Tuesday, March 29, 2011

पुन्हा आले डोळा पाणी!


"दमलेल्या बाबाची कहाणी...' हे गाणं साधारणपणे दोन वर्षांपूर्वी झालेल्या "आयुष्यावर बोलू काही'च्या पाचशेव्या भागामध्ये सलील आणि संदीप यांनी सादर केलं आणि पाहता पाहता अवघ्या मराठी मनाला "बाबा'ला वाटणारी काळजी अंगावर आली. समस्त बाबा लोकांनी त्यावेळी लपून-छपून का होईना रडली. त्यानंतर या गाण्याची पारायणं करत अनेक बाबांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. आईपुरतीच मर्यादीत राहिलेली "माया' संदीपने "बाबा'साठीही किती मोलाची आहे हे शब्दबद्ध केले आणि बाबा लोक भावनांना वाट मोकळी करून देऊ लागले. पहिल्यांदा झालेल्या या कार्यक्रमात ही कविता ऐकताना घराघरांतून बाबा लोक आपल्या लेकीसह रडले. बाबा आणि मुलीमधील असलेल्या नाजूक नात्यातला ओलावा, जिव्हाळा, माया, काळजी सगळं सगळं अगदी थेटपणे समोर आलं आणि काळजाला भिडलं. संदीपने लिहिलं अप्रतिम पण त्या जोडीला दोघांनी ते सादरही केलं अप्रतिम.
दोन वर्षानंतर जेव्हा "आयुष्यावर बोलू काही'चा भाग "साम'मराठीवरून 30 तारखेला प्रक्षेपीत झाला तेव्हाही दोन वर्षांपूर्वीचाच अनुभव अनेकांना आला. गाणं संपताना गालावरून ओघळलेल्या अश्रूंनी सलील-संदीपला दाद दिली. (गेल्या वर्षभरात अनेकांनी तो अनेकदा घेतला. हे गाणं म्हणजे त्यांच्या भावना मोकळ्या करण्याचं जणू साधनच बनलं) सातशेव्या भागातही दोघांनी ही कविता सादर करताना तेवढ्याच आर्तपणे सादर केली आणि उपस्थितांना पुन्हा एकदा विचार करायला भाग पाडलं, हे त्यांच्या सादरीकरणाचं शंभरनंबरी यश.
एवढ्या तेवढ्या कारणांनी वाद घालणारे, रुसवा धरणारे, इगो कुरवाळत आपल्या हाताशी असलेले सुंदर क्षण गमावणारे आपण किती करंटे आहोत. हे पुन्हा एकदा ही कविता ऐकताना जाणीव झाली. म्हणजे पहा..."लग्न ठरल्यावर कसे होईल...' या कल्पनेनं डोळ्यांच्या कडा भरून येतात आणि जवळ असताना आपण त्याची फारशी फिकीर करत नाही हा विरोधाभास आपण जपत राहतो. म्हणूनच मग संदीप-सलीलला मनापासून दाद द्यावी वाटते. त्यांच्यामुळे कोठेतरी माणूसपण जागं राहतं. काही क्षण का होईना आपल्याच प्रतिरुपासाठी डोळे ओलावतात. तिच्या भविष्याच्या काळजीने मन भरून येतं. काही क्षण काही होईना "मी' विसरतो, इगो बाजूला राहतो, प्रत्येकातील "बाबा' हुरहुरतो.

Monday, February 14, 2011

अखेरचा डाव!

