यशस्वी झाला. या खेळपट्ट्यांनी त्याच्या पदरात धावांचे माप अगदी पुरेपूर टाकले. सगळे सहकारी धडाधड पडत असताना या पठ्ठ्याने या खेळपट्ट्यांवर तीन शतकांसह 461 धावांचा रतीब घातलाच. बरं, प्रत्येक वेळी त्याने भारतीय संघाचा पराभव लांबविण्याचा कसोशीने प्रयत्न केला. त्याला पुढून साथच मिळाली नाही आणि पराभवाचे शिक्के बसत गेले.
फलंदाजीमध्येही पीटरसन, बेल, प्रायर, कुक यांनी कोणतीही कसूर बाकी ठेवली नाही. कुक, पीटरसन आणि बेलने भारतीय गोलंदाजांची शिकार करून द्विशतकांचे ताव मारले आणि तृप्तीचे ढेकर दिले. कमकुवत भारतीय गोलंदाजांना इंग्लंडच्या भक्कम फलंदाजीला संपूर्ण उद्‌ध्वस्त करण्यात फारसे यश मिळालेच नाही. इंग्लंडच्या सर्वच प्रमुख फलंदाजांनी धावांची लयलूट केली आणि नंबर एकचा मुकुट अगदी दिमाखाने आपल्या डोक्‍यावर चढविला. चारही सामने मोठ्या फरकाने जिंकणाऱ्या इंग्लंडने कसोटी क्रिकेटविश्‍वात आपणच नंबर एक आहोत, याची द्वाही फिरविली. खेळाच्या सर्वच आघाड्यांवर उत्तम कामगिरी करून नंबर एकच्या सिंहासनावर विराजमान होण्यासाठी लागणारे सर्व गुण दाखवून दिले. भारतीय क्रिकेट किती बेभरवशी आहे, हे जगासमोर उघडे केले. कर्णधार झाल्यापासून कसोटीमध्ये अपयश न पाहिलेल्या कर्णधार महेंद्रसिंग धोनीला प्रथमच मोठा पराभव पत्करावा लागला. यामधून सावरून तो नक्कीच बाऊन्स बॅक करेल, अशी आशा आहे; मात्र सद्या तरी इंग्लंडच्या रस्त्यांवर भारतावरील विजयाचा जल्लोष साहेब करत आहेत आणि त्यासाठी ते खरोखरच पात्र आहेत. भारतीय संघाने आत्मचिंतन करून वनडे मालिकेसाठी कम बॅक करावे, हीच अपेक्षा.

Saturday, August 20, 2011

धुलाई (इंग्लंड डायरी)


भारतीय संघाचे नष्टचक्र सुरूच आहे. शुक्रवारी पीटरसन (175) आणि इयान बेलने (नाबाद 181) भारतीय जखमांवर अक्षरशः मीठ चोळले. त्यांनी अर्धमेल्या भारतीय गोलंदाजीवर घणाघाती हल्ला केला आणि धावांची पुन्हा एकदा लयलुट केली. काही तरी चुकत आहे; पण नेमकं काय हे कर्णधार धोनीसह कोणालाच कळेनासे झाले आहे. खराब कामगिरी होऊ शकते याबद्दल कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही. पण एवढी वाईट कामगिरी गेल्या काही वर्षांत भारतीय संघाची झालेली नव्हती. पहिल्या पराभवानंतर भारतीय संघ "बाऊन्स बॅंक' करून सायबांसोबत दोन हात करेल या आशेचा पार चक्काचूर झाला. भारतीय संघ सपाटून मार खात आहे आणि सायबांचे फलंदाज भारतीय गोलंदाजीला धोपटून काढत आहेत. भारतीय संघाची अवस्था अक्षरशः गलीतगात्र झालेली आहे.
खेळामध्ये हारजीत नक्कीच असते; मात्र पराभवानंतर पेटून उठण्याची वृत्ती दाखविणेही गरजेचे असते. यापूर्वी भारतीय संघाने कितीतरी वेळा अशी वृत्ती दाखवून ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघांनाही नामोहरम केले आहे. ऑस्ट्रेलियाला पराभूत करता येते याचा वस्तूपाठ भारतीय संघानेच साऱ्या क्रिकेटजगताला घालून दिला. कित्येक सामन्यामध्ये अगदी बॅकफुटवरून येऊन अवघड विजय मिळवून दाखवून भारतीयांना जल्लोष करण्याची संधी याच भारतीय संघाने दिलेली आहे. मात्र सध्याचे खेळाडू जान नसल्याप्रमाणे मैदानात उतरताना दिसत आहेत. मैदानावरील त्यांचा वावरही गेल्या काही दिवसांत खांदे पाडूनच सुरू आहे. चौथ्या कसोटीमध्येही गेल्या तीन कसोटी सामन्यांतील अपयशाचा सिलसिला सुरूच राहिला. अवघे तीन गडी बाद होताना सायबांनी धावांचा डोंगर उभा केला. भारतीय संघाचा व्हाईटवॉश करण्याच्याच इराद्याने इंग्लंडचे फलंदाज मैदानात उतरल्याचे दिसते तर अब्रू कशी वाचवता येईल या विवंचनेत भारतीय गोलंदाज आहेत. कधी नव्हे एवढी भारतीय गोलंदाजी मोडून पडलेली आहे. बळीच मिळत नसल्याने त्यांचा आत्मविश्‍वासच गमावलेला आहे. हरभजन निष्प्रभ ठरला आणि कसोटीमधून बाहेर पडला. त्याच्या जागी आलेल्या मिश्राला अद्याप काहीही करामत दाखविता आलेली नाही. श्रीशांत, इशांत आणि आर. पी. सिंग यांना गोलंदाजीची लयच सापडलेली नाही. त्यांच्या गोलंदाजीमध्ये कोठेही आक्रमकता दिसत नाही आणि जेव्हा त्यांनी संधी निर्माण केल्या तेव्हा त्या क्षेत्ररक्षकांनी वाया घालविल्याचेही आपण पाहतो आहोत. गोलंदाजी, क्षेत्ररक्षणापाठोपाठ फलंदाजीतही खेळपट्टीवर नांगर टाकायची जिद्द कोणाचीच दिसत नाही. सर्वच आघाड्यांवर निष्प्रभ ठरणाऱ्या भारतीय संघावर निर्णायक घाव घालण्याच्या इराद्याने पीटरसन, बेल यांनी फलंदाजी करून संघाच्या नजरेच्या टप्प्यात यश आणून ठेवलेले आहे. शुक्रवारी त्यांनी कोणत्याही गोलंदाजाला दयामाया न दाखविता फोडून काढले आहे. शनिवारीही ते धावांचा डोंगर उभा करतील आणि उरलेल्या अडीच दिवसांत भारतीय संघाचे शिरकाण करण्याचा प्रयत्न करतील हे नक्की.

