Friday, August 12, 2011

पाऊले चालती पराभवाची वाट (इंग्लंड डायरी)


पूर्ण दोन दिवस, 180 षटके आणि नऊ खेळाडू शिल्लक. इंग्लंड दौऱ्यातील आत्तापर्यंतचा सर्वात मानहानीकारक पराभव टाळण्यासाठी आणखी 451 धावांचे डोक्‍यावर असलेले ओझे. "केविलवाणे' या शब्दाला लाजवेल अशी झालेली भारतीय संघाची अवस्था. ही कसोटी वाचविण्यासाठी काहीतरी चमत्कार व्हावा, अशीच सच्च्या क्रिकेटप्रेमींची अपेक्षा; पण चमत्कार करणार कोण? ज्याच्याकडून चमत्काराची अपेक्षा बाळगू शकतो, जो काही षटकांमध्ये सामन्याचा नूर बदलू शकतो तो वीरेंद्र सेहवाग पहिल्याच चेंडूवर बाद. बरं त्याला बाद होताना पाहिल्यानंतर क्‍लब क्रिकेटमधील खेळाडू जशा बालीश चुका करतात तशीच चूक करून त्याचं बाद होणं हे हृदयाचा ठोका चुकविणारं होतं. तो आला, पहिला चेंडू खेळला आणि बाद झाल्यानंतर मान खाली घालून परतला, हे साऱ्या क्रिकेटविश्‍वाने पाहिले. त्याला बाद करण्याचं श्रेय शंभर टक्के अँडरसनचे. सेहवाग काय चूक करू शकतो हे अचूक ध्यानी घेऊन त्याने चेंडू टाकला. सेहवागच्या बॅटजवळून चेंडू हळूवार बाहेर काढला आणि या सापळ्यात सेहवाग अलगद फसला. बाकीचं काम कर्णधार स्ट्रॉसनं स्लीपमध्ये केलं. भारतीय संघाच्या वर्मावर पहिला घाव घालण्यात साहेब यशस्वी झाले. दिवसभरात त्यांनी गंभीर आणि द्रविडवर दडपण राखण्यात यश मिळविले. भारतीय संघाचा पराभव अटळ आहेच. हा पराभव फक्त लहरी निसर्ग लांबवू शकतो जर तो पावसाच्या रुपात बरसला तर. सर्व फलंदाजांचा कस पाहणारी स्थिती येऊन ठेपलेली आहे. सर्व खेळाडूंनी मिळून ही परिस्थिती हाताळली, समजून उमजून फलंदाजी केली तरच काहीतरी होऊ शकतो अन्यथा...
त्यापूर्वी आज दिवसभरात पुन्हा एकदा भारतीय गोलंदाजीचा मनोभंग करत कुकने मॉर्गन (104) आणि ब्रेस्नन (53) यांच्या संगतीने आजची दिवसभराची परिस्थिती हाताळली. ज्या खेळपट्टीवर दिग्गज भारतीय फलंदाज गळपटले त्याच खेळपट्टीला वश करून घेऊन भारतीय संघाचं क्रमांक एकचं बिरुद हिसकावून घ्यायचंच या हेतूने कुकने आजही कालचाच कित्ता पुढे गिरवताना 294 धावांची खेळी साकारली. बिचाऱ्याचे त्रिशतक हुकले. सायबांच्या सर्वच यशस्वी फलंदाजांनी भारतीय गोलंदाजीचा पार लोळा गोळा करून टाकला. एकालाही लय मिळू दिली नाही की बळी मिळू दिले नाहीत. संघाला कॉंक्रीट स्थितीत पोचविण्याची एकही संधी त्यांनी सोडली नाही. हिरव्यागार आऊटफिल्डवर भारतीय क्षेत्ररक्षक चेंडू आणून गोलंदाजांकडे देण्याचे काम दिवसभर करत राहिले. काल दिवसभरात सोडलेल्या झेलांचे मोल किती मोठे होते हे कुक आणि मॉर्गनच्या खेळीवरून भारतीय खेळाडूंच्या लक्षात आलेच. दिवसभर घाम गाळल्यानंतर भारतीय गोलंदाजांना बळी मिळाले अवघे चार; मात्र तोपर्यंत धावांनी सातशेचा टप्पा ओलांडला होता. हरभजनसिंगच्या जागेवर मोठा गाजा-वाजा करत आलेल्या मिश्राची डाळ सायबांनी मुळी शिजूच दिली नाही. त्याचे चेंडू फिरक घेत होते; पण त्याला खेळण्यात इंग्लंडच्या फलंदाजांना फारशी अडचण आलीच नाही.
उद्या उपाहारापूर्वी सामन्याचा निकाल नक्की झालेला असणार आहे. भारतीय फलंदाज टिकून आणि टिच्चून खेळले तरच निभाव लागणार आहे, अन्यथा आणखी एक मानहानीकारक पराभव भाळी लिहिला जाणार हे नक्की.

2 comments:

भानस said...

इंटरेस्टच संपलाय आता... इतका एकतर्फी खेळ पाहवत नाही अगदी... :(

prajkta said...

aapan farch waet padhtine harlo. kahitari chukat aahe hey nakki.