बेल वाजली तिनं दार उघडलं ! धाप आवरत तो घरात आला. तिनं पटकन आत जाऊन पाण्याचा ग्लास आणला.
"तो' पाणी पित असताना तिनं खुणेनंच चहाविषयी विचारलं! त्यानं होकारार्थी मान हलविली.
आता त्याची धापही थांबली! त्यानं शर्ट काढला. तिथंच खुर्चीवर टाकला. त्याच खुर्चीवर रेलून पाय लांबविले आणि "ऐ मेरी जोहराजबी तुझे मालूम नही...' ची मस्त शीळ देत डोळे मिटले.
चहा घेतोस नं!
तिच्या हाकेनं तो भानावर आला. त्यानं कप घेतला आणि चहाचे घोट घेऊ लागला.
ती समोरच्या खुर्चीवर बसून चहा घेऊ लागली आणि त्याच्या "हॅपी मूड'मुळे सुखावली.
आजारपणामुळे त्याचं हास्य विरलंय हे तिला माहित होतं, त्यामुळेच त्याचा आजचा मूड पाहून तिला बरं वाटलं.
न राहवून तिनं विचारलंच,""आज एकदम मूड चेंज, काय भानगड?'
""ह्या, भानगड-बिनगड काहीही नाही! असंच! बरं पटकन आवर. बाहेर जायचंय. किशोरीच्या कार्यक्रमाची दोन तिकिटं आणलीत!''
तिच्या परवानगीची वाट न पाहता तो उठून आवरू लागला!
क्षणभर तिला काही कळेचना. तिनंही झटपट आवरलं! त्याला आवडणारी गुलाबी रंगाची साडी नेसून ती तयार झाली.
तिला पाहताच पुन्हा एकदा त्याच्या ओठांवर "ए मेरी जोहराजबी...'ची शीळ आलीच.
"चलायचं!
दोघेही रस्त्यावर आले. नेहमीप्रमाणे तिची पावलं बसस्टॉपकडे वळली, तोच "टॅक्‍सी' या त्याच्या हाकाऱ्याने ती उडालीच. आज टॅक्‍सी!
दोघे टॅक्‍सीत बसले! तिला आज तो नेहमीपेक्षा वेगळा-वेगळा भासला! आज त्याचा मूड एकदम कसा काय बदलला?
थिएटरच्या गेटसमोर टॅक्‍सी उभी राहिली आणि तिची विचारांची श्रृंखला खंडित झाली.
त्यानं टॅक्‍सीवाल्याला पैसे दिले. तिच्या हातात कार्यक्रमाची तिकिटे देऊन तिला पुढे जाण्यास सांगितले.
तिकिटं घेऊन ती अँपी थिएटरच्या पाठीमागील बाजूस गेली. समोर उभ्या स्वयंसेवकाच्या हातात तिकिटं दिली आणि बसण्याची जागा विचारली!
त्यानं तिकिटं हातात घेतली आणि मागून येण्याविषयी खुणावलं! ती पाठोपाठ चालू लागली. "किशोरी' मंचावर जेथे बसणार त्याच्या बरोबर समोर भारतीय बैठकीकडे त्या स्वयंसेवकाने खूण केली! काहीशी अवघडून ती त्या बैठकीवर जाऊ बसली! आत्तापर्यंतचे पाहिलेले सर्व कार्यक्रम थिएटरच्या शेवटच्या कोपऱ्यात बसूनच पाहिलेले असल्याने एकदम पहिल्या रांगेत जाऊन बसणे ही कल्पनाच ती करू शकत नव्हती आणि आत्ता तर खास बैठकीवर. तिचं लक्ष तिकिटांकडे गेलं. पहिल्या रांगेतील खास तिकिटे होती.
एवढ्यात तो ही आलाच!
""जरा तिकडं बघतेस!' असं म्हणून त्यानं तिच्या केसांत मोगऱ्याचा गजरा माळला.''
अपूर्वाईने मोहरलेल्या तिच्या श्‍वासांत मोगऱ्याचा गंध काठोकाठ भरला! ती त्याच्या चेहऱ्याकडे एकटक पाहू लागली.
तिची नजर चुकवत तो कार्यक्रम सुरू होण्याची वाट पाहू लागला!
तब्बलजीने तबला ठीक केला, तानपुऱ्यावरील मुलीनं तारांना ताण दिला. सतारीचे स्वर ठीक केले गेले आणि त्याच वेळी किशोरी मंचावर आल्या...
स्वरांच्या एकेक लडी उलगडल्या आणि मैफलीत रंग भरू लागला.