Thursday, August 18, 2011

शुक्‍लकाष्ठ सुरूच...


सायबांच्या भूमीवर उतरल्यापासून भारतीय संघाच्या पाठीमागे सुरू असलेले शुक्‍लकाष्ठ ओव्हलवरही कायम राहिले. सलग पराभवांमुळे गेलेली अब्रू काही प्रमाणात मिळविण्यासाठी गुरुवारी चौथ्या कसोटी सामन्यातून भारतीय संघ मैदानावर उतरला खरा पण, तो मैदानात उतरण्यापूर्वीच बऱ्यापैकी गोलंदाजी करणारा प्रवीणकुमार गमवावा लागला होता. या दुबळया गोलंदाजीचा समाचार घेत स्ट्रॉस आणि कुक यांनी संघाला नाबाद 75 धावांची सलामी दिली. पाऊस आला आणि दोन्ही संघांना पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. 75 धावांची सलामी देताना दोघांनीही भारतीय गोलंदाजीच्या सुमारपणावर शिक्कामोर्तब केले. पाऊस देवासारखा धावला आणि अब्रूच्या आणखी चिंध्या होण्यापूर्वी भारतीय संघ खांदे पाडून ड्रेसिंग रुममध्ये परतला. काहीच मनासारखं घडत नसल्याचे भाव त्या वेळी सर्वांच्या चेहऱ्यावर होते. सामन्यातील एक दिवस वाया गेल्यामुळे या सामन्यात यश मिळवून गेलेली पत मिळविण्याची संधीही काही प्रमाणात दुरावल्याचे दिसत आहे. शुक्रवारी गोलंदाजांची कामगिरी कशी होईल त्यावर भारतीय संघाचे यशापयश अवलंबून असेल.

Saturday, August 13, 2011

पायउतार...(इंग्लंड डायरी)