"जाईन विचारीत रानफुला...' किशोरींनी सुरू केलं आणि... वाह।।। च्या उत्स्फूर्त प्रतक्रिया उमटल्या!
त्यानंही तशीच दाद दिली. तल्लीन होऊन किशोरी ऐकत असताना त्यानं तिचा हात हातात घेतला आणि त्याच्या स्पर्शाचं गाणं तिच्याभोवती फेर धरून नाचू लागलं!
ती गाणं विसरली. भूतकाळात गेली. पाच वर्षांपूर्वी अखेरच्या स्टेजच्या कॅन्सरशी झगडत असताना "तो' आयुष्यात आला!
ंसह घरातील सर्वांनी जेव्हा आपल्याला दूर लोटलं तेव्हा त्याने आधार दिला. जगण्याची उमेद जागवली. वर्षभर सेवा केली! मरण लांबवलं! सहवासानं ओढ वाढली!
एक दिवस चहाला म्हणून रेस्टॉरंटमध्ये गेलो, तेथे लग्नाविषयी विचारलं! स्वतःविषयी सांगितलं! दोन मुलं अमेरिकेत! त्यांना बापाची गरज नाही. नातवंडांसाठी आजोबा अनोळखी. पत्नी दहा वर्षांपूर्वीच गेली! घरी एकटाच राहतो. कॅन्सरग्रस्तांच्या रुग्णालयात सेवाभावी वृत्तीनं काम करतो आणि आता आधाराची गरज आहे.
"नाही म्हणूच शकले नाही!'
सहजीवन नव्याने सुरू झालं. सुखाचे दिवस आल्याचं वाटत असताना "त्याला'ही ब्रेन ट्यूमर असल्याचं समजलं आणि आशेच्या पालवीने नव्याने फुललेल्या झाडाला दुःखाची वाळवी लागली! गेले वर्षभर दोघेही एकमेकांच्या आधाराने जगत अखेरच्या दिवसाची वाट पाहत असताना... आज अचानक?
टाळ्यांचा गजर झाला आणि तिची विचारमालिका भंगली.
दोघेही उठले...बाहेर आले...
त्यांच्या आवडीच्या रेस्टॉरंटमध्ये जेवले! तेथून बाहेर पडले आणि चालत चालत नदीकाठी आले.
नेहमीप्रमाणे अनेक जोड्या बसलेल्या.
दोघेही एका ठिकाणी बसले... बराच वेळ कोणीच काही बोलले नाही!
पाण्यावर उमटणाऱ्या तरंगावर चांदणप्रकाशाचा खेळ रंगलेला.
तिनं मौनाला बोलतं केलं!
"काय विशेष? स्वारी आज एकदम वेगळ्या मूडमध्ये...घरात शीळ घालून गाणं काय?, येताना टॅक्‍सी, मग "किशोरी' तीही पहिल्या रांगेत बसून...गजरा...रेस्टॉरंट आणि आता इथे... काय दोघांच्या मरणाची तारीख समजली की काय?
तो काहीच बोलला नाही! फक्त नदीकडे पाहत राहिला!
"बोल ना काही तरी! नाही तर जाऊ या घरी' म्हणून ती उठू लागली!
आता त्याचं मौन सुटलं! तो आश्‍वासक हसला!
हसतोस काय? आपण अवघ्या काही दिवसांचे पाहुणे आहोत हे विसरलास काय?
काहीही विसरलो नाही! असं म्हणत त्यानं शर्टाच्या आतून छानसा गुलाब आणि पाकीट काढलं आणि तिच्या हाती दिलं, म्हणाला, "हॅपी व्हॅलेंटाईन!'
आता तिला दिवसभराच्या त्याच्या वागण्याचा अर्थ उमगला! तिचे डोळे भरले! जाता जाताही तो आपल्याला आनंदाचे क्षण देतोच आहे! तिच्या तोंडून हुंदका बाहेर पडला!
बराच वेळ रडल्यानंतर तिनं डोळे पुसले आणि पाकीट फोडून पाहिले.
कसली तिकिटं आहेत?
"पुढच्या आठवड्यात आपण लंडनला जातोय!'
"कशाला?'
"दोघांवरही शस्त्रक्रिया करायची आहे. दोघांचेही कॅन्सर शेवटच्या स्टेजला असले तरी होप्स आहेत! मग निदान जाता जाता दोघांसाठी एक डाव खेळून बघायला काय हरकत आहे! त्याचीच ही गिफ्ट! हॅपी व्हॅलेंटाईन!
त्यानंतर दोघे कितीतरी वेळ भविष्याविषयी बोलत राहिले!

Tuesday, December 21, 2010

स्टॅंड लागलंय!

शीर्षक वाचून हा काय प्रकार? असा प्रश्‍न तुम्हाला नक्कीच पडला असेल. जरा थांबा खुलासा करतोच. त्याचं काय झालं परवा असाच बाईकवरून फेरफटका सुरू होता. ट्रॅफिकमधून वाट काढत निघालो होतो. एवढ्यात एक मोटरसायकलस्वार बाजूने पुढे निघून गेला, जरा घाईतच दिसला. त्याच्या पाठोपाठ एक सॅंट्रोवालाही पुढे गेला. दोन्हीही माझ्या अगदी नजरेसमोर. एवढ्यात सॅंट्रोवाल्याने गाडीचा वेग वाढविला आणि तो त्या मोटरसायकलस्वाराजवळ गेला आणि ओरडला,
भाईसाब स्टॅंड लागलंय!फ
मोटरसायकलस्वारानं खाली पाहिलं, मोटरसायकलचा वेग कमी केला. सराईतपणे स्टॅंड पायानं मागं ढकललं आणि सॅंट्रोवाल्याकडे पाहत अगदी मनापासून मान हलवून आभार मानून निघूनही गेला. त्याच्या आभार मानण्याने सॅंट्रोवाल्याच्या चेहऱ्यावर छानशी स्उिमटली आणि तोही त्याच्या मार्गे रवाना झाला.
बाब अगदी साधी पण मला खात्री आहे, आपणही अनेकदा असा प्रसंग पाहिलेला असेल. आपल्यापैकी काहींनी अनुभवलाही असेल. आपण कित्येकदा विसरतो तसंच हा मोटरसायकलस्वार कोठे तरी उभा राहिला असणार आणि त्यानंतर गाडीला कीक मारून सुसाट निघाला असणार. गडबडीत स्टॅंड काढायचं राहिलं असणार. नेमकं हेच त्या सॅंट्रोवाल्याच्या लक्षात आलं आणि तो पटकन मोटरसायकलस्वाराला धोसुचना देऊन मोकळा झाला.
मला प्रश्‍न पडला त्या सॅंट्रोवाल्यानं हे का सांगितलं? त्याचा काय संबंध? त्या मोटरसायकलस्वाराचं आणि त्याचं नातं काय? समजा त्या तशा स्टॅंडमुळे तो मोटरसायकलस्वार पडला असता, त्याला काही दुखापत झाली असती तरी त्या सॅंट्रोवाल्याचं काहीही बिघडलं नसतं किंवा त्याचं काही नुकसानही झालं नसतं. जे काही नुकसान झालं असतं ते मोटरसायकलस्वाराचं; पण...
दोस्तांनो हा पणफच इथं खूप महत्त्वाचा आहे. त्या सॅंट्रोवाल्याच्या साध्या कृतीनं माणुसकीचा झरा वाहता आहे, तो अद्याप आटलेला नाही हे अधोरेखीत झालं. लागलेल्या स्टॅंडमुळे तो मोटरसायकलस्वार पडेल आणि त्याला काही तरी इजा होईल, ही काळजी वाटल्याने सॅंट्रोवाल्याने त्याला तातडीनं सांगितलं. त्याच्यातल्या माणुसकीनं त्याला साद घालून तातडीनं व्यक्त होण्यास भाग पाडलं आणि कदाचित होऊ घातलेला एक अपघात, एखाद्या कुटुंबावर होणारा आघात टळला.
तर दुसरीकडे च्या बीजाची एका ह्रदयातून दुसऱ्या ह्रदयात आपसूक पेरणी झाली. धोका असताना दुसऱ्याला सावधान करण्याची साधी माणुसकी जपली पाहिजे हा संदेश एकाकडून दुसऱ्याकडे अगदी अलवारपणे पोचला. मला खात्री आहे आता पुन्हा तो मोटरसायकलस्वार दुसऱ्या कुणाच्या गाडीचे स्टॅंड लागलेलं दिसेल तेव्हा तातडीनं त्याला त्याबाबत सांगेल कारण आता तो मोटरसायकलस्वार या वाहत्या झऱ्यातील एक धार बनला आहे. त्याच्या परीने तो जेव्हा जेव्हा वेळ येईल तेव्हा हा झरा अखंड वाहता राहण्यासाठी प्रयत्नशील राहील.
या आणि अशा छोट्या-छोट्या बाबींमुळेच जगाचे रहाटगाडगे काहीसे व्यवस्थीत सुरू आहे. नाहीतर आजूबाजूला पाहिलं तर फारसं सुखावह चित्र दिसतच नाही; मग अशावेळी असे काहीसे निर्मळ झरे नजरेला पडतात आणि आपल्या पावित्र्याने आपल्यालाही त्याचा एक भाग बनण्यासाठी साद घालतात. मी ठरवलं आहे या सादेला प्रतिसाद देण्याचं!... तुम्ही?