भारतीय क्रिकेटचं काहीतरी बिनसलं आहे हे नक्की. अति क्रिकेट, मिळणारा अतिपैसा, विश्‍वकरंडक विजेतेपदाचे डोक्‍यात गेलेलं यश, खेळाबद्दल खेळाडूंमध्ये असलेली बेफिकीरी आणि काही देणं घेणं नसल्यासारखा मैदानावरील वावर. या सगळ्यांचा परिपाक इंग्लंड दौऱ्यात दिसला आणि शनिवारी त्यावर कळस चढला. श्रीशांत बाद झाला आणि भारतीय संघ एक डाव 242 धावांनी पराभूत झाला. भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात लाजिरवाण्या पराभवापैकी एक पराभव नोंदला गेला. गेली दोन वर्षे भारतीय क्रिकेटच्या सुरू असलेल्या घोडदौडीला आज सायबांनी लगाम घातला.
जगातली सर्वात भक्कम फलंदाजी असणाऱ्या संघाचे बुरुज ब्रॉड, अँडरसन, ब्रॉस्नन यांनी एकापाठोपाठ उध्वस्त केले आणि कसोटी क्रिकेटच्या अव्वलस्थानाच्या सिंहासनावर हक्क सांगितला. क्रिकेटची मायभूमी गेली कित्येक वर्षे अव्वलस्थानाला पोरकी झाली होती. भारतीय संघाला एजबस्टनमध्ये नमवून सायबांनी हा मुकुट हिसकावून घेतला. भारतीय संघ अव्वस्थानावरून पायउतार झाला. गेल्या तिन्ही सामन्यांमध्ये इंग्लंड संघाने केलेली कामगिरी खरोखरच कौतुक करण्यासारखी आहे. त्यांच्या फलंदाजांनी वसुली केल्याप्रमाणे भारतीय संघाच्या गोलंदाजांना ठोकून काढले. धावांच्या राशी ओतल्या. भारतीय क्रिकेटने भविष्यात गोलंदाजीसाठी खास मेहनत घेतली पाहिजे हे वाजवून सांगितले. झहीरखानशिवाय भारतीय गोलंदाजी रांगल्याचं या दिवसांत पहावयास मिळालं. इतर गोलंदाजांना इंग्लंडच्या फलंदाजांना रोखणे जमलेच नाही. त्याच्याबरोबर उलट परिस्थिती इंग्लंड गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांची केली. पहिल्या दोन सामन्यात राहुल द्रविड आणि अखेरच्या सामन्यात कर्णधार धोनी वगळता एकाही भारतीय फलंदाजाला त्यांनी हुकुमत गाजवू दिली नाही. उलट प्रत्येक धाव घेण्यासाठी त्यांना कमालीचा घाम गाळण्यास भाग पाडले. क्रिकेटच्या देवाचे महाशतक हा क्रिकेटरसिकांमध्ये चेष्टेचा विषय बनला. एकाही सामन्यात त्याची बॅट बोलू दिली नाही. इतरांनाही त्यांनी फारशी करामत दाखवू दिलीच नाही. करामत दाखविण्यापूर्वीच त्यांनी आपल्या खेळपट्ट्यांना आपल्याच मुठीत ठेवले आणि त्यावर भारतीय फलंदाज अगदी टिपून बाद केले. येथील वातावरण, खेळपट्टी आणि हात-हात स्विंग होणारे चेंडू यांच्या चक्रव्युहातून भारतीय संघ बाहेर पडूच शकला नाही. भारतीय संघाचा तारणहार असा गाजावाजा करत बोलावलेला सेहवाग फलंदाजी विसरल्याप्रमाणे अखेरच्या कसोटी सामन्याच्या दोन्ही
डावांत खेळला. उभ्या उभ्या फटके मारण्याची त्याची सवय जाता जात नाही हेच खरे. त्यातही समोर जगातील सर्वोत्तम गोलंदाज आहेत हेही तो विसरला. परिणाम त्याला दोन्ही डावांत भोपळा फोडताच आला नाही आणि इतर फलंदाज प्रतिकार करण्यापूर्वी बाद होत गेले. त्यामध्ये नवा-जुना असा भेदच राहिला नाही. मोठी खेळी करून संघाला बाहेर काढायचे असते हेच बहुधा भारतीय संघ विसरला. झहीरमुळे लंगडी झालेल्या गोलंदाजीची धुरा प्रवीणकुमारने वाहण्याचा प्रयत्न केला खरा पण; त्याला दुसऱ्या बाजूने जरासुद्धा आश्‍वासक साथ मिळाली नाही. इशांत, श्रीशांत यांना खूप काही शिकावे लागणार हे या दौऱ्याने अधोरेखीत केले. गॅरी कर्स्टन यांनी प्रशिक्षकपदावर आल्यानंतर भारतीय संघाला क्रिकेटच्या सर्व प्रकारांत अव्वलस्थानी पोचविण्यासाठी मेहनत घेतली. यामध्ये सातत्य ठेवण्यात सध्यातरी डंकन फ्लेचर यांना अपयश आले आहे. गेलेली अब्रू आणि पत परत मिळविण्यासाठी त्यांना कंबर कसून कामाला लागावे लागेल हे नक्की.

Friday, August 12, 2011

पाऊले चालती पराभवाची वाट (इंग्लंड डायरी)


पूर्ण दोन दिवस, 180 षटके आणि नऊ खेळाडू शिल्लक. इंग्लंड दौऱ्यातील आत्तापर्यंतचा सर्वात मानहानीकारक पराभव टाळण्यासाठी आणखी 451 धावांचे डोक्‍यावर असलेले ओझे. "केविलवाणे' या शब्दाला लाजवेल अशी झालेली भारतीय संघाची अवस्था. ही कसोटी वाचविण्यासाठी काहीतरी चमत्कार व्हावा, अशीच सच्च्या क्रिकेटप्रेमींची अपेक्षा; पण चमत्कार करणार कोण? ज्याच्याकडून चमत्काराची अपेक्षा बाळगू शकतो, जो काही षटकांमध्ये सामन्याचा नूर बदलू शकतो तो वीरेंद्र सेहवाग पहिल्याच चेंडूवर बाद. बरं त्याला बाद होताना पाहिल्यानंतर क्‍लब क्रिकेटमधील खेळाडू जशा बालीश चुका करतात तशीच चूक करून त्याचं बाद होणं हे हृदयाचा ठोका चुकविणारं होतं. तो आला, पहिला चेंडू खेळला आणि बाद झाल्यानंतर मान खाली घालून परतला, हे साऱ्या क्रिकेटविश्‍वाने पाहिले. त्याला बाद करण्याचं श्रेय शंभर टक्के अँडरसनचे. सेहवाग काय चूक करू शकतो हे अचूक ध्यानी घेऊन त्याने चेंडू टाकला. सेहवागच्या बॅटजवळून चेंडू हळूवार बाहेर काढला आणि या सापळ्यात सेहवाग अलगद फसला. बाकीचं काम कर्णधार स्ट्रॉसनं स्लीपमध्ये केलं. भारतीय संघाच्या वर्मावर पहिला घाव घालण्यात साहेब यशस्वी झाले. दिवसभरात त्यांनी गंभीर आणि द्रविडवर दडपण राखण्यात यश मिळविले. भारतीय संघाचा पराभव अटळ आहेच. हा पराभव फक्त लहरी निसर्ग लांबवू शकतो जर तो पावसाच्या रुपात बरसला तर. सर्व फलंदाजांचा कस पाहणारी स्थिती येऊन ठेपलेली आहे. सर्व खेळाडूंनी मिळून ही परिस्थिती हाताळली, समजून उमजून फलंदाजी केली तरच काहीतरी होऊ शकतो अन्यथा...
त्यापूर्वी आज दिवसभरात पुन्हा एकदा भारतीय गोलंदाजीचा मनोभंग करत कुकने मॉर्गन (104) आणि ब्रेस्नन (53) यांच्या संगतीने आजची दिवसभराची परिस्थिती हाताळली. ज्या खेळपट्टीवर दिग्गज भारतीय फलंदाज गळपटले त्याच खेळपट्टीला वश करून घेऊन भारतीय संघाचं क्रमांक एकचं बिरुद हिसकावून घ्यायचंच या हेतूने कुकने आजही कालचाच कित्ता पुढे गिरवताना 294 धावांची खेळी साकारली. बिचाऱ्याचे त्रिशतक हुकले. सायबांच्या सर्वच यशस्वी फलंदाजांनी भारतीय गोलंदाजीचा पार लोळा गोळा करून टाकला. एकालाही लय मिळू दिली नाही की बळी मिळू दिले नाहीत. संघाला कॉंक्रीट स्थितीत पोचविण्याची एकही संधी त्यांनी सोडली नाही. हिरव्यागार आऊटफिल्डवर भारतीय क्षेत्ररक्षक चेंडू आणून गोलंदाजांकडे देण्याचे काम दिवसभर करत राहिले. काल दिवसभरात सोडलेल्या झेलांचे मोल किती मोठे होते हे कुक आणि मॉर्गनच्या खेळीवरून भारतीय खेळाडूंच्या लक्षात आलेच. दिवसभर घाम गाळल्यानंतर भारतीय गोलंदाजांना बळी मिळाले अवघे चार; मात्र तोपर्यंत धावांनी सातशेचा टप्पा ओलांडला होता. हरभजनसिंगच्या जागेवर मोठा गाजा-वाजा करत आलेल्या मिश्राची डाळ सायबांनी मुळी शिजूच दिली नाही. त्याचे चेंडू फिरक घेत होते; पण त्याला खेळण्यात इंग्लंडच्या फलंदाजांना फारशी अडचण आलीच नाही.
उद्या उपाहारापूर्वी सामन्याचा निकाल नक्की झालेला असणार आहे. भारतीय फलंदाज टिकून आणि टिच्चून खेळले तरच निभाव लागणार आहे, अन्यथा आणखी एक मानहानीकारक पराभव भाळी लिहिला जाणार हे नक्की.