Tuesday, December 14, 2010

सैर माडबनची


ही वाट दूर जाते... स्वप्नामधील गावा...
जैतापूरला अणुऊर्जा प्रकल्प होण्याचे नक्की काय झालं आणि "माडबन' साऱ्या जगभर प्रकाशझोतात आलं. कारण हा प्रकल्प होणार आहे माडबनच्या हद्दीमध्ये. कोकणातील टिपीकल छोटंसं खेडं असलेल्या माडबन आणि परिसरावर निसर्गानं सौंदर्याची अगदी मुक्त हस्ते उधळण केलेली आहे. माडबनच्या किनाऱ्यावरून पश्‍चिमेकडे समुद्राच्या लाटांशी झुंजणारा विजयदुर्ग पहावयास मिळतो. तर येथील समुद्र किनाऱ्याला असलेल्या सुरूच्या बनातूनच किनाऱ्यावर छोट्याशा पायवाटेच्या साथीने येता येते. पायवाट संपून जेव्हा आपण किनाऱ्यावर पोचतो तेव्हा आपले स्वागत स्वच्छ, शांत, सुरक्षीत मऊशार वाळूंचा किनारा करतो. या वाळूच्या अंगणात ठिकठिकाणी खेकड्यांनी रेखाटलेली नक्षी पहावयास मिळते. छोट्या छिद्रांभोवती रेखलेली ही नक्षी पाहण्याची मौज काही औरच. शांतपणे काठावर बसून पहात राहिलं तरी आपल्या डोळ्यांदेखत अशा नक्षी उमटून येताना पहावयास मिळते. तुरूतुरू धावणारे लहान-मोठे खेकडे या वाळूवर एकसे एक नक्षी रेखाटतात आणि त्यांच्या कलाकारीला दाद दिल्याशिवाय राहवत नाही. साधारण किलोमीटरभर लांबीच्या या किनाऱ्यावर अगदी निर्धोकपणे फिरण्याचा आनंद घेता येतो, तर कंबरेएवढ्या पाण्यात जाताना कसलीही भीती वाटत नाही. येथील पाण्याला तुलनेत ओढ कमी असल्यामुळे अगदी बिनधास्त पाण्यात फिरता येते; मात्र सोबत गावातील कोणीतरी असणं आवश्‍यक आहेच बरं. जर वातावरण स्वच्छ असेल तर विजदुर्ग किल्ल्याच्या परिसरातील हालचालीही आपण सहज पाहू शकतो.
साधारण साडेसातशे लोकसंख्या असलेलं माडबन टिपीकल कोकणी गाव. चिऱ्यातील घरे, त्यावर कौलारू छत, अंगणात आणि परसात माड, सुपारी, आंबा, काजू, रातांब्याची झाडे. स्वच्छ अंगण आणि प्रत्येक अंगणाला चिऱ्याच्या भिंतीचे कुंपण, त्याला लावलेला कुडाचा दरवाजा. गावाला लागूनच असलेली भाताची खाचरे. त्यातल्या त्यात सधन घरापुढे उभ्या गाड्या. भगवतीचे सुरेख मंदिर आणि तिची तेवढीच सुंदर, सुबक मूर्ती. उतारावरून गावात आल्यानंतर साऱ्या जगाशी कसलाही संपर्क नसलेलं सुंदर देखणं गाव. यावं प्रेमात पडावं आणि येथील होऊन जावं असं मनात रुतून बसणारं माडबन. (सध्या जैतापूर अणूऊर्जा प्रकल्पविरोधातील हालचालींचे प्रमुख केंद्र बनल्याने गाव शांतता हरवून बसले आहे)

हे आहे खेकड्याचे घर

खेकड्यांनी मिळून नक्षी काढून सजवलेला रुपेरी वाळूचा किनारा

हा सागरी किनारा...

कोकणातलं टिपीकल घर आपुलकीनं बोलावणारं

Thursday, November 11, 2010

मोगरा फुलला


टेरेसचा दरवाजा उघडून सवयीप्रमाणे दूरवर दिसणाऱ्या पन्हाळ्याच्या डोंगररांगेकडे पाहिले तर धुक्‍याच्या पडद्याआड ती हरवून गेलेली; पण वातावरण एकमद मस्त. माझ्याभोवतीही धुक्‍याचे काही कण रेंगाळत-रेंगाळत पुढे चाललेले. त्याच्या स्नेहार्द स्पर्शाने सकाळ आणखीनच प्रसन्न झाली. नेमका हाच मोका साधून मोगऱ्याच्या हळूवार गंधाने नाकाशी येऊन साद घातली. डोळे आपोआप वळले मोगऱ्याच्या कुंडीकडे तर हिरव्याकंच पानांच्या पार्श्‍वभूमीवर पांढऱ्या शुभ्र शलाका उमटून आलेल्या. वाऱ्याच्या मंद झुळकीशी मस्तपैकी खेळत असलेल्या. पाच टप्पोऱ्या शलाका.
वर्षभरापूर्वी लावलेला मोगरीचा वेल त्याच्या वकुबानुसार फुलला. माझे प्रयत्न सुरूच होते; पण या वेलीचं वैशिष्ट्य असं की हिला नवी फांदी फुटली की पहिल्यांदा त्यावर कळी डोले आणि मगच फांदी वाढे. बरं कुंडीतली वेल ती कितीशी वाढणार? तिला फारसं बाळसं नाही; मात्र असलेल्या चार पाच छोट्याश्‍या फांद्यांवरही सातत्याने फुले उमललीच. परवा मात्र या वेलीनं एकाच दिवशी चक्क ओंजळभर फुलांचं दान आम्हाला दिलं; मग मात्र मोह आवरला नाही. आमच्या मित्रवर्यांना आमंत्रित करून छानसं फोटो सेशन उरकलं. (आमचं त्याबाबतीतल ज्ञान जरा तुटपुंजंच आहे) आमच्या कुटुंबानेही त्यादिवशी समजुतदारपणा दाखवताना या फुलांचा वेलीवरच डोलण्याचा आनंद मुळीच हिरावून घेतला नाही, त्यामुळे संपूर्ण दिवस या शुभ्र शलाकांच्या सुगंधाने घराचा परिसर भरून राहिला.

Thursday, November 4, 2010

स्वागतिका


आश्‍विन महिन्याला सोबतीला घेऊन धुक्‍यासोबत हातात हात घालून थंडीचे आगमन होतं आणि पांढुरक्‍या धुक्‍याची दुलई साऱ्या सृष्टीवर अलगद पांघरली जाते. सारे चराचर दबबिंदूंचे कण टिपून घेण्यासाठी उतावीळ असते. पाऊस पिलेला निसर्गही थंडीचे अमृत पिण्यासाठी आसुसलेला असतो. खळ्यावरून घराच्या अंगणात आलेल्या समृद्धीच्या सोन्यामुळे बळिराजाही मनोमन आनंदलेला असतो. नोकरदारांच्या हातात खुळखुळणारा ज्यादाचा पैसा सुखाची सोबत करतो. मनामनांचे गाभारे आनंदाच्या दीपोत्सवाने उजळून निघालेले असतात. नव्या नवलाईमुळे घराघरांतून आनंदाचे दीप प्रकाशमान होऊन सुखाच्या रेशीमलडी उलगडतात. हे रेशीम आणखी चमकदार बनविण्यासाठी दिवाळी येते. अशा वेळी पहाटे गाणं कानावर पडतं ...
उठी श्रीरामा पहाट झाली...
पूर्व दिशा उजळली...