कुकने दिले धडे (इंग्लंड डायरी)


हिंदी सिनेमामध्ये पहिला चित्रपट सुपरडुपर हिट दिल्यानंतर अनेक हिरो गायब झाल्याची कितीतरी उदाहरणे आहेत. भारतीय क्रिकेट संघाची अवस्था सध्या तरी डिट्टो तशी झाली आहे. विश्‍वकरंडक जिंकल्यामुळे हिरो बनलेल्या भारतीय संघाबद्दल चाहत्यांच्या मनामध्ये अपेक्षांचा डोंगर उभा राहिलेला आहे. त्यात हा संघ कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावरील त्यामुळे तर यश मिळालेच पाहिजे अशी अपेक्षाही बाळगली जात आहे. प्रत्यक्षात इंग्लंड दौऱ्यात राहुल द्रविड वगळता एकाही भारतीय खेळाडूला त्याच्या लौकिकाला साजेशी कामगिरी मैदानावर दाखवण्यात यश आलेले नाही. दौऱ्याच्या सुरवातीपासून आजपर्यंत भारतीय संघाच्या बाजूने एक गोष्ट होईल तर शपथ. खेळाडू जायबंदी होण्याचा ससेमिरा, गोलंदाजांना मिळत नसलेले अपेक्षित यश आणि पूर्णपणे ढेपाळलेली फलंदाजी अशी केविलवाणी अवस्था संघाची झालेली आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यांत दणकून मार खाल्यानंतर भारतीय संघ "बाऊन्स बॅक' करेल अशी भाकिते वर्तविली जात होती, प्रत्यक्षात एजबस्टन कसोटीच्या पहिल्या दोन दिवसांत तरी "मागचे पाढे पंचावन्न' अशीच स्थिती आहे. पहिल्या दोन पराभवानंतर भारतीय संघ काही शिकलाय असे वाटत नाही, उलट भारतीय संघाचे मनोधैर्य पूर्णपणे खच्ची झाल्याचे मैदानावर सातत्याने दिसत आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यातही खराब फलंदाजीनंतर गोलंदाजांनाही ही खेळपट्टी समजलेली नाही. स्वैर गोलंदाजीचा पुरेपूर समचार साहेबांनी घेतला. विशेषतः ऍलिस्टर कुकने गेल्या दोन कसोटी सामन्यांतील अपयशाची पुरेपूर भरपाई करताना या सामन्यात भारतीय गोलंदाजीवर हुकुमत गाजवली. गेल्या वर्षभरातील कामगिरीवर त्याने चार चांद लावणारी खेळी केली. अर्थात त्यामध्ये त्याला मिळालेल्या जीवदानाचा वाटा मोठा आहे. त्याने उत्तम सलामीवीर कसा असतो याचा वस्तूपाठ गुरुवारी घालून दि
ला. त्याने स्ट्रॉससोबत आधी भक्कम भागिदारी केली आणि त्यानंतर पीटरसनसोबत संघाला आघाडीवर नेले. कारकिर्दीतील 19वे शतक झळकवताना त्याने दाखविलेली मॅच्युरिटी "काबीले तारीफ' अशीच होती. त्याने एकाही भारतीय गोलंदाजाला हुकुमत गाजवू दिली नाही. आक्रमण, बचाव आणि संधीचा लाभ कसा घ्यायचा असतो हे भारतीय फलंदाजांना दाखवून दिले. ज्या खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांनी लोटांगण घातले त्याच खेळपट्टीवर हा पठठ्या पाय रोवून उभा राहिला. त्याने आपली कामगिरी पार पाडताना संघाला दोनशेच्यावर आघाडी मिळवून देण्यात मोलाची कामगिरी बजावली आहेच. शिवाय संघाच्या विजयाचा पाया भक्कम करण्यात कोणतीही कसूर ठेवलेली नाही. आपल्या 182 धावांच्या खेळीत त्याने मैदानाच्या चौफेर धावांची वसुली केली. त्याच्या धडाक्‍यासमोर भारतीय गोलंदाज हतबलतेने गोलंदाजी करताना दिसत होते. भरीत भर म्हणून क्षेत्ररक्षकांनीही जेवढी म्हणून करता येईल तेवढी सुमार कामगिरी केली. कुकने भारतीय संघाच्या डोक्‍यावरील एक नंबरचा मुकुट काढून घ्यायला हात घातला आहे. हा सामना संपेल तेव्हा तोच मुकुट इंग्लंड संघाच्या डोक्‍यावर कदाचीत विराजमान झालेला असेल.