उभी घेऊनी कलश दुधाचा
कौसल्या माऊली!
आणि दिवाळीची जाणीव भोवती रुंजी घालू लागते. भल्या पहाटे काकणभरले हात अंगणावरून फिरू लागतात आणि पाहता-पाहता सारे अंगण सजीव होतं, आपल्याशी बोलू लागतं. सारवलेल्या, स्वच्छ अंगणात किणकिण नाद येऊ लागतो आणि एक-एक नक्षी उमटून येऊ लागते. बोटांच्या चिमटीतून लोभस, गहिरे, मनाचा ठाव घेणारे, रंगबिरंगी रंग एकापाठोपाठ एक धरतीशी नातं जोडू लागतात आणि नक्षीची सुरेल मैफल आकार घेऊ लागते. त्या किणकिणणाऱ्या हातांची नजाकतभरी हालचाल एखाद्या चतुरस्त्र चित्रकाराची आठवण करून देतात. (तशी रांगोळी रेखणारी "ती' यजमानांच्या आयुष्यात रंग भरणारी चित्रकारच असते) रांगोळीची शुभचिन्हे गंधभरल्या अंगणावर झर-झर उतरतात आणि सारा माहौल बदलून जातो. कधी हा माहौल ठिपक्‍यांतून बोलतो, तर कधी त्यातील नक्षी तुमच्यासोबत संवादाचा पूल बांधते. कित्येक ठिकाणी फुलांच्या पाकळ्याही सोबतीला येऊन रांगोळीची श्रीमंती अधिक वाढवितात. दिवाळीसाठी घरोघरी येणारी लक्ष्मी अंगणातून प्रसन्न होऊन यावी आणि आपल्या घरीच तिने राहावे, या साठीची ही तयारी.
गारगोटीच्या चुऱ्यापासून बनविलेली पांढरीशुभ्र रांगोळी आणि रंगांची सोबत यांमुळे रांगोळी रेखलेले अंगण, येणाऱ्या प्रत्येकाशी आपसुक संवाद साधते. एरव्ही देव्हारा, तुळशीवृंदावन, जेवणाच्या ताटाभोवती रेखली जाणारी रांगोळी ऐन दिवाळीत मात्र साऱ्या अंगणाची आणि घराची शोभा अगदी काठोकाठ वाढवतं. रंगांच्या या ओळी पवित्रतेचे प्रतीक मानल्या जातात आणि म्हणूनच त्या घराघरांत रेखल्या जातात. सारं अंगण सजिव करून टाकणारी ही रांगोळी असते फक्त गारगोटीचा चुरा पण ती रेखतानाची भावना चैतन्य निर्माण करते. ही रांगोळी बंगालमध्येअल्पना म्हणून, बिहारमध्ये ती अरिपना म्हणून, राजस्थानात मांडना म्हणून, तर दक्षिण भारतात ती कोलाम म्हणून भेटते. केरळात ती पाकल्लम म्हणून समोर येते. महाराष्ट्राशिवाय इतरत्र रांगोळीसाठी तांदळाचे पीठ, फुले, फुलांच्या पाकळ्या, विटकरीचे तुकडे, नैसर्गिक रंग यांचाही उपयोग करतात; तर दक्षिणेत फुलांचा उपयोगाने रांगोळ्यांच्या पायघड्या, गालीचे अंथरले जातात; मात्र गारगोटीचा चुरा आणि रंग हे मात्र कॉमनच.
चिमटीतून सारं भावविश्‍व साकारण्याची किमया साधणारी रांगोळी मनांचा ठाव घेते आणि समृद्धीचा आनंदोत्सव साजरा करण्याचा पवित्र भाव साऱ्या अंगणभर मिरवते, सारा भवताला आनंदी, पवित्र बनवून स्वागतिका बनते.

Saturday, October 30, 2010

ती दोघं

सिग्नल लागला आणि त्यानं गाडी उभी केली. उन्हाच्या तडाख्याने तो जाम वैतागला होता. हातातलं काम उरकून केव्हा एकदा ऑफिसच्या एसीमध्ये शिरतोय असं त्याला झालेलं; पण अजून दोन तास तरी त्याला उन्हात फिरावेच लागणार होते. तो दीड मिनिटे संपण्याची वाट पाहू लागला. टळटळीत उन्हातला प्रत्येक सेकंद त्याला शिक्षा वाटत होती.
"सालं काय आपलं नशिब! दिवसभर वणवण फिरा, क्‍लायंटना कन्व्हीन्स करा. जास्तीत जास्त बिझनेस होण्यासाठी प्रयत्न करा. बॉसपुढं रेकॉर्ड चोख राहील म्हणून धडपडा. करीयर ग्राफ वाढता रहावा, जास्त पैसा मिळावा म्हणून धडपडा. घरतल्यांच्या आनंदासाठी उन्हा-तान्हात हिंडा. चेहरा काळवंडून जातो. संध्याकाळी जीव नकोसा होतो. तरी बरं पैसे बरे सुटतात, नाहीतर...'
खण-खण आवाजाने त्याची विचारांची तंद्री भंगली. त्यानं आवाजाच्या दिशेने नजर टाकली.
फाटके कपडे घातलेली दोन पोरं जीव खाऊन खाली पडलेल्या सिमेंटच्या पिलरवर हातोड्याने घाव घालत होती.
"काय पोरं आहेत! उन्हा-तान्हात कशाला खेळत असतील? असा प्रश्‍न त्याच्या डोक्‍यात वळवळला.
तेवढ्यात पाठीमागून कर्कश्‍श हॉर्न वाजला आणि त्याची विचारांची तंद्री भंगली. सिग्नल सुटला होता. त्यानं किक मारली आणि वाहनांच्या गर्दीतून वाहून जाऊ लागला.
----
तासाभराचे काम आटोपून तो पुन्हा मघाच्याच चौकात आला आणि पुन्हा सिग्नल लागला. आता तो स्वतःवरच वैतागला. दीड मिनिटे पुन्हा रणरणत्या उन्हाची शिक्षा. पुन्हा घाम, चिक-चिक. वैताग साला! एवढ्यात त्याच्या कानावर पुन्हा खण-खण आवाज आला. त्याचे लक्ष तिकडं गेलं. मघाची तीच पोरं जीव खाऊन त्याच पिलरवर हातोड्याने घाव घालत होती.
आता त्याचे कुतुहल जागे झाले. त्याने गाडी वळविली आणि तो त्या पोरांच्या बाजूला जाऊन उभा राहिला.
"काय करताय रे पोरानो?'
त्याच्या प्रश्‍नाने ती पोरं दचकली. त्यांचे हातोडे थांबले. चेहऱ्यावर अनामिक भीती तरळली.
"काही नाही...काही नाही! आम्ही आपलं हे...' असं म्हणून ती पोरं अडखळली.
"अरे घाबरू नका, उन्हा-तान्हात काय खेळताय हे बघायला मी आलोय बाकी काही नाही'
"हात तुझं! असं म्हणून त्यातल्या एकानं पुन्हा हातोडा सरसावला आणि खाणकन पिलरवर घाव घातला.'
दुसरा त्याच्या तोंडाकडं बघत म्हणाला, ""साहेब खेळत नाय काय, या पिलरमधनं लोखंडाचं तुकडं काडतुय.''
"लोखंडाचे तुकडे? आणि त्याचं काय करता?'
"ओ साहेब जाऊ द्या नां! ए वश्‍या आटप लवकर. उगच नको बोलत बसू. त्यांना न्हाई काम. तू मार फटके.'
दुसरा म्हणाला,"" साहेब जावा तुम्ही ह्यो शिवज्या न्हाई शाना, उगीच काय तरी बोलंल तुम्हाला जावा तुम्ही.'
""अरे पण तुम्ही उन्हा-तान्हात या पिलरमधून लोखंडाचे तुकडे का काढत बसलाय? आणि तुम्हाला शाळा नाही?''
""शाळा आणि आमी, काय साहेब चेष्टा करताय काय गरिबाची? आवं हिथ दोन येळचं जेवण मिळावं म्हनून आख्खा दिस उन्हा-तान्हात घालवावा लागतूय. आसं पडक्‍या ठिकाणचं सिमेंटची दगडं, पिलर हुडकायची, दिवसभर हाताला फोड येईस्तवर फोडून त्यातनं लोखंड काढायचं. राती भंगारचं दुकान बंद व्हायच्या आत तिथं जायाचं. फोडून काढलेलं लोखंडाचं तुकडं तिथं द्यायचं. त्याचं वजन करायचं. पाच-पंचवीस रुपये मिळतात. ते घ्यायचं आनी घर गाठायचं. साला तो भंगारवाला त्यात पण काटा मारतोय, पण करणार काय? गुमान दिल ते पैसे घ्यायचं. पैसं आसलं, तर आई घरात घेती, नायतर बोंब मारती. शिव्या घालती''
""का?'' आता त्याची छाती भरून आली. दाटलेल्या आवाजात न राहवून त्यानं मध्येच प्रश्‍न विचारला.
""सावत्र हाय न्हवं! बाचा पत्त्या नाय; पण घरात ठिऊन घेतीया हेच लय झालं. ती पण काय करणार म्हणा. ती चार घरची धुणी भांडी करती. आणखी दोन भनी हायेत. पाच जणांच्या पोटाची खळगी तिला भरायची हाईत. दोनी पोरींना उजवायचं हाय. मग आमी नाय पैसै मिळवायचं तर कुनी, तुमीच सांगा सायेब?''
त्याचं लक्ष दोघांच्या हाताकडं गेलं. हात पार सोलवटून निघालेले; पण डोळ्यात जगण्याची चमक आणि दोन पैसै मिळवायची धमक स्पष्ट.
""आपल्याला जरा ऊन लागलं तर मघाशी आपण स्वतःवरच चरफडलो आणि ही पोरं...
त्याचे डोळे भरले. त्यानं पाकिट काढलं हाताला लागतील तेवढे पैसै घेतले आणि त्या पोराच्या सोलवटलेल्या हातावर ठेवले. दोघांच्याही डोक्‍यावरून हात फिरवला आणि काहीही न बोलता गाडीला कीक मारली.''
""पोरांचे डोळे चमकले. ऊन थंड वाटू लागलं, हातात आणखी बळं आलं. त्यांनी आणखी जोमाने हातोड्याचे घाव घालायला सुरवात केली. आज पोटभर अन्न मिळणार याची त्यांना मनोमन खात्री पटली होती.''