Thursday, August 11, 2011

धोनी धावला...एकदाचा (इंग्लंड डायरी)


भारतीय क्रिकेट संघाची अवस्था वादळात सापडलेल्या नौकेसारखी सध्या झालेली आहे. इंग्लंडमधील वातावरण, तेथील खेळपट्ट्यांना भारतीय संघ नेमका कधी जुळवून घेणार याचे उत्तर दौरा निम्म्यावर आला तरी अद्याप मिळालेले नाही. तिसऱ्या कसोटीमध्ये भारताने कसाबसा दोनशे धावांचा टप्पा ओलांडला. मोठ्या गाजावाजा करत संघात दाखल झालेला सेहवाग शुन्यावर बाद झाला. (याबद्दल त्याला दोष देता येणार नाही, कारण त्यालाही खेळपट्टीसोबत जुळवून घ्यायला थोडा वेळ लागणारच) गंभीरची सुरवात झकास झाली पण पुन्हा एकदा तो मोठी खेळी उभारण्यात अपयशी ठरला. मग भिंत स्वस्तात ढासळली आणि व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण स्पेशल करण्यापूर्वीच परतला. महाशतकामुळेच गेले काही दिवस चर्चेत असलेला मास्टर ब्लास्टरने भोपळा फोडला पण त्यापेक्षा जास्त काही करण्यापूर्वी त्याची बॅट थंड करण्यात आली. रैनाची दैना याही सामन्यात संपली नाही आणि पाहता पाहता सहा फलंदाज शंभर धावांत तंबूत. ही अवस्था पाहिल्यानंतर एकवेळ भारतीय संघ दीडशे धावांचा टप्पा पाहील ही अपेक्षा चाहत्यांनी सोडून देऊन स्टॅंडमधून बाहेर पडायला सुरवातही केली; मात्र कसा कोण जाणे पण आज धोनी पेटला. दौऱ्यात प्रथमच त्याची बॅट मैदानावर चालली. "आक्रमण हाच उत्तम बचाव' हे सूत्र अंगीकारून धोनीने प्रवीणकुमारसह सायबांच्या गोलंदाजीवर हल्लाबोल केला आणि मग मात्र धावफलक वेगाने हलता झाला. धोनी दोन षटकार ठोकून मैदानात चैतन्य आणले. जो भारतीय संघ दीडशे धावांचा टप्पा गाठेल असे छातीठोकपणे सांगता येत नव्हते. त्या संघाने दोनशे धावांचा टप्पा ओलांडला तो धोनी आणि कुमारच्या धडाकेबाज खेळीमुळे. धोनीच्या खेळीमध्ये क्रिकेटमधील फारसे आदर्श फटके नव्हतेच पण तो खूप दिवसानंतर त्याच्या शैलीत खेळला आणि त्याच्या बॅटला धावांचा खुराक मिळाला. तो बाद झाला तेव्हा समोर त्याला ज
ोडीला फारशा आशा राहिलेल्या नव्हत्या; मात्र त्याच्या 77 धावांच्या खेळीने संघाची अब्रू काही प्रमाणात तरी झाकली. गेल्या काही सामन्यांत पूर्णतः सूर हरपलेल्या धोनीने बुधवारच्या खेळीने काही प्रमाणात पुन्हा एकदा लय पकडण्याचा प्रयत्न केला. गोलंदाजांनी गुरुवारी जर करामत दाखवली तर धोनीच्या 77 धावांचे मोल नक्कीच समजेल. तूर्त एवढेच म्हणता येईल. रथी-महारथींच्या बॅटा थंडावलेल्या असताना धोनीची बॅट तळपली. संघ अडचणीत असताना कर्णधाराने धावून जायचे असते, याला बुधवारी एकदाचा काही प्रमाणात का होईना न्याय दिला. आता इतर आघाड्यांवरही असाच आक्रमकपणा दाखवून भारतीय संघाची गेलेली पत, अब्रू काही प्रमाणात का होईना परत येऊ शकेल अर्थात त्याला इतर खेळाडूंचीही तेवढ्याच समरसतेने साथ मिळण्याची आवश्‍यकता आहे.

Saturday, July 30, 2011

बेभरवसा = भारतीय फलंदाजी (इंग्लंड डायरी)


भारतीय फलंदाजी आणि सलमान खान यांच्यामध्ये सर्वात मोठे साम्य कोणते असेल? दोघेही प्रचंड बेभरवशाचे. सलमान कधी शर्ट काढून सिक्‍स पॅक्‍स दाखवेल सांगता येत नाही आणि भारतीय फलंदाजी भक्कमपणे वाटचाल करत आहे, असे वाटत असताना कधी कोसळेल याचा नेम नाही. नॉटींगहॅमला दुसऱ्या कसोटीच्या शनिवारी दुसऱ्या दिवशी पहिल्या दोन सत्रांमध्ये इंग्लंड गोलंदाजीवर वर्चस्व गाजवून मोठी आघाडी मिळविण्याची स्वप्ने पाहणारी भारतीय फलंदाजी चहापानानंतर काही वेळात पत्त्याचा बंगल्याप्रमाणे कोसळली आणि पदरात पडली नाममात्र आघाडी. ज्या ब्रॉडला पहिल्या दोन सत्रांमध्ये द्रविड, लक्ष्मण आणि युवराज यांनी रट्टे दिले, त्या ब्रॉडची उधारी चुकती करायची असल्यासारख्या विकेटही टाकल्या. पाच बाद 267 धावा अशा भक्कम स्थितीतील संघ 288 मध्ये माघारी परतला होता. अवघ्या 21 धावांत पाच फलंदाज "तू आधी का मी आधी' अशा पद्धतीने भोंज्या शिवल्यासारखे मैदानावर जाऊन माघारी आले. फलंदाजीवेळी बॅट घेऊन आडवा आलेला ब्रॉड गोलंदाजी करताना अंगावर धाऊन आला. त्याला मग शिंगावर घेण्याची हिम्मत ना द्रविडला दाखवता आली ना युवराजला. रैना, सचिन, कर्णधार धोनी, हरभजन, प्रवीणकुमार आदींनी रजा पडू नये, म्हणून ज्याप्रमाणे मस्टरवर सही करून ऑफिसमध्ये उपस्थिती दाखवतात तशी येऊन हजेरी लावली. फलंदाजी केल्यासारखं दाखविलं आणि पुन्हा पॅव्हेलियनची वाट धरली. विक्रमादित्य सचिनचा बॅड पॅच शनिवारीही सुटला नाही. तो तिसऱ्यांदा ब्रॉडचा गिऱ्हाईक झाला. ब्रॉडने लॉर्डस्‌च्या खेळपट्टीप्रमाणे नॉटींगहॅमच्या खेळपट्टीलापण स्विंगचे अमिष दाखवून वश करून घेतले आणि कसोटी क्रिकेटमध्ये हॅटट्रीक नोंदविण्याची कामगिरी लिहिली. पडझड सुरू असताना खेळपट्टीवर नांगर टाकून शतक झळकावणारा आणि भारतीय फलंदाजीला आघाडीचा किनारा दाखविणाऱ्या राहुल द्रविडनेही (117)
आता बास झालं करत बॅट फिरवली आणि चेंडूने त्याला बरोबर गंडवले. संयम सुटला आणि त्याचा खेळ संपला. त्यापूर्वी त्याने युवराजबरोबर कामगिरी चोख बजावली खरी; पण अल्पसंतुष्टपणे त्याच्या माघारी जाण्याने या कसोटीवर वर्चस्वाची मोठी संधी भारताने गमावली ती गमावली. युवराजने अर्धशतकी (65) खेळी केली खरी पण अजूनही त्याला कसोटीसाठीचा संयम राखता येत नाही हे दिसून आले अर्थात ब्रॉडने त्याला टाकलेला चेंडूही तसाच अफलातून होता.
ज्या खेळपट्टीने वाकुल्या दाखविल्या त्याच खेळपट्टीला ब्रॉडने स्वींगने गुलाम बनविले. चेंडूला वेग देतानाच त्याने चेंडू फलंदाजाच्या बॅटपासून हळूच बाहेरही काढला. इनकटर आणि इनस्विंगचे शस्त्र त्याने वापरले आणि एकाच षटकात नाट्य घडवून भारतीय फलंदाजी कापून काढली. 46 धावांत सहा बळी घेत आपली भेदकता सिद्ध केली हे जसे खरे आहे, तसेच भारतीयांनी त्याच्या चेंडूचे अंदाज न घेता अत्यंत बेजबाबदार फटके मारले हे ही तितकेच खरे.

Friday, July 22, 2011

पीटरसन पेटला (इंग्लंड डायरी)


पहिल्या दिवशी खेळ करणारा पाऊस दुसऱ्या दिवशी खुपसा शहाण्यासारखा वागला आणि नेमका त्याच वेळी झहीरखान मैदानाबाहेर राहिला. या दोन्ही बाबींचा पुरेपूर फायदा साहेबांनी विशेषतः पीटरसनने उठविला आणि भारतीय गोलंदाजीविरुद्ध धावांचा वणवा पेटवला. काल सावधपणे खेळून खेळपट्टीचा आणि भारतीय गोलंदाजीचा अंदाज घेतलेला केवीन पीटरसन आज चांगलाच पेटला. त्याने झहीरशिवाय भारतीय गोलंदाजी कशी तकलादू आहे हे दाखवून दिले. आपल्या डावात त्याने "पलटी' शॉट्‌सही अगदी लिलया खेळले. त्याने ट्रॉट आणि प्रायर यांना जोडीला घेऊन संघाची धावांची भिंत अगदी भक्कम बांधली. दिवसभरात झालेल्या 347 पैकी 180 धावा एकट्या पीटरसनने फोडून काढल्या. सामन्या दरम्यान त्याच्यात आणि प्रवीणकुमारमध्ये थोडी नोकझोंक झाली; पण त्याचा परिणाम केविनने आपल्या खेळीवर होऊ दिला नाही. उलट शतक पूर्ण केल्यानंतर आणखी आक्रमक होत द्विशतकही पूर्ण करून त्याने ऐतिहासीक कसोटीसोबत आपले नावही कायमचे कोरले. यशस्वी ठरत असलेल्या प्रवीणकुमारसह भारताच्या सर्वच गोलंदाजांना त्याच्या झळीचा चटका बसलाच. त्याने एक षटकारासह 21 चेंडू सीमापार करताना लॉर्डस्‌च्या खेळपट्टीला आपले गुलाम केले. काल झहीरच्या गोलंदाजीच्या प्रेमात पडलेली खेळपट्टी आज ऊन लागताच बदलली आणि पीटरसनवर फिदा झाली. तिने पीटरसनला पूर्णपणे साथ दिली आणि धावांचा किल्ला बांधण्यास हातभार लावला. संपूर्ण दिवसभराच्या खेळात तो दोनदाच बाद होता होता वाचला. विशेष म्हणजे या वेळी गोलंदाज होता भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी. हे दोन अपवाद वगळता पीटरसनने आपला फलंदाजीचा क्‍लास लॉर्डस्‌वर उपस्थित क्रिकेटप्रेमींपुढे पेश केला. संपूर्ण दिवसभर फलंदाजी केल्यानंतरही त्याची शरीरभाषा सकारात्मक होती. सहकारी टप्प्या टप्प्याने पॅव्हेलियनमध्ये परतत असताना. त्याने खेळपट्टीवर भ
क्कम नांगर टाकला तो अखेरपर्यंत काढलाच नाही. कर्णधार स्ट्रॉसनेही त्याच्या द्विशतकाची वाट पाहिली आणि ते पूर्ण होताच डाव घोषित केला आणि मानवंदना स्वीकारत पीटरसन दिमाखात परतला.

धोनीच्या हाती चेंडू
लंचनंतर भारतीय खेळाडू जेव्हा मैदानात उतरले तेव्हा यष्टीरक्षकाचे ग्लोव्हज द्रविडच्या हातात दिसले तेव्हा धोनी गोलंदाजी करण्याचा प्रयोग करतोय काय असा प्रश्‍न पडला आणि त्याचे उत्तर लगेचच मिळाले. लंचनंतरची पहिले षटक टाकून धोनीने सगळ्यांनाच आश्‍चर्याचा धक्का दिला. एवढ्यावरच न थांबता त्याने सलग पाच षटके टाकून आपल्या मुख्य गोलंदाजांना काहीशी विश्रांती दिली. दुसऱ्या ओव्हरमध्ये तर त्याच्या गोलंदाजीवर चेंडू पीटरसनच्या बॅटच्या जवळून द्रविडच्या ग्लोव्हजमध्ये विसावल्यानंतर बिली बॉडेन यांनी झेलबाद दिले; मात्र पीटरसनने त्याविरुद्ध रिव्ह्यू मागितला आणि तेथे तो नाबाद ठरला. धोनीने गोलंदाजीवरही हात साफ करताना आठ षटके टाकली आणि धावा दिल्या 23.

Thursday, July 21, 2011

पाऊसच जास्त खेळला! (इंग्लंड डायरी)


छायाचित्र संकेतस्थळाच्या सौजन्याने
----------------
कसोटी क्रिकेटमधील दोन हजारावी कसोटी खेळण्याचे सुवर्णपान लिहिले जात असताना वरुणराजालाही आवेग अनावर झाला आणि तो मुक्तपणे धारांतून लॉर्डस्‌वर बरसला आणि ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार बनला. दिवसभर प्रत्यक्ष क्रिकेटच्या बरोबरीने त्यानेही मैदानावर खेळ मांडून गोलंदाजांसाठी पोषक वातावरण बनविले. या पोषक वातावरणाचा फायदा उठविण्यासाठी भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने टॉस जिंकून गोलंदाजी घेतली खरी; मात्र त्याचा फायदा झहीरखान वगळता इतर कोणालाही उचलता आला नाही. अर्थात त्यांनी प्रयत्न केलेच नाहीत असे नाही; पण बिचाऱ्यांना नशिबाची साथ काही लाभली नाही. प्रवीणकुमारचे चेंडू स्विंग झाले; मात्र त्याला खेळून काढण्यात साहेबांनी यश मिळविले; तर इशांतला त्यांनी खेळविले. इशांत प्रयत्नात कोणतीही कसूर करत नाही; पण आजचा दिवस त्याचा नव्हताच. हरभजनने सुरवातीपासूनच लय पकडून जोनाथन ट्रॉटला जाळ्यात अडकवण्याचा केलेला प्रयत्न अगदी थोडक्‍यात फसला. चेंडू द्रविडच्या हाताला लागून खाली पडला. त्यावेळी हरभजन द्रविडवर आणि द्रविड स्वतःवरच जाम वैतागलेला दिसला. एक संधी हुकल्याची खंत दोघांच्या चेहऱ्यावर उमटली. दुसरीकडे पहिल्या चेंडूपासूनच उत्तम लाईन आणि लेंथ पकडलेल्या झहीरखानने लॉर्डस्‌च्या खेळपट्टीला पहिल्या काही षटकांतच वश करून घेतले मग आधी कुकला आणि नंतर नेहमीचं गिऱ्हाईक असलेल्या स्ट्रॉसला बाद करून कर्णधाराचा विश्‍वास सार्थ ठरविला. त्या वेळी भारतीय संघ पहिल्याच दिवशी मजबूत पकड घेणार अशी हवा तयार झाली; मात्र ही हवा त्यानंतर पार विरून गेली.

स्ट्रॉसचा बळी पंचविसाव्या षटकात गेला आणि त्यानंतरच्या 24 षटकांत पीटरसन आणि दोनवेळा नशिबवान ठरलेल्या ट्रॉटने भारतीय गोलंदाजांना संधीच दिली नाही आणि धावांची भरही घातली. ट्रॉटला हरभजनच्या गोलंदाजीवर द्रविडने सोडल्या
नंतर झहीरच्या गोलंदाजीवरही पहिली स्लीप आणि यष्टीरक्षक यापैकी कोणी झेल घ्यायचा या संभ्रमात चेंडू सटकला. द्रविड आणि धोनी दोघेही चेंडू पकडण्यात अपेशी ठरले. यानंतरचा खेळ मात्र पीटरसन आणि ट्रॉटनेच केला. त्यांनी पावसाळी वातावरण इंग्लंडच्या पाठीराख्यांना आणखी बोचरे होऊ नये याची काळजी घेतली आणि डाव स्थिर केल्याचे समाधान दिले. ट्रॉटने अर्धशतकी खेळी करताना दोन जीवदानांचा पुरेपूर लाभ उठविला. प्रवीणकुमार, इशांत शर्मा आणि हरभजनने जाता जाता झटका देण्याचा केलेला प्रयत्न अपुरा पडलाच. चहापानाला खेळ थांबला आणि मग पुन्हा एकदा वरुणराजाने अस्तित्व दाखवताना मनसोक्त खेळ मांडला तो मांडलाच. आता उद्या भिस्त पुन्हा एकदा झहीरवरच, पण त्याला दुखापत झालीय. रात्रीत तो तंदुरुस्त व्हावा यासाठी धोनी देव पावसात न ठेवेल तर नवल.

Wednesday, July 20, 2011

क्रिकेट युद्धाला तोंड फुटणार


आज (ता. 21) सकाळी लॉर्डस्‌च्या हिरवळीवर भारत आणि इंग्लंड संघातील खेळाडू पाय ठेवतील तेव्हा क्रिकेटच्या इतिहासातील आणखी एक सुवर्णपान लिहिलं जाईल. 2 हजाराव्या कसोटीमध्ये वर्चस्वासाठी दोन्ही संघ आमने-सामने उभे ठाकतील तेव्हा या ऐतिहासिक घटनेसोबत धोनीब्रिगेड आणि स्ट्रॉस सेना आपसुक जोडली जाईल. सायबांना त्यांच्याच घरात पराभवाचे खडे चारण्यास धोनीसेना उत्सुक असताना प्रत्यक्ष लॉर्डस्‌वर उपस्थित राहून तसेच दूरचित्रवाणीच्या माध्यमातून कोट्यवधी क्रिकेटरसिक या क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतील.
15 ते 19 मार्च 1877 मध्ये पहिला कसोटी सामना खेळल्यानंतर गेली 144 वर्षे क्रिकेटच्या मैदानावरील हा सिलसिला अखंड सुरूच आहे. या प्रवासात क्रिकेटमध्ये आमुलाग्र बदल घडला असून आणि यापुढेही घडण्याची नांदी होऊ घातली आहे. कसोटी सामने दिवस-रात्र खेळविण्याविषयी गांभीर्याने चर्चा सुरू आहे. एकदिवसीय सामन्यांमुळे कसोटी क्रिकेटची लोकप्रियता काही प्रमाणात कमी झाली असली तरी गेल्या काही वर्षांत कसोटी सामने निकाली होऊ लागल्याने पुन्हा एकदा प्रेक्षक या सामन्यांकडे वळू लागला आहे. कसोटी खेळणे म्हणजेच क्रिकेट खेळणे ही भावना अद्यापही क्रिकेटपटूंमध्ये दृढ असल्याने कसोटी क्रिकेट जिवंत राहणार हे नक्की.
भारत आणि इंग्लंड यांच्यात शंभरावी लढत होत असताना इंग्लंड भूमीवर भारतीय संघाची कामगिरी म्हणावी तशी बहरलेली नाही. पंधरा लढतींपैकी अवघी एक लढत जिंकण्यात भारतीय संघ यशस्वी ठरला आहे, तर दहा पराभव पदरी पडलेत. तर 99 पैकी 19 लढतींमध्येच भारतीय संघ विजय मिळवू शकला आहे. इंग्लंडने 34 विजय मिळवताना 46 लढती अनिर्णित राखल्यात. सध्या भारतीय संघ कसोटी क्रमवारीमध्ये अव्वल स्थानी आहे. कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली इतिहास बदलण्यासाठी हा संघ उत्सुक आहे; मात्र स्ट्रॉसच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघाविरुद्ध त्यांच्याच मैदानावर खेळताना धोनीसेनेचा कस लागणार आहे हे नक्की.

लॉर्डसवर सचिन मोका साधणार?
ही कसोटी जशी ऐतिहासिक आहे. तसेच क्रिकेटच्या पंढरीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर कारकिर्दीतील शंभरावे शतक झळकावून मणिकांचन योग साधण्यात यशस्वी होणार का, याकडेही क्रिकेटरसिकांचे लक्ष लागलेले आहे. यापूर्वी या मैदानावरील त्याची कामगिरी जरी सुमार असली तरी हा भूतकाळ पुसून हा मोका साधण्याचा प्रयत्न सचिन नक्कीच करेल अशी आशा आहे.